Wednesday, August 2, 2023

श्री ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराजांचे बोधवचन क्र ९० --

 


श्रीमहाराजांचे बोधवचन क्र ९० - 


"उत्तम वस्तु नेहमी थोडीच असते. श्रीखंडामध्ये चक्का आणि साखर कितीतरी असते; पण केशर किती थोडे घालावे लागते! तसे भगवंताच्या नामाचे आहे. रोज थोडे पण अगदी मनापासून आणि मोबदल्याची अपेक्षा न करता नाम घ्यावे; ते फार फार काम करील."


जय श्रीराम 🙏


श्रीमहाराज एकीकडे म्हणतात,

"तुम्ही सूज्ञ, माझे प्राण।

नाम करा तेवढे जतन।। 

याहून दुजे मागणे काहीं।

सत्य सत्य त्रिवाचा नाहीं।।


आणि हे त्यांचे सांगणे (खरे तर मागणे) आम्ही मानावे, यासाठी अनेक रीतीने- साम दाम- वापरून ते आम्हाला नामाचे महत्त्व पटवून देऊ पाहतात. जे नामरूप झाले त्यांना नाम घ्यावे लागत नाही, त्यांना प्रपंच सोडावा लागत नाही, त्यांना नामाची वेळ ठरवावी लागत नाही, संकल्प करावा लागत नाही. त्यांना नाम सोडत नाही, प्रपंचात राहूनही प्रपंच त्यांच्या चित्तातून नाहीसा होतो, ते सदा सर्वकाळ नामातच वास्तव्य करतात आणि स्वतःच संकल्परूप झाल्याने त्यांच्या संकल्पाने आमच्यासारखे सामान्य उद्धरून जातात! 


परंतु आमची आज तशी स्थिती नाही. आम्ही अजून स्थळ-काळ-निमित्ताच्या परिघात वावरतो. त्यामुळे आमचे नामस्मरण देखील त्याच परिघात बांधलेले असते.  नामातून काय साधायचे याची कल्पना नसल्यामुळे पण तरीही सद्गुरूंनी सांगितल्यामुळे आम्ही नाम घेण्याचा प्रयत्न करतो. आमचे प्रगाढ अज्ञान आणि प्रापंचिक मायेचा जोर आमच्या सद्गुरूंपासून लपलेला नाही. त्यामुळेच आमच्या परिघात येऊन ही ब्रह्मज्ञानी माय आम्हाला समजावून सांगते आहे. आमची धाव लौकिकातल्या उत्तम वस्तूंकडे आहे हे जाणून इथे महाराज नामाला उत्तम वस्तू म्हणून संबोधत आहेत. उत्तम चा खरा अर्थ आहे - उत्-तम- म्हणजे सर्व गोष्टींच्या वरती जे स्थित आहे ते! म्हणजे, सर्वोत्कृष्ट! आणि आमची 'चवीची' ओढ माहीत असल्यामुळे महाराज श्रीखंडाचे उदाहरण देत आहेत की त्यामध्ये जसे चक्का व साखर जास्त लागत असले तरी केशर अगदी थोडे लागते, वा आम्ही थोडे घालतो, तसे - त्या केशरासारखे नाम आहे. केशर जसे अमूल्य तसे नाम अमूल्य. कोणत्याही गोड पदार्थाला केशराने एक सहज richness येतो, तसे तुम्ही प्रपंचात कितीही काहीही करत असा, नामस्मरणाने तुमचा प्रपंच खऱ्या अर्थाने Rich - श्रीमंत होईल असे महाराजांना सांगायचे आहे. केशर जसे काहीच ठिकाणी पिकते तसे नाम देखील केवळ संत सद्गुरुंच्या ठायीच बहरते.


पण हे नाम जेव्हा सद्गुरूप्रदत्त असते तेव्हा त्या नाम-केशराची गोडी आमच्या अंतरंगाला पवित्र व सिद्ध बनवते. सिद्ध कोण? तांदूळ जेव्हा हवे तेवढे बरोबर शिजतात आणि मोकळा तरीही मऊ असा भात बनतो, त्यावरून हा सिद्ध शब्द आला आहे. तसा नामाच्या स्मरणाने साधक प्रापंचिक जंजाळातून मोकळा आणि तरीही सहृदय असा बनतो! आणि महाराज वचनामध्ये ही नामाची सिद्ध बनवण्याची ताकद विशद करताहेत. प्रपंचात राहूनही जर नामाला (केशरासारखे) सर्वोच्च मूल्य देऊन थोडे का असेना पण मनापासून नाम घेण्याने ते नाम फार फार काम करील, याचा अर्थ हाच आहे की त्या नामाने अंतःकरण शुद्ध आणि मृदु बनून सद्गुरूंची कृपा पचवण्यासाठी सिद्ध बनेल! 


परंतु यात एक अत्यंत महत्त्वाचे नामक्रियाविशेषण महाराजांनी योजले आहे- 'मोबदल्याची अपेक्षा न करता'!  आमची सर्व पंचाईत इथे आहे. निष्काम होणे फार फार अवघड आहे. एक महाराजांचे शिष्य होते, ते म्हणायचे, 'अगदी मनाशी ठरवलेलं असतं की महाराजांकडे काहीही मागायचं नाही; पण गोंदवल्यात पायऱ्या उतरून त्यांच्यासमोर उभं राहिलं की कुठून आतून कामना जन्म घेते कळत नाही आणि ते प्रापंचिक मागणं मागितलं जातं!' निदान या साधकांनी प्रामाणिकपणे सांगितले. आम्ही 'आम्हाला काही नको' म्हणतो आणि मागण्यांची यादी आमच्या चित्तात सतत वास करते. त्यापुढची पायरी म्हणजे लौकिक अनुभव/ मागणे नको वाटू लागले की आमचे अनुभवांना आसुसलेले मन नामाने येणारे पारमार्थिक अनुभव मागू लागते आणि ही देखील मोबदल्याची अपेक्षाच आहे हे विसरून जाते! 


जोवर अनुभवांची आस आहे तोवर मनाचा सूक्ष्मात प्रवेश होऊ शकत नाही. कारण, अनुभव 'मला यावा अथवा येतो' यामध्येही 'मी' उरलेला आहे हे लक्षात येत नाही. खऱ्या साधकाला 'मी' ची शेंडी थोडीशी उरली तरी सहन होत नाही. तो त्या उरल्यासुरल्या मी ला शेंडी धरून बाहेर काढण्यासाठी पुन्हा अजिजीने प्रार्थना करतो व नामात बुडी मारतो! त्यावेळेला खऱ्या अर्थाने आज जे महाराज म्हणताहेत की 'असे नाम फार फार काम करील' म्हणजे काय करील याचे सम्यक आकलन त्यास गुरुकृपेने होईल व सद्गुरुंच्या अखंड सान्निध्याने त्याचे जीवन धन्य होईल! 


अशा नामाने संतश्रेष्ठ एकनाथ महाराज म्हणतात तसे,

"रूप देखता आनंद। 

जन्मकंद तुटे तेणे।

एका जनार्दनी मन। 

जडोनि ठेले चरणी।।"

अशी अवीट भक्तावस्था भगवत् कृपेने प्राप्त होते!


।।श्रीनाम समर्थ।। 🙏

Saturday, July 29, 2023

श्रीब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराजांचे बोधवचन क्र ८९ --

 


श्रीमहाराजांचे बोधवचन क्र ८९ - 


"नावडते काम जबरदस्तीने करावे लागते, आवडते काम सहज होते. आवड आणि दुःख एकाच ठिकाणी निर्माण होतात. म्हणून जेथे आवड निर्माण होते, तेथेच तिला 'नामाने' मारणे जरूर आहे."


जय श्रीराम 🙏


घणाचा घण्ण असा घाव बसावा तसे हे वचन आहे श्रीमहाराजांचे! Power-packed. प्रत्येक वाक्य स्वतःमध्येच एक अध्याय आहे. या आधीच्या वचनामधली 'आवड' कशाच्या संदर्भात हवी याचे पुरेपूर स्पष्टीकरण देणारे असे हे वचन आहे. 


मुले जेव्हा परीक्षेचा अभ्यास करतात, तेव्हा बहुतेक वेळा जो विषय आवडीचा असतो, त्याचाच अभ्यास करण्याकडे त्यांचा कल असतो; पण आई सांगते, अगोदर जो विषय नावडता आहे, तो हातावेगळा कर, म्हणजे नंतर त्याबद्दल काळजी राहणार नाही. अशा वेळी जर आईचे ऐकणारे मूल असेल तर जबरदस्तीने का होईना आधी नावडता विषयाचा अभ्यास करते आणि जर केवळ परीक्षेसाठी करत नसेल तर हळूहळू अभ्यासातूनच त्या नावडत्या विषयाची गोडीही त्याला लागू शकते. 


आमची अनादि आई - सद्गुरू - आम्हाला हाच बोध वचनाच्या पहिल्या वाक्यातून देताहेत. नामाच्या अभ्यासाला सुरुवात करत असताना पूर्वीची सवय नसल्यास ते कर्म नावडते होते म्हणतायत महाराज. ते एकीकडे म्हणतातच की नामामध्ये गोडी येईपर्यंत आपणच त्यात गोडी घालून ते घ्यावे लागते. पूज्य बाबा बेलसरेंनी याबद्दल आनंदसाधनेत जे मुख्य कारण सांगितले आहे, ते म्हणजे कंटाळा. पूज्य बाबा म्हणतात, जोवर कामनापूर्तीसाठी नाम व्हायचे तोवर कंटाळा यायचा नाही; पण ही लालूच (गुरुकृपेने) गेल्यावर मात्र जपाला बसण्याचा कंटाळा येऊ लागला आणि त्यावर दिवसातला थोडाथोडाच वेळ वरचेवर जप करून त्या जपाच्या शक्तीने जेव्हा शरीर-मनाचा ताण कमी होऊ लागला तसतसा कंटाळा कमी होऊन नामात उत्साह वाटू लागला. (हा अनुभव पूज्य बाबांच्या अगदी सुरुवातीच्या साधनकाळातील आहे.) म्हणजेच नामाला, महाराज म्हणतात तसे, सुरुवातीला थोडी जबरदस्ती हवीच.


एक गोम आहे या महाराजांच्या वचनात, ती अशी की, आवडते काम सहज होते असे जे सांगितले आहे, त्यामध्ये हळूहळू नाम घेणे आवडू लागतेच हा त्यांचा आशीर्वाद अध्याहृत आहे! आपल्या आत्म्याचा प्राण आहे नाम! हे न कळल्याने आम्ही इतर गोष्टी, वस्तू, व्यक्तींना 'माझा प्राण आहे' असे चुकीने संबोधत आहोत. नामाच्या जोडीला म्हणूनच महाराजांच्या वचनांमध्ये रमण्याचा, त्यांचे चिंतन करण्याचा अभ्यास केला तर खऱ्या अर्थाने आम्हाला नाम आवडू लागेल आणि आवडीच्या गोष्टीच्या आड काहीच येत नाही हे आपण सर्वांनी अनुभवलेले आहे! फक्त वचनातल्या दुसऱ्या वाक्याप्रमाणे आमच्या so called आवडींनी दुःखच निर्माण केले आहे, करत आहेत, करत राहतील! कारण, जिथे अपूर्ण गोष्टींमुळे लौकिकात सुख वाटेल, त्याची दुसरी बाजू कोणत्या ना कोणत्या प्रकारे, कधी ना कधी दुःख देणारच हा या मृत्यूलोकाचा नियम आहे आणि सृष्टिनियमात कधीही पालट होत नसतो. त्यामुळे महाराज म्हणतायत, 'आवड आणि दुःख एकाच ठिकाणी निर्माण होतात!' 


समर्थ उगीच म्हणाले नाहीत दासबोधात की, 

"संसार म्हणिजे महापूर। 

माजी जळचरे अपार।

डंखू धावती विखार। 

काळसर्प।।" 

ही जळचरे म्हणजे भगवंतास - नामास सोडून आमची असणारी 'आवड' होय. त्या आवडीने लाचार होऊन काळसर्पाच्या विळख्यात असंख्य योनी आम्ही फिरत आहोत. नाही, ही नकारात्मकता नव्हे. आमचे अंतरंग जागृत होण्यासाठी संतांनी ठोठावलेले दार आहे. नुसते दार ठोठावून उठोत वा न उठोत म्हणून सोडून देणारे ते संत कसले! दार ठोठावून ते उघडेपर्यंत दारातच बसून राहणारी आमची ब्रह्मचैतन्य माय आहे. दार उघण्यासाठी ज्यामुळे दार घट्ट बसले आहे त्या विपरीत आवडींना 'नामाने मारा' म्हणून सांगते आहे. जसे महाराज एके ठिकाणी म्हणतात, वृत्तींच्या तोंडी नाम द्यावे. आमच्या आवडीमुळे मनात निर्माण झालेला कर्मास उद्युक्त करणारा विचार म्हणजे वृत्ति. वृत्तिनिर्मिती आणि कर्म यांमध्ये नामाला घालावे असे महाराज सांगतात, म्हणजे नामाच्या शक्तीने ती वृत्ति जागीच थिजून जाईल. 


पूज्य अंबुराव महाराज होते, त्यांच्याकडे कुणीतरी या मनाच्या वृत्तींमुळे नाम होत नसल्याची तक्रार करत होते, त्यांना उसळून ते म्हणाले, "नामाच्या बळापुढे कल्पनेचे (मनोकल्पित विचारांचे) बळ कितीसे? अगदी तुच्छ! तुम्हाला हे कळते का??" गरज आहे ती फक्त दार ठोठावणाऱ्या सद्गुरुरायाच्या हाकेला नामाने ओ देण्याची! केवळ ते दार उघडण्याचा अवकाश, केवळ सद्गुरूंची संपूर्ण सत्ता मानण्याचा अवकाश, वरच्या दासबोधातल्या ओवीच्या पुढे समर्थ म्हणाले तसे, 

"जे अंकित ईश्वराचे। 

तयास सोहळे निजसुखाचे।

धन्य तेचि दैवाचे। 

भाविक जन।।" 

अशा अलोट, अमाप, अथांग अशा कारणरहित आनंदाचे धनी गुरुकृपेने होण्यास विलंब लागणार नाही! 


।।श्रीनाम समर्थ।। 🙏

Tuesday, July 25, 2023

श्रीब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराजांचे बोधवचन क्र ८८ -

 


श्रीमहाराजांचे बोधवचन क्र ८८ -


प्रत्येक मनुष्याला कशाची तरी आवड असते. ज्यामध्ये पडले असता दुःखाची जाणीव कमी होते तिचे नाव आवड होय. त्या आवडीमध्ये आपण राहावे आणि त्यात जबरीने नाम घ्यावे.


जय श्रीराम 🙏


श्रीमहाराजांची वचने हे वरकरणी पाहता बहुतेक वेळा खूप सोपी साधी आणि आचरायला देखील सुलभ वाटतात, कारण इतक्या सोप्या भाषेत त्यांनी आम्हाला सांगितले आहे. पण त्यांच्या शब्दांतला terseness (व्यापकपणा) त्यावर चिंतन करताना त्यांच्या कृपेने जाणवून येतो. आजच्या वचनातल्या पहिल्या तीन ओळी वाचल्या की माझ्यासारख्या सामान्याला प्रथम हेच वाटते की, वाह! सद्गुरू मला जे आवडत आहे त्यामध्येच राहायला सांगत आहेत. मग मला काय आवडते? तर अनंत जन्मांच्या संस्कारांनुसार मला हा प्रपंचच गोड वाटतो. त्यामधल्या विविध गोष्टी - जसे खाणेपिणे, लेणे, उत्तम जीवनशैली, भरघोस पैसा मिळवणे व साठवणे, मनोरंजनात्मक गोष्टी, माझ्या लौकिक कीर्तीत वाढ, या देहमनाला सुखावणाऱ्या लोकांमध्ये रमणे आणि अधूनमधून सद्गुरूंनी हिताचे आहे असे सांगितले आहे म्हणून नाम घेणे, बस्स! 


परंतु असे वाटले म्हणजे आम्ही महाराजांच्या वचनातली दुसरी ओळ समजावून घेतली नाही. -- 'ज्यामध्ये पडले असता दुःखाची जाणीव कमी होते तिचे नाव आवड होय. ' या सर्व वरच्या गोष्टी कमीजास्त प्रमाणात मिळूनही माझी दुःखाची जाणीव कमी झाली का? की अजून वाढली? की त्या दुःखाच्या जाणिवेत अधूनमधून फुंकर बसावी म्हणून मी या वरच्या क्षणिक सुखावणाऱ्या गोष्टींना 'आवड' समजले? उत्तर स्पष्ट आहे. संत म्हणाले, "जोवरी नाही भगवंताचे अधिष्ठान। तोवरी नाही नाही आराम।।" आ-राम! ज्याला चहूबाजूंनी रामाने घेरले त्यालाच आराम मिळतो, हा या शब्दाचा खरा अर्थ आहे. आणि हाच आनंदाचा अर्थ आहे! संत सोपानदेव म्हणाले तसे, "सोपान प्रेमा आनंद हरीचा। तुटला मोहाचा मोहपाश।।" श्रीहरीचा आनंद एकच असा आहे, ज्याने सर्व देहमनबुद्धिला जडलेले मोहाचे पाश तुटून केवळ हरीचा मोह त्याची जागा घेतो. महाराज या 'आवडी'बद्दल सांगत आहेत आजच्या वचनात, ज्यामध्ये पडले असता - हाही शब्दप्रयोग गोड आहे. ज्या ठिकाणी - सद्गुरूंवर प्रेम असते, तिथे दुरून नमस्कार करत नाहीत शिष्यगण. दंडवत घालतात- म्हणजे पायांवर 'पडतात' काठीप्रमाणे! असा जो 'त्या आवडीमध्ये पडला' तोच तरला हे आज महाराज सांगत आहेत. 


म्हणजेच जी आपली आवड आहे त्याचे मुख भगवंताकडे वळवावे असे महाराजांना सुचवायचे आहे. "तुका म्हणे अवघी जोडी। ते 'आवडी' चरणांची।।" मगच "अवघे धन्य होऊ आता। स्मरविता स्मरण।।" म्हणाले तुकाराम महाराज. 


अशा रीतीने कोणत्या आवडीने दुःखाची जाणीव खरोखरच कमी होईल हे जाणून घ्यावे असे महाराज सांगत आहेत. एकीकडे महाराज म्हणाले, गुरूची सेवा खूप सोपी. कशी? तर गुरूला जे आवडते ते आपल्याला आवडले की झाली सेवा! त्यांना परमेश्वराशिवाय दुसरे काही आवडतच नाही, ते आपल्याला आवडले की गुरु सेवा झाली - हीच खरी सेवा! म्हणून महाराज आजच्या वचनात आम्हाला सांगताहेत की या आवडीमध्ये आपण 'राहावे'! मुक्काम तो, जिथून उठावे - हलावे - इतर काही करावे - अजून कुठे जावे असे वाटत नाही. याला 'राहणे' म्हणताहेत महाराज. भगवंताची आवड अशी लागावी की त्यापरते काही - त्याइतके काही न आवडावे! प्रभू श्रीराम विभीषणास म्हणाले, "सब कै ममता ताग बटोरी। मम पद मनहि बाँध बरि डोरी।।" - जो सर्वच्या सर्व गोष्टींमधल्या ममत्वाच्या धाग्यांना गुंडाळून एक दोरी वळतो आणि त्या दोरीने आपले मन माझ्या चरणांशी बांधतो, असा तो मला प्रिय होतो. 


असे ज्याने केले त्याला त्या भगवंताच्या आवडीमध्ये सुरुवातीला महाराज वचनात म्हणतात त्याप्रमाणे 'जबरीने नाम घ्यावे' लागले तरी त्या अभूतपूर्व अशा आवडीने त्या जबरदस्तीचे रूपांतर गुरुकृपेने सहजतेमध्ये होईल आणि त्याच्यासाठी भगवंताची आवड व नाम हे एकरूप बनतील! ज्ञानेश्वर महाराज म्हणूनच म्हणाले,


समाधीचे साधन। ते रामनाम चिंतन।

चित्त सुखसंपन्न। हर्ष जीवनी केला।।

कोटी तपाचिया राशी। जोडीती रामनामापाशी।

नाम जपता अहर्निशी। वैकुंठपद पाविजे।। 


अशा रीतीने हे 'रामनामाचे चिंतन' - ती हृदयीची आवडी समाधीचे साधन कसे बनू शकते याचे प्रत्यंतर गुरुकृपेने येईल. 


।।श्रीनाम समर्थ।। 🙏

Friday, July 14, 2023

श्री ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराजांचे बोधवचन क्र ८७ -

 


श्रीमहाराजांचे बोधवचन क्र ८७ - 

"भगवंताच्या नामाची गरज दोन तऱ्हेने आहे. एक, प्रपंचाचे स्वरूप कळण्यासाठी; आणि दुसरी, भगवंताच्या प्राप्तीसाठी."


जय श्रीराम! 🙏

समर्थ करुणाष्टकांत म्हणाले,

अनुदिन अनुतापें तापलों रामराया।

परमदिनदयाळा नीरसी मोहमाया।।

अचपळ मन माझें नावरे आवरीता।

तुजविण शिण होतो धांव रे धांव आता।।

आम्ही आमची अंतर्स्थिती अशी आहे का याची चाचपणी केली तर लक्षात येईल की इतकी तीव्र इच्छा त्रिविध संसारतापातून बाहेर पडण्याची आमची नाहीच. आमचे वैराग्य हे बहुतेक वेळा क्षणिक असते, ज्याला समर्थ 'हेकांडपिसे वैराग्य' म्हणतात दासबोधात. आणि जर काही काळ जरी खरे वैराग्य एखाद्या साधकाला आले तरी कलियुगी दृश्याचा मारा इतका प्रचंड आहे, की ते वैराग्य कधी डगमगू लागते कळतही नाही. आणि जोवर मनास - वृत्तीस - अंतरंगास थोडे तरी वैराग्य आवडू लागत नाही, तोवर मुमुक्षुत्व लाभणे कठीण! 

हेच लक्षात घेऊन आम्हाला आज श्रीमहाराज सांगताहेत की मी जे अभिमंत्रित नाम तुम्हाला देत आहे, त्या नामामध्ये मुख्यतः दोन शक्ती आहेत. जसे, स्वच्छ पाणी हे एखाद्या मातीने मलिन झालेल्या भांड्यातली माती अगोदर नाहीशी करते आणि मग पुन्हा ते भांडे स्वच्छ करते; तसे, नाम हे अगोदर आमच्या चित्तात प्रपंचरूपाने साठलेल्या वृत्तींचा सम्यक बोध आम्हाला करवते. अनंत जन्मांच्या संस्कारांमधून आमची वृत्ति कशी बाहेर धावणारी झाली आहे व इतके धावूनही कसा त्या वृत्तीला शांत करणारा कायमचा आश्रय कसा मिळालेला नाही, ह्याचे आकलन देखील आम्हाला सद्गुरुप्रदत्त नामच करवून देते. हे झाले की मगच जसे आमच्या तुकाराम महाराजांना वाटले तसे वाटू लागेल --

किती वेळा जन्मा यावे। किती व्हावे फजीत।

म्हणऊनि जीव भ्याला। शरण गेला विठोबासी।।

प्रारब्ध हे पाठी गाढे। न सरे पुढे चालता।

तुका म्हणे रोकडी हे। होती पाहे फजिती।।

अशी फजिती होत आहे हे कळणे म्हणजे सद्गुरू कृपा - नाम कृपा होणे होय! म्हणून महाराज म्हणतात, प्रपंच हा मोडक्या वस्तू सुधारण्याचा कारखाना आहे. आपल्याला वाटते, हे ज्याला कळले तो आयुष्यात नकारात्मक होईल; पण याउलट होते. नामाच्या साहाय्याने प्रपंचाचे असे नश्वर, घटवाढ असणारे, असक्तीपूर्ण स्वरूप कळल्यानंतर त्या साधकाची तक्रार क्षीण होत जाऊन नाहीशी होते, कारण खरे प्रपंचाचे स्वरूप कळणे म्हणजेच त्याचा सहज स्वीकार होणे होय. मग प्रापंचिक हवेनकोपण घटले की खरी आसक्ती कशामध्ये हवी हे गुरुकृपे कळों येई! 

मग चोखोबांसारखी आर्त हाक साधक परमेश्वर चरणी करतो -

कोण आता माझा करील परिहार।

तुजविण डोंगर उतरी कोण।

तू वो माझी माय तू वो माझी माय।

दाखवी गे पाय झडकरी।।

बहुत कनवळा तुझिया गा पोटी।

आता नको तरी करू सेवा।।

चोखा म्हणे मज घ्यावे पदरात।

ठेवा माझे चित्त तुमच्या पायी।। 

ही आहे आजच्या वचनातल्या दुसऱ्या भागाची - भगवंताच्या प्राप्तीची सुरुवात. ज्या नामाने प्रपंचाचे स्वरूप अंतरंगात समजावून सांगितले, त्याच नामाने हळूहळू अंतरंग परिवर्तन गुरुकृपेने घडून जीव त्या शाश्वत आईच्या मांडीवर विसावतो! अमृताची दृष्टि घालूनिया वरी। शीतल हा करी जीव माझा।। या आर्त हाकेला ती माय नामामध्येच स्वतःचे दर्शन देऊन कृतकृत्य करते आणि तो जीव धन्य होतो!

।।श्रीनाम समर्थ।। 🙏

Wednesday, July 5, 2023

श्री ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराजांचे बोधवचन क्र ८६ -

 


श्रीमहाराजांचे बोधवचन क्र ८६ -

"खायलाप्यायला पोटभर, बायकामुले, घरदार वगैरे सर्व गोष्टी असल्या तरीसुद्धा आपल्याला काळजी आणि तळमळ का असते हे आपल्याला कळत नाही. याचा अर्थ दुःखाचे खरे स्थान कोठे आहे हे आपल्याला कळत नाही. ते कळण्याकरता भगवंताच्या नामाची गरज आहे."


~ जय श्रीराम 🙏

संतश्रेष्ठ नामदेव महाराज एका अभंगात म्हणतात,

"मी माझे करिता गेले हे दिवस। न धरीच विश्वास नामी।का करिशी साठा प्रपंच विस्तार। न तुटे येरझार नामाविण।।" 

या अभंगातल्या 'मी - माझे' यामध्ये आजच्या बोधवचनात महाराजांनी सांगितलेल्या आमच्या तळमळीचे कारण आहे. जन्माला आल्यापासून ज्या ज्या गोष्टींवर आम्ही मनुष्य जन्माच्या 'गरजा' म्हणून शिक्का मारला, त्या गोष्टी वाढत जाऊन कधी त्या गरजांचे रूपांतर इच्छा-आकांक्षा-वासना-लोभ यांमध्ये होते हे आमचे आम्हालाच कळत नाही, किंवा कळले तरी सामाजिक व्यवस्था अशा गोड नावाखाली आम्ही त्याकडे दुर्लक्ष करतो. परंतु एका वचनात महाराज म्हणतात, 'हरकत नाही; जर खावे, प्यावे, मजा करावी हे करून तुम्ही सदैव आनंदात राहू शकत असाल तर हे तत्वज्ञान देखील मला मान्य आहे; पण असे दिसत नाही!' असे जे जन वरकरणी सुखी दिसतात, त्यांना आतमध्ये त्रिविध तापांनी पछाडलेले दिसते व त्या तापांवर एक प्रकारे पांघरूण घालण्यासाठी ते अजूनच लौकिक छानचुकीमध्ये स्वतःला गुरफटून घेतात. 

श्रीमहाराज आम्हाला आजच्या वचनात घोर अज्ञाननिद्रेतून जागे करण्याचा प्रयत्न करीत आहेत. ते म्हणतात, तुम्हाला सर्व काही आहे प्रपंचात, तरीही काळजी आणि तळमळ का लागते? हे समजून घेणे म्हणजेच अध्यात्मिक तत्त्वज्ञान जाणून घेणे होय. हे जाणून नामस्मरणात राहण्याचा प्रयत्न करणे म्हणजे समजून नाम घेणे होय. 

आजच्या वचनात महाराज 'दुःखाचे स्थान' असा उल्लेख जो करत आहेत, त्या दुःखाचे कारण मुळात आहे, 'अपूर्णता'! कितीही गोष्टी असल्या तरी मृत्युलोकात त्या वस्तू, व्यक्ती, पदार्थाच्या नश्वर स्वभावामुळे त्या स्वतः पूर्ण बनू शकत नाहीत व त्यांना आधार समजणाऱ्या आम्हाला पूर्णत्व प्रदान करू शकत नाहीत. आणि अपूर्णता हेच दुःखाचे मूळ कारण आहे, ज्यायोगे आम्ही या देहालाच सर्वस्व मानून आयुष्य कंठतो. 

वचनात म्हटल्याप्रमाणे भगवंताचे नाम मुख्यत्वेकरून काय करते तर हे दुःखाचे स्थान कोणते आहे याची जाणीव गुरुकृपेने उत्पन्न करते! काय खोली आहे पहा महाराजांच्या या सांगण्याला! कशामुळे ही जाणीव उत्पन्न होते? तर विवेकामुळे. म्हणजेच महाराज आम्हाला सांगताहेत की विवेक देखील भगवंताच्या नामानेच उत्पन्न होईल. महाराज जे म्हणतात की तुम्ही फक्त नाम घ्या, ते विवेक-वैराग्य मी बघून घेतो; याचा अर्थ जो सतत नाम जपेल त्याचा विवेक नामरूप महाराज जागृत करतीलच, एवढेच नव्हे तर तो विवेक अखंड ठेवतील! 

ज्याचा विवेक तीक्ष्ण आहे, त्यालाच दुःखाचे खरे स्थान नामाच्या योगे कळल्याने तो साधक नामदेव महाराजांनी वर म्हटल्याप्रमाणे 'साठा-प्रपंच-विस्तार' ओढवून घेणार नाही. दोन तऱ्हा असतात - एक तो जो आहे तो प्रपंच भगवंताने दिला म्हणून त्याच्या इच्छेने त्याच्या स्मरणात अखंड राहून देहाने कर्तव्य समजून करत राहतो आणि दुसरा तो जो आहे त्या प्रपंचात फसून, त्याला सत्यत्व देत आणखी गोष्टी जमा करत, आणखी कर्मे ओढवून घेऊन त्यांच्या काळजीने व तळमळीने दुश्चित्त होतो. पहिल्या प्रकारचा असतो, तो भक्त होण्यास पात्र ठरतो. भागवतात संतश्रेष्ठ एकनाथ महाराजांनी अशा भक्ताचे वर्णन फार सुरेख केले आहे. भगवंत म्हणतात, 

"माझे भक्त जे उत्तम। त्यांचा धर्म अर्थ मीचि काम।

मज वेगळा मनोधर्म। अन्यथा कर्म करू नेणे।।

माझे भजन उत्तम कर्म। मज अर्पे तो शुद्ध धर्म।।

मज कामने हा शुद्ध काम। ज्याचा आराम मजमाजी।।" 

यामध्येही भजनाला- म्हणजेच नामाला उत्तम कर्म म्हटले आहे! कर्म ते ज्याचे फळ टाळता येत नाही. आणि भगवद्भजन हे असे कर्म आहे, ज्याच्या सेकंदासेकंदाचा हिशोब होतो. या हिशोबाचे फळ मिळते तळमळ रहित, काळजी-चिंता विरहित असे अखंड समाधान! 

अशा तऱ्हेने महाराज म्हणतात भगवंताच्या नामाचा पहिला परिणाम असेल तर तो म्हणजे सर्व काही असूनही  दुःख - तळमळ का लागते याचा सम्यक बोध होय. या बोधाची परिणती नामाला मनापासून धरण्यात आणि सद्गुरुंच्या प्रार्थनेत होते व नामसाधन आणि सद्गुरूप्रार्थनेचे फलितच नामात गोडी होय! 

हे झाले की मगच वरच्या नामदेवांच्या अभंगात ते पुढे म्हणतात तशी अवस्था होईल -- 

"नामा म्हणे ऐसे रामनामी पिसे। तो उध्दरैल आपैसे इहलोका।।"

ज्याला रामनामाचे वेड लागेल तो स्वतःचा उद्धार तर करीलच; पण या इहलोकालाही उद्घरील, जसे श्रीमहाराजांनी "कोट्यानुकोटी उद्घरिले लोक, रामनाम एक बोधुनिया!!"

।।श्रीनाम समर्थ।। 🙏

Wednesday, June 28, 2023

श्री ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराजांचे बोधवचन क्र ८५ -

 श्रीमहाराजांचे बोधवचन ८५ -

"


विषयरूपी सापाचें विष उतरलेलें नसल्यामुळे भगवंताचें अमृतासारखें गोड नाम आपल्याला गोड लागत नाहीं."


जय श्रीराम 🙏


दोन प्रकारचे बदल माणसाला नेहमीच त्रासदायक ठरतात. पहिला प्रकार असा की ज्यामध्ये इच्छा असूनही तो बदल करू शकत नाही. जसे, जोराच्या फ्लू च्या साथीत तोंड कडू झाले की थंडीताप उतरल्यावर सुद्धा अनेक दिवस आपल्याला अन्न गोड लागत नाही.


दुसऱ्या प्रकारचा बदल असा ज्यामध्ये आपल्या प्रयत्नांच्या जोरावर बदल घडवण्यासाठी मनुष्य धडपड करतो. जसे, मोठ्या शहरात अनेक वर्षे राहिल्यावर खेड्यातला साधेपणा काही दिवसांपलिकडे रुचत नाही. 


अशा अनेक 'सवयी' आहेत ज्या बदलण्यास आपले सवयींच्या आधीन असलेले मन कचरते, सहजासहजी स्वीकारत नाही. थोडक्यात आपण त्या सवयींना शरण जातो आणि सवयी घट्ट होऊन चित्तात संस्कार रूपाने अनंत जन्म वास करतात. अनेक संशोधनांअंती हे स्पष्ट झाले आहे की प्रत्येक व्यक्तीच्या आवडीनिवडी या केवळ या जन्मातल्या परिस्थितीवरच अवलंबून असतात असे नाही. काही आवडीनिवडी अशा का आहेत असा प्रश्न संशोधकांना व त्यात भाग घेतलेल्यांना पडला. त्याचे कारण पूर्वजन्मांतल्या संस्कारांमध्ये आहे हे मानण्यास त्यांची तार्किक बुद्धि तयार झाली नाही; परंतु उत्तर देखील मिळाले नाही. 


हे जर साध्या सामान्य अशा लौकिक सवयींच्या बाबतीत, तर जो परमात्मा या सगळ्याच्या पलीकडे आहे, त्याचे संस्कार मनबुद्धिमध्ये होण्यास वेळ हा लागणारच. त्यातही पुन्हा सगुण भगवंताहून त्याचे नाम सूक्ष्म असल्याकारणाने 'नामाचा संस्कार' होण्यास नामाचा संस्कार झालेल्याचा दैहिक-मानसिक सहवास हाच उपाय आहे हे त्रिवार सत्य आहे! त्यामुळे आजच्या वचनात महाराज आम्हाला याच आमच्या विषयरूपी संस्कारांची आठवण करून देत आहेत. एक प्रकारे आम्हाला चेतावणी देत आहेत. 


अनेकांना नामस्मरण किंवा भगवद्भावना ही दिवसभरातल्या अनेक कर्तव्यांपैकी एक कर्तव्य असे वाटते. त्यामुळे मनुष्याच्या अंतःकरणात वास करणाऱ्या लोभ, मोह, काम, ईर्षा या भावना त्या नामासही ग्रासतात. आणि जोवर लौकिक व्यवहाराचा किंचितसा स्पर्श देखील नामाला आहे, तोवर दैनंदिनीत नामास अग्रक्रम मिळू शकत नाही. सर्व करून जमल्यास करण्याची गोष्ट असे त्याचे स्वरूप बनते आणि तरीही नामाने मनःशांती देखील का मिळत नाही हा प्रश्न मनात रुंजी घालतो! 


नाम राहो कंठी हेचि माझे कर्म।

वाहिला संसार पायी कळले त्याचे वर्म।।

असा शुद्ध भाव बनण्यासाठी महाराज सांगताहेत की नाम अमृतासारखे वाटण्यास अगोदर विषयरूपी सापाचे विष उतरले पाहिजे. पूज्य बाबा बेलसरे म्हणायचे, 'अमुक केलं तर काय झालं, तमुक केलं तर काय झालं' असे वाटत आहे तोवर साधणार नाही. म्हणजे, विषयाचे विष उतरण्यासाठी अगोदर ते विष आहे हे कळले पाहिजे, त्याशिवाय सांसारिक रागद्वेषातून मुक्त व्हावे ही इच्छाच होणार नाही. मग हे ओळखावे कसे तर संत सांगतात,

देह माझा मी देहाचा, तोवरी नसे मी देवाचा! जोवर मनबुद्धीचा मोहरा सर्व या देह आणि देहाला लागलेल्यांच्या ठायी आहे, तोवर विष कोणते याचे आकलन होणे शक्य नाही. यावर आम्ही मखलाशी करतो, पण जर हे सर्व त्यांनीच दिले आहे, तर मग त्याकडे लक्ष पुरवायला नको का? पण आम्ही 'त्यांनी दिले आहे म्हणून, ते त्यांचेच आहे' या भावनेने संसार करतो का? असे जो करील त्याला काहीच बाधणार नाही वा बांधणारही नाही! 


लौकिक विषाचे परिवर्तन अमृतात करता येत नाही; परंतु परमार्थात एक मोठा दिलासा असा आहे की या लौकिक विषयांचा मोहरा सद्गुरूंकडे - भगवंताकडे वळवला की तेच विषरूपी विषय अमृतात परिवर्तित होतात!! मग संत छातीवर हात ठेवून म्हणू शकतात, "विषय तो त्यांचा झाला नारायण"! 


हा झाला पहिला भाग की विषय विषरूपी आहेत हे कळले; परंतु आता दुसरा भाग हा अधिक महत्त्वाचा आहे की 'भगवंताचे नाम हेच अमृत आहे' याचा मनबुद्धीने कायमस्वरूपी स्वीकार! आम्ही पारायण करतो, ग्रंथ वाचतो, तीर्थक्षेत्री जातो, दानधर्म करतो, नीतिधर्माने वागतो, तरीही नाम जरुरीचेच आहे का? असा प्रश्न अनेकांच्या मनात येतो. ज्ञानेश्वर महाराज, श्रीमहाराज, सर्वच संत म्हणतात, भगवंताच्या अनुसंधानाशिवाय असणारी नीती ही पोरकी आहे. तिला मायबाप हवेत ना! हे मायबाप म्हणजे 'भगवंताचे नाम' आहे. नामाच्या गोडीची खरी कल्पना ही नामच आयुष्य बनलेल्या साधकांना येते. महाराजांनी अमृताची उपमा देण्यामागचे कारण हे की नामाने मनुष्याला आपल्या अजर-अमर आत्मस्वरूपाचे यथार्थ दर्शन होते. नामाने अमृतस्वरूप भगवंताची प्रेमप्राप्ति होते, नामाने पंचकोष पंचक्लेश यांपलिकडे साधक जातो व कायमची दुःखनिवृत्ती आणि अखंड आनंदप्राप्तीचा अधिकारी सद्गुरू कृपेने बनतो!


सद्गुरूंनी उपदेशिलेल्या आजच्या वचनाचे चिंतन करता सहज स्पष्ट होते की, 

# सर्व विषांचा संग्रह या 'खोट्या मी' मधे आहे. 

# खोट्या मी चे प्रकटीकरण 'अहंकार' रूपात होते. 

# त्याचे बीज आहे वासना. 

# वासनेचे बी अहंकाराचा जमिनीत रोवले गेले की त्या बीजातून जन्ममरण आणि त्यामधल्या भोगांना सामोरा जाणारा वृक्ष वाढत जातो.

# त्याला स्वसमर्थनाचं पाणी सतत घालत गेलं की बीचा केव्हा वृक्ष झाला कळतही नाही.

# या वृक्षाला लोभ-मोहाची फळे येऊन पुन्हा त्यांचे बी तयार होते व नवीन जन्माचा वृक्ष फोफावतो. 


मात्र,

वासनेचे बी आणि वृक्ष दोन्ही परिणामहीन ठरतात सद्गुरुंच्या शक्तीपुढे! हे होण्यासाठी -

# बी सद्गुरुंच्या नामाचे हवे

# वासना सद्गुरूंना आनंद देण्याची हवी

आणि

# अहंकार सद्गुरूंच्या मोठेपणाचा - थोरवीचा हवा!

# समर्थन सद्गुरूंनी उपदेशिलेल्या आज्ञेचे हवे.


हे होण्यासाठी सद्गुरूंना संपूर्ण शरण जाण्याची शुद्धबुद्धी प्रदान करावी अशी करुणा त्यांच्या चरणी अखंड भाकावी! 


त्यांच्या कृपेने हे घडले की मग मात्र कितीही विषयाच्या जालीम विषाच्या सान्निध्यात साधक राहिला तरी त्याचे अंतरंग नाममृताने दुथडी भरून वाहील व केवळ त्याला स्वतःलाच नव्हे तर त्याच्या सान्निध्यात येणाऱ्या असंख्य जनांना अमृतरूप करेल यात शंका नाही! 


संत चरण रज लागता सहज।

वासनेचे बीज जळुनी जाय।।

मग रामनामी उपजे आवडी।।

मग रामनामी उपजे आवडी।। 


।।श्रीनाम समर्थ।। 🙏

Tuesday, June 27, 2023

श्री ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराजांचे बोधवचन क्र ८४ -

 


श्रीमहाराजांचे बोधवचन क्र ८४ -


"नामानें दुरित नाहींसें झालें की भगवंत हवासा वाटेल आणि मग त्याच्या नामांत प्रेम येईल. नामांत प्रेम आल्यावर समाधान आपोआप लाभेल. म्हणून, आधी भगवंताची खरी भूक लागली पाहिजे."


जय श्रीराम 🙏


सनमुख होइ जीव मोहि जब ही।

जन्म कोटि अघ नासहिं तबहीं।।

हे भगवंताचे वचन आहे की, जेव्हा जीव माझ्या सन्मुख झाला तेव्हाच त्याच्या करोडो जन्मांच्या पापांचा नाश होतो. आजच्या वचनाच्या पहिल्या भागात श्रीमहाराज आम्हाला याच प्रभुवचनावर सही करून सांगत आहेत की, 'नामाने दुरितांचा नाश होतो', कारण नाम आणि भगवंत हे एकरूप आहेत. त्यामुळे भगवंतांना सन्मुख होणे म्हणजेच त्यांच्या नामाला सन्मुख होणे होय व नामाला सन्मुख होणे म्हणजेच भगवंतांना सन्मुख होणे होय.


दुरिते ही आपल्याच कर्मांचा परिपाक असतो. मग ती दुरिते ही कोणत्याही भोगांच्या स्वरूपात आपल्यासमोर येऊ शकतात. लौकिक सुख आणि दुःख असो वा परमार्थ मार्गावर चालताना येणारे अडथळे असोत. दोन्हीकडे आपल्याच कर्मफळानुसार गोष्टी घडतात. परंतु, परमार्थ मार्गात एक मोठा फरक आणि अमोघ असा दिलासा आहे की जर आम्ही सद्गुरूंना शरण जाण्याकडे आमची बुद्धि वापरली तर मात्र ते आम्हाला या कर्मफळांच्या पलीकडे नेऊन देखील साधनेत स्थिर करू शकतात. मात्र अशी शरणागती इतकी सोपी नाही. तिच्यासाठी ज्या मीपणाला आयुष्यभर मी पोसले त्याचा पूर्ण बळी देण्याची इच्छा व तयारी लागते. 


मग हे होईतोवर नामाचा परिणाम दिसतच नाही का? याचे उत्तर आज महाराज देत आहेत.


अनेक साधक शिष्यांचा हा प्रश्न असतो की आम्हाला अजून नामाची प्रचिती येत नाही. त्यांना महाराज सांगताहेत की अगोदर तुमचं पूर्व दुरित, पूर्व पाप, पूर्व कर्म यांचा नाश करण्यामध्ये नामाची शक्ती कार्य करते. ते झाल्यावर मग 'भगवंत हवासा वाटेल!!' यामध्ये महाराजांनी हे देखील सूचित केले आहे की पुन्हा तुमचे नाम दुरित नाहीसे करण्यात खर्ची पडू नये वाटत असेल आणि नामाने वाढीस लागणारी भगवद्भक्ति अनुभवायची असेल तर यापुढे तुमची सर्व कर्मे शुद्ध, गुरू-भावनेने प्रेरित आणि नितीधर्माच्या चौकटीत बसणारी असावयास हवी. 


हे सर्व कशासाठी आवश्यक आहे हे सांगताना महाराज म्हणताहेत की 'भगवंताची भूक' हे खरं पुण्य आहे मनुष्यदेहात आल्यानंतर. ज्याला ही भूक लागली तो त्याच्या निकट जाण्यास तयार झालाच! पण ही भूक लागल्याचे लक्षण आहे, इतर भूक व तहान कमीकमी होत जाणे. *भूक लागली पोटी। जेणे विठ्ठल विठ्ठल ओठी।।* अशी आस लागली की मग महाराज म्हणताहेत की 'मग त्याच्या नामात प्रेम येईल'. जेव्हा आम्ही म्हणतो, आमचं नाम mechanical होते, त्यात कोरडेपणा जाणवतो, त्याचे कारण महाराज स्पष्ट करत आहेत की अजून आम्हाला भगवंताची भूक नाही आणि इतर भूक भागली नाही! आणि हेच खरे दुरित जे भगवंताच्या भुकेविना साठत साठत संचित प्रारब्ध बनून पुन्हा पुढच्या जन्मी आमच्या वाट्याला येते! 


कसे सांगितले आहे पहा महाराजांनी. खरे बघू जाता परमार्थात प्रत्येकच गोष्ट गुरुकृपेने होत असते, त्यांच्या दयेने होत असते. परंतु आम्हाला महाराज जो पुरुषार्थ आम्ही प्रपंचात हिरिरीने वापरतो असे म्हणतो, त्याची दिशा परमार्थाकडे वळवून *'भगवंताची भूक लागेल असे करावे'* असे जणू सांगितले आहे. हे लक्षात आले की मग साधक खऱ्या अर्थाने 'धारणेचा' अभ्यास करण्यास सिद्ध होतो. एकाच गोष्टीने मन व्यापून असणे याचे नाव धारणा! ही धारणा ज्यावेळी सद्गुरुंच्या विचारांनी, आज्ञेने, भावनेने, वृत्तीने आणि कर्माने संचलित होते, तेव्हा खऱ्या अर्थाने साधक सद्गुरू प्रदत्त नामाच्या 'मागे लागतो!' 


आणि श्रीमहाराज म्हणताहेत की जो असा नामाच्या दिशेने आपली संपूर्ण मनोवृत्ती स्थिर करण्याचा प्रयत्न करतो, त्याला नामाचे प्रेम येतेच - म्हणजे ते नामाचे प्रेम आपल्याला देतात. आणि म्हणतात की नामाचे प्रेम आल्यावर समाधान आपोआप लाभेल. किती स्पष्टपणे सांगितले आहे इथे की नामाच्या प्रेमाची परिणती समाधानात होणे हा नियमच आहे, त्यात बदल संभवतच नाही. म्हणून आमचे संत चोखा महाराज म्हणाले,

नाम जाळी संचिताचा पूर्ण बडीवार।

आहे बुडत्याला नौका जीवनी आधार।।


पण हे कधी होईल सांगताना म्हणाले,

नाम जपो वाचा नित्य श्वासातही नाम।

नाममय होवो देवा माझे नित्य कर्म।।

नामाच्याच संगे लाभो प्रेम रे अपार।।

नामाच्याच संगे- हे होण्यासाठी इतर संग मनाने सुटणे गरजेचे आहे आणि हे व्हावे याची करुणा जो गुरुचरणी भाकेल त्याला 'भगवंताची खरी भूक' तेच प्रदान करतील!


।।श्रीनाम समर्थ।। 🙏