Thursday, April 30, 2020

श्री ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराजांचे बोधवचन क्र १४ --


श्रीमहाराजांचे बोधवचन क्र १४ –

नामाच्या आनंदाचा झटका आला की मनुष्य स्वतःला विसरेल आणि जगाला सुद्धा विसरेल. काही काळ तो त्या अवस्थेत राहील. त्यातून थोडा खाली आला तर त्याची दृष्टी निराळी असेल; पण नाम पचले की मग तो साध्या माणसासारखाच दिसेल.

श्रीराम!
श्रीमहाराज एका अभंगात म्हणतात,
“श्रीराम म्हणा मुखी राम म्हणा मुखी | तेणे सर्वसुखी होशील तू ||
धन्य तो जगी होय रामदास | संसारी उदास असोनिया||”

हेच परम सुख सर्व संतांनी अनुभवले. ज्ञानियाच्या राजाचे गुरु संतश्रेष्ठ निवृत्तीनाथ एका अभंगात म्हणतात,

“हरिविण दैवत नाही पै अनुचित्ती | अखंड श्रीपती नाम वाचे ||
राम कृष्ण मूर्ती या जपा आवृत्ती | नित्य नामे तृप्ती जाली आम्हां ||
नामाचेनि स्मरणे नित्य पै सुखात | दुजियाची मात नेणो आम्ही ||
निवृत्ती जपतु अखंड नामावळी | हृदयकमळी केशीराज ||”

श्रीमहाराज म्हणतात, नामाबद्दल ज्याची शुद्ध बुद्धी, तोच संत! आणि अशी शुद्ध बुद्धी केवळ हरिनामाच्या ‘आश्रयानेच’ साध्य होते. नामाचा आश्रय म्हणजेच नामीचा आश्रय हे सर्व संतांनी ठासून सांगितले. वरच्या वचनात श्रीमहाराज जे म्हणतात, त्या नामाचा आनंद असा आहे की मनुष्य स्वतःला विसरेल. सर्व अध्यात्म साधनेचे फळ आहे ‘खोट्या मी ची विस्मृती’! श्रीमहाराज एके ठिकाणी म्हणतात, जर भगवंताने विचारले की तुला काय पाहिजे तर मी म्हणेन, माझी मीपणा ची जाणीव काढून घ्यावी, कारण मीपणाची जाणीव परमार्थात फार घात करते. नाम साधनेने काय होते हे सांगताना सर्व सत्पुरुष अंतःशुद्धी वर भर देतात, याचे कारण नामाने आतून सुधारणा घडून मनुष्य ‘मी, माझे, मला’ या त्रयीच्या कचाट्यातून सुटतो. याच त्रयीच्या आधाराने मनुष्याचे जग असते. आम्ही दिवसभरात जेवढा म्हणून जगाचा विचार करतो, तो माझ्या संदर्भातले जग असाच असतो; विचार केला तर हे सहज लक्षात येण्यासारखे आहे. म्हणून नामाने अंतःशुद्धी होत ज्याला मीपणाचा विसर पडला, त्याला साहजिकच जगाचाही विसर पडला. नामाची ‘आनंदावस्था’ याचे मूळ इथे आहे.

साधकावस्थेत सतत वरच्या अभंगांमध्ये म्हटल्याप्रमाणे ‘दुजियाची मात नेणो आम्ही’ किंवा ‘संसारी उदास असोनिया’ या संत वचनांचे भान ठेवून साधकाला संसारापासून मनाला ओढून नामाकडे – साधनेकडे लावावे लागते. पण ज्याच्यावर नामाची कृपा झाली (त्याने नामाशिवाय इतर सर्व ‘आश्रय’ वर्ज्य केल्यामुळे), त्याला संसाराचा विचार सोडावा लागत नाही; तो विचारच त्याला सोडून जातो व त्यामुळेच तो नामानंदात निमग्न होतो. ही अवस्था नामाला सर्वस्व मानून गुरु-आज्ञेने चालणाऱ्या प्रत्येक साधकाच्या आयुष्यात येतेच. श्रीमहाराज म्हणतात, याच शांत, निर्द्वंद्व, भाव समाधी सदृश अवस्थेमध्ये तो साधक काही काळ राहतो. ही गुरुकृपेने आलेली साधकावस्थेतील सर्वोच्च अनुभूती होय. त्याचे संपूर्ण साधक आयुष्य सद्गुरू आपल्या हातात घेतात व त्याला ‘चालविसी हाती धरोनिया’ हा अनुभव येतो.

महाराज म्हणतात, ‘काही काळ तो त्या अवस्थेत राहील.’ हा जो काळ आहे तो गुरु-शिष्य संबंधाचा पर्वकाळ म्हणता येईल. ज्ञानेश्वर महाराज अमृतानुभवात जे म्हणतात, “जीवू परमात्मा दोन्ही, बैसवूनी ऐक्यासनी, जयाच्या हृदय भुवनी विराजती” ही जिवंत अनुभूती तो शिष्य अनुभवतो. याच कालावधीत त्याला आपल्या गुरूच्या कृपेचा वसंत अनुभवता येतो. याच कालावधीत त्याला गुरू आणि भगवंत यातील अभेद प्रत्ययास येतो. याच कालावधीत तो नित्यतृप्त अवस्था आणि तरीही नामातली अतृप्ती अनुभवतो!

यातून तो थोडा खाली आला, म्हणजे, गुरूने त्याला या जगात काही कार्य करण्यासाठी अथवा सामान्य लौकिक आयुष्य जगून साधनेतला आनंद उपभोगण्यासाठी नेमले, तर मग तो कायम लौकिक आयुष्याच्या परती अशी तरंगती अवस्था अनुभवतो. लौकिक जीवनातील सुख-दुःख, चढ-उतार यांच्याशी त्याचा संबंध उरत नाही. काही साधक त्यात सहभागीही होऊ शकत नाहीत; मात्र काही गुरुकृपेने सहभागी होत असल्याचे दाखवू शकतात. जगाची स्तुती निंदा त्याच्या साधनेवर यत्किंचितही परिणाम करू शकत नाही. सद्गुरूंची आज्ञा त्याला पदोपदी मार्गदर्शन करते व त्यानुसारच त्याच्या आयुष्यातला प्रत्येक निर्णय असतो – घ्यावा लागतो. ही निराळी सूक्ष्म दृष्टी त्याला केवळ आणि केवळ गुरु आज्ञेत राहून केलेल्या अलौकिक अशा नाम साधनेने प्राप्त होते. भगवंत जे गीतेत वचन देतात, ‘ददामि बुद्धियोगं तं’ तो निश्चल बुद्धियोग प्राप्त झाल्यामुळे नामाच्या अद्वितीय स्वरूपाचे सार्थ दर्शन त्याला होते; परंतु, याच्याही पुढे जाऊन जेव्हा त्याला गुरुकृपेने नाम पचते, म्हणजे त्या नामाचे भव्यदिव्य स्वरूप त्याच्या ठायी जिरते, तेव्हा आत्मानंदात राहूनही तो जगाचा कारभार अलिप्तपणे करू शकतो.

हीच बहुतेक सर्व संतांची अवस्था असते, जे गुरु-भगवंत आज्ञेने प्रवृत्ति मार्ग स्वीकारून अमाप भगवत् कार्य जगात करतात. जे श्रीमहाराज म्हणतात, “उपासनेचा जोर पाठीशी आहे तोच जगात खरे कार्य करतो” ते वास्तविक अशा महानुभावांच्या संदर्भात आहे. आणि हे असे संत ओळखणे अत्यंत कठीण आहे. जोवर ते स्वतः आपली खरी ओळख देत नाहीत वा जोवर गुरुकृपेने आम्हाला ती दृष्टी आलेली नाही, तोवर अनेकदा अशा संतांचा उपहासच होतो. अर्थातच त्यांना त्याचे सोयरसुतक नसते, कारण त्यांना ‘निजसुखाचा नाम-साठा’ गवसलेला असतो!

||श्रीनाम समर्थ||





Wednesday, April 29, 2020

श्री ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराजांचे बोधवचन क्र १३ --


श्रीमहाराजांचे बोधवचन क्र १३ –

“नामात एका आनंदाशिवाय दुसरे काहीही नाही!”

श्रीराम!
“नंद” याचा अर्थ मोद, संतोष. म्हणूनच ज्याने प्रत्यक्ष भगवंताच्या बालरूपाला आनंदाने खेळवले तो गोकुळीचा “नंद”! आणि “आ-नंद” म्हणजे सर्व बाजूंनी जिथे केवळ संतोषच आहे, त्याशिवाय इतर काहीही नाही. या दृश्य जगात, अगदी पृथ्वीपासून स्वर्गलोकापर्यंत जे जे म्हणून काही ‘सुख’ या संज्ञेत बसते, त्या प्रत्येक गोष्टीला दुसरी बाजू आहे. पृथ्वीवरचे सुख, जे जे म्हणून आपण उपभोगतो, ते निर्भेळ सुख नसते हे तर आपल्याला माहीत आहेच. भगवंत स्वतः म्हणतात, “अनित्यं असुखं लोकं”... इथे खरे सुख नाही. ज्याला आपण सुख समजतो, तो केवळ सुखाचा आभास होय. आपण आजवर अनंत जन्मांतून स्वर्ग लोकापर्यंतची यात्राही अनेक वेळा केलेली आहे. गीतेत भगवंत म्हणतात त्याप्रमाणे, “क्षीणे पुण्ये मर्त्यलोकं विशन्ति” जो जीव काही पुण्यकर्मे, सत्कर्मे केली म्हणून स्वर्गलोकाला गेला, तो देखील स्वर्गलोकातील भोग भोगून तो पुण्यांश क्षीण झाला, म्हणजे पुन्हा या इथे जन्म घेतो व प्रारब्धाप्रमाणे सुखदुःख भोगतो; म्हणजे स्वर्गलोकापर्यंत देखील खरा आनंद मिळणे संभवत नाही. मग आनंद आहे कुठे हा प्रश्न विवेकवंत मनुष्याला पडणे स्वाभाविक आहे. किंबहुना हा प्रश्न पडणाऱ्यासच मनुष्य ही संज्ञा आहे असे उपनिषदे सांगतात; कारण, इतर कोणत्याही योनीमध्ये ‘मी कोण आहे’ याचा शोध घेण्याचा विवेक आणि बुद्धी जिवाला नाही. तो मान केवळ मनुष्यजन्मातच मिळालेला आहे. मनुष्यालाच अंतर्मुख होऊन खऱ्या आनंदाचा शोध घेण्याचा हक्क आहे. आणि हा आपला हक्क आणि खरा स्वार्थ ज्या मनुष्यांनी यथायोग्य वापरला त्यांना संत म्हणतात!

श्रीमहाराज एके ठिकाणी म्हणतात, “मी समाधानाचा शोध लावला आहे!” हा जो त्यांचा शोध त्यालाच “आनंद” ही संज्ञा आहे. ही अशी अवस्था आहे, जिला दुसरी बाजूच नाही. संत आज आनंदात आहेत आणि उद्या काही घडले म्हणजे त्यांचा तो आनंद मावळला असे दिसत नाही. तसे असेल तर ते संत नव्हेतच. म्हणजेच हा शाश्वत आनंद आहे आणि शाश्वत असल्यामुळेच तो त्या शाश्वत तत्त्वापासूनच आलेला असला पाहिजे. मूळ स्थिर असल्याशिवाय येणारा कोंब टवटवीत असणे शक्य नाही. त्याचप्रमाणे संतांचा आनंद हा त्या आनंदरूप भगवंताच्या साक्षात अनुभूतीतून आलेला असल्यामुळे तेथे दुःख नाही! बहुतेक सर्व संतांना लौकिक आयुष्यात अतोनात कष्ट दुःख सहन करावे लागलेले असूनही ते आनंदसागरात डुंबत राहतात. कारण त्यांना आनंदाचे निधान असे “भगवंताचे नाम” त्याची या लौकिक जगातील खूण म्हणून मिळालेले असते व त्याला ते आपल्या आयुष्याचे सर्वस्व मानतात. खूण यासाठी की सुरुवातीला सर्व जणच नामाचा साधन म्हणून अवलंबन करतात; आणि त्यावेळी श्रद्धायुक्त अंतःकरणामध्ये त्याचा वास “ही माझ्या देवाची खूण आहे” या भावनेने असतो. परंतु, दृश्य जगातील खुणेमध्ये आणि अलौकिक जगातील नामाच्या खुणेमध्ये एक मोठा फरक हा की दृश्य जगातील खूण, जसे, एखाद्या गावाच्या दिशेने असलेली पाटी, ही केवळ त्या गावाकडे कोणत्या दिशेने जायचे याचा निर्देश करते. तिथे त्या खुणेचे कार्य संपते. परंतु, नामाची खूण ही त्या सच्चिदानंद परमात्म्याकडे घेऊन जाणारी नुसती खूण न उरता सबंध प्रवासातली सोबतही असते आणि मुक्कामी पोहोचता पोहचता ‘खूण आणि मुक्काम एकच आहेत’ याची अनुभूती देणारी असते! आणि याच अनुभूतीला संत “समाधानाचा शोध” म्हणतात!

म्हणून तुकाराम महाराज म्हणतात, 

"सेवितो हा (नाम) रस, वाटी तो आणिका | घ्यावे होऊ नका रानभरी || 
तुका म्हणे खातो आनंदाचे लाडू | नका चडफडू घ्या रे तुम्ही ||"

वरच्या बोधवचनात जे महाराज म्हणतात, नामात एका आनंदाशिवाय दुसरे काहीही नाही, याचा सरळ सरळ अर्थ हाच की नामात एका भगवंताशिवाय दुसरे काहीही नाही, किंवा नाम हाच भगवंत आहे!

दोन मार्ग आहेत, एक – सद्गुरूंनी दिलेले नाम घेत राहून या अनुभूतीप्रत जाणे. बहुतेक तार्किक विचारदृष्टी प्रबळ असलेले साधक या मार्गाने प्रवास करतात. पण त्यांची चिकाटीही वाखाणण्यासारखी असते. तर्काला ते साधनेच्या आड येऊ देत नाहीत. त्यामुळे थोडे उशिरा का होईना ते या समाधानाप्रत पोहोचतात, कारण मार्गात थोडे उशिरा का होईना त्यांना ‘शरणागती’ चे स्टेशन पार करावेच लागते.

मात्र, दुसरा गट असा जो सद्गुरूंच्या वचनावर संपूर्ण विश्वास ठेवतात की नाम हाच भगवंत आहे. नाम हाच आनंद आहे. या निष्ठेच्या जोरावर त्यांचा साधन प्रवासाची सुरुवातच शरणागतीने होते व त्यामुळे त्यांचे साधन हे साधन न उरता तीच आनंद-यात्रा बनते.

मार्ग कोणताही असो, आपल्याला नामाच्या सिद्धीशी मतलब आणि ती सिद्धी म्हणजे “अखंड आनंदावस्था!” ही ज्याने सद्गुरू कृपेने प्राप्त केली त्याचा मनुष्यजन्म सुफळ संपूर्ण झाला हे निश्चित!

||श्रीनाम समर्थ||

Tuesday, April 28, 2020

श्री ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराजांचे बोधवचन क्र १२ --



श्रीमहाराजांचे बोधवचन क्र १२ –

‘मी ब्रह्म आहे’ या अनुभवातसुद्धा मीपण आहे. नाम त्याच्याही पलीकडे आहे.

अद्वैत सिद्धांताचे दर्शन म्हणजे “अहं ब्रह्मास्मि”| तो सच्चिदानंद घन परमात्मा आणि जीवात्मा हे भिन्न नाहीत हे ‘अनुभवणे!’ परंतु, अशी अनुभूती मिळणारे साधक – सिद्ध अत्यंत दुर्मिळ. जिथे ‘लक्षामध्ये कोणी एक पाहे आत्मानात्म विवेक’ असे समर्थ म्हणतात, म्हणजे आत्म काय आणि अनात्म काय हा विवेक करणारेच लक्षामध्ये कुणी एक म्हटले आहे. तिथे तो विवेक होऊन, तदनुसार साधन घडून, ही सर्वोच्च अनुभूती मिळवणे किती दुर्लभ असेल याची कल्पनाच केलेली बरी. त्यामुळे कुठेतरी श्रीमहाराजांसारख्या सगुण भक्तिचे प्रतिपादन करणाऱ्या संतांना असे लक्षात येते की मनुष्य देहबुद्धी मध्ये इतका अडकलेला आहे की केवळ काही ग्रंथ वाचून, थोडेफार साधन घडून, काही श्रवण करून तो ब्रह्मपदाला पोहोचल्यासारखा दाखवतो. आमचा मार्ग ‘दर्शनापेक्षा’ ‘प्रदर्शन’ असतो आणि हे झाले म्हणजे हाती काहीच न लागता समर्थच म्हणतात त्याप्रमाणे, “सगुण नेले ब्रह्मज्ञाने, निर्गुण नेले संदेहाने | दोहीकडे अभिमाने वोस केले||” अशी आमची अवस्था होते. निर्गुण देहबुद्धी असताना कळू शकत नाही. त्यामुळे त्या संशयाने निर्गुण हातचे गेले. दुसरीकडे ब्रह्म स्वरूपाच्या शब्दज्ञानाने सगुण खरे नाही असे वाटू लागले. अशा रीतीने देहाभिमानामुळे दोन्हीकडचा पाहुणा उपाशी अशी गत होते असे समर्थ सांगतात.

याच्याही पुढे जाऊन श्रीमहाराज वरच्या वचनात म्हणतात, ‘मी ब्रह्म आहे’ या अनुभवात मीपण आहे. कारण, जोवर हा अनुभव सांगता येतो आहे तोवर तो अनुभव नव्हेच. एकदा एक विद्वान श्रीमहाराजांना भेटण्यासाठी आले होते. त्यांनी महाराजांना विचारले, “महाराज तुम्हाला संपूर्ण समाधान मिळालेले आहे का?” तेव्हा महाराज म्हणाले, “ते काही मला माहित नाही बुवा; मला फक्त रामाचे नाम आवडते व ते मी सर्वांना सांगतो” त्या गृहस्थाचा प्रथम गैरसमज झाला की महाराजांना ब्रह्मज्ञानी सत्पुरुष म्हणतात आणि हे माहित नाही असे कसे म्हणतात? नंतर त्यांना पू कुर्तकोटींनी सांगितले, “तुम्हाला महाराजांचे बोलणे कळले नाही. जोवर मी समाधानी आहे असे वेगळेपणाने सांगता येते तोवर समाधान मिळालेले नाही. श्रीमहाराज समाधानरूप आहेत, तेथे वेगळेपणाच नाही, ते शब्दात सांगणार कसे?”

दुसरी गोष्ट अशी की ही ब्रह्माची अनुभूती तेव्हाच शक्य आहे जेव्हा साधकाची देहबुद्धी संपूर्णपणे गळून जाते, त्याचे मन उन्मन होते व तो या दृश्य संसारापासून पूर्णपणे मनाने विगलित होतो.आणि हे ज्याचे होते, तो ‘मी ब्रह्म आहे’ हे सांगायला उरतच नाही; केवळ आत्मानंदात मग्न होतो. किंबहुना, ही अनुभूती घेतलेले श्रीमहाराजांसारखे अनेक महात्मे भगवंताशी एकात्म भाव सहन न झाल्यामुळे द्वैतात येऊन सगुण भक्ती करतात. ज्ञानी भक्त ते हेच. म्हणूनच ‘ब्रह्मरस अंगी ठसावला’ सांगणारे तुकोबा ‘तू देव मी भक्त ऐसे करी’ अशी आळवणी भगवंताजवळ करतात.

अद्वैत चूडामणी शंकराचार्य “भज गोविन्दं मूढमते” असे सांगून “इह संसारे बहु दुस्तारे, कृपयाSपारे पाहि मुरारे” असे म्हणून भगवंताजवळ हा संसार तरून जाण्यासाठी याचना करतात. आणि इथेच श्रीमहाराजांनी वारंवार प्रतिपादन केलेल्या भगवद् नामाचे अनन्यसाधारण असे महत्त्व आहे. खरोखर नामस्मरणाचा सरळ सरळ अर्थ ‘मी तुला शरण आहे आणि म्हणून मी तुला प्रेेेमाने हाक मारतो आहे’ असा होतो. म्हणून काही उत्तरेकडील संत आत्मज्ञान आणि ब्रह्मज्ञान असा भेद करताना दिसतात. आत्मज्ञान स्वरूप साक्षात्काराला थांबते; इथे संपूर्ण दुःखनिवृत्ती होते. ब्रह्मज्ञान यापुढे संपूर्ण भगवत् शरणागतीने होते; इथे दुःखनिवृत्ती बरोबर अखंड आनंदप्राप्ती होते. कारण शरणागती शिवाय, तू बाप-मी लेकरू, तू स्वामी- मी दास या भावांशिवाय जिवाला खरी विश्रांती लाभू शकत नाही हे त्रिवार सत्य आहे. म्हणून श्रीमहाराज म्हणतात, ‘मी ब्रह्म आहे’ या अनुभवात सुद्धा मीपण आहे. आणि नाम त्याच्या पलीकडे आहे, कारण शरणागती नामानेच घडते, अन्यथा नाही. आणि या अशा अद्वैत सिद्धीनंतर देखील ज्ञानी भक्ताच्या भूमिकेवर राहून निरंतर नाम स्मरणारा भक्त हा माझा आत्मा आहे, असे भगवंत गीतेत म्हणतात.

एकूण काय, मुमुक्षु असो, साधक असो वा सिद्ध, प्रत्येकाला या भवसागरातून तारून नेणारे एक भगवंताचे नामच आहे; ते ज्याने धारण केले, त्याच्याच हृदयात “नामापरते सत्य न मानावे” ही अनुभूती जिवंत रूपात नांदते!

||श्रीनाम समर्थ||  

Monday, April 27, 2020

श्री ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराजांचे बोधवचन क्र ११ --


श्रीमहाराजांचे बोधवचन क्र ११ –

आयुर्वेदाने रोग मुळापासून जातो. पण त्याला वेळ लागतो. तसे नामाने वेळ लागेल, पण सर्व रोग मुळापासून जाईल. इंग्रजी औषधाने रोग वरवर नाहीसा होतो किंवा इंजेक्शन दिल्याने दुःखाची जाणीव कमी होते, पण रोग आत असतोच. तसे इतर साधनाचे आहे.

श्रीराम!
श्रीमहाराजांच्या आयुष्याची Central Theme म्हणजे नाम.
श्रीमहाराजांचा आत्मा म्हणजे नाम.
श्रीमहाराज म्हणजे नाम.
त्यामुळे एका गोड अभंगात म्हटले आहे, “ब्रह्मचैतन्याचा गाभा प्राप्त नोहे कमलनाभा!” एक प्रकारची कोटी केलेली आहे की कमलनाभ भगवंताला देखील ब्रह्मचैतन्य महाराजांचा गाभा - जे नाम - ते प्राप्त नाही; म्हणजे आपल्याच नामाची गोडी भगवंत आपणच चाखू शकत नाही; त्यासाठी भक्तरूप घेऊन संताच्या रूपात त्याला यावे लागते त्या नामाच्या रसाचा आस्वाद घेण्यासाठी. आणि म्हणून पावलागणिक श्रीमहाराज त्या नामाचा महिमा गाण्याचे थांबवत नाहीत, थांबू शकत नाहीत. संतांनी सांगितलेली प्रत्येक गोष्ट तर्काच्या पट्टीवर घासून बघणाऱ्या काही तार्किकांना एके ठिकाणी महाराज विचारतात, संत खोटे का बोलतील? जनाच्या तोंडून नाम वदवून घेण्यात त्यांचा काय स्वार्थ आहे? किंबहुना लोक ऐकणार नाहीत हे माहित असूनही ते सांगणे सोडत नाहीत, केवळ लोकांच्या कल्याणाच्या तळमळीपोटी. त्यामुळे अनेक उदाहरणे देऊन श्रीमहाराजांसारखे संत आपल्याला भगवंताच्या नामाचे महत्त्व पटवून देतात.

श्रीमहाराजांची ही हातोटी आहे की रोजच्या, व्यवहारातल्या गोष्टींशी सांगड ते परमार्थाशी – नामाच्या साधनेशी घालतात. म्हणजे मग आम्हाला त्याचे आकलन होणे सोपे जाते. मनुष्य कर्मप्रधान असल्यामुळे त्याला काहीतरी केल्याशिवाय चैन पडत नाही. परमार्थ साधनेत देखील काही देहाची आसने, आहार नियम, काही नित्य परिपाठ, तीर्थस्थळांना भेटी, वगैरे गोष्टी तो हौसेने करतो; परंतु, गुरु जेव्हा एके जागी बसून नाम घे म्हणतात, तेव्हा त्याला ते अवघड वाटते. याचे कारण आमची बाहेर फिरणारी इंद्रिये व त्यांना चालना देणारे बहिर्मुख मन. आमची सगळी धाव दृश्याकडे असल्यामुळे आम्हाला साधन देखील त्याच दृश्यातले असावे असे वाटते आणि म्हणून आमचे मन नामात रमत नाही. ते रमावे यासाठी श्रीमहाराज वरील उदाहरण देत आहेत.

आयुर्वेदासारख्या प्राचीन औषध शास्त्रात जे रोगमुक्तीचे उपाय सांगितलेले असतात, ते रोगाचे मूळ कारण लक्षात घेऊन, कफ-वात-पित्त या त्रिदोषांचे प्रमाण लक्षात घेऊन त्याप्रमाणे सांगितलेले असतात. तद्वत, श्रीमहाराज म्हणतात, नामाचा उपाय जो आहे, तो आमचा मूळ दोष – जी देहबुद्धी – मी देहच आहे ही बुद्धी - लक्षात घेऊन व सत्व-रज-तम यांचे प्राकृतिक अधिष्ठान लक्षात घेऊन भवरोगाची उपाययोजना करतो. साहजिकच जिथे रोग मुळापासून उपटून काढायचा, तिथे वेळ हा लागणारच. साधे आपण महिनाभर गावी गेलो तर आल्यानंतर महिनाभराची घरातली धूळ झटकून टाकायला आपल्याला वेळ लागतो. आम्ही तर जन्मोजन्मीच्या देहसंस्कारांची धूळ जमा करून बसलो आहोत; ती नाहीशी व्हायला अवधी लागणारच. म्हणून अजून एके ठिकाणी श्रीमहाराज म्हणतात, ज्याची देहबुद्धी जास्त, त्याला अधिक वेळ लागतो. यासाठीच परमार्थ साधनेत वाट बघण्याची तयारी हवी व ही वाट बघताना चुकूनही मनाला मरगळ येणार नाही वा निरुत्साह होणार नाही याची दक्षता घेणे क्रमप्राप्त आहे.

आपले सद्गुरू आपल्या रोगाला वरवर मलमपट्टी कशी बरं करतील? अनेकदा असे घडते की आपण एखाद्या शिबिराला जातो, जिथे काही योगसाधन शिकवले जाते. तिथे आठवडाभर असेपर्यंत आपले देह मन बुद्धीचे व्यापार अतिशय सुरळीत चालतात. आपल्याला नवीन जोम वाटून एक प्रकारची प्रसन्नता वाटते; परंतु परत आपण आपल्या संसारात आल्यानंतर एक प्रकारचा विरोध सुरु होतो. अनुभवलेल्या गोष्टीकडे मन धावत असते; परंतु प्रपंच आपल्याला जखडून ठेवतो व त्यामुळे हळूहळू आलेली प्रसन्नता निघून जाते. यालाच महाराज तात्पुरता उपाय म्हणतात, जो त्यांना मान्य नाही.

आपले लेकरू अधूनमधून आरोग्यपूर्ण असते आणि वरचेवर आजारी पडते हे कोणत्या आईला सहन होईल? ते लेकरू नेहमी टवटवीत प्रसन्न कसे राहील हीच त्या आईची इच्छा. अगदी तसेच आपण सर्व संतांची - सद्गुरूची लेकरे आहोत आणि आपल्याला जन्मोजन्मीच्या आजारपणातून मुक्त करण्याची आपल्या सद्गुरू आईला तीव्र तळमळ आहे, जी दुर्दैवाने आम्ही जाणत नाही. आणि म्हणून सद्गुरूंनी दिलेल्या नामाव्यातिरिक्त काहीतरी इंजेक्शने अधूनमधून घेण्याची आम्हाला हुकी येते. एखादे ग्रंथ पारायणाचे अनुष्ठान आम्ही करतो; ते करू नये असे नाही; परंतु बहुतेक संत ग्रंथातून नाम व भक्तीचेच महत्त्व वर्णन केलेले असते. ते लक्षात घेऊन आचरणात आणण्याऐवजी जर केवळ पारायणालाच आम्ही सर्वस्व मानू लागलो, तर ते इंजेक्शन देऊन भूल दिल्यासारखे आमचे काम-क्रोधादि विकार काही दिवस आम्ही त्या पांघरुणाखाली दडवून ठेवतो, जे पुन्हा ते अनुष्ठान संपल्यावर उसळी मारून वर येतात. या उलट जो “नामात राहतो” त्याच्या अंतर्मनावर नामाचा प्रभाव थेट परिणाम करत असल्यामुळे आणि त्यात सद्गुरूंची अध्यात्म शक्ती अनुस्यूत असल्यामुळे साधक हळूहळू त्या विकारांच्या कचाट्यातून पूर्ण सुटतो.

म्हणूनच श्रीमहाराज म्हणतात, संपूर्ण दुःखनिवृत्ती आणि अखंड आनंदप्राप्ती ही नीति धर्माची पथ्ये पाळून केलेल्या नाम साधनेशिवाय शक्य नाही, नाही, त्रिवार नाही!

||श्रीनाम समर्थ||



Sunday, April 26, 2020

श्री ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराजांचे बोधवचन क्र १० --


श्रीमहाराजांचे बोधवचन क्र १० --

तुकारामबुवांची वाचा त्यांना अनावर झाली, ती सारखी नाम घेऊ लागली. याचा अर्थ असा की त्यांच्या कल्पनेच्या बाहेर नाम येऊ लागले. आपल्या शक्तीच्या बाहेर कार्य होणे ही भगवंताची कृपा होय. गाडी उतरंडीला लागली की जशी अति वेगात येते आणि आवरत नाही, तसे हे आहे.

श्रीराम!
तुकाराम महाराज अभंगात म्हणतात, “माझी मज झाली अनावर वाचा| छंद या नामाचा घेतलासे||” या एका ओळीतच तुकोबा आपल्याला नाम साधनेचे सार सांगत आहेत. “नामाचा छंद” हे अलीकडेही आहे आणि पलीकडेही. म्हणजे काय? तर, जो सद्गुरूंनी दिल्यानंतर मनापासून “नामाचा छंद जोपासतो”, त्याच्यावर सद्गुरू कृपा होऊन त्याला “नामाचा छंद लागतो!”. म्हणूनच नाम हे साधनही आहे आणि साध्यही! भगवंतांनी दर्शन दिल्यावर बाळ ध्रुव म्हणाला, तुझ्या सगुण दर्शनापेक्षाही मला नामातच आनंद आहे, तेच मला द्यावे!

खरोखर नाम काय आहे, हे सांगता येणे अत्यंत कठीण आहे, कारण जसा परमात्मा अनिर्वचनीय, तसेच त्याचे नाम देखील ‘अनिर्वचनीयं प्रेमस्वरूपम्’ असे आहे. केवळ अनुभवसिद्ध संतच नामाचे महत्त्व जाणतात. एखादा साधक जरी काही लौकिक आशेपोटी नाम साधनेला लागला; परंतु जर तो मनापासून नाम घेऊ लागला, तर त्या नामाची शक्ती अशी आहे की तो लवकरच त्या लौकिक हव्यासाच्या कचाट्यातून मुक्त होईल व नामातच त्याला सर्व सुख आणि समाधान लाभू लागेल. नामाची शक्ती काहीही करण्यास समर्थ असली तरी त्याचा मुख्य परिणाम हा संसार आसक्तीतून सुटका आणि भगवंताचे प्रेम हा आहे आणि याच प्रवासात साधकास ही ओळख पटू लागते की भगवंताचे प्रेम हेच त्याच्या नामाचे प्रेम आहे, दोन्हीत भेद नाही. हे झाले, म्हणजे मग त्यास नाम घ्यावे लागत नाही, नाम थांबत नाही!

पूज्य गुरुदेव रानडेना एका पीठाचे शंकराचार्य भेटण्यासाठी आले होते. दोघांचे वेदांताबद्दल बोलणे झाले. त्यांची जायची वेळ झाली; परंतु या थोर नामसिद्ध संताशी अजून बोलावे त्यांना वाटू लागले आणि म्हणून त्यांनी उद्या पुन्हा भेटायला जमेल का असे विचारताच गुरुदेव म्हणाले, “नामाने सोडले तर येईन!” म्हणजे ते इतके नामाच्या ताब्यात गेले होते की नामाने त्यांना व्यापून टाकले होते. अनावर नाम झाल्यावर साधक नामाच्या ताब्यात जातो. सुरुवातीला आपण नाम घेतो, नेमास केव्हा बसायचे हे आपल्या ताब्यात असते (तसे आपण समजतो); पण गुरुकृपेने जसजसे नाम वाढू लागते, तसतसे साधक नामाच्या आधीन होतो. गुरुदेवच एके ठिकाणी म्हणतात, “न कळे दिवसराती| अखंड लागलीसे ज्योती!!” ही अवस्था म्हणजे नामाच्या ताब्यात जाऊन नाम अनावर होण्याची तुकाराम महाराजांची अवस्था!

वरच्या वचनात याची गोड आणि यथार्थ सांगड महाराजांनी भगवंताच्या कृपेशी घातली आहे. खरोखर नामात प्रेम येणे हे कृपेशिवाय अशक्य! ही कृपा मात्र साधकाच्या निश्चयात्मिका बुद्धीशी निगडीत असते. जे साधक, “ महाराजांची कृपा असेल तरच नाम होणार; अजून कृपा दिसत नाही” अशी पळवाट काढतात, त्यांना महाराज म्हणत, “माझी कृपा आहेच; आता तुम्हीच तुमच्यावर कृपा करा”; म्हणजे करण्याचा निश्चय करून प्रयत्नाला लागा. कृपा ही निश्चितच यत्नसापेक्ष आहे. निदान सुरुवातीच्या काळात तरी हा नियम किंवा विश्वास साधकाला प्रयत्नांची शिकस्त करण्यास प्रवृत्त करतो. मात्र जेव्हा सद्गुरू कृपेने असे अनावर नाम येऊ लागते, तेव्हा मात्र त्याला खरी जाणीव होते, की माझ्या मुखात येणाऱ्या पहिल्या नामापासून होती ती केवळ कृपा! त्या कृपेची जाणीव मला नव्हती म्हणून मी माझ्या बळावर, कर्तृत्वावर भरोसा ठेवून होतो. पण आता मात्र त्याला त्यांच्या कृपेची अनन्य जाणीव होते व तो संपूर्ण शरणागत होतो. “मी नाम घेतो” ही भावनाच कुठल्या कुठे लोपून जाते आणि साधकाच्या मुख, मस्तक, हृदय, एवढेच काय पण शरीराच्या रोमारोमातून नामाची स्पंदने जाणवतात!

अशी ही गाडी उतरंडीला लागली म्हणजे या जन्माचे काम झाले! संपूर्ण शरणागत असल्यामुळे ‘मला पारमार्थिक आयुष्यात देखील अजून काही मिळवायचे आहे’ हा भावच साधकाचा पुसला जातो व प्रत्येक नामागणिक तो स्वानंदात निमग्न होतो! म्हणून याच अभंगात अगोदर तुकाराम महाराज म्हणतात, “विषयी विसर पडला निःशेष| अंगी ब्रह्मरस ठसावला||” काय अनुभव आहे नामाचा हा! अजून एकीकडे तुकाराम महाराज म्हणतात, “अनुहादि गुंतलो, नेणे बाह्यरंग| वृत्ति येता मग बळ लागे||” हा जो नामाचा प्रवाह सुरु झाला, त्याने त्या नामाच्या नादातच गुंतल्यामुळे बाहेरचे भान नाहीसे झाले; किंबहुना बाह्य वृत्ति येण्यासाठी मला जोर लावावा लागतो आहे. म्हणजे आता जसे आम्हाला दृश्य जगातून नामाकडे लक्ष देण्यासाठी जोर लावावा लागतो, तसे त्यांना नामाकडून दृश्य जगाकडे लक्ष देण्यासाठी जोर लावावा लागतो; ही आहे नामाची किमया!

संत म्हणतात, हे कुणालाही अभ्यासाने शक्य आहे. कुणीही असा विचार करण्याची जरूर नाही की ‘ते थोर, आम्ही सामान्य!’ एकदा सद्गुरूंनी आपले म्हटल्यावर कुणीही सामान्य नाही; सामान्य आहे ती आमची देहबुद्धी व आमची नकारात्मकता. या दोन्हीतून सुटण्याचा मार्ग देखील नामस्मरण व सत्संग हाच आहे. पूज्य ब्रह्मानंद महाराजांचे एक वचन अतिशय उत्तेजन देणारे आहे. ते म्हणतात, “नाम हे वेलीसारखे आहे. वेल जशी भरभर वाढते, तसे एकदा साधक नामाला खऱ्या अर्थाने लागला की नाम त्या वेलीसारखे भरभर वाढते!” केवळ या संत वचनांवर विश्वास ठेवून नामाला लागले पाहिजे; जो असे करील त्याला नामाने आपल्या आयुष्याचे कसे परिवर्तन झाले हे सांगावे लागणार नाही; ते परिवर्तन त्याच्या आत व बाहेर शांति, आनंद आणि समाधान या रूपात नांदेल!  

||श्रीनाम समर्थ||

Saturday, April 25, 2020

श्री ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराजांचे बोधवचन क्र ९ --


श्रीमहाराजांचे बोधवचन क्र ९ –

एक मनुष्य बैलगाडी मधून जाताना रस्त्यामध्ये पडला. एका सज्जन माणसाने त्याला तेथे पडलेला पाहून उचलला आणि आपल्या घरी नेला. तसे नुसते विषयात राहणे हा आडमार्ग आहे, नामात राहणे हा सरळ मार्ग आहे. आपण भगवंताच्या नामात पडून राहावे. त्यात राहिले की कोणीही संत भेटतो आणि आपले काम करतो. आपण सरळ मार्गात मात्र पडले पाहिजे.

श्रीराम!
या पृथ्वीतलावरची सर्वात अमोघ संपत्ती, अविचल पावित्र्य, अभंग भक्ती आणि करुणेचा सागर म्हणजे संत. संत नाहीत ती धरा आजपर्यंत कोणत्याही काळात अस्तित्वात नव्हती. सृष्टीचा निर्माता - नियामक भगवंताचे या दृश्यातले रूप म्हणजे संत! कलियुगात सगळीकडे वासना आणि भोगाचे साम्राज्य पसरलेले असताना वीतभर माणुसकी, काही सात्विक जनांचे पारमार्थिक आयुष्य आणि थोडीबहुत सकारात्मकता यांचे जनक म्हणजे हे संत.

माणगंगेच्या काठी असेच जे चालते बोलते ब्रह्म अवतरले, ते श्रीमहाराज सांगतात, जगाच्या चालीने चालू नका; संतांच्या चालीने चाला. ते नेहमी म्हणायचे, संतांनी अनुभवून भगवंताचे स्वरूप आपल्याला सांगण्याचा प्रयत्न केला, भक्तीचे रहस्य आपल्याला सांगितले. त्यांचा त्यात काय स्वार्थ आहे म्हणायचे. ते स्वतः तर पूर्ण झाले; त्यांना आता काहीही मिळवायचे असे उरले नाही. तरीही ते जगासाठी शेवटच्या श्वासापर्यंत आणि त्याही नंतर सूक्ष्मात झटत राहिले, याचे कारण काय? याचे कारण केवळ करुणा होय. भगवंत आहे अकारण करुण; परंतु त्या करुणेचे मूर्त स्वरूप म्हणजे हे संत! हेच संत जेव्हा गुरुरूपाने मार्गदर्शन करतात, तेव्हा ते सद्गुरू बनून त्या शिष्याच्या पारमार्थिक वाटचालीत त्याचे माय बाप बंधू सुहृद बनून त्याला अक्षरशः कडेवर घेऊन “ब्रह्म सनातन ईश्वराचे” दर्शन घडवतात. शिष्याच्या आयुष्यात परम शांती व समाधान आणण्याचे महत्कार्य सद्गुरू करतात.

हे कसे घडते हे वरच्या बोधवचनात महाराज सांगतात. वस्तुतः दोनच मार्ग आहे, एक आहे दृश्याचा लौकिक मार्ग आणि दुसरा आहे अध्यात्माचा अलौकिक मार्ग. पहिला मार्ग हा विषयाचा, पुनर्जन्म-पुनर्मृत्यु च्या भोवऱ्यात अडकवणारा आणि दुसरा वासनेचे मूळच उपटून काढून शाश्वत आनंदाचा मार्ग दाखवणारा असा आहे. जेव्हा वाटसरू रस्त्यात पडला तेव्हाच त्याला सज्जन माणसाने बघितले व आपल्या घरी नेले. हेच जर तो आडरानात पडला असता तर तो त्याच्या दृष्टीस पडला नसता. त्या सज्जनाची इच्छा आडरानात पडलेल्याला देखील मदत करण्याची असते; परंतु तो दिसलाच नाही तर तो तरी काय करेल? तद्वत, जो विषयात आहे, त्याला देखील मदत करून निर्विषय भगवंताच्या मार्गावर घालण्याची इच्छा गुरूंना असते. परंतु, संतांना देखील काही नियम पाळावे लागतात. जोवर संसारातून विरक्तीचा थोडा तरी अंकुर त्या व्यक्तीच्या हृदयात फुटत नाही, तोवर त्याला ते भगवंताकडे वळवत नाहीत.

इथेच बुद्धीच्या निश्चयाचे काम आहे. समर्थ जे म्हणतात, “जो त्रिविध तापे पोळला तोचि अधिकारी झाला परमार्थासी”, याचा अर्थ हा एकच मार्ग आहे असे नव्हे. काही पूर्वजन्माचे अधिकारी सत्पुरुष सारासार विवेकाने देखील या असार संसाराकडून सार अशा भक्तिमार्गाकडे वळतात; परंतु समर्थांनी जे सांगितले त्या मार्गाने भगवंताकडे वळणारे साहजिकच जास्त! कारण कोणतेही असो, जोवर बुद्धीचा निश्चय होत नाही, तोवर खऱ्या अर्थाने साधनेची तळमळ लागत नाही व जड संसाराकडून निघून सूक्ष्म भगवंताच्या मार्गाची ओढ लागत नाही. हे होईतोवर तोवर मनुष्य नामाला चिकटत नाही. आपल्याला अनेक वेळा असे वाटते, की कुणीही उठून सद्गुरूंचा अनुग्रह घेऊ शकतो, मिळवू शकतो; परंतु ते तसे खरेच नाही. ज्याला कुणाला संत बोलावतात, तोच अनुग्रहास पात्र होतो. जीवाची ताकद नाही संतापर्यंत पोहोचण्याची. आज स्वकर्तृत्वावर विश्वास असल्यामुळे आम्हाला वाटते, मी अनुग्रह घेतला. पण वास्तविक सत्य हे आहे, की गुरुची अपार करुणा बरसली, कृपेचा जलनिधी द्रवला आणि म्हणून आम्ही अनुग्रहास पात्र झालो.

अनुग्रह होईपर्यंत सामान्य माणसाची ही उत्कंठा असते, की मी कुणाचा अनुग्रह घ्यावा, माझा अनुग्रह कधी होईल? त्याला वरच्या वचनात महाराज एक सूत्र सांगत आहेत, की तू फक्त नामात राहा. अनेक साधक शिष्यांचा हा अनुभव आहे, की अनुग्रह होण्यापूर्वीचे थोडेबहुत नाम साधन जे पूर्वजन्मीच्या गुरुकृपेमुळे घडले, ते या जीवनात अत्यंत महत्त्वाचे असते. हाच नामाचा अंकुर फुटण्याची बहुधा सद्गुरू वाट बघत असतात. हे ज्याने केले त्याला संत शोधत येतात म्हणतात श्रीमहाराज. हे अतिशय सूचक आहे. पुष्कळ जणांचा अनुभव आहे की आम्हाला गोंदवल्याविषयी काहीच माहित नव्हते परंतु आता वाटते श्रीमहाराज माझे गुरु म्हणून मला कसे काय लाभले? सद्गुरू लाभणे ही आयुष्यातील सर्वोच्च सिद्धी आहे आणि ती जीवाच्या थोरपणामुळे नव्हे तर सद्गुरू आपल्याला जन्मोजन्म विसरत नाहीत यामुळे आहे. कोणत्या ना कोणत्या मार्गाने ते आपल्यासमोर येतात. मग कुणी त्यांचा अनुग्रहित आपला परिचयात येईल, त्यांच्या अनुग्रहीतांच्या घरी जन्म होईल, अगदी अनपेक्षितपणे देखील हे घडू शकते. पण जो त्यांचा आहे, तो त्यांच्यापर्यंत पोहोचल्याशिवाय राहत नाही. हे पोहचणे जर ती व्यक्ती थोडेफार जरी नाम घेत असेल तर लवकर होते म्हणताहेत श्रीमहाराज. नाम हाच सद्गुरू आणि आपल्यातला दुवा आहे, जो आपल्याला हा बोध करवून देतो की तुझे गुरु हेच नामरूप भगवंत आहेत!

सर्व बाधा आडमार्ग सोडण्याची आहे. तो सोडण्याचे एक पाऊल जरी आम्ही उचलले, तरी शंभर पाऊले सद्गुरू चालून आपल्यापर्यंत येतात हे निश्चित. आणि एकदा का ही संतभेट घडली की शिष्याचे आयुष्य अंतर्बाह्य उजळून निघते!!!

संत आनंदाचे स्थळ| संत सुखचि केवळ| नाना संतोषाचे मूळ| ते हे संत||
संत विश्रांतीची विश्रांती| संत तृप्तीची निजतृप्ती| नांतरी भक्तीची फळश्रुती| ते हे संत||
मोक्षश्रिया आळंकृत| ऐसे हे संत श्रीमंत| जीव दरिद्री असंख्यात| नृपती केले||
जे त्रैलोकी नाही दान| ते करिती संतसज्जन| तव संतांचे महिमान| काय म्हणौनि वर्णावे||
ऐसी संतांची महिमा| बोलिजे तितुकी उणी उपमा| जयांचेनि मुख्य परमात्मा| प्रगट होये||
(दासबोध संतस्तवन)  

||श्रीनाम समर्थ||

Friday, April 24, 2020

श्री ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराजांचे बोधवचन क्र ८ --


श्रीमहाराजांचे बोधवचन क्र ८ –

इतर साधनांनी लवकर साधल्यासारखे वाटेल पण ते तात्पुरते असते. नामाने थोडा उशीर लागेल, पण जे साधेल, ते कायमचे साधेल, कारण नामाने मुळापासून सुधारणा होते.

श्रीराम!
गीतेच्या अकराव्या अध्यायात भगवंत म्हणतात, “नाहं वेदैर्न तपसा न दानेन चेज्यया”| अर्जुना, हे जे माझे विश्वरूप तू पाहिलेस, म्हणजेच माझ्या स्वरूपाचे जे ज्ञान तुला झाले, ते वेदाध्ययनाने होत नाही, तपानेही होत नाही किंवा यज्ञानेही होत नाही. मग कशाने होते? तर “भक्त्या तु अनन्यया शक्य!!” हे स्वरूपाचे ज्ञान केवळ अनन्य भक्तीनेच होऊ शकते. आणि या अनन्य भक्तीचा पाया आणि कळस असेल तर ते म्हणजे भगवंताचे नाम!

बदल किंवा परिवर्तन हे दोन प्रकारचे असते. एक बाहेरून आणि एक आतून. योग साधनेसाठी किंवा ज्ञान मार्गासाठी प्रप्रथम साधकाला बाहेरून अनेक प्रकारची तयारी करावी लागते. अष्टांग योगात पहिल्या चार पायऱ्या बहिरंग साधनेत मोडतात. ज्ञान मार्गासाठी साधक ‘साधन-चतुष्टय-संपन्न’ असावा लागतो. ही पूर्वतयारी नसेल तर साधक त्या मार्गांवर प्रवेश सुद्धा मिळवू शकत नाही. आणि जर समजा, त्याने या पायऱ्या ओलांडून पुढे पाऊल टाकले तरी देखील प्रत्येक पायरीगणिक घसरण्याचा संभव फार. हे मार्ग कर्मप्रधान असल्यामुळे तिथे अहंकार वाढण्याचीच भीती जास्त आणि अहंकार हे सर्व दुर्गुणांचे प्रवेशद्वार आहे. त्यामुळे इतर साधनांमध्ये अतिशय सावधानता बाळगण्याची जरूर आहे, जी आजच्या युगातील मनुष्यास खरोखर फार अवघड आहे म्हणतात महाराज. आणि जसे त्यांनी वरच्या वचनात म्हटले आहे, की साधले केव्हा म्हणता येईल? जेव्हा ते कायमचे साधेल तेव्हा. तात्पुरते साधण्याला साधले म्हणता येणार नाही.

याउलट ज्याला भक्तिमार्गावर पाऊल ठेवायचे आहे, त्याच्यासाठी कोणताच Criteria नाही. किंबहुना जर काही अंगी तपोबल, विद्येचे बळ, सामर्थ्य असेल तर ते भक्तिमार्गात आड येण्याचीच शक्यता जास्त, कारण भक्तीचा पाया आहे श्रद्धा! आणि या एकमेव भांडवलावर मनुष्य नाम साधनेस प्रारंभ करू शकतो. किंबहुना श्रीमहाराज तर म्हणतात, जो केवळ गुरूने दिले म्हणून नाम घेण्यास सुरुवात करेल, त्याची श्रद्धा देखील त्या नामाच्या बलाने पुष्ट होऊ लागेल. श्रद्धा पुष्ट होणे याचाच अर्थ अंतःकरणातील मलीनता हळूहळू कमी होण्यास सुरुवात होणे. श्रीराम बिभीषणाला म्हणतात, “निर्मल मन जन सो मोहि पावा| मोहि कपट छल छिद्र न भावा||” ज्याचे मन कपट धूर्तपणा यासारख्या दुर्गुणापासून मुक्त होऊन निर्मल झालेले असते, तेच मला येऊन मिळतात. हेच महाराज म्हणतात, नामाने आतून सुधारणा होते. सर्व अध्यात्म किंवा परमार्थ हा Internal Evolution आहे. आज जे माझ्या मनाचे स्थूल गुणधर्म आहेत, ते कमीकमी होत जाऊन मनाला सूक्ष्मता येणे व त्याचे उन्मन होणे हे सर्व अध्यात्म साधनेचे रहस्य आहे. आणि म्हणूनच नाम साधना ही सर्व साधनांपेक्षा श्रेष्ठ होय!

मग महाराज “थोडा उशीर होईल” असे का म्हणत आहेत हा प्रश्न पडणे साहजिक आहे. याचा अर्थ नामामध्ये काही कमी आहे का किंवा काही दोष आहे का? तर मुळीच नाही. नाम हे परम शुद्ध, परम पवित्र, परम शक्तिशाली, परम मंगल असेच आहे. नाम जपणाऱ्या शिष्याच्या एकविध भावामध्ये कमी असेल आणि तो संपूर्ण शरणागत नसेल तर उशीर होणे स्वाभाविक आहे. प्रपंचात फापटपसारा वाढवण्याचा छंद जडलेल्या आम्हाला परमार्थात देखील एकच एक नाम हृदयाशी धरून ठेवणे अनेकदा जमत नाही. सदगुरूंकडून नाम मिळून किती वर्षे झाली यापेक्षा सद्गुरू भेटल्यावर आम्ही “त्यांचे किती लवकर झालो” यावर साधनेची एकाग्रता आणि प्रेम अवलंबून असते. आणि त्यांचे व्हायला आजवर जे जे अवडंबर गोळा केले ते त्यांच्या पायी द्यावे लागते. इथे हरणारा जिंकतो. जसे सूरदास म्हणतात,

“अप बल तप बल और बाहु बल, चौथो बल है दाम|
सूर किसोर कृपा ते सब बल, हारे को हरिनाम||”

संतांना माहित असते की जोवर कोणत्याही बलामध्ये भगवंताचे बळ जोडलेले नाही तोवर त्याची किंमत शून्य असते. म्हणून सूरदास म्हणतात, भगवंताची कृपा हे एकमेव बळ माझ्यात आहे, कारण बाकी सर्व बळ मी हरलो आहे आणि अशा सर्व बळ हरून निर्बल झालेल्यालाच हरिनामाचा आश्रय घेणे शक्य आहे! म्हणून चैतन्य महाप्रभू म्हणतात, “तृणादपि सुनीचेन”, गवताच्या पात्यापेक्षाही ज्याचा भाव दैन्य झाला, तोच भक्तीचा अधिकारी असतो. आणि हे हरायला त्या त्या व्यक्तीच्या स्थूल व सूक्ष्म अहंकारामुळे वेळ लागतो. परंतु असे असले, तरीही अगदी वैखरीने घेतलेले देखील एक नामही व्यर्थ जात नाही. संतश्रेष्ठ तुलसीदास मोठी गोड उपमा देतात. म्हणतात, शेतात दाणे पेरताना आपण कसेही पेरतो; त्याचे तोंड कुणीकडे आहे बघून मग पेरत नाही आणि तरीही पीक सगळीकडे सारखेच येते. तसे कसेही घ्या पण जर नाम घेतले तर त्याचे फळ मिळतेच. श्रीमहाराजही हेच सांगतात आणि पुढे जोडतात, श्रद्धेने घेतलेत तर जास्त बरे आणि वृत्ति सांभाळून नामात राहिलात तर त्याहूनही जास्त बरे! आणि हे महाराजांनी सांगितलेले पाळून जो नामात राहील त्याची प्रगती वेगाने होईल आणि प्रगतीशी देखील संबंध सुटून तो “स्थिती”त स्थिरावेल! आणि हे परिवर्तन मुळापासून झालेले असल्याने ते कायमचे असेल हे निश्चित!

||श्रीनाम समर्थ||

Thursday, April 23, 2020

श्री ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराजांचे बोधवचन क्र ७ --


श्रीमहाराजांचे बोधवचन क्र ७ –

नाम उपाधिरहित असल्यामुळे आपणही उपाधिरहित झाल्याशिवाय नामाचे प्रेम आपल्याला येणार नाही.

श्रीराम!
उपाधि म्हणजे काय याची व्याख्या करताना श्रीमहाराज एके ठिकाणी म्हणतात, “भगवंतावाचून इतर सर्व म्हणजेच उपाधि होय!” आता उपाधिची ही व्याख्या आपण वरच्या श्रीमहाराजांच्या वचनाला लावू. पहिल्या वचनाच्या भागात महाराज म्हणतात, नाम उपाधिरहित आहे. म्हणजेच भगवंतावाचून इतर जे जे म्हणून आहे, त्याविरहित असे त्याचे नाम आहे. म्हणजेच भगवंताचे नाम म्हणजेच प्रत्यक्ष भगवंत आहे! सरळसरळ इक़्वेशन आहे हे. याला वेदात ‘नेति नेति’ चा मार्ग म्हणतात. महाराज या छोट्याशा वचनात आपल्याला जणू वेदांचे सार सांगत आहेत. युरोपियन तत्त्वज्ञ याला “Reaching The Absolute Via Negativa” असे म्हणतात. म्हणजे, दृश्य जगात जे जे म्हणून आहे, जड वस्तूंपासून, जीव चराचरापर्यंत आणि त्यातही अगदी मनुष्यप्राण्याचा देह, मन, बुद्धी, अहंकारापर्यंत ही सगळी दृश्यातली उपाधि आहे आणि ही गळून पडली म्हणजे मग खऱ्या परमात्व तत्त्वाचा, जे नामरूप आहे, त्याचा बोध होतो असे महाराज सांगतात.

अजून एक मार्ग आहे तो म्हणजे “स इति स इति” किंवा “ReachingThe Absolute Via Affirma” हा मार्ग होय. म्हणजे जे दिसते आहे ते सर्व ईश्वरच आहे हा बोध होय. परंतु ज्ञानमार्गी असो वा भक्तीमार्गी, हा समग्रतेचा बोध त्याला सुरुवातीला नेति नेति या मार्गातून गेल्यावर मगच अनुभवास येतो. सर्व तोच आहे, हे नुसते म्हणणे आणि ते अनुभवास येणे या दोन गोष्टी साहजिकच परस्पर भिन्न आहेत. उपाधि देखील तोच आहे हे म्हणताना त्या उपाधि त्या मूळ तत्त्वाचे केवळ projection आहे हा विसर पडला तर मनुष्य गाभ्याला विसरून केवळ फोलपटालाच सर्वस्व मानू लागतो व आज आमचे तसेच झाले आहे. त्यामुळे श्रीमहाराज जे सांगतात, ‘भगवंतावाचून सर्व उपाधि’ हाच मार्ग आम्हास या वरवरच्या दृश्य जगापासून ‘मनाने’ दूर ठेवून त्या खऱ्या ईश्वर तत्त्वापर्यंत पोहोचवू शकतो.

वचनाच्या दुसऱ्या भागात जे सांगितले महाराजांनी, उपाधिरहित झाल्याशिवाय नामाचे प्रेम आपल्याला येणार नाही, हे सर्व अध्यात्म साधनेचे रहस्य आहे. एका वाक्यात बघायचे तर “बहिर्मुखता मनाने त्यागल्याखेरीज नामाचे प्रेम येणार नाही.” संत जे एकांतात नाम किंवा ईश्वराचे चिंतन करण्यास सांगतात, त्यामागे हाच हेतू आहे. जीव बहिर्मुख झाला म्हणून कर्मबंधनात अडकला. ‘मी कुणीतरी आहे’ हा अहंकार आणि त्यापोटी गोळा झालेली ‘माझे घर, माझी माणसे, माझा पैसा, माझा देह, मला अमुक आवडते, अमुक आवडत नाही, मला हे व्हावे वाटते, हे व्हावे वाटत नाही, मला मानसन्मान प्रतिष्ठा लाभावी वाटते, माझे कौतुक व्हावे वाटते” वगैरे भुते मनुष्याला उपाधींचा दास बनवतात. एकच उदाहरण घ्यायचे तर हा देह जो भगवंताने आम्हाला त्या भगवंताची भक्ती करण्यासाठी किंवा ‘मी कोण आहे’ याचे शोध घेऊन आत्मानंदात स्थिर होण्यासाठी दिला त्याचा उपयोग आम्ही केवळ त्या देहाचे लाड करण्यासाठी करतो आणि वर हा माझा देह म्हणून मिरवतो, त्याला सजवतो, त्याची वारेमाप काळजी घेतो. हे म्हणजे कुणीतरी आम्हाला नारळ दिला आणि आम्ही त्यातले गोड पाणी पिण्याऐवजी किंवा मऊ खोबरे खाण्याऐवजी त्याची करवंटी खाण्याचा चंग बांधण्यासारखे आहे. या सर्व देहाच्या उपाधि त्या करवंटी सारख्या आहेत. भगवत् तत्त्व त्यातले गोड पाणी व खोबरे म्हणजे त्या तत्त्वाची सगुण भक्ती होय! परंतु करवंटी फोडल्याशिवाय हे मिळणार कसे? तद्वतच जोवर बाह्य गोष्टींचा मनाने त्याग होत नाही, तोवर आतला भगवंत प्रेमाचा – नाम प्रेमाचा मधुर गर चाखायला मिळणार कसा?

त्याग मनानेच करायचा आहे हे मान्य; परंतु संत काय म्हणतात की, ही उपाधींच्या त्यागाची सुरुवात थोडी तरी बाहेरून केली पाहिजे. एकदम मी आतून विरक्त होईन हे आजच्या भोगप्रधान संस्कृतीत कसे शक्य आहे? जितके शक्य तितके साधे खाणेपिणे, कमीतकमी कपडा लत्ता, नको असलेल्या खरेद्या टाळणे, अनावश्यक लोकसंग्रह टाळणे, वगैरे साध्या साध्या गोष्टी तरी नाम साधकाने करायला नकोत का असे संत विचारतात. जगाच्या प्रवाहात पडलेल्यांना हा मूर्खपणा वाटणे साहजिक आहे. पूज्य बाबा बेलसरे प्रवचनात म्हणायचे, तुम्हाला साधक बनायचे आहे ना? मग हे केले पाहिजे! मी आता आहे तसाच राहणार, वागणार आणि तरीही मला परमार्थ मार्गात प्रगती साधायची इच्छा आहे, तर हे जमणे शक्य नाही. एक संत आपल्या अभंगात म्हणतात, “देव बाजारचा भाजीपाला न्हाय रं||” त्या शाश्वत परम तत्त्वाची ओळख अशी बरी आहे त्या जागी होईल? मनाची उत्क्रांती होणे हाच मार्ग त्याच्याप्रत घेऊन जाऊ शकतो. तुम्ही बाहेरून काय करत आहात याला भगवंताच्या राज्यात फारसे महत्त्व नाही; तुमचे मन कुठे आहे, मनाचे व्यापार काय सुरु आहेत, यावर त्याची प्राप्ती अवलंबून आहे. म्हणून म्हटले आहे, “चिंतने चिंतने तद्रूपता” आम्ही दिवसभर जगाच्या व्यापारांचेच चिंतन केल्यामुळे आज बहिर्मुख होऊन जगाशी, दृश्याशी तद्रूप झालो आहोत. हेच जर आम्ही भगवंताचे चिंतन मनापासून आरंभले, सद्गुरू उपदिष्ट मार्गाने नाम साधन सुरु केले व जास्तीत जास्त काळ भगवत चिंतनात राहिलो, तर तुम्ही का भगवत रूप होणार नाही? असे श्रीमहाराज विचारतात.

प्रेमाचे रहस्य तादात्म्य होण्यात किंवा तद्रूप होण्यात आहे. ज्याने भगवंताच्या नामाला, जे सदगुरूंकडून आपल्याला मिळालेले आहे, तेच आपल्या जीवनाचे सर्वस्व मानले व स्वतःला गुरूच्या स्वाधीन केले त्याला या बाह्य उपाधि काय बाधा पोहोचवू शकतील? गुरुदेव रानडे म्हणायचे, “या विश्वात अशी शक्ती नाही जी नामाच्या शक्तीला बाधा पोहोचवू शकेल! अशी कोणतीही गोष्ट नाही जी नामाच्या साधकाला साधनेमध्ये विघ्न निर्माण करू शकेल.” सर्व विघ्न हे आपल्या मनाच्या विकल्पांमुळे आहे. संकल्प विकल्प असलेले हे मनच ज्याने सद्गुरू चरणी अर्पण केले त्यालाच ते परम पावन नामाचे प्रेम जाणवेल व त्याचे आयुष्य कृतकृत्य होईल असे श्रीमहाराज म्हणतात!

||श्रीनाम समर्थ||

Wednesday, April 22, 2020

श्री ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराजांचे बोधवचन क्र ६ --


श्रीमहाराजांचे बोधवचन क्र ६ –

नामात राहणारा पुरुष फार थोर असला पाहिजे.

श्रीराम!
एक तत्त्वज्ञानी म्हणतो, Thoughts are places; choose wisely where you want to live!” म्हणजे चित्तातले विचार हेच मनुष्याच्या राहण्याचे ठिकाण असते; त्यामुळे तो म्हणतो, तुला कुठे राहायचे आहे, हे तू हुशारीने ठरव. म्हणजेच तुझे चित्त अशा उत्तम विचाराने भरलेले वा भारलेले असू दे, जेणेकरून तुला त्याच्यातच रमायला आवडेल. श्रीमहाराज जेव्हा म्हणतात, “नामात राहणारा” त्याचा अर्थ ज्याच्या चित्तात नाम भरून आहे आणि नामाव्यतिरिक्त विचाराला तेथे फारसा थारा नाही! मन आणि चित्त या दोन संज्ञा महत्त्वाच्या आहेत. मनात अनेक विचार येतात; तो मनाचा धर्मच आहे. श्रीखंडाचा विचार आला तर मनःचक्षूंसमोर श्रीखंड येते; पण जेव्हा श्रीखंडाचा विचार वरचेवर येऊ लागतो तेव्हा मन श्रीखंडरूपच होते, तेव्हा ते चित्त बनते आणि ते श्रीखंड चित्तात वास करते. तद्वत सद्गुरूंनी दिलेले नाम त्याच्या अभ्यासामुळे व सद्गुरू कृपेने जेव्हा चित्तात वास करते, तेव्हा मनात विचार कोणतेही असोत, त्या नामाच्या स्थानाला धक्का लागत नाही व साधक नामाला आपले घर मानू लागतो. पूज्य बाबा बेलसरे एके ठिकाणी म्हणतात, “नाम हे रमणस्थान व्हावे”. प्रपंचातली अनेक कर्तव्य कर्मे केल्यानंतर जर मनाला कुठे विश्रांती मिळणार असेल, विसावा मिळणार असेल तर ते म्हणजे भगवंताचे नाम! असा अनुभव ज्या साधकाला येऊ लागतो, त्याला नाम ‘घ्यावे’ लागत नाही, तो नामात ‘राहतो’!

असा पुरुष फार थोर असला पाहिजे म्हणताहेत महाराज. स्वाभाविक आहे. कारण,

(१) त्याचे आयुष्यातले ध्येय निश्चित झाले आहे – परमार्थ तोवर अवघड आहे, जोवर मनुष्यजन्माचे ध्येय निश्चित होत नाही. भगवंत गीतेत सांगतात, “व्यवसायात्मिका बुद्धि: एकेह कुरुनंदन!” म्हणजे मनुष्यजन्मासारखे उज्ज्वल वरदान पदरात पडल्यानंतर तुझ्या बुद्धीचा निश्चय होणे जरूर आहे म्हणतात भगवंत. जो नामात राहतो, म्हणजेच भगवंत चिंतनात राहतो, त्याचे ध्येय असे निश्चित झालेच असले पाहिजे आणि ध्येयनिश्चिती म्हणजे अर्ध्याहून अधिक पल्ला गाठणे म्हणतात सर्वच संत. म्हणून अशी व्यक्ती थोरच यात शंका नाही!

परमार्थ मार्गावरील सर्व गडबड हा एक मुद्दा स्वतःचा स्वतःशी स्पष्ट न झाल्यामुळे आहे. मनुष्य प्रवाहपतित होऊन जातो. अनेक लोक जे करत आहेत आणि बाह्यतः सुखी दिसत आहेत, ते न करता मी भगवंताच्या – त्याच्या नामाच्या नादी लागणे हा मूर्खपणा तर ठरणार नाही ना? याच प्रश्नाचे उत्तर शोधता शोधता अर्धे आयुष्य निघून जाते! आणि असे आहे, की एक तर निश्चय असतो किंवा निश्चय नसतो. ‘माझा 50 टक्के निश्चय झालेला आहे की आता मला परमार्थ खुणावतो आहे’ वगैरे वाक्ये केवळ आत्मवंचना होय. सरधोपट मार्ग आक्रमताना आम्ही सारासार विचार करताना दिसत नाही. अनेक लोक अमुक चित्रपट बघताहेत म्हणजे मीही बघितला पाहिजे असा आमचा सारासार विचार (!) असतो. अनेक संतांनी, सद्गुरूंनी अनुभव घेऊन, छातीवर हात ठेवून “तू इकडे फक्त ये, मी तुझा उद्धार करीन आणि तुला शाश्वत आनंदाप्रत नेईन” हे जे सांगितलेले आहे, तिथे आम्ही आमची so called सारासार बुद्धी वापरतो आणि ती अजूनही ‘असाराच्या’ जास्त आश्रयाला असल्यामुळे ‘सार’ आमच्या हातून निसटते. त्यामुळे अशी ज्याची बुद्धी स्थिर होऊन सारग्राही झाली तो निश्चितच थोर होय म्हणतात महाराज!

(२) हे जग वासनाधिष्ठित आहे. मनुष्याचा जन्मच मुळी वासनेतून आहे. या वासना अनंत जन्म गोळा झालेल्या वृत्तींमधून जन्मतात, विकारांमधून जन्मतात. त्यांची परिणती ऊर्मी मध्ये होते आणि ऊर्मी आली की कृती घडते हा क्रम आहे. या चक्राची मनुष्याला किंवा जिवाला अनंत जन्मांच्या संस्कारांमुळे इतकी सवय झालेली आहे की त्यातून बाहेर पडणे ही खरोखर ‘जीव के बस की बात नहीं है!’ मग जमायचे कसे? तर, सद्गुरू अनुग्रहामुळे, कृपेमुळे, सत्संगामुळे मनुष्याची अशी वृत्ति जागी होते – व्हावी की मला यातून बाहेर पडायचे आहे. ही तळमळ ज्याला लागली त्याच्यावर गुरुकृपा झालीच आणि या कृपेचे स्वरूप म्हणजेच नामात गोडी! ही गोडी लागलेला मनुष्य हा खऱ्या अर्थाने गुरुपुत्र असतो आणि त्याच्यावर साहजिकच विशेष गुरुकृपा असते, किंबहुना तो चालतीबोलती कृपाच असतो! आणि अशी हा कृपापात्र (ज्याच्या पात्रात – भांड्यात फक्त कृपा वसते) व्यक्तीच “थोर” या संज्ञेस लायक असते!

(३) श्रीमहाराजांना जेव्हा कुणी विचारत, की महाराज, कुंडलिनी जागृत करण्यासाठी काही करावे का? तेव्हा श्रीमहाराज हसून म्हणायचे, “अरे, ज्याच्या मुखात नाम आहे, त्याची कुंडलिनी जागृत झाली असलीच पाहिजे!” नाम मुखात, चित्तात वसणे हे येऱ्यागबाळ्याचे काम नोहे, तेथे पाहिजे जातीचे! म्हणजेच त्याची निष्ठा दृढ हवी की नामच मला या भवसागरातून तारणारे आहे, गुरूंच्या शब्दांवर पूर्ण विश्वास हवा, संपूर्ण अनन्यता हवी. अनन्य साधकच शेवटपर्यंत पोहोचू शकतो. भगवंताप्रत किंवा शाश्वत समाधानाप्रत जाण्याचे असंख्य मार्ग आहेत. बहुतेक वेळा गडबड अशी होते की सदगुरूंकडून नाम घेऊन अभ्यासाला सुरुवात केल्यानंतर काही दिवसांनंतर कुणाचा काही अनुभव ऐकला की वाटते, मला तर काही अनुभव नाही, म्हणजे मला बहुधा नामाच्या जोडीला अजून काहीतरी करणे आवश्यक आहे. हाच तो बुद्धिभेद करणारा विकल्प! याला विटाळ समजून दूर ठेवतो व सद्गुरूंनी दिलेल्या नामाव्यातिरिक्त अन्य उपासनांचा आश्रय जो कदापि घेत नाही तोच थोर शिष्य. श्रीमहाराज म्हणतात, ब्रह्मदेवाने जरी सांगितले तरी नामाची निष्ठा कमी होऊ देऊ नये! असा नामनिष्ठ - नामात राहणारा साधक – शिष्य थोर असेल यात काय नवल?

(४) मनुष्याचे थोरपण त्याच्या जास्तीत जास्त निस्वार्थ होण्यात दडले आहे. एके ठिकाणी महाराज म्हणतात, संपूर्णपणे निस्वार्थी होणे म्हणजे परमार्थ! नाम साधन हे असे निस्वार्थतेकडे घेऊन जाणारे साधन आहे. कारण सद्गुरुंकडून नाम मिळण्याअगोदर बहुतेक जणांचा समज असा असतो, की धार्मिकता म्हणजेच अध्यात्मिकता. मनुष्य धार्मिक आहे, बऱ्यापैकी नीति पाळतो, देवाची पूजा अर्चा करतो, देवळात जातो, काही मंत्र विधी करतो तो धार्मिक असे म्हटले जाते. पण जर असे करणाऱ्या बहुतेक लोकांना विचारले, किंवा त्या लोकांनीच जर आत्मपरीक्षण केले तर हा धार्मिकपणा बव्हंशी ‘लौकिक गोष्टींचा मोह’ किंवा ‘काही अनिष्ट होऊ नये याची भीती’ यांवर अवलंबून असतो. तिथे निर्भयता नसते आणि अध्यात्मिकतेत किंवा परमार्थात मोह वा भीती यांना स्थानच नाही! सद्गुरू उपदिष्ट साधनेचा पायाच मुळी ‘अंतःशुद्धी घडून त्या अनंताचा साक्षात्कार करून घेणे’ हा आहे. त्यामुळे जो साधक नामात राहतो, त्याची अंतःशुद्धी बऱ्याच प्रमाणात झालेली आहे म्हणावयास नक्कीच हरकत नाही. कारण जोवर लौकिक कामना, भय निवारण वा तत्सम इच्छा असतील, तोवर नामात राहण्याइतके नामास चिकटणे शक्य होणार नाही! जेव्हा या गोष्टी bucket list मधून हद्दपार होतील आणि bucket मध्ये फक्त एक नामचिंतनच उरेल तेव्हाच ती थोरवी साधकास प्राप्त होईल!

असे अनेकानेक मुद्दे सांगता येतील, जेणेकरून नामात राहणारा थोर हे निश्चितच सिद्ध होईल, किंबहुना तो सिद्धच आहे! ज्याला नाम मिळाले व जो नामाला चिकटला, यापेक्षा मोठी सिद्धी ती कोणती?? मनुष्य जीवनाचे इतिकर्तव्य ते हेच!

||श्रीनाम समर्थ||

Tuesday, April 21, 2020

श्री ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराजांचे बोधवचन क्र ५ --


श्रीमहाराजांचे बोधवचन क्र ५ –

नामाचे साधन हे ‘फास्ट’ गाडीप्रमाणे आहे. रंग दिसणे, प्रकाश दिसणे, आवाज ऐकू येणे, ही मधली स्टेशने सोडून नाम एकदम भगवंताकडे नेऊन पोचवते.

श्रीराम!
साधनाचे महत्त्व आणि किंमत वाढत जाण्यास परमार्थात काही परिमाणे आहेत-- 
(१) साधन किती सुलभ व सहज आहे
(२) साधन किती आनंददायक आहे
(३) साधन दृश्यापासून किती विलग आहे
(४) साधन साध्याच्या किती जवळ आहे

या चारही परिमाणांना पुरून उरेल असे असेल तर केवळ भगवंताचे नाम आहे! उपनिषदात भगवंताला म्हटले आहे, “रसो वै सः||” म्हणजे भगवंत हा रसरूप, आनंदरूप आहे. भगवंतामध्ये रस आहे, त्याच्यामध्ये आनंद आहे असे म्हटलेले नाही हे ध्यानात येते. तो स्वतः आनंदरूपच आहे असे म्हटले आहे. त्याच धर्तीवर वरचे चारही मुद्दे नामाच्या संदर्भात बघता येतील.

(१) नाम हीच सुलभता आणि सहजता आहे. नामाच्या साधनेसाठी जिवाला कसलीही आटाआटी करण्याची जरूर नाही. आपण जिथे असू तेथे, कोणत्याही परिस्थितीत, कशाही वातावरणात नाम घेऊ शकतो; किंबहुना शासोश्वासी नाम जपावे हाच आग्रह सर्व संत करताना दिसतात. आणि श्वास किती सहज आहे! तितकेच सहज नाम अभ्यासाने जमू शकते.
(२) नाम खचितच आनंदरूप आहे. नामैव परमानंदो म्हटलेले आहे. येथे आनंद चा अर्थ लौकिक सुख नव्हे; त्याला दुःखाची बाजू असते. जो खरा आनंद असतो, तो सूर्यासारखा असतो. सूर्याला जसा अंधार माहिती नाही, तद्वत नामाच्या आनंदाला दुःखाची बाजूच नाही. कारण, या जगातील सुख आणि दुःख हे उपाधींवर अवलंबून असते आणि नाम हे संपूर्णपणे निरुपाधिक आहे आणि तसे ते असल्यामुळेच आनंदरूप आहे!
(३) निरुपाधिक सद्वस्तु दृश्यापासून विलग असेलच यात काय संशय? अद्वैत वेदांतामध्ये दृश्याला मिथ्या म्हटले आहे किंवा केवळ सद्वस्तु चे एक projection म्हटले आहे. त्यामुळे या दृश्यातील जी जी म्हणून साधने आहेत (योग, याग, तप, देहदंडण वगैरे), ती बव्हंशी मूळ तत्त्वाच्या एका आयामातून आलेली आहेत असे म्हटले तर वावगे ठरू नये. परंतु, नाम हा विश्वाच्या उगमाचा हुंकार आहे, राम हे तत्त्वच विश्वाचा उगम आहे आणि उगम हा मायेच्या पलीकडे असतो. त्यामुळे नाम हे दृश्यापासून विलग आहेच यात शंका नाही.
(४) सत् असा परमात्मा चित् रूप झाल्या झाल्या जे प्रकट झाले ते नाम! (इच्छा असलेल्यांनी चरित्रातील श्रीमहाराज आणि तुकाराम बुवा वलव्हणकर यांमधील संवाद वाचावा) आणि असे हे सत् चित् एकत्र येऊन पराशक्ती द्वारा आनंद निर्मिती झाली! तेच सच्चिदानंद परमात्म्याचे रूप! त्यामुळे अगदी तार्किक रीतीने देखील हे स्पष्ट होते की नाम आणि नामी किंवा भगवंत यांत भेद नाही! त्यामुळे नाम साधन हे साध्यरूपच आहे यात मुळीच शंका नाही!

श्रीमहाराज जे म्हणतात, “नामाचे साधन ‘फास्ट’ गाडीप्रमाणे आहे”, याचे कारण हे! श्रीमहाराज अजून एकीकडे जे म्हणतात, जो नाम घेईल त्याच्या मागे पुढे मी घोटाळत राहतो, तसे केल्याशिवाय भगवंताला गत्यंतर उरत नाही, याचेही कारण हेच! की साधक नाम घेऊ लागला याचाच अर्थ प्रत्येक नामागणिक तो सद्वस्तु च्या निकट चालला. भक्त म्हणेल, मला सगुण रामाच्या सन्निध राहून दास्यभक्ती करायची आहे आणि ज्ञानी म्हणेल मला त्या शाश्वत राम तत्त्वाशी एकरूप व्हायचे आहे! आंतरिक भाव कोणताही असला तरीही नाम साधन त्या साधकाला त्याच्या गंतव्य स्थानापर्यंत पोहोचवल्याशिवाय राहायचे नाही हे निश्चित!

बाह्य साधने करणाऱ्यांना बहुतेक वेळा साधनात काही सिग्नल्स किंवा संकेतस्थळे अपेक्षित असतात. प्रकाश दिसणे, सुगंध येणे, आवाज ऐकू येणे, रंग किंवा चांदण्या दिसणे आणि काही लहान मोठ्या सिद्धी या त्या गोष्टी होत. नेमाने केलेल्या नामानेही काहींना हे अनुभव येतात. परंतु या वचनात श्रीमहाराज मुद्दाम हे सांगत आहेत की हे अनुभव आले म्हणजेच तुम्ही योग्य मार्गावर आहात असे समजण्याचे कारण नाही. किंबहुना इतरही अनेक ठिकाणी महाराजांनी सावध केले आहे, की हे संकेत अनेकदा साधकाला त्याच्या मार्गावरून भ्रष्ट करतात, कारण मग साधक त्यात अडकतो आणि त्याचा पुढचा मार्ग अवरुद्ध होतो. पूज्य बाबा बेलसरे यांनी एका प्रवचनात श्रीमहाराजांनी दिलेले एक सुंदर उदाहरण सांगितले आहे. ज्याला या प्रकारचे अनुभव येऊ लागतात किंवा काही सिद्धी नाम साधनेने येऊ लागतात, त्यांना सद्गुरू सांभाळतात. कसे? तर, श्रीमहाराज एक उदाहरण द्यायचे, एक घोडा होता. त्याच्यावर स्वार होऊन रोज एक घोडेस्वार एका गावाहून दुसऱ्या गावाला जायचा. रोजचा तोच रस्ता. पण हा रस्ता एका जंगलातून जायचा आणि जंगल आले म्हणजे तो घोडा बुजायचा आणि नीट पुढे जायचा नाही. मग हा स्वार काय करायचा, की ते जंगल सुरु व्हायच्या आगोदर घोड्याला जोरात टाच मारायचा की तो घोडा चौखूर उधळून वेगाने धावू लागायचा आणि त्या नादात जंगल पार व्हायचे! तसे महाराज म्हणाले, जेव्हा असे लौकिक अनुभव किंवा सिद्धी साधकाला येतात, तेव्हा असे काहीतरी सद्गुरू घडवून आणतात की त्या सिद्धी राहतात बाजूला आणि हा त्यांना त्यागून किंवा ओलांडून पुढे जातो आणि ही खरी सद्गुरूची कृपा आहे म्हणतात महाराज!

आपलं प्राप्तव्य काय आहे हे क्षणभर देखील नजरेआड होऊ नये यासाठी हे श्रीमहाराजांचे वचन आहे. भगवंत – अखंड समाधान – शाश्वत आनंद हे आपले मनुष्य जन्मातील प्राप्तव्य आहे. एक संत सांगायचे, अशी छोट्या छोट्या सिद्धी रूपी आमिषे मला जेव्हा भगवंत साधन मार्गात देऊ लागला, तेव्हा मी त्याच्यासोबत भांडण आरंभले. “तू काय मला लहान लेकरू समजलास होय? लेकरू आईला त्रास देऊ लागले की आई त्याच्यासमोर काहीतरी खेळणे टाकायची आणि तात्पुरते ते लेकरू शांत व्हायचे. तसे या लहान सहान अनुभवांचे, सिद्धींचे खेळणे टाकून तू मला शांत करू बघतोस होय? मुळीच नको. भगवंता, मला तू हवा आहेस आणि तू मिळाल्याशिवाय तुझे हे लेकरू शांत होणार नाही!” 
साधनेतील वरवरचे अनुभव, सिद्धी यांची किंमत यावरून स्पष्ट व्हावी!

आणि म्हणून साधन जितके उपाधिरहित, तितके ते साधन करणारा हळूहळू का होईना उपाधिरहित होऊ लागतो; निदान उपाधिरहित व्हावे अशी आस तरी त्याच्यात निर्माण होते आणि तो सरळ त्या शाश्वत तत्त्वाच्या कुशीत जाऊन विसावतो!

||श्रीनाम समर्थ||