Sunday, June 28, 2020

श्री ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराजांचे बोधवचन क्र ५६ --


श्रीमहाराजांचे बोधवचन क्र ५६ –

भगवंताच्या नामाचा नाद लागला तर दुःखाची जाणीव कमी होईल. दुःखाची जाणीव नसल्यावर मग दुःख असले म्हणून बिघडले कुठे?

श्रीराम!
“यत्न कसून करीन मी यश दे रामा, न दे, तुझी सत्ता|
हाचि निरोप गुरूंचा मानावा राम सर्वदा कर्ता||”
या निरोपाच्या वचनात श्रीमहाराज आम्हाला प्रयत्नाचे महत्त्व आणि रामाची सत्ता या दोन्ही गोष्टी सांगताहेत. याचे कारण - आम्ही देहात असल्या कारणाने आमचे सुख आणि दुःख हे देहावर अवलंबून आहे असे आम्ही समजतो, कारण आमचा आणि इतरांचा देह आणि त्याच्याशी निगडीत व्यवहार हे आमच्या ज्ञानाचे क्षेत्र आहे. त्यामुळेच श्रीमहाराज एकीकडे म्हणतात, “देहबुद्धी असेपर्यंत प्रयत्नच श्रेष्ठ आहे.” हे सांगण्याचे कारण म्हणजे आजच्या वचनात ज्या दुःखाचा उल्लेख श्रीमहाराज करत आहेत, ते या देहबुद्धीच्या क्षेत्रातले दुःख आहे. समर्थ दासबोधात जे आधिभौतिक, आधिदैविक आणि आधात्मिक तापांचे (दुःखांचे) वर्णन करतात ती सर्व प्रकारची दुःखे आजच्या व्च्नातल्या ‘दुःख’ या संज्ञेत समाविष्ट होतात. आमच्या समजुतीनुसार ही दुःखे बहुतेक वेळा आमच्या प्रयत्नांवर अवलंबून असल्यामुळे ‘अमुक गोष्ट केली असती तर बरे झाले असते’ असे आम्हाला देह, वस्तु, व्यक्ती, नातेसंबंध, परिवार, कामकाज, धंदा – व्यवसाय अशा अनेक बाबतीत वाटते आणि जेव्हा आमच्या अपेक्षेनुसार परिणाम या दृश्य क्षेत्रात दिसत नाही तेव्हा आम्हाला दुःख होते.

सर्व अध्यात्म शास्त्र हे या पायावर आधारित आहे, की या दृश्य जगात जे जे आहे त्यात शाश्वत सुख नाही. ‘एक धागा सुखाचा, शंभर धागे दुःखाचे’ हे वाटणे देहबुद्धीत जगणाऱ्या मनुष्यासाठी अगदी स्वाभाविक आहे. कारण त्याचे सुख आणि दुःख दोन्ही बाह्य गोष्टींवर अवलंबून असते आणि बाह्य गोष्टींवर आमचा बहुतांशी ताबा नसतो. आणि म्हणूनच समर्थ म्हणतात,
“जो त्रिविध तापे पोळला तोचि अधिकारी झाला परमार्थासी” कारण हे मायारूपी दुःख आल्याशिवाय शाश्वत समाधान नावाची काही गोष्ट अस्तित्वात आहे, तिचा अनुभव संत समाजाने घेतलेला आहे, हे आमच्या गावीही नसते आणि आम्ही आमचेच दुःख कवटाळून बसतो. सबंध गावाने वाळीत टाकून सुद्धा आमची ज्ञान माऊली म्हणते, “अवघाचि संसार सुखाचा करीन| आनंदे भरीन तिन्ही लोक||” कुठून आली ही गर्जना?? जगाच्या दुःखमय असण्याशी हे विपरीत नाही का असे वाटणे स्वाभाविक आहे. या गर्जनेचा उगम आहे, “शांतीची पै शांती निवृत्ती दातारू| हरिनाम उच्चारू दिधला तेणे||” ज्ञानेश्वर महाराज सांगताहेत, शांतीचे आगर असलेल्या सद्गुरूंनी (निवृत्तीनाथांनी) हरिनाम दिले (नाममंत्र दिला) आणि तेणे जाहले सकळ काम!

‘सदगुरूंकडून नाम मिळणे’ याचे महत्त्व काय आहे हे ज्याला समजले त्याचे जग बदलले नाही तरी जगाकडे बघण्याचा दृष्टीकोन बदलतो. प्रारब्धाने येणारी दुःखे भोगावी लागली तरी त्याची झळ नाम जणू शोषून घेते हा सर्व नाम साधकांचा अनुभव आहे. संतश्रेष्ठ एकनाथ महाराज म्हणतात,

आनंदे करूनि संसारी असावे| नाम आठवावे श्रीरामाचे||
नामाचिया योगे संसार तो चांग| येरव्ही ते अंग व्यर्थ जाय||
ऋषीमुनी सिद्ध संत महानुभाव| रामनामे भाव सुखे केला||
नामे होय सुख, नामे निरसे दुःख| रामनाथ एक हृदयी धरा||

अगदी हेच श्रीमहाराज आजच्या वचनात सांगत आहेत. फक्त अट आहे, नामाचा “नाद” लागला पाहिजे! ज्ञानेश्वर माऊली ज्ञानेश्वरीत म्हणतात,
“आवडी आणि लाजवी| व्यसन आणि शिणवी|
पिसे आणि न भुलवी| तरी तेचि कायी||”
नामाची – भगवंताची – परमार्थाची आवड कशी हवी? तर त्या आवडीची लाज वाटता कामा नये. त्यापुढे जाऊन त्याचे रूपांतर व्यसनात झाले तर त्याचा कंटाळा कधीही येता कामा नये. त्या व्यसनाने इतके भुलवले पाहिजे की त्याचे वेड लागले पाहिजे म्हणतात ज्ञानदेव. याला “नामाचा नाद” लागणे म्हणतात.

नाम पूर्ण असल्यामुळे ज्याला असा नामाचा नाद लागला तो साहजिकच त्या नामाच्या धुंदीत स्थिरावतो. त्याचे मन बुद्धी कर्म ही सर्व नामाच्या अवतीभोवती घोटाळतात. उत्तर भारतात काही घरांतून बाळकृष्णाची उपासना चालते. घराच्या मुख्य खोलीत मध्यभागी याचा दरबार असतो. सकाळी उठल्यापासून बाळकृष्णाला उठवणे, स्नान घालणे, मग नैवेद्य बनवून त्याला खाऊ घालणे या गोष्टी रात्री त्याला झोपवेपर्यंत नित्यकर्मात मोडतात. असे नामाच्या अवतीभोवती आमचा दिवस घोटाळू लागला की आम्हाला नामाचा नाद लागला असे म्हणावयास हरकत नाही. असा जो नामाच्या नादात स्वतःला विसरतो त्याला साहजिकच या देहाशी संलग्न दुःखांचा विसर पडतो. सुरुवातीला तो नाम घेताना तात्कालिक असतो; मात्र जर सततच्या अभ्यासाने आणि गुरुकृपेने हे नाम सहज चालू लागले की मग मात्र त्याचा देह मन बुद्धीशी त्रयस्थासारखा संबंध राहून तो अलिप्तपणे साक्षीभावात राहतो. कर्तव्य कर्म उत्तम करताना देखील हे साधू शकते हे आम्हाला सर्व प्रापंचिक संतांनी दाखवून दिले आहे, त्यामुळे त्याबाबतीत तक्रार करण्यासाठी आम्हाला कुठेही जागा नाही.

हे वचन श्रीमहाराजांनी आमच्यासारख्या देहाला केंद्र करून राहणाऱ्या लोकांसाठी सांगितले खरे, मात्र यातून त्यांना आम्हाला त्यापलीकडे नेण्याची इच्छा आहे, जेथे प्रापंचिक दुःख हे देखील सुखाचे वाटू लागते आणि सुखामध्ये तो हरखून जात नाही. गीतेत स्थितप्रज्ञाची व्याख्या करताना भगवंत म्हणतात, “दुःखेषु अनुद्विग्न मनः, सुखेषु विगतस्पृहः||” – कोणतेही दुःख ले असता जो उद्विग्न होत नाही वा सुखात देखील स्थिरबुद्धी राहतो, “आत्मन्येवात्मना तुष्टः!”- जो स्वतःमध्ये (बाहेरील कोणत्याही आलंबाशिवाय समाधानी – आनंदी राहतो तो स्थितप्रज्ञ होय. आणि हे होण्यासाठी भगवंताच्या नामाचा सर्वतोपरी आधार घेणे, त्यात टिकून राहणे, तो अनुभवणे आणि त्यात मस्त होणे हा राजमार्ग आहे.

एकदा श्रीमहाराजांनी विचारले, “भगवंत प्रकट झाले तर काय मागाल?” जेव्हा अपेक्षित उत्तर आले नाही तेव्हा ते स्वतःच म्हणाले, “मी माझेपणाची जाणीव काढून घे, असे मागीन” काय ज्ञान भक्ति वैराग्याचा सागर भरला आहे या एका उत्तरात! आजच्या वचनात महाराज आम्हाला हेच सांगत आहेत की एकदा नामाच्या अभ्यासाने, त्याला अनुसरून गुरुकृपेने आलेल्या नामाच्या प्रेमाने दुःखाची जाणीवच कमी होईल, कारण दृश्य विश्वाचे नश्वरपण मनावर ठसून भगवंताची लीला म्हणून आम्ही आमच्या आयुष्याकडे बघू शकू आणि सुख दुःखाचा एकाच पद्धतीने आनंद लुटू शकू. चित्रपटात जर फक्त एकाच तऱ्हेचा आनंदाचा बाजार दाखवला तर आम्ही कंटाळतो ना, तसेच भगवंताच्या चित्रपटातील पात्रे त्याच्या दिग्दर्शनाखाली सुख दुःखाची पात्रे रंगवताहेत या सत्य जाणीवेत नाम मग्न करते व तो संसारात राहून सर्वतोपरी त्यावर तरंगत राहतो; कारण तो नामात – भगवद्भावात बुडून गेलेला असतो!

||श्रीनाम समर्थ||

Wednesday, June 24, 2020

श्री ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराजांचे बोधवचन क्र ५५ --


श्रीमहाराजांचे बोधवचन क्र ५५

अत्यंत कठीण प्रमेये असलेले जगातले ग्रंथ वाचावेत, पण शेवटी अत्यंत सोप्यातले सोपे असे नामच घ्यावे.

श्रीराम!
नाथपंथीय योगीराज संतश्रेष्ठ निवृत्तीनाथ महाराज रामनामाबद्दल म्हणतात,

रामनाम मुखी तो एक संसार| एऱ्हवी अघोर नरक हा||
संसार नरक रामनाम सार| तरले पामर पतित देवा||
अजमिळा नामे तरला पतित| नारायण त्वरित आले तेथे||
“हरिनाम हेच शास्त्र पै जयाचे|” तयासी यमाचे भय नाही||

परमार्थाला “Path of Enquiry” असेही म्हटले जाते. हा शोधमार्ग आहे, ज्यामध्ये साधक परमात्म तत्त्वाचा शोध घेतो. या जगात जन्म घेतल्यानंतर जे चार पुरुषार्थ वेदांमध्येही सांगितले गेले, त्या सर्व पुरुषार्थांचे सार असेल तर हा शोध घेणे होय. किंबहुना त्या चारही पुरुषार्थांचा सुयोग्य वापर करून मनुष्याने आपल्या मूळ पुरुषाचा शोध घ्यावा, जेणेकरून त्याला आपल्या जन्माचे सार्थक करून घेता येईल अशी वेदांची योजना आहे. याचे कारण हेच की जोवर हा शोध पूर्ण होत नाही, तोवर मनुष्याला पुन्हा पुन्हा देह धारण करून देखील अखंड समाधान मिळणार नाही आणि दुःख निवृत्ती – आनंद प्राप्ती साधणार नाही. म्हणून विविध मार्गांनी हा शोध घेण्याचे कार्य अखंडपणे या मृत्युलोकात चालू आहे. आम्हाला जाणीव नसली तरी हा शोध घेणाऱ्या महात्म्यांच्या पुण्यांशामुळेच थोडी सकारात्मकता कलियुगात देखील इथे टिकून आहे.

मुमुक्षुत्व असलेल्या शिष्याच्या या शोधाची सुरुवात सद्गुरू भेटीपासून खऱ्या अर्थाने होते. श्रीमहाराज म्हणतात तसे “परमार्थ समजून करावा” हे वाक्य ज्याने हृदयी धरले त्याला सद्गुरू उपदिष्ट मार्गात स्थिरावल्याशिवाय चैन पडत नाही. मग अनेक अंगांनी याच मार्गावर राहून तो या शाश्वत तत्त्वाचा माग घेतो. परंतु, जशी घार अनेक दिशांना जाते, आपल्यासाठी भक्ष्य शोधते पण तिचे सर्व लक्ष तिच्या घरट्यातील पिल्लांकडे असते, तशाच रीतीने जो सद्गुरू उपदिष्ट मार्गात राहतो तो विविध मार्गांनी समजून घेण्याचा प्रयत्न जरी करत असला तरी त्याचा खुंटा हा एकच असतो – असावा आणि तो खुंटा म्हणजे सद्गुरूंनी दिलेले नाम!

खरे बघायला गेले तर हा खुंटा इतका ताकदवान आहे की एकदा त्या खुंट्याला चिकटले तर अजून काही करण्याची आवश्यकताच नाही. परंतु श्रीमहाराज म्हणतात, वाचनापासून साधनेला जोर येतो. त्यामुळे नामस्मरणाला पूरक असे वाचावयास हरकत नाही. याबरोबर प्रत्येक साधकाची एक पूर्वावस्था असते, या जन्मातीलच नव्हे तर मागील अनेक जन्मांची. त्यानुसार त्याचा स्वाभाविक कल हा भक्तिमार्ग, योगमार्ग किंवा ज्ञानमार्ग यांपैकी एकाकडे जास्त असतो. अर्थातच हे त्या साधकांबद्दल खरे आहे ज्यांच्या मनातून सांसारिक आसक्ती नाहीशी नाही तरी निदान क्षीण होऊ लागली आहे. हे होईपर्यंत स्वाभाविक कल कळणे शक्य नाही. सांसारिक आसक्ती आहे तशीच आहे आणि तत्त्वज्ञानाचे ग्रंथच्या ग्रंथ वाचत असू तर देहबुद्धीच पोसली जात नाही ना याकडे साधकाने जागरूक राहणे आवश्यक आहे. हे कळावे कसे हे सांगताना श्रीमहाराज म्हणतात, ‘जे वाचतो ते आचरणात येते की नाही हे जो सतत तपासत राहतो त्याला वाचलेले पचते आहे म्हणायला हरकत नाही, त्यानेच वाचावे.’  

आजच्या वचनात तर श्रीमहाराज म्हणतात, अत्यंत कठीण प्रमेये असलेले ग्रंथ वाचण्यास देखील हरकत नाही. सद्गुरू हे आम्हाला खुबीने समजावतात, त्यांची खुबी ज्याला कळली त्याला सद्गुरूंची अशी वचने जाणून मौज वाटते की कसे महाराज दोन्ही गोष्टी एकत्र सांधतात. आधी महाराज म्हणतात, कठीण प्रमेये असलेले ग्रंथ वाचावे पण सोप्यातले सोपे नाम घ्यावे. कसे आहे, ही वचने आमच्यासाठी तेव्हाच आहेत, जेव्हा आम्ही त्यांचे तंतोतंत पालन करण्याचा प्रयत्न करतो. जो असे करील तो वाचनासोबत नाम सांभाळील हे निश्चित. आणि असे नाम जो सांभाळील ना, त्याचे वाचन एका विशिष्ट मर्यादेपर्यंतच राहील. त्याबरोबरच जे जे तो वाचेल त्याचा अन्वयार्थ तो महाराजांच्या – आपल्या सद्गुरूंच्या वचनांशी, त्यांनी दिलेल्या साधनेशी लावेल. म्हणून श्रीमहाराज हे सांगण्याची रिस्क घेताहेत की ग्रंथ वाचा पण नाम सांभाळून वाचा, म्हणजे त्या नामाची शक्ती – त्या नामाचे हळुवार निपजणारे प्रेम जे वाचन तुम्हाला नामाशी – तुमच्या गुरूंशी जुळवणार नाही त्याकडे जाऊच देणार नाही. नाम हेच सत्य आहे ही जाणीव नामच दृढ करील. जसे तुकाराम महाराज म्हणाले, “तुका म्हणे नाम| तेणे पुरे माझे काम||” मूळ सत्य हेच आहे की कोणतेही सद्ग्रंथ एकच गोष्ट सांगतात, त्यामध्ये भेद नसतोच; आमची पृथक बुद्धी संतांच्या सांगण्यामध्ये भेद शोधते आणि मग बुद्धी भ्रमित होऊन गुरूंनी दिलेल्या साधनेला दुरावते.

यासाठीच सद्गुरू सांगतात, एक तर वाचताना नाम न सोडता वाचावे किंवा ते वाचन आमच्या साधनेला पोषक असेच असावे. भक्तिमार्गी संताचा शिष्य जर खूप जास्त योगशास्त्र वाचू लागला तर अजून देहबुद्धीत असल्यामुळे त्याला ज्या साधनेद्वारा ‘मी देह नाही’ हे समजून घ्यायचे आहे, तोच देहाला जास्त महत्त्व देऊन देह-साधनेला लागेल. वास्तविक योगातले देहाचे कष्ट देखील देहबुद्धीतून बाहेर पडण्यासाठीच आहेत हे लक्षात न घेतले तर केवळ देह-पोषण होईल. यासाठी वाचन सावधानतापूर्वक झाले पाहिजे असे श्रीमहाराज सांगतात.

मार्गातली विविधता ही भगवत् प्राप्तीच्या शोधाला वास्तविक रम्यता आणते. कोणतेच ‘वाद’ खरे नसून सर्व मार्गातला ‘संवाद’ महत्त्वाचा आहे हेच खरे संत ग्रंथ सांगतात. त्यामुळे तो संताने लिहिलेला ग्रंथ असेल आणि तो योग्य व्यक्तीकडून समजून घेतला तर त्यात बुद्धिभेद होण्याचा धोका नसतो. भक्तिमार्गी साधकांसाठी तर रामायण – भागवतासारखे सद्ग्रंथ नामाचे महत्त्व आणखी दृढ करणारे आहेत.

भगवंतांनी गीतेत “गिरामस्म्येकमक्षरम् असे सांगून ॐकार रूपी नाम म्हणजे मूळ तत्त्व आहे हे स्पष्ट केले. त्याच मूळ तत्त्वाचा भक्तिरूपी विकास म्हणजे सद्गुरूंनी दिलेले सगुण ब्रह्माचे नाम होय. त्यामुळे दोन्हीत भेद नाही. हे सांगण्याचे कारण म्हणजे ज्या मूळ तत्त्वाबद्दल विविध ग्रंथांमध्ये विविध ग्रंथकारांनी आम्हाला सांगितले, ते तत्त्वच आम्हाला सद्गुरूंनी नाम रूपाने दिले आहे हे शास्त्रीय सत्य आहे. म्हणून श्रीमहाराज म्हणताहेत, शेवटी सोप्यातले सोपे नामच घ्यावे, कारण ते साधना दृष्टीने सोपे असले तरी तेच एक अंतिम सत्य आहे!

गीतेत भगवंतांनी अनन्यतेचे महत्त्व सांगितले आणि ती अनन्यता गुरूपदिष्ट नामाबद्दल असणे हेच भक्तिमार्गाचे सार आहे. म्हणूनच श्रीमहाराज म्हणतात, काहीही करा, काहीही वाचा पण नाम सोडू नका, कारण संत एकनाथ महाराज म्हणतात त्याप्रमाणे,

योग याग व्रत नेम दान धर्म|
नलगे साधन जपता हरि||
साधनाचे सार नाम मुखी गाता|
हरि हरि म्हणता कार्यसिद्धी||

||श्रीनाम समर्थ||



Sunday, June 21, 2020

श्री ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराजांचे बोधवचन क्र ५४ --


श्रीमहाराजांचे बोधवचन क्र ५४ –

भगवंताचे नाम ही ठिणगी आहे. ती फुलवली तर सबंध जग भरून जाईल येवढी मोठी होऊ शकते. ज्याप्रमाणे अग्निहोत्र्याच्या कुंडातला अग्नि थोडा धुगधुगीमध्ये असतो, त्यावर फुंकर घालून त्याचा जाळ करता येतो. त्याप्रमाणे आपण नामाची ठिणगी जागृत ठेवू; त्या ठिणगीचा जाळ करणारा उत्पन्न होईल आणि तो जाळ जगभर पसरेल.

श्रीराम!
एक तत्त्वज्ञानी म्हणतो, “डोळ्याची एक पापणी हलली तरी त्याचा परिणाम दूरच्या आकाशगंगेतल्या चांदणीवर होतो.” हे सांगण्यामागचा हेतू हा की कोणतेही सामान्यातले सामान्य कर्म देखील त्याचा परिणाम दाखवल्याशिवाय राहत नाही. याचे कारण ज्याला वेदांतामध्ये Eternal Consciosness किंवा Awareness म्हणून संबोधतात, त्यायोगे सबंध विश्वात एकच तत्त्व भरून आहे. ज्ञानमार्गी त्याला तत्त्वरूपाने बघतात तर भक्तिमार्गी रामरूपाने बघतात. ॐकार हे त्याच ज्ञानाचे मूळ तर नाम हे त्या रामतत्त्वाचे मूळ; त्यामुळे दोन्हीत भेद नाही. आणि जे ब्रह्मांडी तेच पिंडी या न्यायाने – “ॐकाररूपि तन्नाम हृन्मन्दिरनिवासि च|” (नामचंद्रिका) – तुझे जे नाम ॐकार रूप आहे तेच हृदयाच्या गाभाऱ्यात वसलेले आहे. सबंध विश्वाचे साम्राज्य त्या नाम धारकाच्या हृदयात आहे ज्याला नामात सर्वतोपरी प्रीति आहे.

जर एखादे सामान्य कर्म त्याचा परिणाम या जगावर सोडल्याशिवाय राहत नाही तर नाम, जे विश्वाचा उगम आहे, ते परिणाम दाखवल्याशिवाय राहील? मांडुक्य उपनिषद सांगते,
ओमित्येतदक्षरमिदं सर्वं तस्योपव्याख्यानं भूतं भवद्भविष्यदिति सर्वमोङ्कार एव|
यच्चान्यत्त्रिकालातीतं तदप्योङ्कार एव||”
-- एकमेव नित्य वस्तु ॐकारच आहे. जे काही जगात दिसते आहे, ते सर्व प्रकाशित करणारा हाचकार (नाम) आहे. जे घडून गेलेले आहे, जे घडते आहे, जे घडणार आहे, तो कारच (नाम) आहे. या तीनही काळाच्या पलीकडे जे सर्वव्यापी तत्त्व (भगवंत) आहे, तो देखील कारच आहे.
हा एकच उपनिषदातील श्लोक श्रीमहाराज नामाला ठिणगी का म्हणत आहेत हे सांगायला समर्थ आहे. सर्वव्यापक तत्त्व जे नाम आहे; तेच नाम सगुण ब्रह्माच्या अनुषंगाने संतांच्या वैखरीत सदा सर्वकाळासाठी स्थानापन्न झाले. जे ब्रह्मांडी होते ते पिंडी विराजले म्हणून विश्व चेतवणाऱ्या वन्हीचे रूपांतर ठिणगीत झाले, त्याशिवाय नामाला धारण करणे आमच्या सारख्या जीवांना अशक्य आहे. म्हणून श्रीमहाराज म्हणताहेत, ही ठिणगी फुलवणे म्हणजे त्या सर्वव्यापी ईश्वराला साद घालणे होय आणि जेव्हा जेव्हा ही साद शुद्ध चित्ताने घातली गेली तेव्हा तेव्हा सबंध जग भरून जाईल इतकी ती ठिणगी मोठी झाली आणि तो नामधारक विश्वरूपच बनला!

अजून एके ठिकाणी श्रीमहाराज म्हणतात, “जसा मारुतीमध्ये देव – अंश होता तसा तो आपल्यामध्येही आहे. त्याने तो फुलविला, आपण तो झाकून विझवून टाकला.” आजच्या वचनात जे श्रीमहाराज म्हणतात, त्या ठिणगीचा जाळ करणारा उत्पन्न होईल... तो साधक किंवा सिद्ध असाच असेल ज्याने मारुतीचे उदाहरण डोळ्यांसमोर ठेवले. भक्तिमार्गाचा उद्गाता आहे हनुमंत! श्रीमहाराजच एके ठिकाणी म्हणतात, “हनुमंताचे ब्रह्मचर्य, भक्ति, दास्य आणि परोपकार या गोष्टी आपण शिकाव्यात. मारुती हा चिरंजीव आहे. ज्याची तशी भावना असेल त्याला अजूनही त्याचे दर्शन होईल!” खरोखर ज्या साधकाला आजच्या वचनाप्रमाणे त्या नामाच्या ठिणगीचा जगभर पसरलेला जाळ – म्हणजेच नामाचे सर्वव्यापित्व अनुभवायचे आहे, त्याने हनुमंताचे चरित्र अभ्यासले पाहिजे. काय आहे हनुमंताच्या चरित्रात? आपण जेव्हा कुणाचेही चरित्र बघतो, तेव्हा त्यात त्या व्यक्तीच्या आयुष्यातल्या निरनिराळ्या घटना दिसतात. मात्र जेव्हा हनुमंताचे चरित्र बघतो, तेव्हा मात्र त्याच्या लहानपणच्या काही बाललीला वगळता संपूर्ण आयुष्यात केवळ आणि केवळ राम भक्ती, राम नाम, राम कार्य आणि राममय जीवन हेच दिसून येते. हनुमंताला श्रीरामाशिवाय बघणेच शक्य नाही, त्याची तशी इच्छाच नाही! हे होणे म्हणजे भक्तिमार्गात पाय रोवून स्थिर होणे आहे.

नामाची ठिणगी म्हणण्यामागे नामाच्या अभ्यासाने निर्माण होणारी भगवत्प्राप्तीची तळमळ देखील अभिप्रेत आहे. नाम हे साधन म्हणून जेव्हा सद्गुरू आम्हाला देतात, तेव्हा त्यात सद्गुरूंची संपूर्ण अध्यात्मिक शक्ती साठवलेली असल्याने मुळातच ते शक्तिरूप असते. मात्र आमची ग्रहण क्षमता कमी असल्याने आम्ही ते नाम सर्व शक्तीनिशी धारण करण्यास असमर्थ होतो व आमची देहबुद्धी आणि त्याला लागून असलेल्या कामना त्या शक्तीच्या अभिव्यक्तीच्या आड येतात. तरी देखील त्याच्या प्रचंड शक्तीमुळे धुगधुगी असतेच. जर त्यावर सतत सत्संगाची फुंकर घातली गेली तर त्या धुगधुगीचे रूपांतर खऱ्या तळमळीच्या अग्नीत होते हे सर्वसंतमान्य असे सत्य आहे. आणि श्रीमहाराज आम्हाला म्हणूनच सांगतात की नामाचा संग हाच खरा सत्संग आहे, ज्यायोगे तुम्हाला ही तळमळ लागेल. ज्याला खरी तळमळ लागली त्याच्या मनातून विषय आणि संसारासक्ती स्वाभाविकच हद्दपार होते व तो साधक शुद्ध साधनेस लागतो. शुद्ध साधनेचा प्रारंभ हीच नामाच्या ठिणगीवरची फुंकर आहे.

मात्र जीवाची शक्ती अपूर्ण आहे; त्यामुळे खरा शरणागत साधक म्हणतो, महाराज, मी तुम्हाला धरले आहे असे मला वाटते; परंतु माझ्या शक्तीने मी तुम्हाला धरणे मला शक्य वाटत नाही. त्यामुळे तुम्हीच मला धरावे आणि माझ्यात ती तळमळ जागी करावी. ही प्रार्थना जो मनापासून करतो, त्याच्या नामाच्या ठिणगीवर फुंकर घालण्याचे काम सद्गुरूच करतात. गंमत अशी की ही फुंकर परमदिव्य, परमशांत आणि परमतेजस्वी अशा भगवद्रूप सदगुरूंकडून आलेली असल्याने ती तळमळीच्या अग्नीचे रूपांतर देखील परम सौम्य आणि मृदु अशा अनुभूतीत करते आणि साधकाला अंतर्बाह्य गुरुप्रेमात न्हाऊन टाकते. जो गुरूच्या प्रेमात बुडाला त्याची साधना – नामस्मरण ही एक दिव्य परंतु सहज अनुभूती होते व बघता बघता सगुण निर्गुणाला लांघून तो नामाच्या परम दिव्य प्रकाशात गुरुकृपेने स्थिरावतो!

||श्रीनाम समर्थ||


Saturday, June 20, 2020

Informing about YouTube Channel --

।।जय श्रीराम।।

By the grace of Shri Maharaj, here is the YouTube channel that will connect us through Shri Maharaj's stories in English, chintan on some random verses of Bhagavad-Gita and many other things over a period of time. By His grace, I hope all these initiatives taken up by His Power will lead us on the path of devotion more firmly and encourage us to chanting the Divine Naama. Those interested may subscribe and share the YouTube channel with their near and dear ones.

https://www.youtube.com/user/shreyadeshpande

।।श्रीराम समर्थ।।

Wednesday, June 17, 2020

श्री ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराजांचे बोधवचन क्र ५३ --


श्रीमहाराजांचे बोधवचन क्र ५३ –

येथून विलायत हजारो मैल दूर आहे. तेथे जाऊन आलेल्या लोकांकडून आपण तेथल्या गोष्टी ऐकतो. तेथे आपण पायी जाऊ शकत नाही; कारण ते फार दूर आहे. शिवाय वाहनामध्ये बसून जावे म्हटले तर मध्ये मोठा समुद्र आहे. पण पायाला श्रम न होऊ देता, समुद्राचे पाणी पायाला न लावता आणि आपल्याला बुडू न देता समुद्रातून आर नेणारी जशी आगबोट आहे, त्याचप्रमाणे भगवंताचे नाम आहे. भगवंत कसा आहे तो आम्ही पाहिला नाही, पण संत त्याला पाहून आले आणि त्यांनी त्याचे वर्णन आमच्याजवळ केले. आम्ही आमच्या कष्टांनी त्याला गाठू म्हणावे तर ते शक्य नाही. शिवाय, प्रपंचासारखा एवढा भवसागर मध्ये आडवा पडलेला आहे. अशा परिस्थितीमध्ये आपण नाम घट्ट धरले तर सुखाने भगवंतापर्यंत जाऊन पोहोचू.

श्रीराम!
“नाम हाच साधनेचा प्रारंभ, नाम हाच मध्य आणि नाम हाच साधनेचा अंत – म्हणजेच साध्य” हे मनावर बिंबवण्यासाठी श्रीमहाराज आपल्याला अनेक उदाहरणे देऊन समजावतात. त्याच धर्तीवरचे आजचे बोधवचन आहे. श्रीमहाराज म्हणायचे, नामाचे महत्त्व ज्याला कळले तो एक तर बोलणारच नाही, फक्त नाम घेईल किंवा नामाबद्दल बोलतच राहील पण कितीही बोलले तरी नामाचे महत्त्व सांगून संपणार नाही. परंतु अत्यंत सहज, सोपे व कधीही कुठेही ‘साधनात’ ठेवण्याचे सामर्थ्य असलेल्या नामाचे त्याच्या सोपेपणामुळेच आम्ही महत्त्व जाणत नाही हे दुर्दैव आहे. सहजतेने आणि कोणत्याही आडंबराशिवाय हृदयातील नित्यवासी भगवंतापर्यंत पोहोचवणारे फक्त एक नामच आहे. या अंतरीच्या प्रवासाबद्दलच श्रीमहाराज आजच्या वचनात आम्हाला सांगत आहेत.

विलायतेला जाण्याला जशा अनेक अडचणी आहेत, तशाच, किंबहुना त्यापेक्षा अनंतपट जास्त अडचणी हृदयातल्या स्वस्थानी जाण्याला आहेत, त्या केवळ आमच्या अज्ञानामुळे, अविद्येमुळे. आम्ही परदेशी जाण्यासाठी चिकार खटपट करू; परंतु ‘खऱ्या स्वदेशी’ जाण्याबद्दल उदासीन राहू. आमची अडचण ही आहे की या जगातल्या कोणत्याही गोष्टीच्या प्राप्तीबद्दल आम्ही नेहमीच दुर्दम्य इच्छाशक्तीने, कष्टाने, एकाग्रतेने प्रयत्न करतो, कारण तिथे त्या कष्टाचे फळ आम्हाला खुणावत असते. मात्र हृदयस्थ ईश्वराच्या साक्षात्काराने काय साधणार आहे याची आम्हाला माहिती नसल्याने किंवा विपरीत माहिती असल्याने आम्ही आमची इच्छाशक्ती, कष्ट, एकाग्रता तिकडे लावत नाही.

म्हणून आज आम्हाला महाराज सांगताहेत, हरकत नाही, तुम्ही भगवंत पाहिलेला नाही; पण संतांनी तो पाहिला आहे. एखादा मनुष्य विदेशी जाऊन आला व त्याने आम्हाला त्याबद्दल सांगितले की आम्ही त्यावर विश्वास ठेवतो. अनेकदा असेही काही लोकांच्या बाबतीत घडलेले आहे की अमुक माणसावर विश्वास ठेवून त्याने सांगितल्याप्रमाणे विदेशी जाण्याची खटपट केली परंतु तो मनुष्य स्वार्थी निघाला व त्याने केवळ पैशासाठी फसवले. या अशा बातम्या वाचून ऐकून अनुभवून देखील आमची दृश्याची खेच आणि तिकडे धडपडण्याची वृत्ति कमी होत नाही. हे एकच उदाहरण नाही; अशी अनेक उदाहरणे आहेत जिथे मनुष्य दृश्याच्या खेचेला बळी पडतो व हाती काही लागत नाही. म्हणून श्रीमहाराज सांगताहेत, संतांवर विश्वास ठेवा, कारण जे संत आहेत, त्यांच्या मनात कोणताही स्वार्थ नसतो. तुम्हाला शाश्वत शांति – समाधानापर्यंत घेऊन जाण्यात संतांचा कोणता स्वार्थ आहे? असेही महाराज एकीकडे विचारतात. असे असताना देखील आम्ही संतांवर विश्वास न ठेवता सर्व जग ज्या एका दृश्याच्या भोवऱ्यात ओढले जात आहे त्यातच आम्हीही अडकणारच अशा जणू स्पर्धेने त्यात वाहवत चाललो आहोत याचे संतांना वाईट वाटते.

एक तत्त्वज्ञानी म्हणतो, All the problems of life revolve around the problem of distraction of mind. मनाच्या चंचल वृत्तीमुळे कोणताही निर्णय घेण्याची मनुष्याच्या क्षमतेत तूट येते. खरे पाहता, निर्णय घेण्याची क्षमता ही एकच गोष्ट चोवीस तास मनुष्याच्या सोबत आहे, ज्यात त्याला स्वातंत्र्य आहे असे अध्यात्मिक तत्त्वज्ञान सांगते. मात्र दृश्यात - या भवसागरात आमचे मन सतत गोते खात राहिल्याने आम्ही आमच्या हृदयस्थ निजमंदिराकडे कधी मनापासून लक्षच देत नाही. यासाठी श्रीमहाराज म्हणतात, आम्ही आमच्या कष्टाने त्याला गाठू म्हणावे तर ते शक्य नाही. खूप महत्त्वाचे विधान आहे हे. प्रपंचात, या संसारात करावे लागणारे कष्ट आणि परमार्थात करावे लागणारे कष्ट या दोन्हीमध्ये जमीन अस्मानाचा फरक आहे. खूप साऱ्या गोष्टी करणे हे प्रपंचातल्या कष्टाचे स्वरूप आहे; तर काहीच वृथा धडपड न करता गुरूच्या चरणांशी पडून राहणे व शांतपणे त्यांनी दिलेले नाम सहजतेने जपणे हे परमार्थातल्या कष्टाचे स्वरूप आहे. त्यामुळे प्रापंचिक कष्टांची सवय असलेल्या आमच्या मनाला या सहजतेच्या नामाच्या आगबोटीत बसण्याची सवय नाही. आणि इथेच सद्गुरूंवरच्या विश्वासाचे महत्त्व आहे, श्रद्धेचे महत्त्व आहे. पूज्य बाबा बेलसरे म्हणायचे, “हा जन्म दिला नामाला असे म्हणावे, वाया जाणार नाही हे निश्चित.” पण हे परमार्थातले साहस करण्यासाठी पुन्हा त्याच निर्णय क्षमतेकडे आम्हाला यावे लागते.

दुर्योधन आणि अर्जुन दोघेही समस्येत फसले होते. भगवंत जेव्हा दुर्योधनाकडे युद्ध टाळण्यासाठी मध्यस्थी करण्यास गेले, तेव्हा दुर्योधन म्हणाला, ‘मला कळत नाहीये असे नाही. “जानामि धर्मं, न च मे प्रवृत्तिः| जानामि अधर्मं न च मे निवृत्तिः||” धर्म काय मला माहिती आहे, अधर्म काय मला माहिती आहे. पण मी माझे मन बदलू शकत नाही, निर्णय घेऊ शकत नाही, त्यासाठी हे केशवा, माझे मन तू वळव.’ यावर भगवंत म्हणाले, ‘तुझे मन तूच वळवायला हवे.’ म्हणजे भगवंतांनी त्याला निर्णय क्षमतेच्या स्वातंत्र्याचीच जणू आठवण करून दिली. अर्जुन देखील असाच द्विधा मनस्थितीत होता. मन चंचल होत होते, निर्णय घेता येत नव्हता, युद्ध करावे की नाही. मग दुर्योधन आणि अर्जुनात फरक काय? तर, दुर्योधन म्हणाला, मला मन वळवणे शक्य नाही! अर्जुन म्हणाला, मला कळत नाहीये; परंतु मी तुझा शिष्य आहे, तर गुरू म्हणून योग्य अयोग्य काय ते तू मला सांग, मी तसे करीन, मी तुला शरण आहे.

दृश्याच्या भोवऱ्यात अडकलेल्या मनुष्याची अगदी अशीच अवस्था आहे. तो म्हणतो, आम्हाला माहीत आहे आम्ही अडकलोय परंतु दृश्याची खेच इतकी आहे की आम्ही त्यातून बाहेर पडू शकत नाही. जे भक्त असतात, सत्शिष्य असतात, ते मात्र म्हणतात, हे गुरुदेव, फक्त तुम्ही आमचे आहात, तुम्ही सांगाल ते आम्ही करण्याचा तुमच्याच कृपेने प्रयत्न करू. असे जे म्हणतात ते गुरूंनी सांगितल्याप्रमाणे केवळ नामाला घट्ट धरतात व सुखाने भगवंतापर्यंत जाऊन पोहोचतात. दुर्योधन व्हायचे की अर्जुन आपण ठरवायचे!

ही रामनाम नौका भवसागरी तराया||
सुटले अफाट वारे| मन तारू त्यात बिथरे||
त्या वादळातुनी या नेईल रामराया||
भ्रम भोवऱ्यात अडली| नौका परी न बुडली||
धरुनी सुकाणू हाती बसलेत रामराया||
आम्ही सर्वही प्रवासी जाणार दूर देशी|
तो मार्ग दाखवाया अधिकारी रामराया||

||श्रीनाम समर्थ||


Monday, June 15, 2020

श्री ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराजांचे बोधवचन क्र ५१, ५२ --


श्रीमहाराजांचे बोधवचन क्र ५१ –

रूपाचे ध्यान मनामध्ये आले नाही तरी नाम सोडू नये; पुढे रूप आपोआप येऊ लागेल.

श्रीमहाराजांचे बोधवचन क्र ५२ –

नाम आणि रूप यांचा संबंध असा आहे – एखाद्या माणसाची आपली ओळख असेल तर पहिल्याने त्याचे रूप पुढे येते आणि नंतर नाम येते; पण आपली त्याची ओळख नसेल, आणि आपण त्याला बघितलेला नसेल, तर त्याचे नाव आधी येते आणि नंतर रूप येते. आज आपल्याला भगवंताची ओळख नाही म्हणून त्याचे रूप माहिती नाही; परंतु आपल्याला त्याचे नाम घेता येईल. आजसुद्धा त्याचे नाम घेताना त्याची आठवण होते हा आपला अनुभव आहेच. समजा, राम या नावाचा आपला एक मित्र आहे आणि राम या नावाचा आपला एक गडी आहे. पण आपण ‘श्रीराम, श्रीराम’ असा जप करीत असताना आपल्याला आपल्या मित्राची किंवा गड्याची आठवण होत नाही, आपल्याला भगवंताची आठवण होते. शिवाय, भगवंताचे एक रूप तरी निश्चित कुठे आहे? एक राम ‘काळा’ तर एक राम ‘गोरा’ असतो; एक राम लहान तर एक राम मोठा असतो. एक राम उग्र तर एक राम सौम्य असतो; पण सर्व रूपे एका रामाचीच असतात. भगवंत स्वतः अरूप आहे, म्हणून जे रूप आपण त्याला द्यावे तेच त्याचे रूप असते. यासाठी आपण कोणत्याही रूपामध्ये त्याचे ध्यान केले तरी चालते.

श्रीराम!
बोधवचन क्रमांक ५१ व ५२ दोन्ही एकमेकांशी संबंधित आहेत म्हणून एकत्र घेतली आहेत. किंबहुना ५२ व्या वचनात श्रीमहाराजांनी ५१ वे वचन का सांगितले आहे याचे यथार्थ स्पष्टीकरण दिले आहे. भगवंताच्या ‘नाम रूपाचे धनी’ हे खऱ्या अर्थाने संतच असतात. वेगवेगळ्या नाम रूपांमधे रंगून जाऊन हे संत भक्तिमार्गाला एक दिव्य रम्यता आणतात. याच नाम रूपांमुळे भक्त – भगवंतातला डाव रंगतो. तरीही सर्वच संत रूपापेक्षा नामाला महत्त्व देताना दिसतात व नामाच्या मागून तुझे रूप आलेच पाहिजे देवा, अशी जणू त्या सगुण परमात्म्याला आण घालतात. संतश्रेष्ठ तुकोबा तर म्हणतात,

तुका म्हणे तुम्ही खादली हो रडी|
आम्ही धरली शेंडी नाम तुझे||
नाही तरी तुला कोण हो पुसतो|
निराकारी तेथे एकाएकी||

किती गोड भाव आहे नाही! भगवंताशी या संतांची आगळी जवळीक असते. संत या जगातल्या लोकांशी अंतर ठेवून, एक प्रकारे आदरभावाने बोलतील; परंतु जिथे त्यांच्या जीवीच्या जिवलग भगवंताची बात येते, तिथे मात्र ते अगदी मोकळे होतात व आपल्या सख्याला उद्देशून अगदी जवळिकीने बोलतात. याचे कारण हा संबंध सोडून त्यांच्या आयुष्यात दुसरा संबंध मनातही उरलेला नसतो. आम्ही केवळ संबंध आहे म्हणतो; परंतु देवाजवळ, संताजवळ तक्रार मात्र या जगातल्या गोष्टीची करतो. तुकोबा म्हणतात, अरे पांडुरंगा, तू रडीचा डाव खेळतो आहेस आणि अदृश्य होतो आहेस; पण हरकत नाही. मी तुझ्या नामाची शेंडी माझ्या हातात धरली आहे. जर आम्ही तुला सगुणात आणला नसता तर तू एकाकी निराकार होऊन राहिला असतास, मग तुला कुणी विचारले असते? असा खडा सवाल – यातून तुकोबांचा गोड सख्यभाव व्यक्त होतो! आणि हे देखील दिसते की नाम ज्याच्या हातात आहे त्यामागे रूप धारी भगवंत अवतरलाच पाहिजे. श्रीमहाराज देखील म्हणतात, जर पतंगाचा दोरा हातात आहे तोवर पतंग हातात आहेच! तद्वत जोवर नाम हातात आहे तोवर सगुण रूप धारी भगवंत हातात आहे, संनिध आहे. याहीपेक्षा सगुण व निर्गुण या दोन्हीच्या मधला नाम हा सुवर्णमध्य आहे. नामाने भगवंताच्या सगुण रूपाचे ध्यान व ज्ञान होते व ते होत असतानाच नाम हे ध्वनिरूप असल्यामुळे ते निर्गुण देखील आहे आणि त्यामुळे नामाने मुळातील निर्गुण भगवत् तत्त्वाला धक्का लागत नाही. ॐकार व नाम यात भेद नाही तो यामुळेच. उलट नामामध्ये एक विशेष गुणधर्म आहे की नाम हे भगवंताचे गुणदर्शन देखील घडवते. वरच्या वचनात महाराज म्हणतात त्याप्रमाणे नामामध्ये रूपाचे दर्शन आपोआपच होते. ॐकार जास्त बुद्धीला स्पर्श करतो तर नाम हे भावनेस हलवते. आणि म्हणूनच भक्तिमार्गात नामालाच जास्त महत्त्व सर्व संतांनी दिले.

श्री रामकृष्ण त्यांच्या काली मातेला म्हणत, “आई मला कोरडा साधू करू नकोस. मला रसात ठेव.” आणि या रसाचे आस्वादन बुद्धिवादी अध्यात्म मार्ग करू शकत नाही. त्यासाठीच ‘नामामृत’ म्हटले आहे, ज्यामध्ये सर्वच्या सर्व इंद्रिये सुद्धा आपले लौकिक गुणधर्म विसरून भगवंताच्या लीलेत रममाण होतात. गुरुदेव रानडे म्हणतात, “नाम ही ईश्वर प्रतीत करणारी संज्ञा आहे. ती आत्मतत्त्व संलग्न असल्याने प्रत्येक वेळी नामाच्या स्मरणाच्या प्रक्रियेत परमात्मतत्त्वाशी तादात्म्य होते.

अजून एक महत्त्वाची गोष्ट जी नामाचे श्रेष्ठत्व सिद्ध करते ती म्हणजे, भक्तिमार्गात निष्कामतेचे अनन्यसाधारण महत्त्व आहे. जितकी भगवंत उपासना स्थूलात असेल तितकी ती कामनिक असण्याची शक्यता जास्त. अगदी सर्वश्रेष्ठ मोक्षाची कामना देखील सकाम उपासनेतच मोडते. स्मरण ही एकमेव अवस्था अशी आहे जी पूर्णपणे सूक्ष्मात आहे आणि ज्यामुळे मनाला सूक्ष्मता येतेच. म्हणूनच जे लोक महाराजांना विचारत, “महाराज, जपाच्या वेळी रूप समोर आणावे का?” त्यावेळी महाराज म्हणत, दोन्हीकडे लक्ष कसे लागेल; नुसते नाम घ्यावे; रूप मागून आपोआप प्रकाशित होईल.” म्हणजेच नामातून रूपाचे प्रकटन ही सहज प्रक्रिया आहे; त्यासाठी जर साधक जास्त प्रयत्न करू लागला तर कदाचित तो साधनेतील सहजता हरवून बसेल आणि हे होऊ नये म्हणूनच मानसपूजेची मदत घ्यायला संत सांगतात. रामकृष्ण परमहंस परंपरेत मानस पूजेलाच ध्यानाचा दर्जा दिलेला आहे. कारण मनात आराध्याची पूजा करत करत हळूहळू ती घडू लागते. हेच नामातून रूपाचे प्रकटीकरण म्हणायला हरकत नाही. आणि यामुळेच “मी मनामध्ये भगवंताचे रूप प्रकट करतो” हा अहंकार देखील व्हायची शक्यता नाही. रूपाचे प्रकटीकरण हे कृपाधिष्ठित आहे हा “राम कर्ता” भाव दृढ होणे देखील महाराजांच्या नामाला priority देण्याने साधते. आणि नामाला ही priority भगवंताने स्वतः दिली आहे असे सर्व संत सांगतात. तुलसीदास म्हणतात,
समुझत सरिस नाम अरु नामी|
प्रीति परसपर प्रभु अनुगामी||
नाम रूप दुइ ईस उपाधी|
अकथ अनादि सुसामुझि साधी||
-- नाम व नामी दोन्ही एकरूपच असले तरी त्यांच्यामध्ये स्वामी व सेवक असा संबंध आहे. स्वामीच्या मागे सेवक चालतो. त्याचप्रमाणे नामामागे नामी चालतो. नाम आणि रूप या दोन्ही ईश्वराच्या उपाधि आहे. दोन्ही गोष्टी अनिर्वचनीय आहेत. केवळ शुद्ध बुद्धीनेच यांचे स्वरूप जाणता येते.

म्हणूनच विठ्ठलाच्या सगुण रूपाशी खेळणारे संतश्रेष्ठ नामदेव म्हणतात,

“लपलासी तरी नाम कैसे नेसी| आम्ही अहर्निशी नाम गाऊ||”

||श्रीनाम समर्थ||



Thursday, June 11, 2020

श्री ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराजांचे बोधवचन क्र ५० --


श्रीमहाराजांचे बोधवचन क्र ५० –

नामाबद्दल संशय किंवा विकल्प आले तरी ते तसेच आग्रहाने घ्यावे; सर्व संशय आपोआप नाहीसे होतील.

श्रीराम!
श्रीमहाराज एके ठिकाणी म्हणतात, प्रवाहाच्या विरुद्ध दिशेने पोहणे म्हणजे साधक होणे. परंतु विरुद्ध दिशेला जाण्याचे नुसते मनात आले तरी देखील आम्हा सामान्यांना त्याची भीती वाटते. कारण अनेक जन्मातीलच नव्हे तर याही जन्मातील आमचे पूर्वीचे संस्कार. लहान मूल जेव्हा जन्माला येते तेव्हा ते अत्यंत निरागस असते. तरी देखील ‘माझी’ आई हा भाव पहिल्या दुग्धपानापासून, त्याच्याही आधीपासून त्याच्या मनावर बिंबतो. या सात्विक भावातून पुढे पुढे सर्वच बाबतीत ‘मी आणि माझे’ या वावटळीत सापडून या देहाशी घनिष्ठ संबंध आम्ही प्रस्थापित करतो. आणि याच गोष्टीला mass appeal असल्यामुळे त्यातच आयुष्याची इतिकर्तव्यता समजत भरभर आयुष्य निघून जाते. ही अशी आमच्या मनाची दिशा असताना जेव्हा काही पूर्वसंस्कारांमुळे सद्गुरू संपर्कात येतात, जेव्हा त्यांच्याकडून अनंत सत्ता आणि शक्ती असलेले नाम मिळते, तेव्हा ‘आता मला नामाचा अभ्यास सुरु केला पाहिजे’ असे मनापासून वाटून देखील ते घडत नाही. याची अनेक कारणे आहेत. पूज्य बाबा आपल्या आनंद साधनेत पहिली अडचण सांगतात – आळस. कारण आम्हाला सतत काहीतरी शरीराने करण्याची सवय असते. अगदी शाळेच्या अभ्यासापासून ते ऑफिस मधल्या कामापर्यंत! त्यामुळे काहीही न करता नुसते नाम घ्यायचे याचा आम्हाला कंटाळा येतो. मात्र हळूहळू सवयीने तो कमीही होतो, कारण नाम घेतल्यावर आंतरिक शांति जाणवते हा अनुभव अगदी सुरुवातीला देखील बहुतेकांना येतोच.

मात्र यापेक्षा मोठी अडचण पुढे येते, जेव्हा आम्हाला नामाच्या परिणामाबद्दल साशंकता निर्माण होते. पहिली गोष्ट ही की नाम घेऊन काय साधायचे आहे याची संपूर्ण कल्पना आम्हाला नसते व दुसरी ही की फक्त नामाने काय होणार; त्यासोबत अजूनही काहीतरी ‘साधन’ केले पाहिजे हा विकल्प वरचेवर येऊ लागतो. श्रीमहाराज आज आम्हाला याच गोष्टीबद्दल काय करावे हे सांगत आहेत. एकीकडे श्रीमहाराज म्हणतात, बुद्धिभेद हा परमार्थात सर्वात जास्त हानी करतो. आमची बुद्धी खूप जास्त चंचल आहे. त्यामुळे ज्या बुद्धीचा अंकुश मनावर बसायचा ती बुद्धीच चंचल झाल्यामुळे दाही दिशांना धावणारे मन लगेच भ्रमित होते. याचे कारण ज्या अध्यात्मिक शक्तीने नाम सुगम रीतीने चालायचे त्या अध्यात्मिक शक्तीची कमतरता आणि सद्गुरूंच्या प्रति पूर्ण निष्ठेचा अभाव!

श्रीमहाराज म्हणतात, हरकत नाही. संशय तुम्हाला त्रास देतो ना, मग नाम घेत घेत संशय बाळगा. काय जबरदस्त नामनिष्ठा आहे ही! पूज्य बाबा नेहमी म्हणायचे, सगळ्या विकल्पांचे, संशयाचे एकच कारण, आमचे नाम कमी पडते! म्हणून आजच्या वचनात महाराज म्हणतात, “आग्रहाने नाम घ्या!” वृंदावन चे एक थोर संत पूज्य विनोद बिहारी बाबाजी म्हणतात, “ऐसा तो बहुत बार होता है; बुद्धि पूरी की पूरी भ्रष्ट हो जाती है| फिर चाहे वो कुसंग से हो या फिर गुरू पर दृढ़ श्रद्धा ना होने से| नाम का रटन करने को मन करता ही नहीं, क्यूँ की हमें आदत नहीं है ना! लेकिन डरना नहीं| भागना नहीं या निरुत्साह मत होना| जब भी ऐसा लगे तो और जोर से और आग्रहपूर्वक नाम जपना चाहिए| मन को डांटना चाहिए की मैं तुम्हारी सुनूंगा नहीं|” शा रीतीने जो नामाचा अभ्यास करतो, त्याचे मन हळूहळू त्याला वश होते व नामात गोडी निर्माण होते.

अजून एक मोठी गोष्ट आज महाराज सांगत आहेत ती म्हणजे, जो आग्रहाने नाम जपेल त्याच्यावर त्याच्या प्रयत्नांमुळे गुरुकृपा लवकर होईल. जो साधन भावपूर्वक प्रयत्न करतो, त्या भावनेत खूप जास्त सामर्थ्य असते. भावना सगुण ब्रह्माला हलवते! आवश्यकता आहे ती फक्त एकाच गोष्टीची, ती म्हणजे आमच्या मनात येणाऱ्या विकल्पांबद्दल जागरूक होऊन त्यांना बळी पडू नये यासाठी सद्गुरूंची कळळून प्रार्थना करणे! भावपूर्वक प्रार्थना, पुन्हा कुसंगाला बळी न पडणे व सद्गुरूंच्या संनिध आहोत या दृढ भावात राहून आग्रहाने नाम जपणे एवढे जर आपण करू शकलो तर सद्गुरू कृपेने सर्व संशय विकल्प नाहीसे होऊन शुद्ध अनावलंब आणि प्रेमपूर्वक नामस्मरण निश्चित होईल!

म्हणूनच पूज्य बाबा बेलसरे नामचंद्रिकेत म्हणतात,

“सर्वान् वादान् परित्यज्य नामवादं समाचरेत्|
तृप्ताः नामरसं पीत्वा धन्यास्ते विरला जनाः||”

||श्रीनाम समर्थ||  

Sunday, June 7, 2020

श्री ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराजांचे बोधवचन क्र ४९ --


श्रीमहाराजांचे बोधवचन क्र ४९ –

भगवंताचे नाम हे स्वयंभू आणि स्वाभाविक आहे.

श्रीराम!
संत शिरोमणी ज्ञानेश्वर महाराजांनी ज्ञानेश्वरीचा प्रारंभच शब्दब्रह्म नामापासून केला. म्हणाले,
“ॐ नमो जी आद्या| वेदप्रतिपाद्या|
जय जय स्वसंवेद्या| आत्मरूपा||”
ॐकार हे शब्दब्रह्म नाम आत्मरूप ईश्वर आहे असा सरळ सरळ निर्वाळा ज्ञानेश्वरीसारख्या महानतम ग्रंथाच्या पहिल्या ओवीत आपल्याला मिळतो. या ॐकाराला वंदन करून माऊलींनी त्याला या गूढ आणि रम्य अशा भावार्थ दिपिकेचा उगम म्हटले आहे. यातच शब्द आहे, “स्वसंवेद्य”... जो स्वतःच स्वतःला जाणतो आणि जो इतर कोणत्याही गोष्टीने निर्देशित करता येऊ शकत नाही, तो स्वतःच स्वतःचा निर्देश आहे. हाच वेदांमधला प्रतिपादित निर्देश श्रीमहाराजांच्या स्वयंभू शब्दातून अभिप्रेत होतो. गुरुदेव रानडे यथार्थ रीत्या नामाला विश्वाचा उगम म्हणतात ते याच कारणामुळे. ‘ॐ इत्येकाक्षरं ब्रह्म’ असे भगवंतांनी गीतेत म्हटले आहे. दहाव्या विभूती योगात ‘गिरामि अस्मि एकं अक्षरम्’ असा स्पष्ट संकेत – शब्दब्रह्म नाम मीच आहे – असे भगवंतांनी सांगितले. जगद्गुरू शंकराचार्यांनी भगवंताचे स्वरूप यथार्थ जाणण्यासाठी ‘विवेकाचे’ महत्त्व प्रतिपादन केले आणि सांगितले, विवेकाच्या सामर्थ्याने भगवंताचे स्वरूप यथार्थपणे जाणणे यामध्येच मनुष्याचे थोरपण आहे. आणि हे जे भगवंताचे स्वरूप तेच हे आत्मस्वरूप, स्वयंभू आणि स्वाभाविक नाम होय. किंबहुना, भगवंताला जाणणे हे त्याच्या नामाचे सामर्थ्य जाणल्याशिवाय कलियुगात अशक्य आहे असे पुराणांमधूनही सांगितले गेले. आणि खरोखर नामाचे सामर्थ्य, सर्वव्यापित्व, सर्वसाक्षित्व जाणणे म्हणजेच विवेकाचा सुयोग्य उपयोग होय.

श्रीमहाराज वेदांतले गुह्य साध्या सोप्या भाषेत सांगतात ते हे असे! महाराजांचा ‘स्वाभाविक’ शब्द नामाची खोली दाखवतो. मानव जीवाला कोणतेतरी प्रतीक असल्याशिवाय सत् रूप परमात्म्याला शुद्ध स्वरूपात धरणे शक्य नाही. मात्र प्रतीक हे बहुधा उपाधिसहित असते. उपाधिसहित असलेल्या प्रतीकांमधून द्वैत बुद्धी, वेगळेपणा, दृश्याशी संलग्नता या गोष्टी वाढतात. जसे विविध धर्मांमध्ये विविध गोष्टींची उपासना प्रतिपादन केली गेली. या विविधतेमुळे ईश्वरप्राप्तीत रम्यता आली हे निश्चित; मात्र त्याच वेळी त्या मार्गांमधल्या मायिक गोष्टींत अडकण्याची शक्यता वाढली. हे होऊ न देता जितका ईश्वर उपाधिरहित, तितकेच त्याचे प्रतीक देखील उपाधिरहित असले तर जीव मायासागराला ओलांडून सरळ त्या तत्त्वाप्रत जाईल, याच आत्मानुभूतीने युक्त अशा सिद्धांतावर सर्व संतांनी नामाचे प्रतिपादन केले. आणि म्हणूनच, ईश्वराची ओढ जशी आणि जितकी जीवाला स्वाभाविक, तितकीच त्याची नामाची ओढ देखील स्वाभाविक आहे असे श्रीमहाराज आजच्या वचनातून आम्हाला सांगत आहेत. कारण प्रत्येक जीवाची ओढ, त्याला माहित असो वा नसो, त्या आनंदाच्या शाश्वत तत्त्वाकडे आहे, ज्याला ईश्वर वा भगवंत म्हणून ज्ञानी वा भक्त संबोधतात. आणि नाम या शुद्धतम अशा नादब्रह्मातून सर्वव्यापी ईश्वराचा आणि प्रेमस्वरूप भगवंताचा साक्षात्कार अनुक्रमे ज्ञानमार्गी आणि भक्तीमार्गी साधकाला गुरुकृपेने होतो. स्वाभाविक का? तर कोणताही साधक, मग मार्ग कोणताही असो, आजवर शरणागती शिवाय मायेच्या पार पोचला नाही. दोन गोष्टी आहेत – मायेच्या पलीकडे शाश्वत तत्त्वात स्थिर होणे, ज्यायोगे संपूर्ण दुःखनिवृत्ती होते. इथे रजतमात्मक मायेचा निरास होतो. मात्र सत्वगुणी माया इथेही साधकाला व्यापून असतेच असे मुख्यतः भक्तिमार्गी संतांनी प्रतिपादन केले आहे. तिचा निरास हा भगवंताला शरण गेल्यानेच होतो आणि म्हणूनच आत्मज्ञानानंतर देखील शंकराचार्यांनी ‘भज गोविन्दम् मूढ मते’ असे परोपरीने सांगितले! आणि हे झाले (जे होणे ‘स्वाभाविकच’ आहे) म्हणजे तो आत्मज्ञानी महात्मा ब्रह्मज्ञानी संत बनतो, जिथे त्याला अखंड आनंदाचे निजधाम प्राप्त होते!

नाम स्वयंभू असल्यामुळेच त्याचा सार्वकालिक संबंध आत्मस्वरूपाशी आहे. केवळ शुद्ध आत्मस्वरूप प्रतिपादन करणारे रमण महर्षी देखील नामाला यासाठी महत्त्व देतात. ते म्हणतात, “ईश्वराचे नाम पक्के धरले की कोणत्याही कल्पना किंवा विचार जरी मनामध्ये आले, तरी ते भगवंताचे रूप, गुण, कीर्ती, सामर्थ्य यांचेच येतात, त्यामुळे ईश्वरावर मन केंद्रित व्हायला मदत होते. इतर विचार हळूहळू लुप्त होतात. मग ईश्वरातून आत्मतत्त्वाकडे वाटचाल चालू होते व मी कोण आहे (कोSहं) याचा बोध घेता येतो.” म्हणूनच भक्तिमार्गीच काय पण योगी जन देखील भगवत नामाचा आश्रय घेतात असे प्रतिपादन अनेक ठिकाणी केले गेले आहे. पद्मपुराण सांगते,
“रमन्ते योगिनोSनन्ते सत्यानन्द चिदात्मनि|
इति राम पदे नासौ परं ब्रह्माभिधीयते||”
-- योगी जन देखील परमसत्यापासून, ब्रह्मतत्त्वापासून प्राप्त होणाऱ्या अपरिमित आनंदाचा उपभोग घेतात आणि म्हणूनच त्या परब्रह्माला ‘राम’ असेही म्हणतात.

असे हे नाम चिदानंद देणारे, स्वयंभू आणि जीवासाठी स्वाभाविक असल्यामुळेच वैश्वानर संहिता सांगते,
“न देश काल नियमः, शौचाशौच निर्णयः|
वरं संकीर्तनात् एव रामरामेतिमुच्यते||”
-- नाम हे स्वाभाविक असल्यामुळेच त्याला स्थळ काळ शौच अशौच कोणतेही बंधन नाही. केवळ राम राम असे संकीर्तन करावे हेच बरे!

“समाधी साधन संजीवन नाम” या प्रसिद्ध अभंगात संत ज्ञानेश्वर म्हणतात, “तृण अग्निमेळे समरस झाले| तैसे नामे केले जपता हरि||” नाम जपता जपता जीव भगवंताशी एकरूपच झाला, जसे गवत अग्नीमध्ये अग्निरूपच होते. इथे माऊली नामच आत्मनिवेदन भक्ती आहे असे सांगत आहेत आणि म्हणूनच नवविधा भक्तीबद्दल श्रीमहाराज म्हणतात, “तीन मैल चालून गेल्यावरच (श्रवण, कीर्तन, स्मरण) जर हवी ती व्यक्ती (भगवंत) भेटली, तर मग नऊ मैल जायचे कशाला?” म्हणजेच नामाच्या स्मरणातच भगवंत भेट आहे.

साधनेच्या दृष्टीने हे वचन मनावर बिंबवावे असे आहे. जर नाम स्वाभाविक आहे, तर माझे मन नामात लागत नाही ही तक्रार ही मायेची परमावधी होय. आम्ही या नकारात्मक मायिक चिंतनातच जास्त रमलो, म्हणून आम्हाला माया त्रास देते. मला सद्गुरूंनी दिलेले नाम मायेच्या पलीकडे आहे आणि त्यामुळे मायेतली कोणतीही व्यक्ती वस्तु मला यात बाधा पोहोचवणे केवळ अशक्य आहे या दृढ भावनेने जो नामाला धरेल व अभ्यास करेल त्याला गुरुकृपा दूर नाही आणि ही गुरुकृपा म्हणजेच अखंड अबाधित अविरत चालणारे भावयुक्त, प्रेमयुक्त नामस्मरण!

||श्रीनाम समर्थ||

Saturday, June 6, 2020

श्री ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराजांचे बोधवचन क्र ४८ --


श्रीमहाराजांचे बोधवचन क्र ४८ –

सत्याला काहीतरी रूप दिल्याशिवाय आज आपल्याला त्याचे अनुसंधान ठेवता येत नाही. नाम हे त्याचे रूप होय. म्हणून नामाचे अनुसंधान ठेवावे.

श्रीराम!
“यथा देहे तथा देवे” असे म्हटले जाते. आम्ही आमच्या देहाला जे जे म्हणून उपचार करतो, तसे ते देवाला करणे याचे नाव उपासना असे म्हटले आहे. मुळात उपचार हे त्याला आवश्यक असतात जो या देहाच्या मर्यादेत आहे. अमर्याद परमेश्वराला उपचार कसले असे वाटणे स्वाभाविक आहे. परंतु, जोवर जीव देहबुद्धी भेदून पलीकडे गेला नाही, तोवर त्याला निर्गुण निराकार ईश तत्त्वाबद्दल समजणे अशक्य आहे. केवळ शब्दांनी ते स्वरूप माहीत असून उपयोग नाही. त्यामुळे जे आम्हाला देहबुद्धीत असताना देखील श्रद्धेच्या जोरावर कळू शकेल अशी जादू संतांनी केली. खरोखर संतांनीच निर्गुण परमात्म्याला सगुणात आणले आणि भक्तांवर असंख्य उपकार केले. भगवंताचे नाम, लीला, रूप, गुण, धाम, परिकर या सर्व गोष्टींमुळे आज भक्त मालामाल आहेत याचे कारण संत होत! संतश्रेष्ठ तुकाराम छातीवर हात ठेवून आण घेतात –

मोक्षपद तुच्छ केले याकारणे| आम्हा जन्म घेणे युगायुगी||
विटे ऐसे सुख नव्हे भक्तिरस| पुढतापुढती आस सेवावे हे||
देवा हाती रूप धरविला आकार| नेदू निराकार होऊ त्यासी||
तुका म्हणे चित्त निवांत राहिले| ध्याई ती पाउले विटेवरी||
        
पहा भक्तीचा महिमा! आम्ही भगवंताला सगुण रूप धरण्यास भाग पाडले म्हणताहेत तुकोबा आणि त्याला निराकार होऊ देणार नाही असे वर्चस्व ते आपल्या भक्तीने भगवंतावर गाजवतात! श्रीमहाराजांसारखे ब्रम्हज्ञानी संत देखील जे सर्वतोपरी निर्विकार आहेत, तरीही प्रापंचिक माणसांमध्ये राहिले याचे कारण काय? आपण म्हणतो ना,
तो माया मोह पाळी| काय करतील लेकुरवाळी||
पण काम क्रोधा जाळी ऐसा नाही पाहिला||
श्री ब्रह्मचैतन्यासारिखा नाही पाहिला||
बिचारे संसारात अडकलेले जीव काय करतील या आत्मिक कळकळीपोटी माया मोहापलीकडे गेलेले संत देखील माया मोहात राहून, सर्वसामान्यांसारखे आयुष्य जगून आमच्यात नामप्रेम जागवण्याचा यत्न करतात. हेच कारण आज आपल्याला श्रीमहाराज वचनात सांगत आहेत. दृश्यात अडकलेले आमचे मन आज दृश्याच्या पलीकडे शाश्वतात विराजमान असणाऱ्या ईश्वराला बघण्यास असमर्थ आहे. गोपी जनांकडे उद्धव जेव्हा या शाश्वतात स्थिर असलेल्या ईश्वराचे ज्ञान सांगण्यासाठी गेले, तेव्हा कृष्ण्प्रेमात गर्क झालेल्या त्या गोपी हसून त्याला विचारतात आणि सल्ला देतात --

“का करे हम ऐसे ईश्वर को, जो द्वार हमारे आ न सके|
माखन की चोरी कर ना सके, मुरली की तान सुना न सके|
मन हर ना सके, छल कर ना सके, दुख दे ना सके, तरसा न सके|
जो हमरे हिरदय लग ना सके. हिरदय से हमे लगा न सके|
ऐसो ईश्वर छोड हमारे मोहन को पहचानो|
प्रेम में का आनंद रे ऊधो प्रेम करो तो जानो||”

याचाच अर्थ मन स्थिर करण्यासाठी प्रत्येक साधकाला एका आलंबाची गरज असते; परंतु भगवंताच्या नामाच्या आलंबाची गंमत अशी आहे की हा आलंब भगवंतापासून भिन्न नाही; त्यामुळे ज्याने नामाच्या आलंबाला धरले तो सरळ तत्क्षणी भगवंताच्या राज्यात पोचला! महाराज म्हणतात ना, सगुण – निर्गुणाला सांधणारे असेल तर ते भगवंताचे नामच आहे. म्हणूनच आपले कर्तव्य कर्म उत्तम करताना देखील गोपिका भगवंताच्या नामाच्या शरणागत होत्या व या नामाच्या आलंबानेच त्या सिद्ध बनल्या (मुळात सिद्ध होत्याच). तद्वतच प्रत्येक जीव देखील सिद्ध आहेच; केवळ त्याचा विसर पडल्याने भगवंताचा शोध सुरु आहे. भगवंतांनी गीतेत सांगितले, “ईश्वरः सर्वभूतानां हृद्देशेSर्जुन तिष्ठति||” ज्याने या एका वाक्यावर संपूर्ण श्रद्धा ठेवली त्याला तात्काळ भगवंताचे दर्शन आहे. मात्र हृदयदेशी विराजमान ईश्वरावर मायेचे पांघरूण आल्याने साधनाची आवश्यकता आहे. साधनाने ईश्वर भेट होत नसते. मायेचा पडदा विरण्यासाठी साधनाचा उपयोग होतो, ज्यायोगे अंतःशुद्धी होऊन अंतःकरणात सदोदित विराजमान असणाऱ्या ईश तत्त्वाचा बोध गुरुकृपेने होतो.

भगवंताचे नाम आणि त्याचे रूप यात द्वैत नाहीच. महाराज म्हणतातच, ज्याने नामाला घट्ट धरले त्याला हळूहळू रूप प्रकाशित होऊ लागतेच. ज्याचा जसा भाव तसे रूप घेऊन करुणानिधान भगवंत – सद्गुरू त्यास दर्शनही देतात. मात्र खरे दर्शन आहे - नामातच भगवंताचे दर्शन होऊन शाश्वत समाधान लाभणे. आणि याचसाठी श्रीमहाराज नामाच्या अनुसंधानाचा आग्रह करतात. एके ठिकाणी महाराजांनी म्हटले आहे, “नामाविण राम| जैसे पाकळ्यांविण फूल जाण||” जो कुणी महाराजांना विचारे, ‘महाराज आम्ही नुसते तुमचे अनुसंधान ठेवतो; नाम घेतलेच पाहिजे का?’ तेव्हा महाराज म्हणत, ‘हो ते खरे; पण मी तुम्हाला जिवंत पाहिजे ना? मग माझा प्राण नाम आहे. म्हणून नामाचे अनुसंधान ठेवावे!’

आणि ज्याने हे केले, त्याला भगवंताचे रूप, लीला, गुण, धाम, आणि भगवंताचे संत जन यांचे आलय (घर) नामच आहे हा अनुभव श्रीमहाराज देतील!

||श्रीनाम समर्थ||  

Wednesday, June 3, 2020

श्री ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराजांचे बोधवचन क्र ४७ --


श्रीमहाराजांचे बोधवचन क्र ४७ --

श्रीमहाराजांना एकाने एकदा प्रश्न विचारला की, ‘महाराज, सध्या इतकी यंत्रे निघाली आहेत; भगवंताच्या प्राप्तीसाठी संतांनी एखादे यंत्र शोधून काढले नाही का?’ प्रश्न ऐकून श्रीमहाराज झट्दिशी म्हणाले, ‘हो तर! असे यंत्र संतांनी केव्हाच शोधून काढले आहे. त्या यंत्राचे नाव आहे, ‘रामनाम’. हे यंत्र सर्वांना मिळू शकते आणि शिवाय, ते कधीच गंजत नाही!’

श्रीराम!
त्रेतायुगात आणि द्वापारात योग याग तप या मार्गांनी भगवत प्राप्ती होत होती. मात्र कलियुगात हे मार्ग आचरण्यासाठी लागणारी शारीरिक आणि मानसिक क्षमता कलीच्या प्रभावाने कमी कमी होत जाईल असे द्वापाराच्या शेवटी भगवंतांनी सांगितले. मनुष्य आळशी बनेल व त्याची बुद्धी स्थिर राहणार नाही. वातावरणात रजोगुण तमोगुण यांची वाढ होईल. हे झाल्यामुळे मनुष्य प्रत्येक बाबतीत शॉर्टकट च्या मागे लागला. कोणतीही गोष्ट साधण्यासाठी जास्त कष्ट नकोत, खर्च नको आणि तरीही साध्यता सहज झाली पाहिजे अशी मनुष्याची मनोभूमिका झाली. याच लौकिक मनोभूमिकेत मुरलेला मनुष्य हाच नियम परमार्थाकडेही लावू लागला. श्रीमहाराजांची खासियत ही आहे की मनुष्य ज्या भूमिकेतून प्रश्न विचारतो, त्याला ते त्याच्या मनोभूमिकेला अनुरूप असे उत्तर देऊन या मार्गाकडे वळवतात. अशा रीतीने हा आजचा प्रश्न आणि त्याला श्रीमहाराजांनी दिलेले चपखल उत्तर आहे.

कालच्या चिंतनाच्या वेळीच असे वाटत होते की, खरोखर संतच या जगातले सर्वोत्तम शास्त्रज्ञ आहेत. अनेक शोध लौकिक शास्त्रज्ञांनी लावून आयुष्य सुखकर केले; परंतु बहुतेक सर्व शोधांना सकारात्मक आणि नकारात्मक अशा दोन्ही बाजू आहेत. अगदी अणुबॉम्बचेच उदाहरण दिले पाहिजे असे नाही. अगदी लहान सहान शोध – जसे – मिक्सर... आज यामुळे आपले स्वयंपाक घरातीक काम किती सहज सोपे झाले आहे; मात्र यामुळे पूर्वीच्या बायकांमध्ये होती ती पाटा वरवंट्यावर काम करण्याची आमची क्षमताच हळूहळू निघून गेली. त्यामुळे हाडातली, स्नायूंमधली शक्तीही कमी झाली असा शास्त्रीय निष्कर्ष आहे. म्हणजेच कोणत्याही आयुष्य सुखकर करण्याच्या शोधात काहीतरी कमीपणाची बाजू आहे. संतांनी जो शोध लावला तो मात्र, आहे तेच आयुष्य असताना देखील कायम आनंद मिळवून देणारा, मनुष्याच्या मनाची पातळी उंचावून त्याला या जगातल्या सुख-दुःखांपासून मुक्त करणारा असा लावला. याच नामाच्या यंत्राच्या शोधातून मनुष्याला “अखंड समाधान” म्हणजेच भगवत्-प्राप्ती होते असा निर्वाळा श्रीमहाराजांनी दिला. म्हणून ते म्हणाले, अशा यंत्राचा शोध संतांनी कधीच लावला! नामाचे यंत्र म्हटले आहे. कारण देहबुद्धीत असताना मनुष्याला सुरुवातीला स्वतःच्या प्रयत्नाने नामाला चिकटण्याचा अभ्यास करावा लागतो व ‘मला सहज नामाला चिकटता यावे’ यासाठी त्यासोबत निरंतर सद्गुरूंची प्रार्थना करावी लागते.

या यंत्राचा गुणधर्म श्रीमहाराज सांगताहेत, हे यंत्र सर्वांना मिळू शकते! म्हटलंय ना, नाही खर्चिली कवडी दमडी, नाही वेचिला दाम| बाई मी विकत घेतला श्याम! वाह... अक्षरशः नामाच्या यंत्राचा शोध म्हणजे खरोखर भगवंताला वश करून घेणेच आहे. ना काही खर्च, ना काही कष्ट, केवळ मुखाने राम राम म्हणायचे, चित्तात त्याला साठवायचा प्रयत्न करायचा आणि “रामे चित्त लयः सदा भवतु” अशी प्रार्थना गुरुचरणी करायची! बाकी सर्वच्या सर्व साधनांना काही पूर्वतयारी लागते. काही शारीरिक, मानसिक बळ आत्मसात करून, काही विशिष्ट नियम पाळून मगच ती साधने इच्छित फलप्राप्तीसाठी – भगवत प्राप्तीसाठी उपयोगी ठरतात. मात्र नामसाधना सुरु करण्यासाठी अशी कोणतीही अट संतांनी घातलेली नाही. समर्थ म्हणतातच,
चालता बोलता धंदा करिता| खाता जेविता सुखी होता|
नाना उपभोग भोगिता| नाम विसरो नये||
नामाची शक्ती, नामाची पवित्रताच आकाशाला भेदून टाकणारी असल्यामुळे त्याच्यासाठी कर्मकांडात्मक कोणत्या विधीची, कोणत्या विशिष्ट काळाची आवश्यकता नाही. हनुमंत म्हणतात तसे, “कह हनुमंत बिपति प्रभु सोई| जब तव सुमिरन भजन न होई||” विधी ते स्मरण, विस्मरण तो निषेध एवढा एकच नियम पाळायचा. कसे आहे, नामाला कोणत्याच बाधक गोष्टी टाकाव्या लागत नाहीत असे नाही. परंतु श्रीमहाराजांना भगवंताच्या नामावर इतका प्रचंड विश्वास आहे की ते म्हणतात, बाकी आचरणात्मक तुम्ही फार धरायच्या भरीला न पडता केवळ नामस्मरण करा. त्या नामाच्या योगानेच जे बाधक व्यवहार, विचार, आचार असतील ते आपोआप निघून जातील. त्याकडे लक्ष देत बसून वेळ घालवण्यापेक्षा जे करायचे ते केलेले उत्तम हा महाराजांच्या बोलण्याचा स्पष्ट मतितार्थ आहे! खूप सहज आहे हे. जो नामाला मनापासून धरेल, त्याच्याकडून दुर्व्यवहार घडणे अशक्य; जर घडत असेल, अजून नामाला धरण्यात कमतरता आमची आहे, नामात किंवा सद्गुरुंत उणीव नाही!

दुसरा नामाच्या यंत्राचा गुण महाराज सांगतात, ते कधीही गंजत नाही. गंज लोखंडाला का चढतो? त्याचा संपर्क हवेबरोबर आला की. जितके शुद्ध लोखंड तितका गंज जास्त चढतो म्हणतात; हेच जर लोखंडाचे alloy असेल तर गंज चढत नाही. मात्र हे लौकिकातले, दृश्यातले उदाहरण आहे. नाम हे दृश्य अदृश्याच्याही पलीकडे शाश्वतात स्थिर आहे, त्यामुळे त्याच्यावर कशाचा परिणाम होणे शक्यच नाही. मात्र यातून एक बोध घेण्यासारखा आहे. नाम घेणाऱ्या साधकाचे मन जितके जितके सूक्ष्म होत जाते, तितके त्याने स्वतःला बुद्धिभेदाचा, विकल्पाचा, विकारांचा गंज चढण्यापासून सांभाळणे आवश्यक आहे. सूक्ष्म बुद्धीची ग्रहण क्षमता खूप वाढते; त्यावेळी जसा सत्संगाचा परिणाम तत्काळ होतो, तसाच कुसंगाचा परिणाम देखील तत्काळ होण्याचा संभव असतो. जर नाम घेऊन समाधान साधत नसेल, तर यातल्या कोणत्यातरी गोष्टीने आम्हाला गंज चढत आहे हे ओळखून सावध झाले पाहिजे.

जो साधक “आम्हाला केवळ गुरूंची अकारण करुणा म्हणून आमची पात्रता नसताना नाम मिळालेले आहे” हा भाव सतत ताजा ठेवण्याचा प्रयत्न करील, त्याला नामाचा सहजपणा, सुगमता आणि शक्ती यांचा अनुभव आल्याशिवाय राहणार नाही; मग तो / ती कुणीही असो! कारण नामाला कोणताच विटाळ नाही. “चहू वर्णां नामाधिकार| नामी नाही लाहानथोर| जड मूढ पैलपार| पावती नामे||” कोणत्याही अवस्थेत, कोणत्याही समयी, कोणत्याही जागी, कोणत्याही परिस्थितीत नाम घेऊन भगवत प्राप्तीची ज्योत अखंड तेवती ठेवणे आम्हाला जमो हीच प्रार्थना सद्गुरू चरणी वारंवार करणारा साधक या भवसागरातून तर तरून जाईलच; पण त्याहीपेक्षा या इथेच राहून, सर्व परिस्थिती हीच असताना देखील नामाने तो मनाच्या उन्नत अवस्थेत सतत राहू शकेल. आज जी परिस्थिती, माणसे, कमतरता आम्हाला भली मोठी दिसत आहेत, तीच ‘विमानातून जशी खालची शहरे ठिपक्याएवढी दिसतात’ तशी दिसून त्यांचे महत्त्वच नाहीसे झाल्याशिवाय राहणार नाही! म्हणूनच बाकीची सर्व यंत्रे नाहीशी झाली, त्यांचे महत्त्व कमीजास्त झाले, ती काम करेनाशी झाली तरी “नामाचे यंत्र” मात्र कधीही खाडा न करणारे आणि केव्हाही शरीरालाच नव्हे तर मनालाही विश्रांती देणारे असे आहे. यंत्रवत, म्हणजे किंचितही खंड न पडता परंतु त्याला भावनेचे तेल घालून नामस्मरण केले मात्र पाहिजे. म्हणजे नाम हेच रमणस्थान होईल!!!  

||श्रीनाम समर्थ||




Monday, June 1, 2020

श्री ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराजांचे बोधवचन क्र ४६ --


श्रीमहाराजांचे बोधवचन क्र ४६ –

तुम्ही घ्यावे नाम | म्हणजे होईल तुमचे काम ||

श्रीराम!
गरज ही शोधाची जननी आहे असे म्हणतात ना! या जगातले सर्व शोध असेच गरजेतून लागले. गरज कशाची? तर आयुष्य सुसह्य करण्याची. कोणताही शोध याला अपवाद नाही. आता त्याचा उपयोग कसा केला गेला हा वेगळा मुद्दा, मात्र शोधासाठी शास्त्रज्ञांनी केलेल्या खटपटी मागे मात्र दुर्दम्य इच्छाशक्ती होती. अगदी याच धर्तीवर, याहीपेक्षा तीव्र तळमळीने संतांनी खऱ्या अर्थाने जीवन सुसह्यच नव्हे तर आनंददायक करण्याचा शोध लावला. श्रीमहाराज एके ठिकाणी म्हणतातच, ‘मी समाधानाचा शोध लावला.’ कारण संतांच्या लक्षात आले की बाह्यतः कितीही शोध लावले गेले तरीही जोवर मनुष्य अंतरंगातून सुधारला नाही, तोवर ते शोध त्याला Lasting Happiness देऊ शकत नाहीत. याच ‘अंतरंग परिवर्तनाच्या’ शास्त्राला त्यांनी अध्यात्म शास्त्र म्हटले आणि आपल्या निस्वार्थ अनुभूतीने अनंत जीवांना ते समजावून सांगण्याचा चंग बांधला. आपल्याला माहीत आहेच की ‘Invention’ आणि ‘discovery’ असे दोन शब्द आहेत. Invention म्हणजे ते जे पूर्वी कधीच कुठेच अस्तित्त्वात नव्हते व त्याचा शोध लावला गेला. Discovery म्हणजे जे नेहमी होतेच, केवळ विसरले गेले होते वा त्याकडे लक्ष दिले गेले नव्हते, ते शास्रीय रीत्या समोर आणणे! अगदी अशाच रीतीने संतांनी जे नेहमी होते, आहे व कायम राहीलच असे काहीतरी शोधले, अनुभवले व लोकांसमोर ठेवले. यालाच ते नाम असे म्हणतात. महाराजांनी जो समाधानाचा शोध लावला असे ते म्हणाले तो या नामाद्वारे त्यांनी लावला.

जसे आपण वर बघितले की शोध हा आयुष्याला सोपेपणा आणण्यासाठी लावला जातो. अगदी तसेच अध्यात्मिक आयुष्याला, परमार्थाला आत्यंतिक सोपेपणा आणि सहजता देण्याचे काम “नाम” करते म्हटल्यास वावगे ठरू नये! समर्थ मनाच्या श्लोकात म्हणतातच, “मुखे नाम उच्चारिता कष्ट नाही!” हे अजून मनावर ठसवण्यासाठी पुढे म्हणतात,

“नव्हे कर्म ना धर्म ना योग काही|
नव्हे भोग ना त्याग ना सांग पाही||
म्हणे दास विश्वास नामी धरावा|
प्रभाते मनी राम चिंतीत जावा||” (मनाचे श्लोक क्र ७६)

म्हणून श्रीमहाराज आजच्या वचनात स्पष्टपणे, कळकळीने, अगदी सोप्या भाषेत आपल्याला सांगतात, फक्त नाम घे, तुझे सर्व काम होईल. काय जबरदस्त विश्वास आहे संतांचा नामावर! भगवंत कसे आहेत? सर्वव्यापी Omnipresent म्हणतो ना आपण! नाम कुणाचे आहे? भगवंताचे आहे. नाम आणि नामी यांमध्ये अभेद असल्यामुळे नामीचा सर्वव्यापकत्वाचा गुण स्वाभाविकच नामामध्येही आहे. म्हणूनच जीवनाचे असे एकही अंग नाही, ज्याला नामाचा स्पर्श होत नाही. तुलसीदास म्हणतातच,
“राम नाम मानिदीप धरु जीह देहरी द्वार|
तुलसी भीतर बाहेरहुं जौं चाहसि उजियार||”
-- मुखरूपी दाराच्या उंबरठ्यावर जर तुम्ही रामनाम रूपी रत्नदीप ठेवला तर तुम्हाला आत (अंतरंगात) आणि बाहेर (लौकिकात) दोन्हीकडे प्रकाश पडेल.
किती सोपा मार्ग आहे. आणि श्रीमहाराज काय म्हणताहेत, तुम्ही नाम ‘घ्या!’ नामात रहा, एकाग्रचित्ताने घ्या वगैरे काही अटी आपली दयासिंधु माऊली सुरुवातीला तरी घालत नाही. तसेही आम्ही अज्ञानी जीव काय आणि किती लक्ष लावणार? बाह्य उपाधि कमी करणे हे करायचे आहे पण ते मुख्य नाही. अगोदर नामाला धरा म्हणतात महाराज म्हणजे त्या उपाधि सहजच सुटतील. प्रयत्न करणे आपले काम, त्यात यश देणे त्यांचे काम. आम्ही प्रयत्नाला कमी पडू नये एवढीच महाराजांची अपेक्षा आहे. नामाचा स्पर्श झालेली कोणतीही लौकिक गोष्ट देखील उजळून निघेल यात शंका नाही.

मात्र श्रीमहाराजांसारख्या संतांना “काम होणे” म्हणजे आपले अंतिम कल्याण होणे हे अभिप्रेत असते हे निश्चित. कारण बाह्य शोधांप्रमाणे बाह्य आशा, अपेक्षा, हवेपणा याला अंत नाही हे आम्हालाही माहित आहे. एखादी गोष्ट नामाच्या शक्तीने पूर्ण झाली (आणि ती होतेच यात काही विशेष नाही) तरी त्या तथाकथित पूर्ण झालेल्या एका इच्छेतून हजार इच्छा जन्माला येतात हा आमचा अनुभव आहे. पूज्य बाबा बेलसरे प्रवचनात एक मजेशीर उदाहरण द्यायचे. कुणी म्हणतो, मुलीचे लग्न व्हावे, वयात आली मुलगी. झाले लग्न. पुढे आता तिला मूल व्हावे ही इच्छा प्रबळ होते. ही देखील इच्छा पूर्ण झाली तरी शांतता मिळते का? नाही! पुन्हा तिचे बाळंतपण माहेरी की सासरी हा प्रश्न राहतोच! गमतीचा भाग सोडला तरी जे म्हटले जाते “आशा नाम शृंखला” हे या अर्थी निश्चित खरे आहे की अपेक्षांची पिलावळ काही संपत नाही आणि त्यापायी मनुष्याला कधीही खरे समाधान लाभत नाही. यासाठीच “खरे काम होण्यासाठी” निष्काम नाम जपले पाहिजे असे महाराजांना यातून सुचवायचे आहे.

पूज्य ब्रह्मानंद महाराज आपल्या एका अभंगात म्हणतात, “वासनेचे मूळ दूर केले!” किती महत्त्वाचे आहे हे. वासना खूप खोल दडलेली आहे. वरवर तिच्यावर उपचार करून चालत नाही असे संत ज्ञानेश्वर देखील आपल्या एका ओवीत सांगतात. म्हणतात,
“जैसी वरिवरी पालवी खुडिजे| आणि मुळी उदक घालिजे|
तरी कैसेनि नाशु निपजे| तया वृक्षा||”
हे जिव्हेच्या वासनेसंबंधी लिहिलेले असले तरी सर्वच वासनांना हे लागू होते. कोणतीही वासना दाबून किंवा कोणत्याही अन्य उपायांनी पूर्णपणे ताब्यात येत नाही. त्यासाठी वासनेच्या मुळावर आघात करणाराच उपाय हवा आणि तो आहे भगवंताचे नाम! नामाने वासनेचे मूळ उचकटले गेल्यावर सुरुवातीला वासना बंड करून उठतात, मात्र त्यांच्याकडे त्रयस्थपणे बघणाऱ्याला over a period of time त्या सोडून जातात. हे होणे म्हणजे जीवाचे काम होणे आहे, कारण चौऱ्यांशी लक्ष योनीतून फिरण्याचे कारणच या वासना आहेत. त्याच नाहीशा झाल्यावर भय कसले? मुक्ती मेल्यावर मिळवायची गोष्टच नाही. “आपुले मरण पाहिले म्या डोळा| तो जाहला सोहळा अनुपम्य||” ही संत तुकाराम महाराजांची अनुभूती निष्ठापूर्वक नामसाधन करणाऱ्या साधकाला गुरुकृपेने येतेच येते! हे “काम होणे” आहे.

सद्गुरूंची लेकरे आहोत आपण! त्यांच्या property वर आपला हक्क आहे. वडिलांची इस्टेट मुलांना मिळेल की नाही याबद्दल काळजी का लागावी? फक्त मुलांनी वडिलांनी सांगितलेल्या मार्गावर चालणे आवश्यक आहे. वारसा हक्काने सर्वांसाठी मुक्तहस्ते नामाची अमाप, अद्वितीय, कधीही लय न पावणारी आणि कायमचे समाधान देणारी दौलत वाटताहेत महाराज. घेणारा हवा!

||श्रीनाम समर्थ||