Monday, November 15, 2021

श्री ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराजांचे बोधवचन क्र ८३ --


श्रीमहाराजांचे बोधवचन क्र ८३ –

भगवंताच्या स्मरणामध्ये अभिमानाचे मरण आहे.

श्रीराम!

श्रीमहाराजांची बहुतेक वचने साधनेच्या प्रत्येक स्तरावर अत्यंत बोधक अशी असतात, त्यातलेच हे आजचे वचन. ‘अभिमान’ या एका शब्दात परमार्थ मार्गावरचे सर्व अडथळे एकत्र गुंफलेले आहेत असे म्हटले तर वावगे ठरू नये. परमार्थात अभिमानाचे स्थूल आणि सूक्ष्म असे सर्वसामान्य वर्गीकरण केले जाते. बुद्धिमत्ता, मान, कीर्ती, पैसा, रूप, स्थावर मालमत्ता, जीवन जगण्याचा लौकिक स्तर वगैरे अनेक गोष्टी स्थूल अहंकारात येतात; परंतु हा स्थूल अहंकार ज्यातून जन्म घेतो त्यास सूक्ष्म अहंकार म्हणतात. हा सूक्ष्म अहंकार म्हणजेच देहबुद्धी; मी हा देहच आहे आणि त्यामुळे या देहाला लागलेले सर्व व्यक्ती, वस्तू, पदार्थ, उपाधी म्हणजेच ‘मी’ हे झालेले false identification. वेदांतात यालाच अध्यारोप – अपवाद असे म्हणतात. जे नाही ते आहे असे वाटणे; यालाच महाराज ‘माया’ असे म्हणतात. आत्मरूप असलेला जीव मायेच्या क्षेत्रात आल्याबरोबर जे स्फुरण येते तोच अहंकार, ज्यातून मग चित्त, बुद्धी आणि मन आभासात्मक जन्म घेते. याच आभासात जगता जगता जेव्हा या आभासात्मक जगाच्या बाहेर पडण्याची खूण – भगवंताचे स्मरण - सद्गुरूंच्या भेटीने मिळते त्यामुळे जीव हळूहळू या नसलेल्या परंतु तरीही जीवास ग्रासलेल्या मायेतून केवळ त्या परम सत्तेने बाहेर पडू शकतो व पुन्हा आपला आत्मानंद भोगू शकतो, आत्मानंदरूप होऊ शकतो.

 

आपल्या पुराणांमधून आणि विविध ग्रंथांमधून अशी अनंत उदाहरणे आहेत, जिथे साधनेच्या अगदी खालच्या थरापासून अतिशय उत्तम स्तरापर्यंत हा ‘अभिमान’ कसा जीवाला बंधनात पाडतो हे कळते. दोन टोकाची उदाहरणे बघितली तर लक्षात येईल. अर्थात, जेव्हा आपण उच्च स्तरातील व्यक्ती – महात्म्यांमध्ये अशी उदाहरणे बघतो, त्यावेळी त्यांची नेमणूक आपल्याला त्यातून बोध घेता यावा यासाठी असते हेही खरे.

 

देवर्षी नारद ‘मी काम जिंकलेला आहे’ असे अभिमानाने जेव्हा सर्वत्र असे सांगू लागले, त्यावेळी भोलेनाथांनी त्यांना सावधान केले, माझ्यासमोर बोललात ठीक आहे परंतु भगवान श्रीहरींसमोर याबद्दल उच्चार करू नये. परंतु, ‘संभु दीन्ह उपदेस हित नहिं नारदहि सोहाना!’- त्यांनी दिलेला उपदेश नारदांना भावला नाही आणि त्यांनी ते श्रीहरींना सांगितले. त्यानंतर आपल्या या आवडत्या भक्ताचा अभिमान – अहंकार हरण करण्याचा घाट श्रीहरींनी घातला व मर्कटरूप त्यांना देऊन कसे ‘मी काम जिंकला’ या अभिमानास मरण दिले हे सर्वविदित आहे. यातून महाराज ज्याला ‘मीपणाचा अभिमान’ म्हणतात, तो किती घातक आहे हे आपल्या सहज लक्षात येते. मुख्यतः भक्तिपंथामध्ये जोवर किंचित देखील ही मीपणाची भावना आहे तोवर आम्ही ‘भक्त’ म्हणवून घेऊच शकत नाही असे सर्व संतांनी सांगितले. समर्थ तर या अभिमानाला आपल्या मनाच्या श्लोकात ‘पापिणी’ म्हणतात. परंतु समर्थ त्याचा उतार देखील लगेच सांगतात,

“रघूनायकावीण वाया शिणावे|

जनासारिखे व्यर्थ का वोसणावे||

सदा सर्वदा नाम वाचे वसो दे|

अहंता मनी पापिणी ते नसो दे||”

आणि हेच महाराज आजच्या वचनात सांगताहेत, भगवंताच्या स्मरणामध्ये अभिमानाचे मरण आहे. इथे अजून एक लक्षात येते, की नुसते नाम घ्या असे महाराज इथे सांगत नाहीत तर स्मरण असावे हे सांगत आहेत; कारण तेच म्हणतात तसे, सर्व साधनेचा प्राण असेल तर तो म्हणजे स्मरण. नुसते साधन आनंद देत नाही; तर त्यातले स्मरण आनंद देते. आणि नामातून गुरुकृपेने घडलेल्या साधन त्या आनंदाच्या स्त्रोतापर्यंत नेत असल्याने स्वाभाविकच हा प्रवास अहंकाराच्या पलीकडे वसणाऱ्या आत्मरूपापर्यंत होतो. असा प्रवास घडलेल्या साधकाची मनस्थिती कशी असते हे आपल्याला दुसऱ्या उदाहरणात बघायला मिळेल.

 

‘विदेही’ म्हणून गौरवले जाणारे राजर्षी जनक महाराज जेव्हा अष्टावक्र ऋषींकडे येतात, तेव्हा त्यांना प्रश्न करतात,

“कथं ज्ञानमवाप्नोति कथं मुक्तिर्भविष्यति|

वैराग्यं च कथं प्राप्तं एतद् ब्रूहि मम प्रभो||”

जे जनक महाराज प्रत्यक्ष ज्ञान, भक्ति, वैराग्य आहेत ते इतक्या विनम्रपणे ऋषींना ‘प्रभो’ असे संबोधन करून ज्ञान, वैराग्य, मुक्ती व अंतिम ज्ञानाबद्दल प्रश्न करतात आणि या खऱ्याखुऱ्या लीनतेमुळेच अष्टावक्र ऋषींचा संपूर्ण अनुग्रह त्यांच्यावर झाला आणि जगताला वेदांताचे अंतिम ज्ञान अतिशय थेट पोचवणारा ‘अष्टावक्र गीता’ हा ग्रंथ तयार झाला. म्हणूनच महाराज म्हणत असावेत की भावना मात्र शंभर नंबरी हवी; त्यात भेसळ असून चालत नाही;  . ज्याची भावना शुद्ध आणि खरी, त्याला गुरू न मागता देखील कृपा करण्यास आतुर असतात. कारण तिथे सपशेल शरणागती असते.

 

अशी ही अवस्था साधण्यासाठी स्मरणाशिवाय अन्य उपाय नाही असे महाराज सांगत आहेत. कारण, भगवंताच्या – म्हणजेच गुरूंच्या स्मरणाला कोणतीही उपाधी लागत नाही. महाराज एकीकडे म्हणतात, तुम्ही श्रीमंत आहात की गरीब आहात, समाजात तुमचे स्थान काय आहे, तुमची जात कोणती आहे, या व अशासारख्या कोणत्याच उपाधीचा संबंध भगवत स्मरणाशी शक्य नाही; इतके स्मरण शुद्ध आहे, जे त्या परमपित्याशी संधान साधते व जीवास मुक्त करते आणि म्हणूनच गोचिडासारख्या जीवाला जडलेल्या अभिमानापासून केवळ संपूर्ण उपाधिरहित असे नामस्मरणच मुक्ती देऊ शकते.

 

त्यातल्या त्यात भक्तिपंथी संतांमध्ये तर लीनतेची सहज चढाओढ लागल्यासारखी दिसते, इतके ते स्वतःला दीन-लीन म्हणण्यात धन्यता मानतात. प्रत्यक्ष शंकरसुवन केसरीनंदन जिथे म्हणतात, “सो सब तव प्रताप रघुराई| नाथ न कछु मोरि प्रभुताई||” – जो काही पराक्रम माझ्याकडून घडला तो तुमचा मोठेपणा आहे, तुमची शक्ती आहे; माझे त्यामध्ये काहीही नाही! सूरदास म्हणतात,

“अप बल तप बल और बाहु बल, चौथो बल हैं राम| 

सूर किशोर कृपा ते सब बल, हारे को हरिनाम||” – हे जे हरणे आहे, ते म्हणजे अभिमानाचे मरण आणि हे मरण सततच्या स्मरणाने साधते म्हणून महाराजांचा नामाचा अट्टाहास!

 

संतश्रेष्ठ तुकाराम महाराज भगवत नामाच्या स्मरणाने घडलेल्या अभिमान त्यागाला साधनाचे सार म्हणतात –

 

“थोडे आहे थोडे आहे| चित्त साह्य जालिया||

हर्षामर्ष नाही अंगी| पांडुरंगी सरले ते||

अवघ्या साधनांचे सार| न लगे फार शोधावे||

तुका म्हणे लटिके पाहे| सांडी देह अभिमान||”

 

|| श्रीनाम समर्थ ||

 

 

Friday, November 5, 2021

श्री ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराजांचे बोधवचन क्र ८२ --


श्रीमहाराजांचे बोधवचन क्र ८२ –


आपली वृत्ति स्थिर करण्याकरिता आणि उपाधि न लागण्याकरिता आपण नाम घ्यावे. नाम नुसते घेतल्यानेसुद्धा काम होईल; पण आपण ते समजून घेतल्याने काम लवकर होईल. एखाद्या सत्पुरुषाची परीक्षा करायची असेल तर तो नामाबद्दल काय बोलतो ते पाहावे.

 

श्रीराम!

नाम आहे आदी अंती| नाम सर्व सार|

आहे बुडत्याला नौका| जीवनी आधार||

हेच ते अंतिम सत्य आहे हे महाराज वरचेवर आपल्याला सांगतात. पण याचा नेमका अर्थ काय? नाम आदि आहे, नामच अंत आहे आणि नाम हाच आधार आहे म्हणजे नेमके काय? याचा उलगडा आज महाराज वरील वचनात करतायत. त्यामध्ये साधनेमधले तीन टप्पे महाराजांनी सांगितले आहेत. ते तीन टप्पे खालीलप्रमाणे –

१) मुमुक्षु अवस्था - नाम नुसते घेतल्यानेसुद्धा काम होईल

२) साधकावस्थेतील २ टप्पे –

  (अ) आपली वृत्ति स्थिर करण्याकरिता आणि उपाधि न लागण्याकरिता आपण नाम घ्यावे

  (ब) आपण ते समजून घेतल्याने काम लवकर होईल

३) सिद्धावस्था - एखाद्या सत्पुरुषाची परीक्षा करायची असेल तर तो नामाबद्दल काय बोलतो   ते पाहावे

 

आता गंमत अशी की महाराजांनी परोपरीने सांगितलेला पहिला टप्पा जो कुणी मनासून आचरेल त्याला पुढचे टप्पे येऊन गेल्याचे कळणारही नाही हे देखील महाराज सांगतात. मुख्यतः जो खरा तीव्र मुमुक्षु आहे, म्हणजे ज्याची शाश्वत सुखाचा मार्ग मला हवाच अशी ध्येय निश्चिती झालेली आहे, तोच सद्गुरूंनी दिलेले नाम हृदयाशी जपून नामस्मरण करील असे सर्व संत सांगतात. जोवर ध्येय निश्चिती झालेली नाही, तोवर नामाच्या कडेकडेने परिक्रमा होत राहील आणि ध्येय निश्चिती सरशी तो नामाच्या आतल्या वलयात प्रवेशकर्ता होईल. हे आतले वलय म्हणजेच सद्गुरू आज्ञापालन होय. शाश्वताचा अस्वस्थ शोध (तळमळ) आणि जबरदस्त श्रद्धा या भांडवलावर तो पूज्य बाबा म्हणतात तसे “नामाला लागेल”. महाराज सांगतायत, जो असा नुसता नामाला लागेल त्याचे देखील काम होईलच यात शंका नाही. मग तरी देखील आम्हाला महाराज “समजून घेतले तर काम लवकर होईल” असे का सांगत असावेत हा प्रश्न पडणे साहजिक आहे. त्यातही महाराजांनी दोन टप्पे सांगितले आहेत. पहिला टप्पा - वृत्ति स्थिर करण्याकरिता आणि उपाधि न लागण्याकरिता – हा जो आहे, तो महाराजांचा साधक आणि बाधक बोध आहे. जसे संत तुकाराम महाराज म्हणतात, “जेणे विठ्ठल मात्रा घ्यावी, तेणे पथ्येही सांभाळावी” त्याप्रमाणे अनेक ठिकाणी महाराजांनी आम्हाला “नामसाधना सुरळीत चालण्यासाठी” काय करणे जरूर आहे आणि काय टाळणे जरूर आहे हे सांगितले आहे. यात एक खूप मोठी मेख आहे महाराजांची. त्यांनी सांगितलेला कोणताही साधक आणि बाधक बोध यामागे साधन सुरळीत व चपखल चालावे हे कारण तर आहेच; परंतु यापेक्षाही एक दिव्य कारण यामागे आहे आणि ते म्हणजे या सर्व साधक बाधक गोष्टींच्या पालनातून साधक त्या अंतिम बोधाच्या हळूहळू जवळ सरकतो; कसे ते मार्ग चालणाऱ्याला अनुभवता येईल असे महाराज सांगतात.

 

जसे, इथे महाराज म्हणतायत, वृत्ति स्थिर करण्याकरिता – साधनेमध्ये सर्व समस्या असेल तर ती वृत्तीच्या ओढीचीच आहे आणि ही मायेकडची ओढ त्याविरुद्ध दिशेमध्ये परिवर्तित करण्याचे सामर्थ्य फक्त अशाच गोष्टीमध्ये असू शकते जी मायेला भीक घालत नाही आणि अशी गोष्ट नामाशिवाय त्रिभुवनात कोणतीही नाही. ही वृत्ति स्थिर करणे हा साधनातील सर्वात मोठा टप्पा आहे म्हटले तर वावगे ठरू नये. आमच्यासारख्या सामान्य लोकांना रोजच्या कामाच्या धामधुमीत दिवसभरात किती वृत्ति येऊन जातात याचा पत्ताच लागत नाही. त्याचा अंदाज तेव्हा येतो, जेव्हा सतत बदलणाऱ्या – मनाला व्यापून टाकणाऱ्या वृत्तींनी आम्हाला मानसिक थकवा येतो आणि मग दैनंदिन जीवन देखील नीरस आणि कंटाळवाणे वाटू लागते. महाराज सांगतात, कामापेक्षा कामाच्या विचारांनी तुम्ही अधिक थकता. त्यामुळे काम झाले की शांतपणे एका जागी बसून थोडा वेळ नामस्मरण केले की पुन्हा ताजेतवाने व्हाल. हे जे आहे तेच वृत्ति स्थिर करणे आहे, जे नामाने साधते. अर्थात या दैनंदिन व्यापातून जे विविध षड्रिपूंचे तरंग मनामध्ये उठत राहतात ते वृत्तींचे कारण आहे व नाम त्यावर हल्ला चढवते.

 

या सर्व वृत्तींमुळे काय होते? तर आम्ही विविध उपाधींमध्ये अडकतो. सर्व उपाधींचे मूळ कारण आहे देहबुद्धी. या देहाला आम्ही ‘मी’ समजलो आणि त्या देहात कार्य करणाऱ्या मनाला बळी पडलो आणि या जन्मृत्युच्या चक्रात अनंत जन्म अडकलो. चुकीच्या ठिकाणी (देह व मन) जिवाचा अहंकार चिकटल्यामुळे सकाळी उठल्यापासून ते रात्री झोपेपर्यंतच काय परंतु स्वनाच्या दुनियेत देखील आम्ही उपाधींमध्येच घेरले गेलो व अधिकाधिक देहपाशात गुंतलो. याचे पर्यवसान म्हणजे आम्ही व्यक्ती, वस्तु, पदार्थ, धन, मान, कीर्ती या उपाधींना मानव जीवनाचे इतिकर्तव्य समजत आलो. महाराज आजच्या वचनात सांगतायत, या उपाधि न लागण्याकरिता नाम घ्या. एकीकडे महाराज सांगतात तसे, नामाची गंमत अशी आहे, की नाम मनाला उलटे करते. म्हणजेच मनाच्या आजपर्यंतच्या सवयींच्या विरुद्ध प्रवास करायचा असेल तर नामाला पर्याय नाही. असे का होत असावे? एक वृंदावनचे थोर संत पूज्य प्रेमानंद गोविंद शरण जी महाराज अगदी हेच सांगतात की जेव्हा आपण एकच एक गुरुप्रदत्त नाम वरचेवर घेतो, त्यावेळी मन मरते! म्हणजे मनाला दुसऱ्या व्यापाकडे प्रवृत्त करणारी ओढ मरते आणि साहजिकच त्यामुळे देहमनात अडकलेली जीव बुद्धि कमी कमी व्हायला लागून तिथे देवबुद्धीचा प्रवेश सुलभ होतो! त्यामुळे ध्येय निश्चिती नंतरचा टप्पा म्हणजे वृत्ति स्थैर्यासाठी नामाचा उपयोग आणि तदनुसार उपाधीमध्ये अडकलेलो आहोत हे कळायला लागून त्यापासून हळूहळू सुटका.

 

आता अजून काय हवे? हेच नाम समजून घेणे नव्हे का? पण असे असते तर महाराजांनी पुन्हा ‘समजून घेतल्याने काम लवकर होईल’ असे का सांगितले असते असा प्रश्न पडणे साहजिक आहे. कसे आहे, आजचे युग तंत्रज्ञानाचे आहे आणि त्यामुळे कोणतीही गोष्ट मान्य करणे इतके सुलभ होत नाही. आणि ज्याची अशी चिकित्सक वृत्ति आहे, त्याने उपनिषदे आणि मूळ भारतीय तत्त्वज्ञाना मधून नाम महिमा जाणून घ्यावा. किंबहुना असे होण्यापेक्षाही जो केवळ अभ्यास म्हणून देखील तत्त्वज्ञान अभ्यासेल परंतु त्याची धाव जर शाश्वत आनंदाकडे असेल तर त्या सर्व अभ्यासातून तो कधी नव्हे एवढा नामाला चिकटेल. अर्थात त्यामध्ये अभ्यासातच वाहवत जाण्याचा खूप मोठा धोका आहे; यासाठी शास्त्रप्रचितीच्या आकलनामधून त्याला गुरुप्रचितीकडे वाटचाल करावीच लागेल, तेव्हाच आत्मप्रचीतीचा मार्ग खुला होईल असे सर्व संत सांगतात. परंतु यातील एक गंमत अशी की, जसे तहानलेल्याला पाण्याचे महत्त्व अधिक, जसे जन्मान्धाला डोळे मिळाल्यावर जग पाहण्याचा आनंद अधिक, तद्वतच अभ्यासाने ज्याने नामाचे परम सत्यत्व जाणून घेतले, नामानेच झालेली विश्वनिर्मिती उपनिषदांमधून चाखली, त्याला कुणाहूनही अधिक नाम-प्रचितीची – नामातून मिळणाऱ्या अढळ, अमर समाधानाची ओढ लागेल हे निश्चित आणि स्वाभाविकच मग महाराज म्हणतात तसे, नकळत घेतलेल्या नामापेक्षा त्याचे काम लवकर होईल!

 

आता शेवटच्या सिद्धावस्थेबद्दल महाराज म्हणताहेत, एखाद्या सत्पुरुषाची परीक्षा करायची असेल तर तो नामाबद्दल काय बोलतो ते पाहावे. परमेश्वराजवळ – त्या अंतिम सत्याजवळ जाण्याचे अनंत मार्ग आहेत. त्या मार्गांमधील साधनेचा प्रकार, त्याला लागणारा वेळ, श्रम, साधकाच्या मनाची धाटणी यांमध्ये फरक असला तरी कोणताही मार्ग चूक नाही. असे असले तरी ज्याने श्रुतिस्मृतिपुराणे, विविध संत साहित्य आणि त्याही पुढे जाऊन आपल्या सद्गुरूप्रदत्त साधनेचा खरा मागोवा घेतला, त्याला नामाचे निर्विवाद वर्चस्व समजणे ही काळ्या दगडावरची रेघ आहे, कारण 'सम्यक' अभ्यासाने चिकित्सक वृत्ति लयास जाऊन तो खऱ्या अर्थाने नामाश्रित आणि गुरुसमर्पित होतो!  त्यामुळे महाराज म्हणतात, सर्व शास्त्र पारंगत आहे असे म्हणतो, गुरुपद चालवतो आणि तरीही जर नामाबद्दल त्याला कळकळ नसेल, जर नाम त्याच्या आयुष्याची इतिकर्तव्यता नसेल तर तो खरा संत असू शकत नाही, कारण ज्याला नामानुभूती नाही, त्याला आत्मानुभूतीही नाही असा सरळ सरळ आलेख महाराज मांडतात आणि सांगतात,

 

“नामापरते न सत्य मानावे!”

 

|| श्रीनाम समर्थ ||