Monday, August 31, 2020

श्री ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराजांचे बोधवचन क्र ७२ --

श्रीमहाराजांचे बोधवचन क्र ७२ –

‘परिस्थिती चांगली आली तर नाम घेईन’ असे म्हणणारा मनुष्य नाम कधीच घेत नाही.

श्रीराम!
आम्ही श्वास न घेतल्याने गुदमरायला लागलो तरच श्वास घेऊ असे म्हणतो का?
आम्ही भुकेने कासावीस होईपर्यंत खायचे राहतो का?
आम्ही घरात धान्याचा एक दाणा देखील न उरेपर्यंत धान्य भरायचे टाळतो का?
जर आपली मुले वाईट मार्गाला लागली तर ती आपोआप सुधारेपर्यंत हातावर हात धरून बसतो का?
अशी किती उदाहरणे देता येतील जिथे आम्ही कोणत्याही स्थळ काळ परिस्थितीचा जास्त विचार न करता जे करणे उचित आहे ते कर्म करतो. मग जिथे या मनुष्य जन्माच्या इतिकर्तव्याचा प्रश्न आहे, तिथे तुम्ही गाफील कसे काय राहू शकता असे श्रीमहाराजांसारखे संत आम्हाला विचारतात. परंतु सत्यत्वाची कल्पनाच उलट झाल्यामुळे या जगातल्या गोष्टींसाठी आम्ही सर्वस्व पणाला लावून कर्म करण्याचा प्रयत्न करतो, मात्र अध्यात्मिक आयुष्याबद्दल अजूनही मनात स्पष्टता नसल्या कारणाने नामाच्या बाबतीत आमची संकल्पशक्ती दृढता धारण करत नाही. किंवा, श्वासासारखे सहज खरे तर केवळ नाम आहे ही संकल्पना आम्हाला फक्त बुद्धीला संतांनी सांगितलेली म्हणून माहित असल्या कारणाने त्या अनुभूतीला वंचित झालेले आमचे मन बुद्धीचे वर्चस्व झुगारून देते व मनमानी करते.

आजच्या वचनात हाच मनबुद्धीचा गाफीलपणा श्रीमहाराज आम्हाला सांगत आहेत. जोवर आम्ही या देहाला ‘मी’ मानत आहोत, तोवर नामाच्या सत्तेचा सांगोपांग अनुभव आम्हाला येणे शक्य नाही. पण हा अनुभव येणे किंवा या अनुभवात स्थित होणे हे नामाला सर्वस्व मानल्याशिवाय संभवत नाही असे श्रीमहाराज आम्हाला सांगतात.

मुळात नामाचे अस्तित्व कोणत्याही परिस्थितीने बांधण्याजोगे नाही. जे सदा सर्वदा आहेच ते नाम! परंतु हे नामाचे सर्वव्यापी, सर्वसाक्षी अस्तित्व अजून आम्हाला न कळल्यामुळे आमची मनस्थिती आज व्यवस्थित नाही, आज घरामध्ये काही शुभ अशुभ प्रसंग घडला, आज आम्ही गर्दीच्या ठिकाणी आहोत, घरामध्ये नामाला – साधनेला अनुकूल वातावरण नाही, अशी एक ना अनेक परिस्थितीशी निगडीत कारणे नाम साधन न होण्याला आम्ही देत असतो याची जाणीव संतांना असते. म्हणूनच समर्थ म्हणाले,
“आधी आवदसा मग दसा| अथवा दसेउपरी आवदसा|
प्रसंग असो भलतैसा| परंतु नाम सोडू नये||”
हे सांगण्याचे मुख्य कारण पुन्हा हेच की भगवत्प्राप्तीच्या नाम साधनेचे मुख्य वैशिष्ट्यच हे आहे की ते सर्वतोपरी ‘मनाने’ करावयाचे साधन आहे. आपल्या देहाला प्रारब्धानुसार परिस्थितीचे बंधन निश्चित असू शकते. मात्र मनाला बंधन केवळ मनाच्याच क्षुद्र विचारांचे असू शकते. हे मनाचे मनावरचे बंधन मनानेच काढून टाकणे याचे नाव साधना! त्यामुळे आजच्या वचनात श्रीमहाराज सावध करीत आहेत की जर आम्ही परिस्थितीचे कारण सांगत राहिलो तर आमच्याकडून साधन घडणे संभवतच नाही. कारण लौकिक जगाला कोणत्या ना कोणत्या परिस्थितीचा शाप हा असणारच. इथे तथाकथित सुखोपभोग देखील साधन दृष्ट्या शापच आहे हे ज्याला उमजले त्यालाच खऱ्या अर्थाने साधनाची तळमळ लागते. हे लक्षात घेऊन ज्याने परिस्थितीचे बंधन झुगारून आपल्या मनाला तयार केले – करण्याचा प्रयत्न केला, त्याच्यामागे सद्गुरू कृपा सदैव विलसत राहते हा साधकांचा अनुभव आहे.

इथे अजून एका आपल्या मनाच्या विरोधाभासाबद्दल श्रीमहाराज आम्हाला सावध करीत आहेत. अध्यात्म साधन हे पूर्णपणे अंतरंगातले आहे, बाह्य गोष्टींशी त्याचा संबंध नाही हे आम्हाला माहित आहे; पण जेव्हा आम्ही परिस्थितीचे कारण देतो, तेव्हा साहजिकच साधन देखील बहिर्मुख आहे या चुकीच्या भावात स्थित होतो. जेव्हा हा अंतरंग – बहिरंगातला विरोधाभास तीव्र होतो, तेव्हा अत्यंत हानिकारक जर कोणती गोष्ट होत असेल तर ती म्हणजे आम्ही परमार्थाला प्रपंच बनवतो आणि श्रीमहाराज व संत आम्हाला प्रपंचाला परमार्थ बनवायला सांगतात. परिस्थितीशी आमचे साधन निगडीत झाल्यामुळे याच्या बरोबर उलट गोष्ट घडते आणि आम्ही तथाकथित बाह्यांगालाच सत्य समजून आत्मवंचना करून घेतो.

इथे एक गोष्ट समजून घेणे अत्यावश्यक आहे, जी आम्हाला समजावून सांगण्यासाठी यासारखी वचने श्रीमहाराज आम्हाला देतात. ती म्हणजे, नाम हेच ते अंतिम सत्य आहे, ज्याच्या अनुभूतीने संपूर्ण दुःख निवृत्ती व अखंड आनंद प्राप्ती साधते. तेच अनादि सत् तत्त्व नामरूपाने आम्हाला सदगुरूंकडून मिळालेले आहे. या तत्त्वाचे वैशिष्ट्य काय? ज्या तत्त्वात स्थळ, काळ, निमित्त (परिस्थिती) यांमुळे कसलीही वाढ अथवा घट होत नाही, जे अनिर्वचनीय प्रेमस्वरूप नाम शाश्वत दिव्य तत्त्व आहे, ज्याच्या पार्श्वभूमीवर हा विश्वाचा दृश्य विलास पडद्यावरच्या चित्रपटाप्रमाणे आम्हाला दिसतो आहे, त्यालाच “नामतत्त्व” म्हणतात. जेव्हा आम्ही आमचे नाम स्थळ-काळ-निमित्ताच्या परिघात बसवतो, तेव्हा आम्ही नसलेली उपाधि त्या शाश्वत तत्त्वाला लावून आमचीच दिशाभूल करतो व जे आत्मस्वरूपाचे स्टेशन गाठायचे ते कधी गाठता येत नाही. श्रीमहाराजांचे वचन नेहमीच ‘घागर में सागर’ या पद्धतीचे असते. त्याचा आवाका हा प्रचंड मोठा असतो. त्या वचनामागचा त्यांचा हेतू हा साधन आणि साध्य या दोन्हीला व्यापणारा असा असतो. त्याचे सम्यक आकलन आम्हाला निश्चितच आमच्या साधनेशी एकनिष्ठ ठेवते व छोट्या छोट्या वचनांमधून आम्हाला सतत त्या शाश्वत तत्त्वाच्या - नामाच्या निकट नेण्याच्या आमच्या कृपासिंधु सद्गुरूंच्या अथक प्रयत्नांमुळे त्यांच्या चरणी वारंवार नतमस्तक करते!

त्यांचे म्हणणे एकच, नाम हे एकच तत्त्व आहे... दूजा तत्त्व न होई! तुम्ही त्याला माना अगर नका मानू ते आहेच. परंतु जर मानून त्याच्यातच तुम्ही एकरूप झालात तर ‘पुनरपि जननं पुनरपि मरणं’ च्या चक्रातून सुटून मुक्त व्हाल... म्हणून सगळी त्यांची धडपड!

||श्रीनाम समर्थ||




Saturday, August 29, 2020

श्री ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराजांचे बोधवचन क्र ७१ --


श्रीमहाराजांचे बोधवचन क्र ७१ –

खेड्यातले लोक वयात आल्याबरोबर आपले लग्न करून टाकतात. ते गरीब असले तरी ‘उद्याचे उद्या बघू’ असे म्हणतात; पण शहरातले विद्वान लोक मात्र लवकर लग्न करीत नाहीत. तसे, साधारण आणि अडाणी लोक नाम घ्यायला सांगितले की नाम घेतात, परंतु विद्वान लोक मात्र ‘नामाचे प्रेम असेल तरच नाम घेईन’ असे म्हणतात.

श्रीराम!
भक्तिमार्गी संतांना नेहमीच सरळसोट स्वभावाची साधी भोळी माणसे जास्त आवडतात. याचा अर्थ ते समदर्शी नसतात का? तर तसे नव्हे. त्यांना देखील आवडते नावडते असते का? तर तसेही नव्हे. परंतु जिथे अध्यात्म शास्त्र – भगवत् शास्त्राची बात येते, तिथे मात्र ते spade is spade असे सांगणारे असतात. किंबहुना असे स्पष्टपणे सांगणे व समाजाला योग्य मार्गाकडे वळवणे यासाठीच तर आपला अखंड आत्मानंद सोडून ते आमच्यासारख्या प्रापंचिक माणसांमध्ये पडतात. तद्वत श्रीमहाराजांनी प्रत्येक वचनातून आम्हाला सावध करण्याचा जणू चंग बांधला आहे म्हटले तर वावगे ठरू नये. आजच्या वचनात ते एक अगदी साधे दिसणारे असे उदाहरण देऊन आम्हाला पुन्हा नामाचेच महत्त्व पटवून देत आहेत.

“खेड्यातले लोक वयात आल्याबरोबर आपले लग्न करून टाकतात. ते गरीब असले तरी ‘उद्याचे उद्या बघू’ असे म्हणतात; पण शहरातले विद्वान लोक मात्र लवकर लग्न करीत नाहीत” – साधी माणसे आपले जीवन कसे साधेपणाने, जास्त विचार न करता जगतात हे इथे महाराजांनी सांगितले आहे. वचनाचा दुसरा भाग अर्थातच जास्त महत्त्वाचा आहे; परंतु या भागात देखील ‘विनाकारण विचार’ करण्याच्या आमच्या वृत्तीवर ताशेरे आहेत. श्रीमहाराज आणि सर्व संतांचे असे म्हणणे आहे की आमचे सर्व दुःख आम्ही ‘वर्तमानकाळात न जगल्याने आहे.’ आम्हाला एक तर भूतकाळात घडून गेलेल्या गोष्टी त्रस्त करतात किंवा भविष्यकाळ चिंतित करतो. त्यामुळे दोन गोष्टींना आम्ही मुकतो – १) वर्तमानात आम्ही निर्णय क्षमता गमावतो आणि २) वर्तमानातला आनंद गमावतो. जसे इथे महाराज म्हणतात, साधी भोळी माणसे फार विचार न करता आलेल्या परिस्थितीचा वर्तमानात विचार करतात आणि त्यामुळे बहुतेकदा त्यांचे आयुष्य फार कटकटीशिवाय बरे जाते. परंतु तथाकथित विद्वान लोक आपल्या बुद्धीवर जास्तच अवलंबून राहतात व कोणत्याही परिस्थिती अती विचार करून लवकर घेण्याच्या निर्णयाला उशीर लावतात व त्यामुळे आयुष्यातल्या लौकिक गोष्टीतच जास्त अडकून पडतात. ही गोष्ट सांगण्याचा महाराजांचा मुख्य हेतू हा, की आम्ही उगीच लौकिक कर्म, त्याचे कारण आणि त्याचा परिणाम यांमध्येच जास्त बुद्धी लावतो व जे खरे सत्कर्म – भगवत कर्म – नामस्मरण – साधना – यांसाठी आम्हाला उशीर होत जातो.

स्वामी माधवनाथ (स्वामी स्वरूपानंदांचे शिष्य) म्हणायचे, साधकाने जे काही काम आहे ते लवकर संपवावे. बँकेत पैसे ठेवायचे आहेत ना, जा ठेवून या, आता पुन्हा त्याचा विचार नको. जितका अधिक वेळ आम्ही या विचारांमध्ये घालवू तितका आम्हाला साधनेसाठी वेळ कमी मिळतो आणि मग आम्ही बाकी सर्व करतो पण साधन म्हातारपणासाठी पुढे ढकलतो. हे किती भयंकर आहे याची कल्पना संतांना असते म्हणून संतश्रेष्ठ तुकाराम महाराज आम्हाला समजावतात, “नको नको मना गुंतू मायाजाळी| काळ आला जवळी ग्रासावया||”
नामदेव महाराज सांगतात,
“जळी बुडबुडे देखता देखता| क्षण न लागता दिसेनाती||
तैसा हा संसार पाहता पाहता| अंतकाळी हाता काई नाही||
गारुड्याचा खेळ दिसे क्षणभर| तैसा हा संसार दिसे खरा||
नामा म्हणे तेथे काही नसे बरे| क्षणाचे हे खरे सर्व आहे||”
हे ज्याने लक्षात घेतले तो लौकिक गोष्टीत फार अडकत नाही. पण श्रीमहाराज यापुढे जाऊन आम्हाला अजून एका गोष्टीत सावधान करत आहेत. जसे सर्व जुळून येण्याची वाट पहात अतिशहाणा - अतिविचारी लग्न पुढे पुढे ढकलतो, तसा तोच व्यवहारातला नियम साधनेला लावणारा अतिविचारी विद्वान साधनेत कधी स्थिरावतच नाही असे महाराज सांगत आहेत. उतावीळपणा हा साधनाला अत्यंत हानिकारक आहे. शिर्डी चे साईबाबा नेहमी दोन गोष्टी सांगत – श्रद्धा आणि सबुरी! भक्तिमार्गात श्रद्धेशिवाय चालणारच नाही. जर गुरूंनी नाम दिले आहे व त्या एका नामातच सर्व सार साठवलेले आहे असे सांगितले आहे, तर श्रद्धावानाला संशय येण्याचे कारणच नाही. तो मुकाट्याने नामच जपेल. म्हणून श्रीमहाराज नेहमी म्हणत, मला विद्वानापेक्षा अडाणी आवडतो, कारण तो जास्त चिकित्सा करत नाही आणि मुकाट्याने दिलेले नाम जपतो व लवकर त्यात स्थिरावतो. अर्धवट विद्वान मात्र त्याची चिकित्सा करतो व गुरूने आधी नामामध्ये प्रेम द्यावे आणि मग मी नाम जपेन असे म्हणतो. हा उतावीळपणा त्याला नडतो, साधनेत सबुरीने घेणाराच यशस्वी होतो.

नामामध्ये प्रेम म्हणजे अक्षरशः ईश्वर दर्शनच होय! ही भक्तिमार्गाची अंतिम अवस्था आहे, केवळ एक स्तर नव्हे. नामाशिवाय या अशा साधकाला जगणेच अशक्य होते. जसे आम्ही अन्नावर जगतो, तसा तो नामावर जगतो. जसे प्रेमाचे मायबाप बंधू भ्रतार सुत मेल्यावर सामान्य जनास दुःख होते, तसे नाम सुटल्यावर त्याला दुःख होते. नामात हा उन्मत्त होतो, नामात मस्ती हीच त्याची अखंडावस्था असते आणि ती असल्याचे भान देखील त्याला नसते. यावरून ही किती पुढची स्थिती आहे याचे आकलन होणे अवघड नाही. आणि ही स्थिती – अवस्था प्राप्त होण्यासाठी आमचे मन बुद्धी चित्त अहंकार यांमध्ये किती परिवर्तन होणे आवश्यक आहे हे देखील कळणे अवघड नाही. श्रीमहाराजांना एकदा एका साधकांनी विचारले, “नामाच्या आनंदाचा अनुभव आम्हाला एकदा द्या तरी.” यावर श्रीमहाराज म्हणाले, “मी द्यायला केव्हाही तयार आहे; पण घेणारा पात्र नसेल तर त्याला ते झेपायचे नाही, वेड लागेल.” त्यामुळे नामाच्या प्रेमाचा अनुभव हा देहबुद्धीच्या पलीकडचा अनुभव आहे व तो घेण्यासाठी पात्र बनणे हे देखील केवळ गुरुप्रदत्त नामात राहिल्यानेच साधु शकेल असे महाराज म्हणतात.

आणि म्हणून ते विचारतात, वैद्याकडून औषध घेताना त्याचा गुण आधी यावा आणि मग मी औषध घेईन असे जसे आपण म्हणत नाही व त्या वैद्यावर विश्वास ठेवून औषध घेतो, तसे नामाचा सर्वोच्च अनुभव आल्यावर मी नाम घेईन म्हणणे वेडेपणाचे आहे. त्यासाठी तुझे खरकटे भांडे आगोदर स्वच्छ व्हायला हवे. परंतु हे देखील ज्याची मनापासून इच्छा आहे त्याच्यासाठी अवघड नाही. मुळात खरकटे हे दृश्यातले असल्याने मायिक आहे व सत्य नाही. त्यामुळे जे सत्य आहे ते नाम ज्याने धरले त्याने खरकट्याचा विचार करण्याचे देखील कारण नाही, फक्त नाम जपावे असे महाराज म्हणतात. यावर संपूर्ण विश्वास ठेवून ज्याने नामाला धरले त्याच्यासाठी कसले आले आहे प्रारब्ध आणि संचित? संत एकनाथ महाराजांनी म्हणूनच स्पष्ट सांगितले,

आवडीने भावे हरिनाम घेसी| तुझी चिंता त्यासी सर्व आहे||
नको खेद करू कोणत्या गोष्टीचा| पती लक्षुमीचा जाणतसे||
सकळ जीवांचा करितो सांभाळ| तुज मोकलील ऐसे नाही||
एका जनार्दनी भोग प्रारब्धाचा| हरिकृपे त्याचा नाश आहे||

||श्रीनाम समर्थ||




Saturday, August 22, 2020

श्री ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराजांचे बोधवचन क्र ७० --


श्रीमहाराजांचे बोधवचन क्र ७० –

सूर्य हा फक्त प्रकाश देतो, पण त्यामुळे अंधार आपोआप नाहीसा होतो. तसे, नाम हे भगवंताचे प्रेम वाढवते, मग आपले दोष अपोआपच नाहीसे होतात.

श्रीराम!
‘अमृत’ चुकून जिभेवर पडले काय किंवा मुद्दाम घेतले काय, परिणाम अमरत्व आहे.

‘विष’ चुकून पोटात गेले काय किंवा कुणी घातले काय, परिणाम मृत्यू आहे.

‘पारस’ चुकून लोखंडाला लागला काय किंवा मुद्दाम लावला काय, लोखंडाचे सोने बनणारच.

‘संत’भेट सहजच झाली काय किंवा जगभर शोधल्यावर अथक परिश्रमाने झाली काय, परिणाम शांति आहे.

तद्वत, श्रीमहाराज सांगताहेत, प्रकाश देणे हा सूर्याचा धर्मच आहे. अंधार नाहीसा करायचा म्हणून तो प्रकाश देतो असे नव्हे; त्याला प्रकाशाशिवाय दुसरे काही माहीतच नाही; किंबहुना सूर्य अंधार जाणतच नाही. त्याचा उदय झाला की प्रकाश होणारच. तसे नामाला भगवंताच्या प्रेमाशिवाय काही माहित नाही. नाम आणि भगवंत प्रेम या एकाच नाण्याच्या दोन बाजू आहेत. श्रीमहाराज म्हणायचे, “सगुणाला जुळे झाले – एक नाम आणि दुसरे प्रेम”; इतका त्यांच्यात अभेद आहे. तरीही जसे जुळ्यातले एक जरासे मोठे असते तसे, नाम हा जुळ्यातला मोठा भाऊ आहे आणि तो आला (मुखात नाम आले) की मागाहून प्रेम येणारच!

कालच्या चिंतनात जे आपण बघितले तोच मुद्दा वेगळ्या भूमिकेवरून आज पुन्हा महाराज आम्हाला सांगत आहेत की, तुम्हाला दोष बघत बसण्याची जरूर काय? अमृत ज्याला मिळणार आहे हे निश्चित आहे, त्याने ‘मी मर्त्य आहे’ असा जप करण्याचे कारणच काय? अमृत मिळाले म्हणजे झाले.

प्रेम कशाने वाढते? या प्रश्नावर कुणीही सहज सांगेल की सहवासाने प्रेम वाढते. नामाने काय होते? तर श्रीमहाराजांच्या अस्तित्वाची – सहवासाची जाणीव वाढीस लागते आणि त्यामुळे साधकाला सहजच प्रेम वाटू लागते, कारण नाम हे त्यांचे कायमचे वसतीस्थान आहे. श्रीमहाराज स्वतःच म्हणतात, “ज्याच्या मुखात नाम आहे, त्याच्या मागेपुढे मी घोटाळतो!” हीच त्यांच्या अस्तित्वाची खूण आहे. आणि काय आहे त्यांच्या सहवासात? फक्त प्रेम आणि शांति! तिथे दोषांचे आणि विकारांचे स्थानच नाही, म्हणून ते म्हणताहेत, नामाने आपले दोष आपोआपच नाहीसे होतात. त्यासाठी वेगळे पुरुषप्रयत्न करावे लागत नाहीत. कारण कसे आहे की प्रयत्न आणि प्रेम यांच्यात एक प्रकारचा विरोध आहे. जिथे प्रेम आहे तिथे सपशेल शरणागती असलीच पाहिजे. तिथे श्रीमहाराजांमुळे मला प्रापंचिक अथवा पारमार्थिक आयुष्यात देखील काय मिळणार आहे हा प्रश्नच लोप पावतो, त्यामुळे मग प्रयत्न कसले करणार? याचाच अर्थ –
नाम घ्यावे – प्रेम अनुभवावे – शरणागती साधावी – सहज निजानंदासाठी नामात रहावे... असा सरळ क्रम आहे. यामध्ये कुठेच ‘मी’ चे स्थान नाही आणि म्हणूनच असे नाम आणि प्रेम साधकाला सहजगत्या स्वरूपबोधाकडे घेऊन जाते. जीवाचा मूळ दोष हा आहे की तो स्वतःला हा देह समजला आणि दोष निवृत्ती म्हणजे या देहाभिमानाची निवृत्ती आहे. या निवृत्तीला प्रेमाशिवाय उपायच नाही. इथे आमचा मार्ग कोणता आहे हा देखील प्रश्न नाही. ज्ञान मार्ग असो, योग मार्ग असो किंवा भक्ति मार्ग असो, आमच्या मार्गाबद्दल प्रेम नसल्याशिवाय आम्ही गुरुचरणी शरणागत होणेच शक्य नाही. त्यामुळे भक्तिमार्गाशिवाय इतर मार्गींना प्रेम आणि शरणागती आवश्यक नाही असे मुळीच नाही. पण भक्तिमार्गी नाम साधकांना मात्र प्रेम हाचि पाया आणि प्रेम हाचि कळस अशी गोड स्थिती आहे.

या स्थितीप्रत जाण्यासाठी नामाचा राजमार्ग संतांनी यासाठीच सांगितला, की नामाने अनायासेच दोष निर्मूलन होते. जसे आपण बघितले, मूळ दोष आहे, खोट्या मी ला खरे समजण्याचा आणि त्यातूनच इतर सर्व दोष उदय होतात. हा खोटेपणा नामाने जातो म्हणतात संत. संतश्रेष्ठ नामदेव महाराज तर म्हणतात,
“असत्याचे मळ बैसले वाचे| ते न फिरती साचे तीर्थोदळे||
हरिनामामृत प्रक्षाळी जिव्हेने| पाणिये बहुत काय करीती||
गंगासागरादि तीर्थे कोडीवरी| हरिनामाची सरी न पावती||
हरिनामगंगे सुस्नात पै झाला| नाम्याजवळी आला केशिराजा||”
-- आपल्या जिभेवर खोटेपणाची जी पुटे चढली आहेत, जो मळ बसला आहे, तो तीर्थयात्रेने जात नाही. केवळ हरिनामाने जिव्हेचे प्रक्षालन केले म्हणजे ते पाप जाते, पाण्याचेही तिथे काही चालत नाही. गंगासागरादि तीर्थे आहेत खरी; पण त्यांना हरिनामाची सर नाही. नामदेव हरिनामाच्या गंगेत सुस्नात झाले आणि म्हणून तो केशीराज श्रीहरी त्यांच्या सन्निध आला!

हे होण्यासाठी केवळ नामात आमची मनबुद्धि एकवटणे जरूर आहे. हे एकवटण्यासाठी आमचे संकल्पविकल्प शक्य तितके कमी होणे व ती संकल्प बुद्धी केवळ नामाशी निगडीत होणे जरूर आहे. हे होण्यासाठी सद्गुरू प्रार्थनाच उपयोगी पडते असा सर्वसामान्य अनुभव आहे. संकल्पांचे मूळ आहे स्वार्थ आणि स्वार्थातच आमचा मूळ दोष लपलेला आहे. प्रापंचिक स्वार्थाचे तर स्थान नाहीच; पण पारमार्थिक देखील, मला शांति हवी, मला समाधान हवे यासारखे शब्द ‘मला’ ला लागूनच असतात. संत विचारतात, तुम्ही भगवंताला – सद्गुरूंना काय दिलेत म्हणून तुम्ही या गोष्टींची अपेक्षा करत आहात? अपेक्षाविरहित होणे म्हणजेच पारमार्थिक स्वर्थाच्याही पलीकडे जाणे आहे. सद्गुरूंनी दिलेले साधन कोणताही संकल्प विकल्प ना बाळगता जो त्यांना दत्तक गेला त्यालाच नकळत आनंद – प्रेमाचा अनुभव सद्गुरू देतात. किंबहुना तो अनुभव सांगायला तो उरतच नाही, तो अनुभवरूपच होतो आणि यालाच संपूर्ण दुःख-दोष-निवृत्ती आणि अखंड आनंद-प्राप्ती म्हटले आहे. हे होण्यासाठी नीतीचे शक्य तितके पालन करून जो आयुष्य नामाप्रती समर्पित करू शकेल तोच त्या अनिर्वचनीय गुरुप्रेमाचा अधिकारी बनेल. श्रीमहाराज म्हणतातच,
“हृदयी करता भगवंताचे ध्यान|
नामाविण उच्चार दुजा न जाण||
असा नेम ज्याच्यापाशी|
राम तेथिल रहिवासी||”

||श्रीनाम समर्थ||

Friday, August 21, 2020

श्री ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराजांचे बोधवचन क्र ६९ --


श्रीमहाराजांचे बोधवचन क्र ६९ –

विषयाची ऊर्मी हे मायेचे स्मरण होय, आणि नामाचे स्मरण हे भगवंताचे स्मरण होय. नामाच्या मागे भगवंताचे अस्तित्व आहे, म्हणून त्यामध्ये सत्संगति आहे.

श्रीराम!
श्रीमहाराज एके ठिकाणी म्हणतात, “सोडायच्या गोष्टींपेक्षा धरायच्या गोष्टींचा अभ्यास करावा.” अनेकदा असे होते, की साधक आपल्या पूर्वकर्मांबद्दल खूप जास्त विचार करून दुःखी होतो व हातून घडलेल्या पाप कर्मांबद्दलच विचार करण्यात त्याचा जास्त वेळ जातो. श्रीमहाराजांना हे पसंत नव्हते. ते म्हणायचे, सद्गुरूंच्या पायावर डोके ठेवल्यावर पाप राहीलच कसे? हा भाव साधकाच्या मनात दृढ झाला पाहिजे. आजच्या बोधवचनात केवळ व्याख्या द्यायची म्हणून महाराज आम्हाला ‘विषयाची ऊर्मी हे मायेचे स्मरण होय’ असे सांगत नाहीयेत. तर, त्याचे स्मरण करणे कसे निरर्थक आहे हे सांगत आहेत. माया कुठे आहे? माया ही मनात आहे. आम्ही मायेला भगवंतापासून भिन्न मानली म्हणून माया आम्हाला त्रास देते. साधन आणि गुरुकृपेने ही माया त्या भगवंताचीच शक्ती आहे हे लक्षात आले म्हणजे विषय जे आज आम्हाला त्रास देतात, ते केवळ आमच्या मनाच्या भ्रमित अवस्थेचे फलस्वरूप होते याची अनुभूती साधकास येते व तीच माया भगवंताची ज्ञानशक्ती व प्रेमशक्ती होऊन आमच्या अंतरंगी ज्ञानाचा प्रकाश करते.

परंतु, या स्थितीप्रत जाईतोवर श्रीमहाराज सांगत आहेत की, स्मरणच करायचे ना, मग ते भगवंताचे करा. कारण, एकमेव सत्य तो भगवंतच आहे. ज्याचे चिंतन करावे तसे तुम्ही होता हा महाराजांच्या सांगण्यामागचा भावार्थ आहे. आणि त्या भगवंताचे सर्व स्मरण हे त्याच्या नामामध्ये साठवलेले असल्याने नामाचे स्मरण हेच भगवंताचे स्मरण असे आजच्या वचनात महाराज सांगत आहेत. तत्त्वज्ञान दृष्ट्या आजच्या वचनात ‘नेति नेति’ आणि ‘स इति’ हे दोनही भाव एकत्र आलेले आहेत. साधकावस्थेत मनुष्याला नेति नेति या भावातूनच आत्मप्रचीती पर्यंतचा प्रवास करायचा आहे. जर या घडीला आम्ही सर्व ब्रह्मच आहे असा भाव जागवण्याचा प्रयत्न केला, तर आमच्या विक्षेपी आणि जड मनामुळे आम्ही दृश्य जगतात अडकण्याचा धोका खूप जास्त आहे. त्यामुळेच सगुण भगवंताची उपासना व नामस्मरण हे मार्ग अत्यंत दोषरहित आणि निर्धोक आहेत. त्या सगुण ब्रह्माव्यतिरिक्त सर्व मिथ्या आहे या भावामधूनच त्या भगवंताच्या चरणी संपूर्ण समर्पण शक्य आहे. या समर्पणानंतरच जेव्हा साधकास आत्मदर्शन होते, तेव्हाच ‘स इति’ किंवा ‘वासुदेवः सर्वं इति’ ही अनुभूती त्याला होते. मार्ग कोणताही असला तरी देखील त्या मार्गात महत्त्व असेल तर ते केवळ गुरु-प्रदत्त साधनास व त्याहीपेक्षा अनंतपट अधिक गुरुकृपेस महत्त्व आहे. अर्थात गुरुप्रदत्त साधनात रत राहणाऱ्यासच गुरुकृपेची प्रचीती येते हे निश्चित आणि ही गुरुकृपा म्हणजेच सर्व संशयरहित ज्ञान व भगवत्प्रेम होय.

म्हणून श्रीमहाराज साधन काळात आम्हाला विषयांची वृत्ति न उठण्यासाठी व त्याचे रूपांतर ऊर्मीत न होण्यासाठी व तदनुषंगाने कृती न घडण्यासाठी त्याचे स्मरण आणि वारंवार विचार नकोच असे सांगत आहेत. त्या ऐवजी ज्या स्मरणाने हळूहळू मायाबद्ध जीव त्या मनरूपी मायेच्या कचाट्यातून सुटून त्यावर अधिराज्य गाजवेल अशा भगवंताच्या स्मरणात देहाचे विस्मरण होणे आवश्यक आहे.

नामस्मरणाचे अनन्यसाधारण महत्त्व हे आहे की प्रत्येक नामामागे भगवंताचे शुद्ध सच्चिदानंद स्वरूप साक्षात स्थित आहे. याची अनुभूती घेणे म्हणजे खऱ्या अर्थाने नामात राहणे आहे. पूज्य बाबा बेलसरे म्हणत, “नाम घेताना श्रीमहाराजांच्या – भगवंताच्या अस्तित्त्वाची जाणीव होते की नाही ही परीक्षा साधकाने करत रहावे. जर ही जाणीव झाली नाही तर त्याबद्दल वाईट वाटावे.” कारण, नामस्मरणाचा मुख्य हेतूच भगवंताच्या अथवा भगवत्स्वरुप सद्गुरूंच्या अस्तित्त्वाची जाणीव होणे हा आहे; ज्यायोगे जीवाचा अहंकार गलितगात्र होईल. शरणागतीचे बीज या अस्तित्वाच्या जाणीवेत आहे आणि म्हणून श्रीमहाराज नामाचा इतका आग्रह करतात, कारण शरणागतीशिवाय ब्रह्मदर्शन संभवत नाही.

वचनाच्या शेवटच्या ओळीत श्रीमहाराज पुन्हा खरी सत्संगति कोणती हे आम्हाला पटवून देत आहेत. त्यांचे म्हणणे आहे, की देहाने सत्संगती लाभणे हे उत्तमच यात शंका नाही. परंतु, देहाची सत्संगत मिळणे इतके सोपे नाही. मिळाली तरी ती चोवीस तास मिळणे अशक्य आहे. मिळाली तरी त्यावर (म्हणजे संतावर) आजच्या काळात विश्वास बसणे सोपे नाही. म्हणून महाराज देहाने सत्संगती पेक्षाही सद्विचारांची संगत महत्त्वाची मानतात. कारण सध्या आम्हाला जर कुणी त्रस्त केलेले असेल तर ते म्हणजे आमच्या मनीचे विविध विचार. त्याजागी जर सततच्या नामानुसंधानाने, सद्ग्रंथ वाचन, श्रवणाने आम्ही सद्विचार स्थिर करू शकलो, तर त्या विचारांची संगती आमची चिंतनाची दिशाच बदलते व आमची सत्याकडे म्हणजेच परमात्म्याकडे वाटचाल सुगम होते. मात्र श्रीमहाराजांना आम्ही सांसारिक गोष्टीत व दृश्यात किती मनाने अडकलेलो आहोत याची कल्पना आहे. माऊलीच ती. तिलाच आपल्या लेकरांची काळजी. म्हणून आमच्या मनात सद्विचार रुजणे आजच्या घडीला अवघड होईल हा विचार करून, तरी देखील आम्हाला उद्धाराचे मार्ग सापडावा यासाठी सर्व संतांची संगती आणि सद्विचारांची संगती यांनी अनुस्यूत असे नाम त्यांनी आम्हाला दिले. आणि सांगितले, “नामातच सत्संगती आहे.” कारण सर्व संत आणि सद्विचार यांचे वास्तव्यच नामात आहे.

आणि हे लक्षात येण्यासाठी आजचे वचन आम्ही अंगिकारणे अत्यंत आवश्यक आहे. विषय आणि त्यांची ऊर्मी ही केवळ आमच्या मनात आहे पण मन हे केवळ एक इंद्रिय आहे व मी मन नाही या भावनेत दृढ राहून त्याबद्दल जास्त उहापोह न करता जो शाश्वत सत्य अशा नामाला धरेल त्यालाच नामामध्ये गुरुकृपेने भगवत्दर्शन संभवेल!

||श्रीनाम समर्थ||

Wednesday, August 19, 2020

श्री ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराजांचे बोधवचन क्र ६८ --


श्रीमहाराजांचे बोधवचन क्र ६८ –

आज भगवंत एका टोकाला आणि आपण दुसऱ्या टोकाला आहोत.त्याच्या ‘नामाने’ त्याला जवळ जवळ आणावा. आपल्याला जितका आपल्या देहाचा विसर पडेल, तितका भगवंत जवळ येईल. भगवंताच्या नामातच संतसंगति आहे.

श्रीराम!
दृश्य हा अदृश्य ईश्वराचाच विलास असला तरी देखील दृश्य हे नश्वर आहे, दृश्याला क्षयाची बाधा जडलेली आहे. त्यामुळे जोवर दृश्याचा संपूर्ण निरास होत नाही, तोवर अदृश्य ईश्वराचा साक्षात्कार संभवत नाही. म्हणूनच आजच्या वचनात श्रीमहाराज म्हणताहेत, ‘आज भगवंत एका टोकाला आणि आपण दुसऱ्या टोकाला आहोत.’ आज सकाळी उठल्यापासून रात्री झोपेपर्यंत आम्ही केवळ देहविचार करत असू, तर देव-विचार संभवत नाही. सकाळी उठल्यावर प्रप्रथम देहाला चहा मागणारे आम्ही दिवसभर या देह आणि मनाला अग्रभागी ठेवूनच आमची दिनचर्या आखतो. अगदी साधन करताना देखील ‘मी’ सुटणे महा कर्मकठीण आहे याचा अनुभव खऱ्या साधकांना येतो. ‘माझे नामस्मरण’, ‘माझे सद्गुरू’, ‘माझ्या साधनातल्या पायऱ्या’, ‘मला साक्षात्कार व्हावा’, ‘माझे भगवंत प्रेम’ यासारख्या मनात उमटणाऱ्या वाक्यांवरून हे स्पष्ट होते की आम्ही परमार्थ देखील दृश्याच्या आणि अहंकाराच्या तराजूवर तोलतो. आणि त्यामुळेच देहाची आणि देवाची दोन ध्रुवांवर असलेली टोके कधी जुळतच नाहीत व समाधान मिळत नाही.

परमार्थ करायचा आहे, भगवंत आपलासा करायचा आहे पण आम्ही आमच्या दैनंदिनी मध्ये, मनामध्ये काहीही बदल करणार नाही या मनोवृत्तीला परमार्थातील disparity म्हणतात. अशी ही विरोधात्मक समजूत होण्याचे मुख्य कारण म्हणजे आम्हाला परमार्थ हा बहुतांशी बाहेरच्या कर्मकांडासारखा वाटतो आणि त्यामुळे परमार्थ म्हणजे आम्हाला काहीतरी विशिष्ट क्रिया करायची आहे अशी आमची भावना होते. परंतु, श्रीमहाराज म्हणतात, ‘परमार्थ हा संपूर्णपणे आतला आहे. बाहेरच्या परमार्थाची किंमत किती? तर आतला परमार्थ वाढीस लागेल, त्याला पोषक होईल, तेवढीच बाह्य परमार्थाची किंमत होय.’ आणि म्हणूनच ते म्हणतात, ‘प्रवाहाच्या विरुद्ध दिशेने पोहणे म्हणजे परमार्थ.’

आता प्रवाह किती तीव्र आहे यावरून विरुद्ध दिशेला पोहणे अवघड की सोपे हे ठरते आणि आजच्या जबरदस्त बाह्याकर्षणाच्या जगात प्रवाह किती तीव्र आहे याची जाणीव प्रत्येक साधकाला दर दिवशी होते यात शंका नाही. सबंध जग एका तीव्र प्रवाहाच्या भोवऱ्यात अडकून गरगर फिरते आहे. त्याचा जोर इतका विलक्षण आहे की मी मी म्हणणाऱ्या साधकाचा तो कधी बळी घेईल सांगता येत नाही. अशा प्रवाहाच्या विरुद्ध पोहायचे म्हणजे त्यातून आम्हाला ओढून काढणारे साधन तितकेच मजबूत हवे आणि त्याच साधनाला सद्गुरू ‘नाम’ असे म्हणतात! जर ‘कालाय तस्मै नमः’ असा पळपुटेपणा करायचा नसेल, तर केवळ या नामाला घट्ट धरलेला साधकच तरून जाऊ शकतो. संतश्रेष्ठ एकनाथ महाराज म्हणतातच,
“सदा सर्वकाळ मनी वसे देव| तेथे नाही भेव कळिकाळाचा||
काळ तो पुढारी जोडितसे हात| मुखी नाम गात तयापुढे||”
-- ज्याच्या मनात सदैव भगवंताचा वास आहे, केवळ त्यालाच कळिकाळाचे भय नाही. तो काळच अशा भक्तापुढे हात जोडून उभा असतो आणि त्याच्या समोर हा मुखाने नाम गात असतो!

त्यामुळे आज श्रीमहाराज सांगतात, नामाने त्या भगवंताला जवळ जवळ आणावे. असे वर्णन आहे की, ब्रह्मदेवाने सर्व वेदांचे तीन वेळा मंथन केले आणि त्यातून जे सार निघाले तीच भगवंताची भक्ति आणि ती भक्ति साधण्याचे साधन, नाम! मग नाम तर आम्ही स्मरत आहोत, तरीही भगवंत आम्हाला का भेटत नाही याचे उत्तर देखील श्रीमहाराज आम्हाला आज देत आहेत. भगवंत जवळ जवळ येत आहे याची खूण कोणती? तर प्रपंचाच्या गदारोळात देखील नामाचे यत्किंचितही विस्मरण न होणे व त्याच्या स्मरणात संसार फिका वाटू लागणे. संसार करत असतानाच त्यातली आसक्ति कमी कमी होत जाणे. आणि हे होण्यासाठी आजच्या वचनात जे साधन श्रीमहाराज आम्हाला सांगताहेत, ते म्हणजे, देहाचे विस्मरण. एखाद्या गोष्टीचे विस्मरण केव्हा होते? १) जेव्हा त्या गोष्टीचे महत्त्व मनातून कमी होते तेव्हा व २) त्यापेक्षा महत्त्वाची गोष्ट मनामध्ये रुजते तेव्हा. दोन्हीपैकी कोणत्याही मार्गाने गेलो तरी आपण देवापाशी पोहोचू. देहाचे नश्वरत्व लक्षात यायला हवे किंवा नामाचे महत्त्व मनात ठसायला हवे. खरे बघू जाता, या एकाच नाण्याच्या दोन बाजू आहेत. परंतु, नामात महत्त्वबुद्धी होण्याचा मार्ग हा संतांनी नावाजलेला, अनुभवलेला राजमार्ग आहे.

पण साधकावस्थेत दोनही बाजूंनी मनावर घाला घालणे आवश्यक असते असे सर्व संत सांगतात. म्हणजेच मुख्य नाम साधन सुरु असतानाच आमचा आचार, विचार, आहार याकडे देखील साधकाने लक्ष पुरवणे आवश्यक आहे. काहीही कधीही कितीही खाऊ आणि मग नाम घेऊ म्हणेल त्याचे साधन कधीही स्थिरावणार नाही असा सर्व संतांचा अनुभव आहे. सद्ग्रंथ वाचन – संत-श्रवण हे करत असतानाच आम्ही विविध प्रकारच्या मनोरंजनात देखील मन रमवू म्हणेल त्याचे मन साधनेसाठी परिशुद्ध होणे शक्यच नाही. आम्ही जगातल्या सर्व प्रकारच्या लौकिक (जरूर नसलेल्या) कार्यक्रमात भाग घेऊच आणि तरीही नाम जपू म्हणणाऱ्याच्या मनात नामाचे काहूर न माजता ज्या भेटीगाठी झाल्या त्याचेच काहूर माजणार हे निश्चित! त्यामुळे “जेणे विठ्ठल मात्रा घ्यावी तेणे पथ्येही सांभाळावी’ हेच खरे. पूज्य बाबा बेलसरे म्हणायचे, “तुम्हाला परमार्थ करायचा आहे ना, मग हे केले पाहिजे, त्याशिवाय जमणार नाही.” कोणताही प्रकारचे false justification हेच आम्हाला परमार्थ मार्गावर तोंडघशी पाडते. त्यामुळे ज्या ज्या गोष्टींद्वारे आमच्या ‘मी देहच आहे’ या भ्रमित अवस्थेला खतपाणी मिळते ते शक्य तितके टाळणे हे नाम साधनेसोबत आवश्यक आहे असे श्रीमहाराज सांगताहेत. म्हणजे मग आमचे बाहेर धावणारे मन गोळा होऊन आतमध्ये रमेल. जितके आम्ही आतमध्ये रमू, तितकी तितकी देहाची सुखबुद्धी कमी कमी होईल आणि जितकी देहबुद्धी कमी होईल, तितके तितके आम्ही भगवंताच्या सन्निध जात आहोत या अनुभूतीप्रत साधक जाईल. हे जितके होईल, तितका आणि त्या प्रतीचा अनुभव साधकाला येईल की, नामातच संत संगती आहे. कुठे राहतात सर्व संत? कुठे राहतात संतांचे अग्रणी हनुमंत? केवळ भगवंताच्या नामात त्यांची वस्ती आहे. बाहेरून संत संग मिळणे उत्तमच यात शंका नाही पण बाहेरच्या संत संगाचे फलित हेच की ज्यात ते संत रमले त्यात आम्ही रमून त्यांच्याशी तादात्म्य पावणे आणि हे ज्याला साधले त्याला नामातच संत दर्शन आणि भगवंत दर्शन एकत्वाने होईल यात शंका नाही!

||श्रीनाम समर्थ||

Monday, August 17, 2020

श्री ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराजांचे बोधवचन क्र ६७ --


श्रीमहाराजांचे बोधवचन क्र ६७ –

भगवंताच्या नामात मोबदल्याची अपेक्षा नाही, म्हणून ते पूर्ण आहे.

श्रीराम!
अपूर्णपणाचे लक्षण काय? माझ्यात किंवा माझ्याकडे जे काही आहे त्यात काहीतरी कमी आहे असे वाटणे म्हणजे अपूर्णपण. हे मायेचे लक्षण आहे. माणसाची बाहेरच्या बाजूला जी काही धाव आहे त्यामागे हे कारण आहे. प्रत्येक इंद्रियाचा आहार हा बाहेरचा आहे व तो मिळाला तरच ते इंद्रिय तृप्त होईल हा भ्रम या जगाच्या व्यापाला कारणीभूत आहे. या जगाच्या व्यवहारात त्याचे स्थान आहेच. आज ज्या काही विविध गोष्टींचे शोध लागून आमचे जीवन सुसह्य झालेले आहे त्याचा उगम या अपूर्णपणातच आहे. जर मनुष्याला कोणत्याही गोष्टीची जरूर भासलीच नसती तर मग काही शोधण्याचे कष्ट कुणी घेतलेच नसते. व्यवहार दृष्ट्या त्यामुळे आम्हाला वेळ आणि शक्ती वाचवण्यासाठी बऱ्यापैकी फायदा झालेला आहे हे देखील आपण नाकारू शकत नाही. मात्र जशी कोणत्याही गोष्टीला दुसरी बाजू असते तशी या अपूर्णपणातून आलेल्या विविध गोष्टींच्या कामनेला दुसरी बाजू अशी आहे की, कितीही वस्तु - व्यक्ती - ऐश्वर्य लाभले तरी देखील त्या गोष्टीही अपूर्णच असल्यामुळे मनुष्याला समाधान लाभत नाही. आमच्यापैकी प्रत्येकाचा हा अनुभव आहे की, सर्व आहे पण तरी देखील काहीतरी कमी आहे. ते कमी काय आहे हे न कळल्यामुळे अजून काही गोष्टी गोळा करण्याच्या मागे आम्ही लागतो आणि पुन्हा त्याच जाळ्यात गुरफटतो.

या दुष्टचक्राची जाणीव सद्गुरूंपाशी आल्यानंतर होते.
“भूमि जीव संकुल रहे गए सरद रितु पाइ|
सदगुर मिले जाहि जिमि संसय भ्रम सामुदाइ||”
--वर्षाऋतूमुळे पृथ्वीवर जे अनेक जीवजंतू भरलेले असतात, ते जीव शरद ऋतू आल्यावर नष्ट होतात. त्याप्रमाणे, सद्गुरू लाभल्यावर संशय व भ्रम यांचे समूह नष्ट होतात.
गुरु सांगतात, तुला जे हवे आहे ते बाहेर कुठे मिळणार नाही, ते तुझ्या आतच आहे आणि ते एकदा मिळवलेस की अजून काही मिळवावेसे तुला वाटणार नाही. आणि ते कसे मिळवायचे याचा मार्ग मी तुला सांगतो. असे सांगून सद्गुरू आम्हाला नाम देतात आणि सांगतात, तुझ्या कर्मबंधनातून सुटण्याची वेळ जवळ आलेली आहे आणि त्यामुळेच तू नामधारक बनलेला आहेस. मात्र त्याचे महत्त्व जाणून नीतीच्या मार्गाने चालून तू साधनात रहा. जे दिलेले साधन आहे ते कसे आहे? ते महाराज आजच्या वचनात सांगत आहेत की, नामात मोबदल्याची अपेक्षा नाही, म्हणून ते पूर्ण आहे.

वेदांताच्या भाषेत एक सहज सोपा सिद्धांत आहे. त्या सिद्धांतानुसार कोणतीही गोष्ट जी कशावरही अवलंबून आहे ती मिथ्या आहे – Everything that depends upon something is a fallacy. म्हणजेच वर बघितलेल्या सर्व गोष्टी ज्या अपूर्ण आहेत त्या कशामुळे अपूर्ण आहेत? तर त्या स्वतंत्र नाहीत, कशावर तरी अवलंबून आहेत त्यामुळे! जेव्हा मनुष्य एखादी गोष्ट करतो – कोणतेही कर्म करतो, तेव्हा त्या कर्माच्या बदल्यात कोणत्यातरी फळाची – result ची अपेक्षा ठेवूनच ते कर्म केले जाते. मात्र सद्गुरूंनी दिलेले नाम हे सर्वतोपरी स्वतंत्र असे साधन आहे. ते कशावरही अवलंबून नाही. ते पूर्णपणे उपाधिरहित असे साधन आहे. नाम घेण्याला स्थळ, काळ, निमित्त, परिस्थती, धर्म, जात, लिंग, वय कशाचेच बंधन नाही.

नाम आणि नामी यांमध्ये भेद नाही असे जे सत्तत्त्व सांगितले जाते, त्यामुळे प्रभू रामचंद्रांच्या सगुण अवतारातील सर्व गुण त्यांच्या नामामध्ये देखील विराजमान आहेत. प्रभूंचा सर्वोच्च सहज गुण म्हणजे, “अकारण करुणा”. या करुणेपोटी ते कोणत्याही भावाने – अगदी नकारात्मक भावाने – त्यांच्याकडे वळलेल्यास उत्तम गति देतात. वाली, रावण, पूतना, कंस, शिशुपाल... किती किती उदाहरणे द्यावीत? असे जर आहे, तर मग जो मनापासून त्यांच्यावरच्या भक्तीने नाम स्मरतो, त्याला समाधानाची प्राप्ती सहजीच होणार नाही का? तुलसीदास म्हणतात,
राम राम कहि जे जमुहाहीं|
तिन्हहि न पाप पुंज समुहाहीं||
-- जे लोक जांभई देताना राम-राम म्हणतात, म्हणजेच आळसामध्ये का होईना, ज्यांच्या मुखातून रामनाम येते, त्यांच्यासमोर पापाचे समूह फिरकत नाहीत.
या एकाच गुणामधून राम नामाची अकारण करुणा दिसून येते. समदर्शी प्रभूंचे समदर्शी नाम!

अपूर्ण वस्तूमध्ये आणि पूर्ण वस्तूमध्ये फरक हा, की जी वस्तु अपूर्ण असते, ती मिळाल्यावर अपूर्ण जीव पूर्ण होऊ शकत नाही. मात्र पूर्ण वस्तु – नाम – मिळाल्यावर मात्र अपूर्ण जीव हळूहळू त्या पूर्णतेचे गुण साधतो आणि म्हणूनच तो देखील अपेक्षारहित नामासारखाच निष्काम होतो! हीच नामाची विशेषता होय!

असे जर आहे, तर मग इतर सर्व आधारांचा, आश्रयांचा, साधनांचा त्याग करून केवळ नामाचा अखंड निदिध्यास लागलेल्या साधकाबद्दल काय सांगावे? रघुनाथ म्हणतातच,
“समदरसी मोहि कह सब कोऊ|
सेवक प्रिय अनन्यगति सोऊ||”
-- सर्वजण मला समदर्शी म्हणतात. मला कोणी प्रिय किंवा अप्रिय नाही. परंतु, मला भक्त फार आवडतो, कारण त्याला माझ्याशिवाय दुसऱ्या कुणाचा आधार नसतो!

असा ज्याने सर्वतोपरी नामाचाच आधार घेतला तो देखील मोबदला रहित नामासारखा पूर्णकाम बनतो!

||श्रीनाम समर्थ||


Tuesday, August 4, 2020

श्री ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराजांचे बोधवचन क्र ६६ --



श्रीमहाराजांचे बोधवचन क्र ६६ –

सध्या प्रवेशाला ‘पास’ वापरतात. ज्याच्याजवळ पास आहे त्यालाच आत सोडतात; म्हणजे आमंत्रितांनाच आत सोडतात. तसे, आपण नाम घेतले तर आपल्याला अनुकूल तेवढेच आत येईल.

श्रीराम!
भगवद्गीतेच्या दुसऱ्या अध्यायात – सांख्ययोगात भगवंत म्हणतात,
आपूर्यमाणमचलप्रतिष्ठं समुद्रमापः प्रविशन्ति यद्वत्|
तद्वत्कामा यं प्रविशन्ति सर्वे स शान्तिमाप्नोति न कामकामी||२.७०||
-- ज्याप्रमाणे चोहीकडून पाण्याची भर पडत असतानाही आपली मर्यादा अढळ राखणाऱ्या समुद्रात येऊन मिळणारे पाणी गडप होते, त्याचप्रमाणे सर्व विषय ज्याच्या मनात शांति न मोडता प्रवेश करतात त्याच मनुष्याला खरे शांतिसुख लाभते, भोगाची इच्छा करणाऱ्याला ते शांतिसुख मिळत नाही.

“मर्यादा” हा सर्व साधना मार्गांचा प्राण आहे आणि म्हणूनच मर्यादा पुरुषोत्तम प्रभू श्रीराम साधकाचे आदर्श भगवंत आहेत. ही मर्यादा साधन मार्गामध्ये बाह्य जगतातून आम्ही अंतर्जगतात कुणाला घेतो व त्याला किती स्थान देतो यावर अवलंबून आहे असे आजच्या वचनात श्रीमहाराज उदाहरण देऊन आम्हाला समजावताहेत. कोणत्याही महत्त्वाच्या व मोठ्या समारंभांमध्ये जाण्यासाठी आजकाल ‘पास’ ठेवला जातो म्हणताहेत महाराज. कारण काय? तर जे आमंत्रित आहेत, त्यांच्याशिवाय कुणी ऐऱ्यागैऱ्याने त्या समारंभात प्रवेश करू नये. जिथे महत्त्वाचे आदरणीय पाहुणे आहेत तिथे चुकीच्या लोकांनी प्रवेश केल्यास समारंभ निर्विघ्न पार पडणार नाही यासाठी ही व्यवस्था असते ना! त्याप्रमाणेच आमच्या मनामध्ये कुणाला प्रवेश द्यायचा हे ठरवण्याचे सामर्थ्य आमच्यामध्ये यायला हवे असे श्रीमहाराज सांगताहेत. मन हे देखील एक इंद्रीयच आहे. जसे, हात पाय या कर्मेंद्रियांनी चालता आणि काम करता येते, म्हणून आम्ही चोवीस तास चालतच किंवा काम करतच राहतो का? हे जर वेडेपणाचे वाटते, तर मन आहे म्हणून मी चोवीस तास अनेकविध गोष्टी मनात साठवेनच असे म्हणणे वेडेपणाचे का वाटत नाही? याचे मुख्य कारण मन हे सूक्ष्म इंद्रिय असल्यामुळे त्याचे कार्य देखील सूक्ष्मात आहे आणि आम्ही आमची बुद्धी सतत स्थूलात वागवत ठेवल्यामुळे त्या बुद्धीला सूक्ष्मात जाऊन मनावर वर्चस्व गाजवता येत नाही.

आणि मन बुद्धीला सूक्ष्मता आणण्याचा मार्ग श्रीमहाराज आजच्या वचनात सांगताहेत, तो म्हणजे नामस्मरण! नाम हा मनरूपी हत्तीवर अंकुश ठेवणारा माहूत आहे म्हटले तर वावगे ठरू नये. श्रीमहाराज म्हणतातच, “तुम्ही नामस्मरण करताना तुम्हाला विषय त्रास देऊ शकतच नाहीत; विषय त्रास देताहेत वाटत असेल तर तुमचे नाम कमी पडते आहे हे समजावे.” अजून एके ठिकाणी श्रीमहाराज म्हणतात, “नामाने या जगाचे स्वरूप कळते व ईश्वराचे स्वरूप देखील कळते.”, म्हणजेच या जगाचे अशाश्वत आणि भुलवणारे स्वरूप जे आम्ही खरे मानून सुखदुःख भोगतो, त्या भ्रमाचा निरास करणारे देखील नामच आहे. हे कशामुळे होते? तर नामाच्या पूर्णत्वामुळे होते. आमच्या भ्रमित अपूर्णत्वामुळे आम्ही आनंद बाहेर शोधतो आणि त्या बाहेरच्या गोष्टी चित्तात जाऊन बसल्या की विक्षेप निर्माण करतात. नाम काय करते, तर नामाच्या आणि भगवंताच्या एकरूपत्वामुळे नाम आमची बुद्धी स्थिर करते. बुद्धी स्थिर झाली की अंतर्दृष्टी तीव्र आणि विवेकयुक्त करते. आणि हा विवेक सर्व साधनांचा पाया आहे म्हटले तर वावगे ठरू नये. श्रीमहाराजांच्या नमस्कारत्रयोदशी मध्ये आपण म्हणतो, “विवेके सदा ज्ञान वैराग्य साधी||” -  लहानपणापासूनच श्रीमहाराजांनी विवेकमार्गाने ज्ञान आणि वैराग्य साधलेले होते.

विवेक हा शब्द संस्कृतात ‘विच्’ धातूपासून आहे, ज्याचा अर्थ आहे, निवडणे. याला परमार्थात ‘आत्मानात्मविवेक’ असे म्हणतात. हा विवेक जागृत करण्याचे महत्कार्य नाम करते. यामुळे मुख्यतः काय साधते तेच आजच्या वचनात महाराजांनी सांगितले आहे. भगवंतांनी गीतेत जे सांगितले, “सर्वस्य चाहं हृदि संनिविष्टो| मत्तः स्मृतिर्द्न्यानपोहनं च|| (भ. गी. 15.15)” – मी सर्वांच्या हृदयात प्रविष्ट झालेलो आहे आणि माझ्यापासूनच स्मरण, ज्ञान आणि अज्ञानाचे निराकरण होते. याचाच अर्थ आपल्या हृदयातल्या मुख्य पाहुण्यापर्यंत पोहोचण्यासाठी आम्हाला आमच्या मनबुद्धिरूपी दरवाजावर विवेकाचा पहारा बसवायचा आहे. हे कशासाठी करणे जरूर आहे याबद्दल संत तुलसीदास म्हणतात,
“अस प्रभु हृदयँ अछत अबिकारी| सकल जीव जग दीन दुखारी||
नाम निरूपन नाम जतन तें| सोउ प्रगटत जिमि मोल रतन ते||” (रामचरितमानस बालकांड)
-- विकाररहित असे प्रभू हृदयात राहत असून सुद्धा जगातील सर्व जीव हे दीन आणि दुःखी आहेत. नामाचे यथार्थ स्वरूप, महिमा, रहस्य आणि प्रभाव जाणून श्रद्धेने नामजप केल्यामुळे ज्याप्रमाणे रत्न जाणण्याने त्याचे मूल्य कळते, तसे ब्रह्म ज्ञात होते.

या वरील दोन्ही उदाहरणांवरून हे स्पष्ट होते की नामस्मरण हे एका दगडात दोन पक्षी मारण्यासारखे आहे. एकीकडून ते मनावर अंकुश ठेवते व नको त्या गोष्टी चित्तात साठवण्यावर नियंत्रण आणते आणि दुसरीकडून त्या हृदयस्थ भगवंताला हलवते व जीवाला तद्रूप करते.

मानसपूजेमध्ये आपण शेवटी सद्गुरूंना – भगवंताला आपल्या हृदयामध्ये विश्रांती ग्रहण करण्यास सांगतो. विश्रांती स्थान कसे हवे हे आम्हाला माहित आहे. जिथे कोणत्याही प्रकाराने त्यांच्या विश्रांतीत बाधा येणार नाही असे तिथले वातावरण असावे, नाही का? नको ते विषयरूपी पाहुणे तिथे प्रवेश करते झाले आणि त्यायोगे हृदयात कंप, क्षोभ निर्माण झाला तर ते निवासस्थान आमच्या सद्गुरूंना कसे बरे विश्राम देईल? या भावनेने जो नामस्मरण करील, त्याला दोन गोष्टी साधतील. महाराज म्हणाले तसे, आमच्या आत नको ते पाहुणे प्रवेश करणार नाहीत हे एक आणि दुसरे म्हणजे आमच्या हृदयस्थ सद्गुरूंच्या विश्रांतीसाठी मी नाम जपतो आहे हा भाव ठेवला तर आमचे साधन हे निष्काम आणि निरहंकार होईल, ज्यामुळे आमचे सद्गुरू सुखावतील.

आणि सद्गुरूंच्या आनंदात आनंद मानणारा तोच नामाच्या प्रेमाचा अधिकारी बनतो हे निश्चित; कारण त्याचे स्थूल आणि सूक्ष्म दोन्ही अहंकार सद्गुरूंच्या चरणी विसर्जित होऊन त्याची वृत्ति गुरुकृपेने नामात रंगून जाते!

||श्रीनाम समर्थ||

Monday, August 3, 2020

श्री ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराजांचे बोधवचन क्र ६५ --


श्रीमहाराजांचे बोधवचन क्र ६५ –

एक सुतार घर बांधण्यासाठी आला. त्याच्या हातात एक लहान पिशवी होती. येवढे मोठे घर बांधायचे खरे, पण ते बांधायला लागणारी सर्व हत्यारे त्याच्या त्या लहान पिशवीमध्ये होती. त्या घरामध्ये तशी कितीतरी हत्यारे राहू शकतील! तसे, भगवंत येवढा मोठा खरा, पण तो प्राप्त करून घ्यायला एवढेसे ‘नाम’ पुरे.

श्रीराम!
रोजच्या आयुष्यातल्या घटनांमधून परमार्थ शिकवणे हे श्रीमहाराजच करू जाणतात. कोणत्याही घटनेची, प्रसंगाची सांगड नामाशी कशी घालावी याचा आदर्श म्हणजे श्रीमहाराज. याच धर्तीवर आजच्या वचनात श्रीमहाराज आम्हाला नामाचे महत्त्व समजून सांगत आहेत. मुख्यतः केवळ नाम घेऊन परमेश्वर प्राप्ती साधेल का? या प्रश्नाच्या उत्तरादाखल श्रीमहाराज अशी उदाहरणे देत. संशय हा साधनेतील सर्वात मोठा शत्रु आहे. जोवर साधनाच्या संदर्भात संशय आहे, तोवर साधन आनंदही देऊ शकत नाही आणि त्या साधनाला अनुसरून ध्येय गाठणे देखील अशक्य होते.

उपनिषदांमध्ये ज्ञानाच्या तीन पायऱ्या सांगितल्या.
१) श्रवण
२) मनन
३) निदिध्यासन
यातला पहिला टप्पा जो आहे, श्रवणाचा, तो गुरूंनी सांगितलेले जसेच्या तसे ऐकणे यामध्ये मोडतो. संतांचे शास्त्र आहे, “जानो या मानो”... म्हणजे, अंतिम सत्य काय आहे, ईश्वर काय आहे हे जाणून घ्या किंवा ते ज्ञान होईपर्यंत गुरूंच्या शब्दांना ‘माना’! या मानण्याची सुरुवात श्रवणामध्ये आहे. श्रीमहाराजांनी सांगितले, “नाम हेच ते अंतिम सत्य आहे!” यावर विश्वास ठेवून साधकाचा प्रवास सुरु होतो. गुरूंचे वचन हे शब्दच असले तरी त्याचा भावार्थ शब्दापलीकडे असतो आणि त्यामुळे तो कळण्यासाठी साधकाला त्या शब्दांवर मनन करावे लागते. मनन करणे म्हणजेच श्रीमहाराज म्हणतात तसे, “परमार्थ समजून करणे” होय. या टप्प्यावर काही संत ग्रंथांचे वाचन, त्यावर चिंतन, संत श्रवण, सत्संगती यांचे महत्त्व अनन्यसाधारण आहे. हे गुरुकृपेने घडले तर साधक या टप्प्यावर पोहोचतो की, आता मला माझ्या गुरूंनी जे सांगितले आहे ते बुद्धीच्या पातळीवर व्यवस्थित समजलेले आहे आणि त्यात मला काही शंका नाही. मात्र या टप्प्यावर जो प्रश्न साधकाला पडतो तो हा, की मला समजले खरे; परंतु त्या समजण्यातून माझ्यात काही फारसा फरक पडलेला नाही. मी जो पूर्वी होतो, तसाच आहे. म्हणजे जे विकार विचार होते त्यामध्ये मुळातून फारसा फरक जाणवत नाही. हे जितक्या तीव्रतेने साधकाला वाटेल, तितक्या तीव्रतेने तो सद्गुरूंना शरण जातो व जे ज्ञान बुद्धीच्या पातळीवर आजवर ग्रहण केले त्याचा त्याला निदिध्यास लागतो. हा ज्ञानाचा साधनातील अंतिम टप्पा होय. जितका तीव्र आवेग असेल तितका लवकर साधक साध्याच्या जवळ पोहोचतो.

हे सांगण्याचे कारण, आजच्या उदाहरणात श्रीमहाराज आम्हाला सांगत आहेत की, भगवत एवढा मोठा आहे, त्याला प्राप्त करून घेण्याच्या साधनांचा अवाका एवढा मोठा आहे; परंतु तो चिद्रूप, चिदानंदमय भगवंत छोट्याशा नामाला वश होतो. तुलसीदास म्हणतात, “जाकर नाम सुनत सुभ होई||” ज्याचे नाम केवळ कानावर पडले असता सर्व शुभच होते, त्या मनुष्याच्या गतीला ऊर्ध्व दिशा मिळते. अशा प्रभूंचे नाम ज्याने मनापासून घेतले, त्याला आपल्या सर्व कर्मबंधनातून मुक्ती न मिळेल तरच नवल! आजच्या वचनातल्या सुताराच्या पिशवीत जशी बरीच हत्यारे आहेत. मात्र ज्या हत्यारांची आवश्यकता आहे तेवढी तो वापरतो. घर किती का मोठे बांधायचे असुदे, त्याच्या छोट्याशा पिशवीत त्याची सर्व तयारी आहे. तसे, हा देह आणि मन ही आमची पिशवी आहे, ज्यामध्ये परमार्थाला आवश्यक असे सर्व काही आहे. श्रीमहाराज म्हणायचेच, “सेल्फ-कंटेंड ब्लॉक (flat) असतो ना, ज्यामध्ये त्या घरात सर्व सोई सुविधा असतात. कोणत्याही गोष्टीसाठी घराबाहेर जाण्याची गरज त्या घरात राहणाऱ्या माणसाला पडत नाही. त्याप्रमाणेच या देहात परमार्थाला आवश्यक असे सर्व काही आहे. आपण कुठेही असलो तरी ती व्यवस्था आपल्या बरोबर असते. त्यामुळे कुठेतरी जाऊन मी परमार्थ करेन ही कल्पनाच चुकीची आहे.” आणि हे सांगून श्रीमहाराज सांगतात, आम्हाला आमच्या अज्ञानामुळे परमात्म प्राप्ती हा मार्ग लांबचा वाटणे साहजिक आहे, मात्र त्यामुळे घाबरून जाण्याची गरज नाही. भगवंत मोठा असला तरी त्याच्यापर्यंत पोहोचण्यासाठीचे त्याचे नाम मात्र लहानसे आहे. त्याव्यतिरिक्त अजून कशाची जरूरच नाही. म्हटलेच आहे, “सुमिरि पवनसुत पावन नामु| अपने बस करि राखे रामु||”

म्हणूनच संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर माऊली म्हणाले,
“नाममाला घे पवित्र| अंती हेचि शस्त्र||
राम हा महामंत्र| सर्व बाधा निवारी||
भवकर्मविख| रामनामी होय चोख||
हरेल भवव्यथादुःख| पुढे सुख उपजेल||”

कारण जे काही “ज्ञान” आहे, ते सर्व ज्ञान त्याच छोट्याशा नामामध्येच सामावलेले आहे!

“सुमिरत जाहि मिटइ अग्याना|
सोइ सरबग्य रामु भगवाना||”
- ज्यांचे स्मरण होताच अज्ञानाचा नाश होतो, तेच ते सर्वज्ञ भगवंत श्रीराम होत!

||श्रीनाम समर्थ||


Saturday, August 1, 2020

श्री ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराजांचे बोधवचन क्र ६४ --


श्रीमहाराजांचे बोधवचन क्र ६४ –

भगवंताचे नाम हे बँकेत ठेवलेल्या पैशाप्रमाणे आहे. वेळप्रसंगी ते खास उपयोगी पडते.

श्रीराम!
योगी अरविंद होते ना, ते म्हणायचे, संत नेहमी Supramental state मधे असतात. म्हणजे या भौतिक मनाच्या पातळीपासून ते खूप वर असतात. तुकाराम महाराज जसे म्हणतात, “अनुहाति गुंतलो, नेणे बाह्य रंग| वृत्ति येता मग बळ लागे||” म्हणजे ते आतमधल्या आनंदात इतके गुंतलेले असतात की बाहेर यायला त्यांना कष्ट होतात. आमच्या स्थितीच्या उलट स्थिती म्हणजे संतांची स्थिती. आम्हाला जसे नामाला बसल्यावर सांसारिक व्यवहार आठवतात तसे संतांना नाम घ्यायचे नाही तर करायचे काय असा प्रश्न पडतो. म्हणजेच संतांना या जगात मिळवायचे असे काहीही उरलेले नसते, ते नित्यतृप्त असतात. मात्र, आमच्यासारख्या जीवांच्या अज्ञानाला बघून, कारण नसताना ‘महाराजां’चे वंशज असलेले आम्ही दरिद्र्यासारखे दुःख भोगताना बघून त्यांना कळवळा येतो. आणि हा कळवळा इतका तीव्र असतो की ते आपल्या सहज समाधी स्थितीतून खाली येऊन आम्हाला मार्ग दाखवण्यासाठी प्रवृत्ती मार्गाचा स्वीकार करतात. हे सांगण्याचे कारण असे की आजच्या वचनातला दाखला हा आमच्यासारख्या संसारात अडकलेल्यांसाठी संतांना द्यावा लागतो.

खरे पाहता, भगवंताच्या नामाला उपमा देताच येत नाही असे ते अनुपमेय आहे असे श्रीमहाराज सांगतात. ‘या सम हेच’ असे जे म्हटले जाते ते नामाला चपखल लागू होते. पण असे म्हटले तर ते आम्हाला कळणार कसे? एक शेणात राहणारी अळी होती. एक भ्रमर तिच्याजवळ आला आणि त्याने विचारले, “तुला गोड पदार्थ आवडेल का?” ती अळी गांगरून गेली, तिला कळेना हे गोड प्रकरण काय आहे? आजवर शेण सोडले तर इतर चव माहितच नाही. तेव्हा तो भ्रमर म्हणाला, “चल तुला फुलातला गोड पराग देतो, ये माझ्यासोबत!” ती गेली; परंतु ते गोड ती सहन करू शकली नाही आणि त्या भ्रमराला म्हणाली, “नको बुवा, मला आपले माझे शेणच बरे, त्याशिवाय मी मरून जाईन, माझा जन्म इथलाच आणि यातच राहून मी मरेन.” आमच्यासारख्या अज्ञानी जीवांची तऱ्हा ही अशी आहे असे श्रीमहाराज म्हणतात. पण त्यामुळेच उपमा जी शोधायची ती संतांना अशी शोधावी लागते ज्याबद्दल आम्हाला माहिती आहे. म्हणून आज श्रीमहाराज म्हणताहेत, “भगवंताचे नाम हे बँकेत ठेवलेल्या पैशाप्रमाणे आहे.” पैसा म्हटले की लगेच आम्हाला वाटते, “हां, आता मला कळते आहे थोडेफार की नामाचे महत्त्व किती आहे, कारण मला पैशाचे महत्त्व माहित आहे. पैसा असल्याशिवाय आणि नुसता असल्याशिवाय नव्हे तर बँकेत साठवलेला असल्याशिवाय मला माझ्या भवितव्याची निश्चिंती वाटत नाही. पैसा तिथे आहे म्हटल्यावर मला रात्री झोप लागते की उद्या काही कमीजास्त झाले तरी पैशाच्या भरवशावर काहीतरी मार्ग निघू शकतो.” हे किती मूढ मत आहे हे देखील आपल्याला माहिती आहे, कारण नुसता पैसा असून उपयोग नसतो. परिस्थिती, प्रसंग, माणसे एक ना अनेक सर्व अनुकूल असूनही येणारे प्रारब्ध चुकवणे माणसाला शक्य होत नाही हा सर्वसामान्य अनुभव प्रत्येकाच्या गाठीशी असतो. तरीही श्रीमहाराज आम्हाला त्या अनुषंगाने नामाचे महत्त्व इथे पटवून देऊ इच्छितात.

सूरदास म्हणतात,
“माई मेरे निर्धन को धन राम||
रामनाम मेरे हृदय में राखू| जो लोभी राखे दाम||”
सूरदास कि इतनी ही पूंजी| रतन मणी से नहीं काम||”
हेच श्रीमहाराज आम्हाला आजच्या वचनात सांगताहेत की जर राम नाम हीच आमच्या बँकेतल्या पैशासारखी जरी पूंजी आम्ही समजलो, तरी हळूहळू पैशावर अवलंबून असलेलो आम्ही त्या तकलादू अवलंबनाचा त्याग करून जे खऱ्या अर्थाने आश्रयदाता आहे असे भगवंताच्या नामाला आमचे आश्रयस्थान बनवू. महाराज म्हणायचे, पैसा वाईट नाही, पण तुम्हाला त्याचा आधार जो वाटतो, तो परमार्थाच्या आड येतो.

पण तरीही ते आम्हाला समजण्यासाठी सांगतात, की नामाचा balance चांगला असेल तर ते नाम तुम्हाला वेळप्रसंगी निश्चित उपयोगी पडेल. देहबुद्धीत असलेल्या आमच्यासारख्यांची उपासना पूर्णपणे निष्काम होणे अत्यंत अवघड आहे हे त्यांना माहित असल्यामुळे ते सांगतात, हरकत नाही, सकाम भाव ठेवून का होईना, नाम जपण्यास सुरुवात करा, नामाची शक्ती तुम्हाला लहान सहान अडीअडचणींमधून देखील तुमचे प्रारब्ध अनकूल असल्यास सोडवेल आणि हे होत असतानाच ते नामच तुम्हाला हळूहळू निष्काम बनवेल. संतश्रेष्ठ तुलसीदास म्हणतातच,
राम नाम मानिदीप धरी जीह देहरी द्वार|
तुलसी भीतर बाहेरहुं जौं चाहसि उजियार||
-- प्रपंचात आणि परमार्थात दोन्हीकडे तुम्हाला प्रकाश हवा असेल तर तुम्ही मुखरूपी दाराच्या उंबरठ्यावर रामनामरूपी रत्नदीप ठेवा!

हे होण्यासाठी रामनाम हा “रत्नदीप” आहे यावर श्रद्धा दृढ होणे आवश्यक आहे. ही श्रद्धा दृढ होण्याला नामाशी अनन्य होणे जरूर आहे. ही अनन्यता दृढ होण्यासाठी सद्गुरूंना आपले सर्वस्व मानणे आणि त्यानुसार वागणे आवश्यक आहे. हे ज्याने केले त्याचा प्रपंच आणि परमार्थाचेही क्षेम सद्गुरू वाहतील व नामात प्रेम प्रदान करतील हे त्रिवार सत्य आहे!

||श्रीनाम समर्थ||