Sunday, May 31, 2020

श्री ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराजांचे बोधवचन क्र ४५ --


श्रीमहाराजांचे बोधवचन क्र ४५ –

खडीसाखर ठेवली की मुंगळ्यांना आमंत्रण द्यावे लागत नाही; तसे, आपण सतत नामात राहिलो की सद्गुरू आपण होऊन आपल्याकडे येतील.

श्रीराम!
गोड खडीसाखरेसारखेच गोड वचन!
“जेथे नाम तेथे माझे प्राण” म्हणणाऱ्या श्रीमहाराजांनी हे सांगावे यात काय नवल! भक्तिमार्गातील सर्व अधिकारी सत्पुरुष हेच सांगतील. यात तीन गोष्टी आहेत –
१) जीवाच्या अपूर्णतेचे यथार्थ दर्शन आणि त्यामुळे शरणागती
२) नामाच्या संलग्नतेने येणारी सूक्ष्मता आणि नामाची शक्ती
३) संत - सद्गुरूंची आत्यंतिक करुणा

मनुष्य प्राणी संपूर्ण ईश्वराचा अंश असून देखील मायेच्या पडद्याने मूढता आली व मायिक वस्तुपदार्थांशी मेळ होऊन तो अपूर्ण बनला. त्याच्या पूर्वजन्मीच्या संस्कारानुसार व याही जन्मीच्या संस्कारानुसार आयुष्याच्या कोणत्या ना कोणत्या टप्प्यावर त्याच्या उद्धाराचा मार्ग जर त्याला गवसला व तो केवळ सांसारिक विषय चिंतन न करता या ईश्वरप्रदत्त आयुष्याबद्दल विचार करू लागला, तर त्याच्या लक्षात येते की सर्व काही केले तरी माझ्या मनीची अस्वस्थता का जात नाही? ‘मी पूर्ण समाधानी आहे’ असे मी का म्हणू शकत नाही? आयुष्यात काहीही घडले तरी माझ्या मनाचे समाधान टिकेलच याची ग्वाही मी का देऊ शकत नाही? असे अनेक प्रश्न अशा थोड्या ‘जाग्या’ झालेल्या माणसाच्या मनातही येतातच आणि मग शोध सुरु होतो अशा गोष्टीचा जी मला संपूर्ण समाधान देऊ शकेल. समर्थ रोखठोकपणे म्हणतात, “या संसारी सुख झाले ऐसे देखिले ना ऐकिले!” यापुढे जाऊन म्हणतात, “परम मूर्खामाजी मूर्ख जो संसारी मानी सुख!” सर्व संत सांगतात की, तुम्ही संसारात अनेक दुःखे आहेत असे म्हणता; वास्तविक संसार हा परमेश्वरानेच बनवलेला आहे. श्रीमहाराज तर म्हणायचे, की चोरापासून आणलाय का प्रपंच? त्यात वाईट काय आहे? आणि म्हणून ते म्हणतात, ‘संसारात’ दुःख नाही; संसार हेच दुःखमूळ आहे. इथे संसार म्हणजेच संसाराची, त्यातल्या वस्तुपदार्थ – व्यक्तींबद्दलची - देहाबद्दलची आसक्ती. ती सोडा, मग संसार दुःखमय नाही. परंतु हे समजणे देखील अजून मुमुक्षुत्व प्राप्त न झालेल्यास अशक्य आहे. पण तळमळ तर जात नाही, मग करायचे काय? अशा प्राथमिक अवस्थेकरिता देखील आजचे वचन आहे. कारण मायेत अडकलेल्या जीवाची ताकद नाही की मी अशा कुणा सत्पुरुषाकडे जाईन आणि ते मला मार्गदर्शन करतील. खरोखर संत संग मिळणे ही या भूमीवरची सर्वात दुरापास्त गोष्ट आहे. “बिनु हरिकृपा मिलहि नही संता!” एक वेळ भगवंत भेट होईल पण संतभेट होणे हे केवळ आणि केवळ कृपेनेच घडते! मग ही कृपा मिळवायची कशी? ते महाराज सांगतात, नामस्मरणाने! अमुक ठिकाणी साखर टाकली आहे असे म्हणून आपण मुंगळ्यांना आमंत्रण देतो का? त्यांना जसे साखरेचा गंध आपसूकच त्या जागी ओढून आणतो तसा नामाचा सुगंध संतांना – सद्गुरूंना त्या ठिकाणी खेचून आणतो. खऱ्या मुमुक्षु जीवांना याची पूर्ण कल्पना असते आणि म्हणूनच ते गुरु-शोधाआधी नामाला सुरुवात करतात. अनेक साधक भक्तांचा हा अनुभव आहे की गुरूंची भेट होण्यापूर्वीचे नाम किती तळमळीचे होते! आपल्याला नाथांची गोष्ट माहित आहे. गुरु जनार्दन स्वामींची भेट व्हावी याची लहानग्या एकनाथाला किती तळमळ लागली होती! श्रीमहाराजांनी नवव्या वर्षी घर सोडले; कशासाठी? गुरुभेटीसाठी! आता हे लोक ईश्वरकोटीचे असले तरी सामान्य साधकांना देखील हा अनुभव येतो, जर तळमळ खरी असेल तर!

हे केवळ प्राथमिक साधकांसाठी आहे असे मात्र समजू नये. सद्गुरू भेट ही खरे तर देहाने किंवा अमुक स्थानावर अशी व्हायची नसतेच. ‘सद्गुरू आपल्याकडे येणे’ याचा खरा अर्थ आहे, सद्गुरूंचे आपल्या हृदयाच्या गाभाऱ्यात पदार्पण होणे. किंवा असे म्हणता येईल की जे तत्त्व हृदयमंदिरी आधीपासूनच विराजमान होते त्याची चाहूल लागणे! सर्व मानसपूजेचे सार या परिणतीमध्ये आहे. जिथे हृदयापासून घेतलेले नाम आहे, तिथून सद्गुरू दूर राहू शकत नाहीत. आम्हाला खरोखर त्यांच्या नामाच्या प्रेमाची कल्पना येऊच शकत नाही. एक थोर संत राहतात वृंदावन मध्ये, श्री हित प्रेमानंद गोविंद शरण महाराज. ते दिवसभर अनेक मुमुक्षु साधकांच्या उद्धारासाठी सत्संग चर्चा वगैरे चालवतात. पण म्हणतात, यासाठी ठराविक वेळ ठेवलेली आहे, त्याबाहेर ते कुणाला भेटत नाहीत. आपल्या कुटीमध्ये नामात दंग असतात. म्हणतात, नाम हा माझा खुराक आहे. तो मिळाला तरच हे बाकी सर्व चालू शकेल. पोचलेले संत बरं हे! पण नामाचे प्रेम बघा. महाराज म्हणतात ना, एकदा का ते प्रेम आले, की त्याच्या आड इतर काहीही येऊ शकत नाही!

हे ज्या साधकांना गुरुकृपेने समजते, त्यांना असे अनेकानेक अनुभव सतत येतात की संत सद्गुरूंची भेट त्यांना कोणत्या ना कोणत्या माध्यमातून होत राहते. भेट म्हणजे प्रत्यक्ष भेटायला हवे असे नाही. वर म्हटल्याप्रमाणे नामाने जी मनाला सूक्ष्मता येते त्यामुळे त्या सूक्ष्मतेत निरनिराळ्या तऱ्हेने ही भेट होते. कुणाला भावदशेत होईल, कुणाला कोणत्या श्रवणाच्या माध्यमातून, कुणाला स्वप्नातून होईल. जो नामात राहतो, त्याला या भेटींपैकी आपले मनाचे खेळ कोणते खरी भेट कोणती हे बरोबर समजते!  हे सूक्ष्म अनुभव शब्दात कुणाला कसे सांगता येतील?  

आणि गंमत अशी की ज्याला अशी ही भेट घडत राहते त्याला असे चुकूनही वाटत नाही की ही भेट माझ्या नाम साधनामुळे झाली. ज्याला माझे नामसाधन चांगले सुरु आहे असे वाटते तो अजून नामाच्या सूक्ष्म वातावरणात पूर्णपणे आला नाही असे संत म्हणतात. नामाच्या शक्तीची पूर्ण जाणीव असून देखील ‘जीवदशेत करून करून मी किती साधन करू शकतो?’ असा लीनतेचा भाव असलेल्या साधकाच्या हृदयदेशातच सद्गुरूंचे निवासस्थान असते, कारण तो स्वतःची शक्ती हरून संपूर्ण शरणागत असतो! आणि म्हणूनच वर म्हटल्याप्रमाणे सद्गुरू आपण होऊन जेव्हा अशा साधकाकडे येतात, तेव्हा त्याला त्यात केवळ अकारण करुणा दिसते!

त्यामुळेच ह्या वरच्या वचनातल्या नामाच्या खडीसाखरेत शरणागती अनुस्यूत आहे. शरणागती शिवाय गोडवा कसला? गंमत अशी आहे, लौकिकात जवळ काहीही नसले तर माणसाला एक प्रकारची दैन्यावस्था जाणवते. माझ्या जवळ अमुक गोष्ट आज असती तर मी सुखी असतो असे वाटते. मात्र शरणागत साधकाला याच्या बरोब्बर उलट ‘माझ्या’कडे काही आहे’ हा भाव चुकून सुद्धा मनात आला की पोटतिडीक उठते. तो सर्वस्वी लहान लेकराप्रमाणे सद्गुरूंवर – भगवंतावर निर्धास्तपणे अवलंबून असतो, त्याला त्यात कमीपणा नव्हे तर अभिमान वाटतो. नित्य नैमित्तिक कर्म तो निश्चितच करतो पण त्याचा मीपणाचा भावच पुसून गेल्याने प्रत्येक गोष्टीत त्याला केवळ कृपा दिसते!

कृपा श्वास कृपा उच्छ्वास| कृपेचीच काया कृपेचीच माया|
कृपेवीण नाही साधन क्षणाचे| कृपेने दुःखही सुखरूप साचे||
गुरू कृपेचा महामेरू| गुरू कृपाधिष्ठित करुणा पूरु|
गुरू कृपेचेच सगुण रूप| कृपा-गुरू दोन्ही एकरूप||
वेष्टन ज्याने ल्याले कृपेचे| नामात ध्यान लागले तयाचे|
नाही नाही संदेह काही| क्षणोक्षणी कृपेत दर्शन होई||

अशी त्याची अवस्था होते!

काय सांगावी नामाच्या साखरेची करामत!!! बिभीषण – जे रावणाच्या राज्यात राहिले, राक्षस कुळात जन्माला आले, परंतु नामाच्या मस्तीत जगले, भगवंताच्या चिंतनात बत्तीस दातांमध्ये जीभ राहावी तसे राक्षस समुदायामध्ये राहून Untouched राहिले. त्यांची ही नामाची साखर चाखायला कोण आले? प्रत्यक्ष हनुमंत! सर्व सत्संगतीचा पाया आणि कळस आहेत हनुमंत. वरच्या वचनात महाराज म्हणतात तसेच बिभीषणाचे झाले नाही का? सततच्या नाम चिंतनाने भल्या पहाटे प्रत्यक्ष हनुमंत विप्रवेषात दारासमोर उभे राहिले. दर्शन झाल्यावर बिभीषण काय म्हणाले? त्यांनी आपल्या नाम साधनेची महती गायली नाही. म्हणाले,
अब मोहि भा भरोस हनुमंता| बिनु हरिकृपा मिलहि नही संता|
जौं रघुबीर अनुग्रह कीन्हा| तौ तुम्ह मोहि दरसु हठि दीन्हा||
-- आता माझा पूर्ण विश्वास बसला की भगवंताच्या कृपेशिवाय संत दर्शन होत नाही. माझ्यावर निश्चितच रामरायाची आत्यंतिक कृपा आहे, ज्यामुळे तुम्ही मला आज दर्शन दिलेत!

त्यामुळे आजच्या वचनात श्रीमहाराजांनी जे सांगितले की नाम घ्या, सद्गुरू आपण होऊन तुमच्याकडे येतील, हे तर खरे आहेच; परंतु एक साधक म्हणून आपल्याला असेच वाटले पाहिजे की नाम मुखात आले ही देखील त्यांची करुणा म्हणून आणि त्यांची हृदय-भेट झाली ती देखील केवळ भगवंताची अपार कृपा म्हणून! असे वाटण्यातच सद्गुरू चरणी झालेल्या समर्पणाचा गौरव आहे!

||श्रीनाम समर्थ||

Saturday, May 30, 2020

श्री ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराजांचे बोधवचन क्र ४४ --

श्रीमहाराजांचे बोधवचन क्र ४४ –

अत्यंत गुह्यातले गुह्य जे आहे ते मी तुम्हाला सांगतो – नामाचे प्रेम हेच ते गुह्य होय.

श्रीराम!
संत सद्गुरूंना उगीच माऊलीची उपमा दिली जात नाही. जसे आधीच्याही एका चिंतनात आपण बघितले तसे संत हे आई व भगवंत हा बाप असे म्हटले जाते. वडलांची शिस्त असते; अमुक अमुक सर्व केलंस तर तुला आवडती गोष्ट मी तुला देईन असं ते म्हणतात. आई मात्र म्हणते, असू द्या हो; तो ‘माझा बाळ’ आहे, आपण देऊन टाकू त्याला! तसे हे आजचे श्रीमहाराजांचे वचन वाचून वाटते. भगवंतांनी अर्जुनाला गीतेचे १८ अध्याय सांगितले, ज्यात ज्ञान, कर्म, योग, भक्ति वगैरे सर्व सांगितले आणि मग अठराव्या अध्यायात शेवटी शेवटी म्हणाले, तू माझा आवडता भक्त आहेस, म्हणून मी आता या सर्वांपेक्षा गुह्यतम अशी तुझ्या कल्याणाची गोष्ट तुला सांगतो. मग भगवंतांनी दोन श्लोकांत या गुह्यतम अशा गोष्टीचे वर्णन केले –

मन्मना भव मद्भक्तो मद्याजी मां नमस्कुरु|
मामेवैष्यसि सत्यं ते प्रतिजाने प्रियोऽसि मे||
-- माझ्या ठिकाणी चित्त ठेव, माझा भक्त हो, माझी उपासना कर आणि मलाच नमस्कार कर, म्हणजे तू मलाच येऊन मिळशील. माझा तू आवडता आहेस म्हणून मी प्रतिज्ञापूर्वक हे तुला सांगत आहे.
आणि हे होण्यासाठी काय करावे व त्यामुळे काय होईल हे पुढच्या श्लोकात सांगितले,
सर्वधर्मान्परित्यज्य मामेकं शरणं व्रज|
अहं त्वा सर्वपापेभ्यो मोक्षयिष्यामि मा शुचः||
-- सर्व धर्म सोडून तू मला एकट्यालाच शरण ये. मी तुला तुझ्या सर्व पातकांपासून मुक्त करीन. तू आपला शोक सोडून दे.

गीता ही मायेत अडकलेल्या जीवांच्या उद्धारासाठी अर्जुनाला आमचा Representative म्हणून ठेवून भगवंतांनी लीला रचली आहे. जीव ‘मीपणा’च्या, अहंकाराच्या आहारी गेलेला असल्याने त्याला एकदम ‘शरणागत हो’ म्हणून सांगून तो होणार नाही. भगवंत जणू म्हणाले, “Let him go through the ordeal of different paths and then come to me devotedly when he will lose the battle!” – सगळे मार्ग अवलंबून बघितल्यावर देखील, अगदी विश्वरूप दर्शन झाल्यावर देखील, म्हणजेच आत्मज्ञान झाल्यावर देखील जेव्हा जीवाची तळमळ संपत नाही, तेव्हा भगवंत थेट भक्तीचा – शरणागतीचा मार्ग सांगतात.

आमच्या गुरुमाऊलीला मात्र ‘आनंदाच्या अंशांची’ विनाकारण चाललेली धडपड आणि तळमळ बघवत नाही. महाराज एकीकडे म्हणतात, ‘या जगात दुःख करावे असे काही नाहीच.’ काय जबरदस्त विधान आहे! या विधानामागचे सत्य, गुह्य महाराज आजच्या वचनात सांगतात – नामाचे प्रेम! ते जणू म्हणतात, कशाला वेगवेगळ्या गोष्टींच्या मागे लागून अजून उपाधि ओढवून घेतोस? आहे ती देहाची उपाधि थोडी का आहे? या सर्वांतून मुक्त होऊन अखंड आनंद उपभोगण्याचा मार्ग मी तुला सांगतो, “नाम घे!” आज परमपूज्य तुकामाईंची – श्रीमहाराजांच्या गुरूंची पुण्यतिथी आहे. जे स्वतः नाथपंथीय होते, तरी देखील भक्तिमार्गाला सारभूत मार्ग मानणारे होते व त्यांच्याच आज्ञेनुसार श्रीमहाराजांनी आजन्म केवळ साराचे जे सार अशा रामनामाचा प्रसार केला!

नामस्मरण हे असे साधन आहे, ज्यामुळे वर भगवंतांनी ज्या गोष्टी सांगितल्या, चित्ताचे समर्पण व शरणागती, या सहजच होतात. नाम व शरणागती या एकाच नाण्याच्या दोन बाजू आहेत. मनापासून भगवंताचे नाम घेणाऱ्याला सहजच नामाच्या – भगवंताच्या विशालतेचा अनुभव आल्याशिवाय राहत नाही. कितीही अहंकारी मनुष्य असला तरी देखील नामाने त्याची सदसद्विवेकबुद्धी जागी झालीच पाहिजे! नामाने अंतःकरणातील घाण वर येऊ लागते. श्रीमहाराज याला विकारांना नोटीस मिळणे म्हणतात. हळूहळू नामाच्याच अनुसंधानाने व गुरुकृपेने जर साधकाने उद्भवणाऱ्या काम-क्रोधादि विकारांकडे नुसते बघायचे व त्यांना entertain करायचे नाही असे ठरवले तर हळूहळू आपले काम आता इथले संपले असे समजून ते विकारच त्या साधकाला सोडून जातात. अशा रीतीने चित्तशुद्धी झाली की मग अजून श्रद्धापूर्वक नामस्मरणाचा अभ्यास होतो व साधक सहज त्या परमदिव्य शक्तीला शरणागत होतो.

आजच्या वचनात श्रीमहाराज आम्हाला नामाचाच अनुभव जणू सांगताहेत. गुह्यातले गुह्य हे निश्चितच अंतिम साध्य असले पाहिजे नाही का? गुह्यतम गोष्ट मिळाल्यावर अजून काही मिळवायचे शिल्लक आहे हा भावच पुसला जातो. म्हणून महाराज म्हणतात, नामाचा अनुभव नामातच येईल! अजून एकीकडे ते म्हणतात,
“सांगतो ते करणे, याशिवाय दुसरे काही न करणे याचे नाव अनन्यभक्ती. या करण्याचा मोबदला मागितला तर त्याला भक्ति कशी म्हणायची? अखंड स्मरणात राहणे, दुसऱ्याची चाड नसणे हा नव्हे का अनुभव? अमुक हवे किंवा नको असे वाटले तर समाधान कसे होईल? नामाशिवाय कशाने काही मिळत नाही हे समजले म्हणजे तो शिकला! सद्गुरू आज्ञा प्रमाण माना व अनुभवाचे पाठीमागे लागू नका. इतके करूनही तळमळ लागत असली तर त्यापेक्षा आणखी काही मिळणे आहे असे नाही का होत? जे सांगितले त्यातच सर्वस्व आहे असे माना, त्यातच सत्य आहे असे माना, मग तळमळ कशी लागेल? गुरू आपल्यामागे येण्यास त्याला जे आवडते ते, म्हणजे नाम घ्या; म्हणजे वासरामागे गायीप्रमाणे ते येतील! नामातच गुरूला पहा!”

हे म्हणजे महाराजांनी आम्हाला परीक्षा देण्याच्या आरंभीच उत्तरपत्रिका तयार करून हातात ठेवण्यासारखे आहे. सर्वोच्च परीक्षकाकडून उत्तर मिळाल्यावर हेच उत्तर बरोबर असेल की नाही, अजून काही वेगळा अभ्यास करू का? असे विचारणे वेडेपणाचे नाही का? म्हणजेच नामाचा अभ्यास सुरु केल्यावर आम्हाला जे विकल्प येतात त्या सर्वांचे कारण आम्ही नामाला हवे तितके दृढ श्रद्धेने न धरल्याने येतात. जो हे सर्व मायिक अडसर दूर ठेवण्याचा प्रयत्न करून नामाला आयुष्याचे सर्वस्व मानेल, त्याला प्रत्येक क्षण हा नामाच्या – नामीच्या – महाराजांच्या प्रेमाच्या वर्षावाचा असेल... असा असेल की ज्याबद्दल बोलणे अशक्य होईल!!!

||श्रीनाम समर्थ||

Friday, May 29, 2020

श्री ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराजांचे बोधवचन क्र ४३ --


श्रीमहाराजांचे बोधवचन क्र ४३ –

नाम हे त्याच्या शत्रूला सुद्धा जर मदत करते तर ते आपल्याला मदत करीलच.

श्रीराम!
भगवंताचे वर्णन करताना “समदर्शिनः” असे केले जाते. बापाला जशी सर्व मुले सारखीच तसे भगवंताला कुणी कमी जास्त नाही. एक मनुष्य त्याची भक्ती करतो आहे म्हणून त्याला श्वासाला ऑक्सिजन पुरवतो; दुसरा नास्तिक आहे म्हणून त्याला पुरवणार नाही असे भगवंताच्या न्यायालयात नसते. सूर्योदय, चंद्रोदय, वारा, पाउस, जमिनीतले सृजन असा निरनिराळा सृष्टीचा क्रम लक्षात घेतला तर हे सहजच ध्यानात येण्यासारखे आहे. आणि किती स्वाभाविक आहे हे! शत्रु किंवा मित्र कुणाचे असतात? ज्यांना काही ना काही लहान मोठी अपेक्षा असते त्यांना. जो स्वतः सर्वांग परिपूर्ण आहे, सर्वार्थाने पूर्णकाम आहे, जो स्वतः जनाच्या योग्य अपेक्षांची पूर्ती करणारा आहे, त्याला कुणाकडून काय हवे असणार? आणि म्हणून ‘अंशी परमात्मा’ आपल्या अंशांचे – जीवांचे योगक्षेम चालवण्यात कसूर करत नाही. यासाठीच श्रीमहाराज एकीकडे म्हणतात, आपण जीवन जर सृष्टीक्रमावर सोडले तर निश्चित सुखी होऊ! सर्व गडबड त्या सृष्टीक्रमात आम्ही लुडबुड करून तिच्या कार्यात विघ्न आणल्यामुळे आहे. परंतु तरीही भगवंत आपले चर अचर सृष्टीकार्य अविरत करताहेत!

या भूतलावर भगवंताचे साक्षात स्वयंभू प्रतीक हे त्याचे नाम आहे. म्हणून नामचंद्रिका म्हणते,
“नामैव परमो देवो सम्यक् कल्याणकारक:” सम्यक रूपाने सर्व जीवांचे कल्याण करणारे असे हे भगवंताचे नाम प्रत्यक्ष भगवंत स्वरूपच आहे! जसे वर आपण भगवंताचे समदर्शित्व बघितले, त्याच धर्तीवर संतश्रेष्ठ तुलसीदास आपल्या रामचरितमानस मध्ये म्हणतात,
भायँ कुभायँ अनख आलसहूँ| नाम जपत मंगल दिसि दसहूँ||
-- प्रेमाने, वैराने, क्रोधाने किंवा आळसाने देखील जर नाम जपले तर दाही दिशांना कल्याणच होते.

अजून एकीकडे रामाच्या सगुण रूपापेक्षाही त्यांचे नाम श्रेष्ठ कसे ते सांगताना तुलसीदास म्हणतात,
सबरी गीध सुसेवकनि सुगति दीन्हि रघुनाथ|
नाम उधारे अमित खल बेद बिदित गुन गाथ||”
-- श्री रघुनाथांनी (सगुण रूपात) शबरी, जटायू इत्यादी उत्तम सेवकांनाच मुक्ती दिली, परंतु नामाने असंख्य दुष्टांचा देखील उद्धार केला; अशा नामाच्या गुणांच्या (परिणामांच्या) अनेक कथा वेदांमध्ये प्रसिद्ध आहेत.

आजच्या बोधवचनात एक वेदांतिक उपदेश महाराज आम्हाला करतात की ‘पूर्णाला’ धरलेला ‘अपूर्ण’ कसाही असला तरीही पूर्णच बनतो! महत्त्वाचा शब्द आहे, “धरणे!” जसे, पारस लोखंडाच्या मध्ये एका केसाएवढे अंतर असले तरी ते लोखंड सोने बनू शकत नाही; मात्र एका स्पर्शात त्याचे सोने बनते! अग्नी माझ्यात कोण प्रवेश करतो आहे हे बघत नाही, काहीही जरी अग्नीच्या संपर्कात आले तरी भस्म होणे हाच त्याचा परिणाम. विष कसेही खाल्ले तरी प्राण घेणे हाच त्याचा धर्म! तसे, नामाचा ‘वस्तुधर्म’च हा आहे की नामाला – भगवंताला कोणत्याही भावातून धरलेला वाया जात नाही! पण ‘धरणे’ या शब्दाला भेसळ चालत नाही. म्हणजे काय? तर कोणत्याही भावाने धरले परंतु जर भाव शुद्ध नसला तर मात्र अनन्यता छेदली जाते आणि काम होत नाही.

मग तो अगदी वैर-भाव, भयाचा भाव, असे विपरीत भाव असले तरीही. रावण, शिशुपाल कोण होते? भगवंताचे ‘अनन्य’ वैरी होते. रावणाला दिवसरात्र श्रीरामप्रभूंशी शत्रुत्व करण्याशिवाय दुसरा कसला विचारच नव्हता. कंस श्रीकृष्णाच्या भयाने त्याच्या जन्माच्याही आधीपासून केवळ त्याचेच भीतीच्या भावाने दिवसरात्र स्मरण करीत होता. म्हणून श्रीमहाराज रामपाठात म्हणतात, “विरोध भक्तीने रावण वैकुंठपदी पावविला!” याला विरोध भक्ति म्हणतात. परंतु अशा विरोधातही दंभ विरहित अनन्य भावाने तो विरोध घडल्याने भगवंत त्यांनाही मुक्ती देतात. भगवंतांइतका दयाळू कोण आहे? स्वतःच्या छातीवर प्रहार करणाऱ्या भृगुंचे पाऊल भक्ताचे पाऊल म्हणून मिरवणाऱ्या करुणानिधान भगवंताच्या करुणेचा पार लागणे अशक्य!

श्रीमहाराज आजच्या वचनात एक मोठा विश्वास आमच्याबद्दल दाखवत आहेत की, आम्ही भगवंताचे शत्रु नाही! म्हणजे भाव काही असो, निदान शत्रुत्वाचा भाव तरी नाही. खरेच आहे. आम्ही आमचेच शत्रु आहोत, की अजूनही आम्हाला संपूर्णपणे कुणाला धरायचे याचे आकलन झालेले नाही व त्यामुळे आम्ही निरनिराळ्या आसक्तींमध्ये आमचा वेळ आणि शक्ती वाया घालवत आहोत. मात्र हे देखील खरेच की संपूर्णपणे भगवंताला – सद्गुरूंना धरणे ही जीवाच्या अखत्यारीतली गोष्ट नाही. मात्र प्रयत्न करणे व चहूकडे भटकणाऱ्या मनाला वरचेवर चुचकारून केंद्राकडे आणणे हे नक्कीच करू शकतो – केले पाहिजे. यासोबत जर आम्ही सद्गुरूंची निरंतर मनापासून प्रार्थना केली की, काहीही करा पण मला तयार करा! मग त्या गुरुमाऊलीचे अंतःकरण द्रवते व आम्हाला गुरूंना पूर्णपणे धरता यावे यासाठी सत्संग आणि अध्यात्मिक बळाचे दान सद्गुरू करतात!

आजच्या वचनातली मेख म्हणजे, “नाम मदत करीलच!” असे म्हणतात महाराज. खरे आहे की जो नामात राहिला त्याच्या प्रपंच – परमार्थ दोन्हीची जबाबदारी नामावर – गुरूंवर – भगवंतावर जाते; परंतु खरी जबाबदारी जी त्यांच्याकडे जाते ती म्हणजे, या जीवाचा उद्धार कसा होईल याची! प्रपंचाची जबाबदारी या अर्थाने जाते की ज्याने नामाला ‘धरले’ त्याची संसार आसक्तीच कमी होऊन जाते व जी परिस्थिती येईल त्यात तो आनंदाने हसत खेळत संसार करतो. मात्र पारमार्थिक जबाबदारी ही थोडी थोडकी गोष्ट नव्हे. सद्गुरू ही जबाबदारी आपल्या शिरावर घेतात! मग कसली भीती? “रघूनायकासारिखा स्वामी शिरी| नुपेक्षी कदा राम दासाभिमानी||”!!!

महाराज म्हणतात, जो गुरूचा झाला, जो नामात राहिला त्याला शेवटपर्यंत पोहोचवण्याची जबाबदारी गुरूवर जाते! या भूमीवर जन्म घेतलेल्या जीवासाठी याहून मोठी मदत ती कोणती? आज आम्हाला याची खरेच उत्कटता, महत्त्व कळत नाही इतके आम्ही स्वतःमध्ये मश्गुल आहोत. यासाठीच महाराजांवर, त्यांच्या वचनांवर संपूर्ण निष्ठा ठेवूनच आम्हाला वाटचाल केली पाहिजे; म्हणजे मग नामाने केलेली मदत म्हणजेच नामाचे अनंत, अपार, गूढ आणि अक्षय्य प्रेम मिळणे होय, याची खात्री एक दिवस आम्हाला गुरुकृपेने पटेल! कान्हनगडचे स्वामी रामदास म्हणतात,

"God is all mercy, all love, all joy, all wisdom and all peace. Be conscious always that you are repeating His Name and it is bound to purify you and remove all the restlessness of mind."

||श्रीनाम समर्थ||

Thursday, May 28, 2020

श्री ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराजांचे बोधवचन क्र ४२ --


श्रीमहाराजांचे बोधवचन क्र ४२ –

भगवंताचे नाम हे बाणासारखे आहे. जसा शत्रु तसा बाण. अहंकार मारायला नाम हाच खरा बाण आहे. नाम एका बाजूने शत्रूला मारील तर दुसऱ्या बाजूने आपल्याला तारील.

श्रीराम!
भगवंताचे नाम, रूप, लीला, धाम, त्यांच्या सगुण रूपाची श्री अंगे, त्यांची आयुधे, आणि भगवंतावर प्रेम करणारे संत या सर्वांमध्ये अभेद आहे असे भक्तिशास्त्र सांगते. रामबाण आणि नामबाण यातही तसाच अभेद आहे. रामबाण जसा अहंकारी शत्रूला मारायला सर्व समर्थ आहे, तसाच नाम बाण हा अंतरंगात लपलेल्या आणि देहबुद्धीने पोसलेल्या अहंकाराला मारायला सर्व समर्थ आहे असे महाराज आजच्या वचनात आम्हाला सांगताहेत. “जसा शत्रु, तसा बाण!” रावणासारख्या अत्यंत अहंकारी राक्षसाला आपली घमेंड सोडण्याचा आग्रह करताना त्याची शालीन पत्नी मंदोदरी म्हणते,

“राम बान अहि सरिस निकर निसाचर भेक|
जब लगि ग्रसत न तब लगि जतनु करहु तजि टेक||”
-- मंदोदरी म्हणते, श्रीरामांचे बाण हे सर्पांच्या समूहासारखे आहेत आणि राक्षसांचे समूह त्यांच्यापुढे बेडकांसारखे आहेत. ते बाणरूपी सर्प जोपर्यंत या बेडकांना खाऊन टाकत नाहीत, तोवरच आपला हट्ट सोडून काही उपाय करा!   

संत सत्पुरुष व साध्वी स्त्रिया श्रीरामांचा महिमा जाणून असतात. वरच्या दोह्यात आम्हाला भगवंत आणि त्यांचे शत्रू यात कसा विरोधी संबंध असतो हे तुलसीदासांनी दाखवून दिले आहे. हाच संबंध भगवंताचे नाम आणि आपल्या आतले सहा शत्रू यांमध्ये आहे. काम, क्रोध, लोभ, मोह, मद, मत्सर हे षड्रिपू आम्हाला भगवंताच्या राज्यातून ओढून आणून मायेच्या स्वाधीन करतात. हे कमी म्हणून की काय, या सर्वांवर सोज्वळतेचे खोटे पांघरूण घालायला दंभ सज्ज असतो. दंभ मिसळला की हे षड्रिपू रावणापेक्षाही भयंकर होतात. रावण निदान उघड उघड भगवंतांशी वैर करत होता. दंभाच्या बुरख्याखाली मात्र हे षड्रिपू परमार्थाचे मित्र असल्याचे भासवून त्याच्याशी अंतर्गत Cold war मधे जणू असतात. म्हणून श्रीमहाराज म्हणतात, सर्वात घातक जर काही असेल तर ते म्हणजे ढोंग. “तुम्ही काहीही केले नाहीत तरी चालेल, ढोंग मात्र करू नका” असे महाराज म्हणतात ते यामुळेच! दंभाच्या आहारी गेलेला साधक झोपेचे सोंग घेतलेल्या माणसाप्रमाणे आहे. सापाला डब्यात झाकून ठेवले तरी झाकण उघडल्याबरोब्बर जसा तो फुत्कारून बाहेर येतो, तसा दंभाच्या पांघरूणाखाली दबलेला ‘सात्विक थाट’ सतत वर येण्यास धडपडत असतो! तमोगुण, रजोगुण यांच्या अंतर्गत असलेले स्थूल अहंकार ताब्यात येतील कदाचित; पण सत्वगुणाच्या पांघरूणाखाली दडलेल्या मीपणाच्या अहंकारावर मात करणे खरोखर गुरुकृपेशिवाय अशक्य आहे!

आणि ही गुरुकृपा होण्यासाठी खात्रीचा उपाय म्हणजे गुरूंनी दिलेल्या नामाचा प्रेमपूर्वक अभ्यास! म्हणून महाराज म्हणतात, “अहंकार मारायला नाम हाच खरा बाण आहे!”

सहज जाता जाता --
सुंदरकांडात अजून एक अमोघ बाण आहे, सगळीकडे भरून उरलेला आणि तरीही लपलेला!
                          “!!!हनुमंत!!!”
रामाचे चरित्र हनुमंताच्या चरित्राशिवाय अपूर्ण आहे. किंबहुना दोन्ही चरित्रात भेदच नाही इतके हे भक्त आणि भगवंत एकरूप आहेत. परंतु तरीही,
“सो सब तव प्रताप रघुराई| नाथ न कछु मोरि प्रभूताई||” – रघुराई, सर्व प्रताप तुमचा आहे; हे नाथ, यात माझा कोणताही मोठेपणा नाही” असे म्हणून सर्व करून नामानिराळा राहणारा हनुमान! खरे बघू जाता, एक केवळ हनुमंत असे होते, ज्यांच्या सहाय्याची प्रत्यक्ष सगुण रूपधारी भगवंतांना देखील जरूर लागली, एकदा नाही अनेकदा. तरीही भक्ताचा हा सहज स्वभाव असतो की त्याला आपल्याकडून घडणाऱ्या कोणत्याही कर्मात प्रभुकृपेशिवाय काही दिसतच नाही! आणि म्हणूनच हनुमंतासारखा अमोघ असा रघुपतींचा बाण, जो स्वतः नामरूप आहे, तो रामायणात सगळीकडे भरून आहे आणि तरीही आपल्या अंगभूत लीनतेने लपलेला आहे; तसेच राहायला त्याला आवडते... उगीच ‘राम-दुलारा’ नाही तो!
सीता मातेच्या शोधार्थ हनुमंत निघाले, तेव्हा तुलसीदास वर्णन करतात,
“जेहि गिरि चरन देइ हनुमंता| चलेउ सो गा पाताल तुरंता||
जिमि अमोघ रघुपति कर ‘बाना’| एही भाँति चलेउ हनुमाना||”
-- हनुमान समुद्र ओलांडण्यासाठी निघाले, तेव्हा ज्या पर्वतावरून त्यांनी उडी घेतली, तो पर्वत तत्काळ खचून पाताळात गेला. ज्याप्रमाणे श्रीरामांचा अमोघ बाण जावा, त्याप्रमाणे वेगाने हनुमंत निघाले!
खरोखर हनुमंत श्रीरामांचा बाणच होते, ज्यांनी लंकापुरीत जाऊन राक्षसांमध्ये हाहाकार माजवला. या हनुमंतांच्या नामाच्या प्रेमाचे वर्णन करताना आपण म्हणतो,
“पंचप्राण हे पवनसुताचे| ‘राम’ जणू निश्वास तयांचे||”—रामनामात आकंठ बुडालेले हनुमंत हे स्वतः नामरूप असल्यामुळेच अहंकाराच्या राक्षसाचे शत्रू आहेत! त्यांच्या पुण्य पावन चरणांखाली आलेला पर्वताचा देखील अहंकार चूर होऊन तो पाताळी गेला; अशाच रीतीने हनुमत्स्वरूप असलेल्या सद्गुरूंनी दिलेल्या नामाने पर्वतासमान असलेला अहंकार देखील चूर होऊन तो साधक पारमार्थिक दैन्यतेकडे, लीनतेकडे झुकतो. One cannot realize His Grace without becoming smaller than the speck of dust!

श्रीमहाराज जे वचनात म्हणताहेत की “नाम एका बाजूने शत्रूला मारील तर दुसऱ्या बाजूने आपल्याला तारील” याचा अर्थ हाच आहे. नामरूपी बाणाने अहंकार रूपी शत्रू मेला की साधकाचे ‘पात्र’ तयार झाले! सध्या पंचाईत आमच्या पात्राची – भांड्याची आहे. सद्गुरू कृपा करायला तयार आहेत पण आमचे भांडे खरकटे असल्यामुळे ती कृपा सामावून घ्यायला आमच्या भांड्यात जागा नाही. महाराज म्हणूनच म्हणतात, “मी यायला तयार आहे आत पण तुम्ही बाजूला सरकत नाही, मी काय करू?” हे माझ्या ‘मीपणा’च्या अनंत जन्म साठलेल्या खरकट्याला स्वच्छ शुद्ध करण्याचे काम सद्गुरूंनी दिलेले रामनाम करते. सद्गुरूंचा सर्व खटाटोप आम्हाला जवळ बोलावण्यासाठी आहे. आम्ही म्हणतो, आम्हाला महाराजांच्या निकट जाण्याची इच्छा आहे. खरी इच्छा नाहीच ती. इच्छा खरी आहे माझ्या मायबाप गुरूची! ते आम्हाला जवळ बोलावून आमच्या ‘तयार झालेल्या पात्रात’ अखंड समाधानाचे दान देण्यासाठी आसुसलेले आहेत. आम्ही हे जरी लक्षात घेऊन त्यांच्या इच्छेखातर, त्यांच्या आनंदासाठी नाम जपले तर त्यांचा आनंदच माझा आनंद होता, आहे आणि राहील याची प्रचीती ते आम्हाला निश्चित देतील!

||श्रीनाम समर्थ||

Wednesday, May 27, 2020

श्री ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराजांचे बोधवचन क्र ४१ --


श्रीमहाराजांचे बोधवचन क्र ४१ –

नामाबद्दल सुरुवातीला सर्वांचीच वृत्ति साशंक असते; पण आपण सतत नाम घेत गेल्याने विकल्प कमी होतात. विकल्प जाऊन भगवंताचे संकल्प उठू लागले की आपले काम झाले.

श्रीराम!
भगवंतानी ‘संकल्प मात्रे’ या जगाची निर्मिती केली असे म्हटले जाते. ‘सर्वशक्तिसमन्वित:’ अशा भगवंतांना अशक्य काय? जीव देखील त्याचाच अंश असल्यामुळे जे ब्रह्मांडी ते पिंडी या न्यायाने ही संकल्पशक्ती जीवात देखील आली. जसे, वडिलांच्या इस्टेटीवर मुलाचा सहजच हक्क असतो; त्यासाठी त्याला वेगळे काही करावे लागत नाही. तसेच भगवंताच्या लेकरांना काही हक्क जन्मतःच मिळालेले आहेत, त्यामध्ये ही संकल्पशक्ती आहे. अर्थात भगवंतांची शक्ती ही मायेच्या पलीकडे असल्याने शुद्ध आहे; आमची शक्ती मायेत असल्याने व तिचा वापर मायिक गोष्टींसाठी आम्ही करत असल्याने अशुद्ध झाली आहे. किंबहुना या अशुद्ध शक्तीने जेव्हा विकृत स्वरूप धारण केले, तेव्हा त्या संकल्पाचे रूपांतर विकल्पात झाले.

भस्मासुराने जसा त्याला महादेवांकडून मिळालेल्या वरदानाचा उपयोग त्यांनाच मारण्यासाठी करण्याचे ठरवले, तशी ही विकल्प शक्ती आम्ही ज्याच्याकडून आम्हाला संकल्पशक्ती मिळाली त्या भगवंतालाच विसरण्यासाठी करू लागलो. नुसते विस्मरण नव्हे तर त्याच्या अस्तित्वावरच प्रश्नचिन्ह या विकल्पामुळे आले. यालाच परमार्थात अश्रद्धा किंवा संशय असे म्हणतात. परमार्थ मार्गाचा समूळ विध्वंस करण्याचे सामर्थ्य या विकल्पात आहे. परंतु, संत याही स्थिती आम्हाला सावरतात.

श्रीमहाराज म्हणतात, सुरुवातीला असे होणारच. कारण तुम्हाला भगवंताचा व त्याच्या नामाचा महिमा कळलेला नाही. म्हणूनच सर्व विकल्प भगवंताच्या संकल्पात बदलण्यासाठी केवळ नाम जपण्याचा अभ्यास करण्यास महाराज सांगताहेत. अनेकदा महाराज म्हणायचे, पूज्य बाबा बेलसरे सुद्धा आपल्या प्रवचनात सांगायचे की सर्व विकल्पांचे एकच कारण आहे, आमचे नाम कमी पडत आहे. प्रत्येकाला त्याच्या पूर्व जन्मींच्या संस्कारानुसार, त्याच्या गुरुभक्तीनुसार, गुरुंवरच्या श्रद्धेनुसार आणि नामासाठी वेळ देण्याच्या तयारीनुसार ‘परिणाम’ कळेल. हा परिणामच महाराज पुढच्या ओळी सांगताहेत, “विकल्प जाऊन भगवंताचे संकल्प उठू लागतील!”

मनुष्याचे मन सतत काही ना काही संकल्प करतच असते. सकाळी उठल्यापासून आज ऑफिसला इतक्या वाजता जायचे, आज स्वयंपाक अमुक करायचा, आज खरेदीसाठी या दुकानात जायचे, काही परीक्षा असेल तर त्यासाठी अमुक वेळ अभ्यासाला द्यायचा वगैरे. संकल्पांशिवाय मन नव्हेच. देहात अडकलेल्या मनाचा तो धर्मच आहे. थोडेसे आपण या मनापासून वेगळे होऊन बघण्याचा अभ्यास केला तर आपल्याला सहज कळू लागेल की दिवसभरात हजारो विचार संकल्प – विकल्पांच्या रूपाने आपण मनात वागवत असतो. हे मनाचे संकल्प चित्तात जाऊन वसले की त्यांना मूर्त स्वरूप येते व सतत त्याबद्दल चिंतन घडते. आपल्या सर्व संसारिक काळजी, चिंता यांचे मूळ या संकल्प – विकल्पात आहे. कोणत्याही गोष्टीचे हवेनकोपण हा देहबुद्धीचा दृश्य परिणाम आहे.

देहबुद्धीत अडकलेल्या मनाचे त्रांगडे असे आहे की रोजच्या व्यवहारात जे संकल्प आपले मन करते, त्याकडे फारसे योग्य अयोग्य न बघता ‘मनात आले म्हणून केले’ अशी बहिर्मुखता आम्ही दाखवतो व मनाचे गुलाम बनतो. मात्र जिथे गुरूंनी दिलेल्या नामाचा प्रश्न येतो, तिथे मात्र आम्ही शंभर वेळा विचार करतो की यातून मला काय मिळणार आहे, हे मला जमेल का?, हे मी केले तर माझ्या संसारात काही फेरफार होईल का?, नुसते नाम घेऊन खरेच भगवंत भेटेल का?, नामात मन लागत नाही तरीही नाम घेऊन उपयोग होईल का? असे एक ना अनेक! प्रत्येक गोष्टीचे कारण आणि परिणाम अशा दोन दृष्टीने विचार केला तर आपल्याला काय केले पाहिजे हे कळेल. या विकल्पांचे कारण आहे माझी देहाला चिकटलेली बुद्धी, आजूबाजूचे विषयी वातावरण आणि त्यामुळे केवळ देहाला प्रधानता देऊन केलेली माझी कर्मे. परिणामतः माझी बुद्धी नामाला कधी चिकटतच नाही. नाम घेतले तरीही केवळ ते एक कर्मच घडते. त्या कर्माची प्रेरणा त्याप्रत असलेल्या प्रेमाने किंवा भगवंताच्या ओढीने फारशी असत नाही आणि म्हणूनच कंटाळा, विसर, झोप अशी दुर्वृत्ती आम्हाला घेरते.

म्हणूनच महाराज आजच्या वचनात आम्हाला चिकाटीचे महत्त्व सांगत आहेत. ‘सतत नाम घेणे’ ही ती चिकाटी होय. पूज्य बाबा बेलसरे म्हणतात, “प्रेम असो वा नसो, जो कोणी चिकाटीने नाम घेईल, त्याच्यावर महाराज पोटच्या पोराप्रमाणे प्रेम करतील.” केवढे आश्वासन आहे हे! ‘प्रेम करतील!!!’ कोण? प्रत्यक्ष भगवद्रूप झालेले महाराज. कसे आहे, आम्ही अनेकदा म्हणतो, आमचे महाराजांवर प्रेम आहे. परंतु प्रेम ही इतकी साधी वस्तु नाही. आम्ही अपूर्ण असल्यामुळे ‘पूर्ण अशा प्रेमवस्तु’ ची आम्हास आज ओळख नाही. खरे प्रेम केवळ सद्गुरूच करू शकतात, त्या प्रेमातून ते आपल्याला ‘प्रेमाची ओळख’ करून देतात. किंबहुना असे म्हणण्यात यत्किंचित देखील अतिशयोक्ती होणार नाही की एक वेळ खरा द्वेष सहन करणे सोपे पण खरे प्रेम सहन करणे अवघड असते. हे कळायला आम्हाला महाराजांचे प्रेम जाणवले पाहिजे. सद्गुरू शिष्याला परम शुद्ध प्रेमात इतके बुडवून टाकतात की शिष्य त्या प्रेमाच्या नुसत्या स्पर्शाने भारावून जातो; मग जो पूर्ण होऊन त्या प्रेमात मस्त झाला त्याची अवस्था काय वर्णावी? आणि आजच्या वचनात महाराज जे आम्हाला ‘भगवंताचे संकल्प’ सांगत आहेत, तो याच प्रेमाप्रत जाण्याचा राजमार्ग आहे!

बहुतेक सर्व नामाबद्दलचे विकल्प संशय रूपाने असतात. महाराज म्हणतात, संशय घ्यायला हरकत नाही पण संशय आहे म्हणून नाम सोडू नका. जितके विकल्प येतात येऊ दे परंतु नाम सोडू नका. कारण केवळ नामच ‘पूर्ण’ आहे आणि संशय छेदण्याचे सामर्थ्य हे केवळ पूर्णातच असते! पूज्य बाबांची नामचंद्रिका नामाचे वर्णन “निःशेषं दोषवर्जितम्” असे करते. म्हणजेच नाम हे देहबुद्धिच्या पलीकडे असल्यामुळे जो नामाला धरतो त्याची बुद्धि ही सत्यसंकल्प बनते! आणि सगळा परमार्थ हा बुद्धीच्या सत्यसंकल्पावर आधारित आहे. एकदा बुद्धी स्थिर होऊन नामाशी निगडीत झाली की जे जे म्हणून संकल्प उठतील ते नामाला घेऊनच उठतील. अगदी लहान लहान गोष्टींना साधक मग नामाशी connect करू लागतो. जसे, आज एवढेच जेवायचे बरंका जेणे करून नंतर मला नामाला व्यवस्थित बसता येईल. आजचे काम इतक्या वेळात इतर कुठे न जाता, काही न करता लवकर आवरले पाहिजे, म्हणजे मला नामाला बसता येईल. ज्या ज्या म्हणून लौकिक जगातल्या गोष्टी माझ्या नामाच्या – साधनेच्या – भगवत अनुसंधानाच्या आड येताहेत त्या मग त्यागाव्या लागणार नाहीत, त्या सहजच सुटतील व त्या सुटल्या याचे देखील भान राहणार नाही! यालाच प्रत्येक कर्म भगवत समर्पित होणे असे म्हणतात. अशा साधकाचे प्रत्येक कर्म हे भगवद्भावनेला धरूनच असल्याने त्याचा प्रत्येक क्षणच त्याची साधना बनते आणि हे होण्यालाच महाराज “काम झाले” म्हणतात!

कसे आहे, नाम घेण्याला सुरुवात करणे हेच अत्यंत महत्त्वाचे आहे. एक श्लोक कर्ता म्हणतो,

गच्छन् पिपीलिको याति योजनानां शतान्यापि|
अगच्छन् वैनतेय: पदमेकं न गच्छति||
-- सतत चालत राहणारी मुंगी शेकडो योजने पार करू शकते. मात्र न चालणारा गरुड एक पाऊल देखील पुढे जाऊ शकत नाही!
आम्ही मुंगीच्या गतीने का होईना नाम घेत राहिलो, तर आज ना उद्या "महाराजांच्या प्रेमाच्या गावाला" नक्की पोहोचू! 

||श्रीनाम समर्थ||

Tuesday, May 26, 2020

श्री ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराजांचे बोधवचन क्र ४० --


श्रीमहाराजांचे बोधवचन क्र ४० –

अंतकाळी अगदी शेवटी सुटणारी वस्तु म्हणजे भगवंताचे नाम पाहिजे. नामात शेवटचा श्वास गेला पाहिजे.

श्रीराम!
“येच क्षणी मरोन जासी| 
तरी रघुनाथी अंतरलासी|
माझे माझे म्हणतोसी| 
म्हणोनिया||”
आपण जिथे देहाने राहतो आहोत त्याला ‘मृत्युलोक’ असे म्हणतात, जिथे मृत्यू हाच अंतिम परिणाम आहे. जो देहात आहे, त्याला मृत्यू आहे. म्हणजे, जे दिसते आहे ते आज ना उद्या नष्ट होणार आहे. अनंत काळापासून अनंत जीव वेगवेगळ्या योनीत जन्माला आले, जगले आणि मृत्यू पावले. वरच्या दासबोधातल्या ओवीत समर्थ म्हणतात, तुला माहीत आहे की कोणत्याही क्षणी मृत्यू ओढवू शकतो आणि तरीही तू “मी माझे” म्हणतोस आणि रघुनाथापासून दूर जातोस याला काय म्हणावे?

आजच्या परिस्थितीत प्रत्येक मनुष्याने यावर विचार करणे गरजेचे आहे. काय आहे परिस्थिती आज? सबंध जगभर एक टीचभर देखील नसलेला असा कोरोना व्हायरस धुमाकूळ घालतो आहे. माणसे आपल्या आप्तमित्रांपासून दूर जाऊन उपचार मिळून देखील मरत आहेत, अतिशय त्रासात जगत आहेत. ज्या उद्योग व्यवसायांवर आमची भिस्त होती की यामुळे आमचे जगणे सुसह्य होईल ते सर्व बंद पडले आहेत. सर्वत्र आत्यंतिक भीतीचे वातावरण आहे. कधी काय होईल भरवसा नाही यासारखी वाक्ये सर्रास ऐकू येत आहेत. ज्या जगातल्या सृष्टीसौंदर्याचे वर्णन करताना कवींची वाणी थकत नव्हती, त्या जगात कुठेही वावरणे अशक्य होऊन बसले आहे. घराच्या चार भिंतींमध्ये राहून लोकांना मानसिक दुर्बलता सतावते आहे. आपण मृत्यू म्हणजे आयुष्याच्या शेवटी येणारा तो एकच असे समजतो, ते तितके योग्य नाही. मनुष्य जोवर पूर्णाला चिकटला नाही, तोवर प्रत्येक क्षणी त्याचा मृत्यू होत असतो. गेलेला क्षण मृत्यूच पावतो ना? तो परत आणता येतो का? अगदी शरीरातली पेशी देखील सेकंदा सेकंदाला मृत्यू पावते व तिची जागा नवीन पेशी घेते हे शास्त्रीय सत्य आहे. असे असताना मनुष्याला मरणाचे विस्मरण का होते?

याचे कारण - जीव कसा आहे? तर,
“ईश्वर अंश जीव अविनाशी| चेतन अमल सहज सुखराशी||”
जीव त्या अनंताचा अंश असल्यामुळे तो स्वतःला सहजच मृत्युगत समजत नाही. परंतु त्याच्या अपूर्णत्वाचे त्याला विस्मरण झाले आहे व तो या जगात पूर्णत्व शोधायच्या भानगडीत पडल्यामुळे मुळात सुखराशी परमात्म्याचा अंश असून दुःख भोगतो आहे. याला उपाय एकच – त्या भगवंताशी पुनश्च योग आणि हा योग जुळण्याचे साधन - त्याचे अखंड नामस्मरण! म्हणून श्रीमहाराज आपल्याला सतत आठवण करून देतात की जोवर तू नामाला धरत नाहीस, तुला तुझी खरी ओळख होणार नाही. तू स्वतःला देह समजून सुखदुःखाच्या भोगांनी या मृत्युलोकात वरचेवर येत राहिला आहेस. यातून मुक्तीचा उपाय एकच, हा नश्वर देह सोडताना त्या भगवंताचे स्मरण!

भगवंत गीतेत म्हणाले,
“अन्तकाले च मामेव स्मरन्मुक्त्वा कलेवरम्|
यः प्रयाति स मद्भावं याति नास्त्यत्र संशयः||”
-- जो मनुष्य मृत्युच्या समयी माझेच स्मरण करीत देह सोडतो, तो माझ्या स्वरूपास प्राप्त होतो ह्यात संशय नाही.

परंतु, श्रीमहाराजांसारखे संत आम्हाला समजावतात, असे अंतकाळी नाम मुखात, स्मरणात येण्यासाठी आयुष्यभर आम्ही त्याचा अभ्यास केला असेल, त्या भगवंताच्या नामात आम्हाला प्रीति वाटू लागली असेल तरच अंतकाळी नाम आठवणार! कारण पुढच्याच श्लोकात भगवंत म्हणतात,
“यं यं वाSपि स्मरन्भावं त्यजत्यन्ते कलेवरम्|
तं तं एवैति कौन्तेय सदा तद्भावभावितः||”
म्हणजेच अंतकाळी ज्या स्वरूपाचे ‘चिंतन’ असेल, ज्या चिंतनात जीव मग्न असेल, त्याला तो जाऊन मिळतो.
म्हणजेच अंतकाळच्या स्मरणासाठी आयुष्यभराचे चिंतन महत्त्वाचे आहे. खरोखर सर्व परमार्थ हा चिंतनावर आधारित आहे. आम्ही चिंतन संसाराचे, पैशाचे, आप्तांचे करू आणि आम्हाला अंतकाळी मात्र भगवंत आठवू दे हे म्हणणेच विसंगत नाही का? यासाठीच समर्थ आठवण करून देतात, “मरणाचे स्मरण असावे| हरिभक्तीसी सादर व्हावे||” हे स्मरण निकोप असावे असे संत मुद्दाम सांगतात. म्हणजे मरणाच्या स्मरणाने उदास दुःखी होऊन स्मरण असणे योग्य नाही; तर मरण तर निश्चित आहेच, पण जिवंत असतानाच मी सद्गुरूंनी दिलेल्या नामसाधनेच्या मदतीने, त्यांच्याच कृपेने याची देही याची डोळा माझ्या देहबुद्धीचे झालेले मरण बघेन या दुर्दम्य सकारात्मकतेने साधन घडले पाहिजे!

होऊनिया जागे, उठा वेग करा|
शरण जा उदारा| रघुवीरा||

बायजीद नावाचे एक थोर संत होऊन गेले. अंदाजे पंचाहत्तर वय असताना एकाने त्यांना त्यांचे वय विचारले. ते म्हणाले, “चार वर्षे!” तो विचारणारा चपापला. ते म्हणाले, “अहो आयुष्याची सत्तर वर्षे वाया गेली. आता चार वर्षांपासून भगवंताच्या नामात मस्त आहे. त्यामुळे मी चार वर्षांचा आहे”
अल्पायुष्य मानव देह|
शत गणिले अर्धरात्र खाय|
मध्ये बालक पीडा रोग क्षय|
काय भजनासी उरले ते पाहे गा||
खरोखर जो सारासार विवेकाने हा विचार करील त्याचे नाम श्वासोश्वासी चाललेच पाहिजे, इतके या काळाच्या वेगवान गतीच्या आकलनात सामर्थ्य आहे. उगीच म्हणत नाहीत, “शिंक जांभई खोकला| इतुका वेळ वाया गेला||” अभ्यासाने काय अशक्य आहे म्हणतात महाराज?

आणि आपले श्रीमहाराज आपल्याला हा भरवसा देतात की जर तुम्ही मी सांगितलेल्या पद्धतीने नामाचा अभ्यास आयुष्य अजून असताना केलात, तर तुमच्या अंतकाळी मुखात नाम येण्याची जबाबदारी माझी! किती उदाहरणे आहेत. महाराजांच्या चरित्रात डोकावले तर अशी असंख्य उदाहरणे मिळतात, ज्यात साधक अगदी मृत्युशय्येवर असताना केवळ महाराजांनी शेवटच्या क्षणी त्याच्या मुखातून रामनाम वदवले व त्याला उत्तम गतीस नेले. फक्त विश्वास हवा आणि अजून वेळ असेतोवर प्रेमपूर्वक अभ्यास!

लक्षात घेतले पाहिजे की, We are not human beings having spiritual existence. We are spiritual beings having human existence. आपण स्वतः स्वतःला देहात बघितले म्हणून सगळा घोळ झाला. त्यापलीकडे बघण्याची दृष्टी आपल्याला सद्गुरू देतील जर आम्ही त्यांच्या वचनांवर श्रद्धा ठेवून नामाच्या आनंदासाठी हे जीवन जगलो! अहो, त्यांना काय हवे आहे? केवळ आपला आनंद! असा आनंद जो आजसारख्या भयानक परिस्थिती सुद्धा टिकेल व आयुष्याच्या अंती देखील त्यात किंचितशी देखील बाधा येणार नाही! सबंध आयुष्य जो नामाच्या मस्तीत जगेल ना, त्याला आपल्या आयुष्याच्या अंती आपल्या हक्काच्या घरी जाताना कसले आलेय दुःख? त्याचा मृत्यू हा जीवनापेक्षा मोठा उत्सव होईल यात काडीमात्र शंका नाही!

||श्रीनाम समर्थ||

Monday, May 25, 2020

श्री ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराजांचे बोधवचन क्र ३९ --


श्रीमहाराजांचे बोधवचन क्र ३९ –

जगात असे कोणतेही पाप नाही जे नामासमोर राहू शकेल. नामाची सत्ता फार बलवत्तर आहे.

श्रीराम!
उपनिषदे, पुराणे यांमध्ये एक संज्ञा आहे, ‘वस्तुधर्म’. जसे, दाहकता हा अग्नी चा वस्तुधर्म, तसेच पापक्षालन हा भगवन नामाचा वस्तुधर्म आहे. म्हणजे त्याशिवाय वेगळे काही असणे शक्यच नाही त्याला वस्तुधर्म म्हणतात. श्रीमहाराज जे सतत सांगत राहिले, “नाम आणि नामी किंवा भगवंत यात भेद नाही” हेच या नामाने होणाऱ्या पाप क्षालनाचे कारण आहे. अग्नी मध्ये काय पडले याची जाणीव अग्नी ला असते का? जशी कोणतीही वस्तु अग्नीमध्ये भस्मसात होते, त्याप्रमाणे भगवत नामाच्या परिघात जे येईल ते शुद्ध होईलच. भगवंताचे सर्वच्या सर्व गुण एकरुपत्वामुळे नामात जसेच्या तसे आहेत. अकारण करुणाकर भगवंत पाप आणि पुण्याच्या पलिकडे आहेत. अर्जुनाला गीतोपदेश देताना ते म्हणतात, “निस्त्रैगुण्यो भवार्जुन”... पाप आणि पुण्य दोन्हीही त्रिगुणात्मक आहेत. सत्व, रज, तमाच्या आपापल्या हिश्शाचे पाप आणि पुण्य जीवाला भोगावे लागते. पाप आणि पुण्य दोन्हीही बंधनकारकच असल्यामुळे भगवंत अर्जुनाला या दोन्हीच्या पालिकडे ‘निश्चल स्मरणाद्वारे’ जाण्यास सांगतात. याचे कारण नाम हे भगवत् रूप असल्यामुळे ते देखील त्रिगुणांच्या पलीकडे आहे व जो त्याला मनापासून धरतो, तो त्या नामाच्या शक्तीने त्रिगुणात्मिका मायेच्या पलीकडे आज ना उद्या पोहोचतोच.

श्रीमहाराज म्हणजे करुणासिंधु. अनेक लोक त्यांच्याकडे यायचे, आपले पाप कबूल करायचे. अशांना महाराज सांगायचे, “रामरायाच्या चरणांवर कबूल कर की पुन्हा ते पाप करणार नाही आणि करू नकोस. मग झालेल्याची जबाबदारी माझ्याकडे लागली!” हा असतो सद्गुरूचा अधिकार-विशेष आणि दया-विशेष! नाही... या जगात कुठेच आम्हाला अशी व्यक्ती सापडू शकत नाही जी आमच्या दुष्कृत्यांची जबाबदारी घेऊन आम्हाला सन्मार्गावर चालवण्यासाठी आसुसलेली आहे! आजच्या वचनात जे श्रीमहाराज सांगतात की कोणतेही पाप नामासमोर टिकू शकत नाही आणि महाराज म्हणतात, मी जबाबदारी घेतो. यावरून तरी कळते ना की महाराजच प्रत्यक्ष नामस्वरूप आहेत! जर तसे नसते तर इतके छातीठोकपणे कसे सांगू शकले असते? फक्त श्रद्धा हवी!

समर्थ दासबोधात म्हणतातच,

नामे पाषाण तरले| असंख्यात भक्त उद्धरले|
परम पापी तेचि जाले| परम पवित्र||
किती उदाहरणे द्यावीत असे संत विचारतात. अजामिळासारख्या दुराचाऱ्याच्या मुखात केवळ नाम आल्याने त्यांची होणारी दुर्गती रोखली गेली व तो महात्मा बनला. बिभीषण जेव्हा प्रभूंच्या दर्शनाला लंकेतून बाहेर काढले गेल्यावर आले, तेव्हा रामराया म्हणाले,
“सनमुख होइ जीव मोहि जबहि| जन्म कोटी अघ नासहि तबहि||” केवळ प्रभू विमुखता सोडून सन्मुख होण्याची गरज आहे आणि ही सन्मुखता केवळ नामच भगव
त् स्वरूप असल्याने साधून देते.

तुलसीदास सांगतात,
रामनाम की औषधी ‘खरी नियत’ से खाय|
अंग रोग व्यापे नहि महारोग (पाप) मिट जाय||

कसे आहे, वेदांमध्ये तपस्या, ध्यान इत्यादी इतर काही मार्ग देखील पापशमनाचे वर्णन केलेले आहेत. मात्र हातून घडलेल्या अनंत जन्मांच्या पापामुळे चित्ताची जी मलीनता आलेली असते ती मात्र नामाशिवाय शुद्ध होत नाही. वृंदावन चे थोर संत पूज्य श्री हित प्रेमानंद गोविंद शरण महाराज म्हणतात, भगवंत चिंतन आणि त्याचे नामस्मरण सोडून इतर चर्चा, वादविवाद, मनोरंजन हे जोवर आवडते तोवर अजून जन्मोजन्म साठलेली चित्ताची मलीनता आहे असे समजून साधकाने अधिकाधिक नामजप करावा. चित्तशुद्धी केवळ नामानेच होते. या जगातल्या नश्वर गोष्टींची आसक्ती किती कमी कमी होते आहे व नामाची गोडी किती वाढते आहे, यावरून साधकाने आपल्या चित्तशुद्धीची प्रत ठरवावी व तदनुसार आपले आचरण सुधारावे!

श्रीमहाराज वचनात ‘नामाची सत्ता’ म्हणतात. हे तोच म्हणू शकतो ज्याने नामाला सार्वभौमत्व दिले!
त्रिभुवनाचा सम्राट आहे भगवंताचे नाम!
त्या नामाची उंची, खोली कळण्यासाठी खरोखर गुरुकृपाच हवी.
भगवंत गीतेत जबरदस्त आश्वासन देतात,
“अपिचेत् सुदुराचारो भजते मां अनन्यभाक् |
साधुरेव स मन्तव्यः सम्यग्व्यवसितो हि सः||”
कितीही दुराचारी मनुष्य असो, जर तो मला अनन्यभावाने शरण येऊन नाम भजन करू लागला, तर त्याला साधुच मानावे, कारण त्याची बुद्धी योग्य ठिकाणी स्थित झालेली आहे.
ही आहे नामाची सत्ता! केवळ तो साधकच काय, श्रीमहाराज पुढे जाऊन म्हणतात, त्याचे कुळ देखील धन्य होते. म्हणतात,

नामापाशी सर्व सत्ता| नामे होय ब्रह्मवेत्ता||
नाम धन्य तिन्ही लोकी| नाम घेता होय सुखी||
नामे हरती दोष पाप| नामे होती नामरूप||
दास म्हणे नामी प्रीति| त्याचे पूर्वज उद्धरती||

हा आहे गुरु-प्रदत्त नामाचा महिमा! त्यात गुरूचे संपूर्ण अध्यात्मिक तेज मिसळलेले असते. गुरूची प्रीति, गुरूची कळकळ, अपार दया आणि प्रचंड अध्यात्मिक तेज यांचा मिलाफ म्हणजे नाम! श्री रामकृष्ण परमहंसांकडे आपले आयुष्य सुफळ करून घेतलेल्या ज्या अनेक व्यक्ती होऊन गेल्या, त्यांपैकी गिरीश चंद्र घोष सर्वांना सुपरिचित आहेत. नाम घेणे जमणार नाही असे स्वच्छ सांगणाऱ्या, रात्रंदिवस मदिरा आणि मदिराक्षी यांच्या गराड्यात असलेल्या गिरीश चंद्रांना रामकृष्णांनी आपल्या आयुष्याची मालकी (Power of attorney) फक्त त्यांच्याकडे सोपवण्यास सांगितले व म्हटले, हे केल्यास इतर काही करण्याची आवश्यकता नाही. गुरूंचे अध्यात्मिक तेज असे की हा मालकी हक्क सोपविल्याबरोबर स्व विसर्जित होऊनच गेला आणि अपोआप नामावर श्रद्धा दृढ होऊन आयुष्याची नौका किनाऱ्याला लागली! याचाच अर्थ नाम घेत गेले तर सहज समर्पण भाव येईल आणि जर आधीच समर्पण झाले तर नामात सहज प्रेम येऊ लागेल. दोन्ही एकाच नाण्याच्या दोन बाजू आहेत!

म्हणून श्रीमहाराज आपल्या सही शिक्क्यासह आपल्याला सांगतात,

बाधिजेना तुम्हा संसाराचे दुःख| रामनामसुख घ्या रे तुम्ही|
दीनदास म्हणे माझा रघुनाथ| चौऱ्यांशीचे अनर्थ चुकवील||

अजून काय हवे?

||श्रीनाम समर्थ||