Thursday, June 24, 2021

श्री ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराजांचे बोधवचन क्र ८० --

 
श्रीमहाराजांचे बोधवचन क्र ८० –

 

वासनेच्या भक्षयामध्ये आपले मरण आहे. आपले मरण आपल्या डोळ्यांनी पाहण्यासाठी आपण भगवंताच्या नामात राहिले पाहिजे.

 

श्रीराम!

संपूर्ण मनाच्या श्लोकात आणि दासबोधात ‘विवेक’ ही जणू Central Theme ठेवलेल्या समर्थांनी मनाच्या श्लोकात म्हटले,

“विवेके क्रिया आपुली पालटावी|

अति आदरे शुद्ध क्रीया करावी||

जनी बोलण्यासारखे चाल बापा|

मना कल्पना सोडि संसारतापा||”

 

कल्पना – वासना – वृत्ति – कृती – परिणाम असा क्रम आहे, प्रपंचातही आणि परमार्थातही! मनुष्य जन्माला आल्यापासून विविध कल्पना करतो. आपल्या देह मन बुद्धि सकट सर्व मी आहे व याला लागलेले सर्व माझे आहे, हे सर्व कल्पनांचे मूळ आहे. या कल्पनासृष्टीतून मनुष्याच्या विविध वासनांचा जन्म होतो. मला अमुक मिळाले तर मी सुखी होईन हे त्यामागचे कारण देखील कल्पनामयच असते हे सहज लक्षात येईल. याच वासना सततच्या चिंतनाने मनामधून चित्तात प्रवेश करत्या झाल्या की त्या वासनांची वृत्ति बनते. मला अमुक गोष्ट मिळवायची आहे व ते मिळवण्यासाठी आवश्यक सर्व गोष्टी करण्याबद्दलचा जो कल्पनाधिष्ठित विचार तीच वृत्ति होय. त्यातून कृती जन्म घेते व एकदा कृती घडली की त्यानुसार फलप्राप्ती वा परिणाम जीवास अनुभवावा लागतो. या चक्रालाच संतांनी ‘वासनाचक्र’ असे नाव दिले.

 

ज्यावेळी मायेच्या थपडा खाऊन अथवा संतकृपेने झालेल्या शुद्ध विचाराचा परिणाम म्हणून मनुष्य आपल्या आयुष्याकडे थोडे का होईना त्रयस्थाप्रमाणे बघू लागतो त्यावेळी संत सद्गुरू त्याला सांगतात, तुझ्या वासना भगवंताकडे वळव. अनेक जणांच्या मनात हा प्रश्न रुंजी घालतो की जर आम्ही परमार्थ मार्गास लागलो, तर आमच्या विविध वासनांचे खच्चीकरण किंवा suppression होऊन आतमध्ये खदखद निर्माण होणार नाही का? त्यावेळी महाराजांसारखे संत आम्हाला योग्य दिशा देतात आणि सांगतात, do not suppress but divert.

 

जन्मोजन्मी साठलेली वासनांची शिदोरी अचानक रिकामी कशी होणार? परंतु जर हा मार्ग मनापासून चालण्याची इच्छा असेल तर वासनांची दिशा बदल. पण अनेकदा याचा अर्थ लक्षात येत नाही. काही विशेष प्रक्रिया आहे का यासाठी असा प्रश्न पडणे साहजिक आहे. तर विशेष प्रक्रिया नसून तोच क्रम इथेही लागू करा असे संत सांगतात. म्हणजे, कल्पना – वासना – वृत्ति – कृती – परिणाम याच क्रमाने आपल्याला विरुद्ध दिशेला जायचे आहे. महाराज म्हणतात, जगाच्या प्रवाहाच्या विरुद्ध दिशेने पोहणे म्हणजे परमार्थ. हे पोहणे म्हणजेच अगोदर आपल्या रूढ कल्पनांना तिलांजली देऊन संत – सद्गुरू – संतसाहित्य - संतविचार या कल्पनांनी आपले मन भरण्याकडे आपली दृष्टी वळवणे. कोणत्याही कल्पनेतून वासना निर्माण होणारच. या सद्गुरू उपदिष्ट भगवद् कल्पनांतून ज्या निर्माण होतात त्या वासना परमार्थाला हितकारक अशा असतात. साधन व्हावे, सहज सेवा घडावी, सर्वात आत्मरूप बघण्याचा अभ्यास व्हावा, संत ग्रंथ वाचन – संत श्रवण करण्यास मिळावे यासारख्या वासना भगवद् कल्पनातून स्वाभाविक निर्माण होतात. या वासना साधन – अभ्यासाने, अहर्निश प्रार्थनेने व सद्गुरू कृपेने दृढ झाल्या, की या वासनांमधूनच पारमार्थिक वृत्तीचा जन्म होतो. श्रीमहाराज जे म्हणतात, “परमार्थ हा स्वभाव बनावा” तो स्वभाव म्हणजेच पारमार्थिक वृत्ति होय. या वृत्तीतून स्वाभाविकच आपल्या ध्येयानुकूल कृती साधकाकडून होते. जास्त नामस्मरण व्हावे, नामचिंतनातच स्वतःला रमवावे, बहिर्मुखता कमीकमी करून आतमध्ये दृष्टी वळवावी हे त्या कृतीचे स्वरूप असते. आणि परीस स्पर्श झाल्यावर जसे लोखंडाचे सहजच सोने बनते, त्याची इच्छा असो वा नसो; तद्वत भगवद् संबंधी कल्पना, वासना, वृत्ति आणि कृतीने साधक सहजच शुद्ध होत होत अंतिमतः आपले मरण आपल्या डोळ्यांनी बघून जीवन्मुक्त होतो. हाच प्रवास आजच्या वचनात महाराज आम्हाला सांगत आहेत.

 

जन्मोजन्मी आम्ही ज्या वासनेला गोंजारून स्वतःचा अंतिम उद्धार यमाच्या भक्ष्यस्थानी घातला व त्याच वासनांनी “पुनरपि जननं पुनरपि मरणं” करत राहिलो, त्याच वासना गुरुकृपेने जेव्हा “नामाच्या” भक्ष्यस्थानी पडतात तेव्हा त्यांचे भस्म होते. महाराज म्हणतात, “ज्या ठिकाणी देहबुद्धी असते तेथेच वासना उत्पन्न होतात. देह मीच आहे या भावनेने वागणाऱ्या माणसाचे मन सारखे इंद्रियांतून बाहेर धावत असते. त्याच्या मनाची कधीच तृप्ति होत नाही. पण जो नाम घेऊ लागला, त्याचे मन हळूहळू बाहेर धावण्याचे कमी होते. बाहेरची धाव कमी झाली की वासनेचा जोर आपोआप कमी होतो. पुढे तेच मन नामामध्ये रंगून जाते. ज्या मनाने वासना भोगायची, तेच मन दुसरीकडे रंगू लागल्यावर वासना अपोआप क्षीण होते. काही दिवसांनी ती मरून जाते. वासना सूक्ष्म आहे, म्हणून तिचा काटा काढण्यास सूक्ष्मच अस्त्र पाहिजे, ते म्हणजे नाम होय!”

 

ही वासना शुद्ध कशी होते याचे technique देखील महाराजांनी सांगितले आहे –

“पापवासना अथवा वाईट विचार मनात येऊन लगेच त्यानुसार देहाने कुकर्म घडणे हा सर्वात खालचा – तामसी प्रकार होय. त्यापेक्षा वरच्या दर्जाचे ते की ज्यांच्या मनात वाईट विचार येतात पण त्यांना संयमाने आवर घालून ते कुकर्म ते प्रत्यक्षात घडू देत नाहीत. हा रजोगुणी प्रकार म्हणता येईल. याहून श्रेष्ठ, सात्विक वृत्तीचे जे असतात, त्यात पापसंकल्पना मुळीच नसते. आणि वासनांचा सर्वोच्च व शुद्ध सात्विक प्रकार म्हणजे, सद्गुरू आणि भगवंत यांच्याखेरीज काहीही विचार मनात न येणे. संत व सिद्ध पुरुष हे असे असतात. सतत नामस्मरण राहिले म्हणजे माणूस अपोआप या पायऱ्यांनी वर चढतचढत श्रेष्ठत्वास पोचतो!”

 

तामसिक व राजसिक वासनांनीच जन्मोजन्मीचे महादोष निर्माण होतात आणि म्हणूनच सद्गुरू उपदिष्ट नामसाधनेचे आत्यंतिक महत्त्व; जेणेकरून समर्थ म्हणतात तसे,

 

“जयाचेनि नामे महादोष जाती|

जयाचेनि नामे गती पाविजेती|

जयाचेनि नामे घडे पुण्य ठेवा|

प्रभाते मनी राम चिंतीत जावा||”

 

|| जय जय रघुवीर समर्थ||

 

|| श्रीनाम समर्थ ||  

Tuesday, June 22, 2021

श्री ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराजांचे बोधवचन क्र ७९ --

 


श्रीमहाराजांचे बोधवचन क्र ७९ –

 

रामबाण म्हणजे बरोबर काम करणारा बाण, आपल्या लक्ष्यावर अचूक जाणारा बाण. रामाचा बाण पुन्हा परत येऊन भात्यामध्ये बसे. त्याचप्रमाणे नाम अगदी रामबाण आहे. कारण रामाच्या जवळ राहणारे आणि अगदी अचूक रामाकडे नेणारे नामाशिवाय दुसरे कोणतेच साधन नाही.

 

श्रीराम!

रामारायांच्या बाणाचा वेध इतका लक्ष्यानुसंधानी आहे की आजतागायत “रामबाण” हा शब्द “अचूकते” बरोबर समानार्थक वापरला जातो. तुलसी रामायणात संतश्रेष्ठ तुलसीदासांनी भगवान शिव शंकरांच्या मुखी एक अप्रतिम असे श्रीराम स्तवन घातले आहे. उत्तरकांडातल्या या काही ओळी उद्धृत करण्याचा मोह इथे आवरत नाही. भोलेनाथ आपल्या आराध्याची स्तुती करताना म्हणतात,

 

“दससीस बिनासन बीस भुजा| कृत दूरि महा महि भूरि रुजा||

रजनीचर बृंद पतंग रहे| सर पावक तेज प्रचंड दहे||”

-- दहा शिरे व वीस भुजा असणाऱ्या रावणाचा विनाश करून पृथ्वीचा महारोग दूर करणाऱ्या हे श्रीरामा, राक्षससमूह रूपी जे कीटक होते, ते सर्व तुमच्या बाणरूपी अग्नीच्या प्रचंड तेजाने भस्म झाले.

“महि मंडल मंडन चारुतरं| धृत सायक चाप निषंग बरं|

मद मोह महा ममता रजनी| तम पुंज दिवाकर तेज अनी||”

-- तुम्ही या पृथ्वीमंडलाचे अतिसुंदर भूषण आहात. तुम्ही श्रेष्ठ बाण, धनुष्य व भाता धारण केलेले आहात. मद, मोह आणि ममतारूपी रात्रीच्या घोर अंधाराचा नाश करण्यासाठी तुम्ही सूर्याचे तेजोमय असे किरण आहात.

“मनजात किरात निपात किए| मृग लोग कुभोग सरेन हिए|

हति नाथ अनाथनि पाहि हरे| बिषया बन पावंर भूलि परे||”

-- कामदेवरूपी भिल्लाने मनुष्यरूपी हरिणांच्या मनात कुभोगरूपी बाण मारून त्यांना पाडले आहे. हे नाथ, पाप-तापाचे हरण करणारे हे हरी, त्या कामाला मारून विषयरूपी वनात भटकणाऱ्या या बिचाऱ्या अनाथ जीवांचे रक्षण करा.

 

पुढे म्हणतात,

“मुनि मानस पंकज भृंग भजे| रघुबीर महा रनधीर अजे|

तव नाम जपामि नमामि हरी| भव रोग महागद मान अरी||”

-- हे मुनींच्या मनरूपी कमळातील भ्रमरा, हे महान रणधीर आणि अजिंक्य असणाऱ्या रघुवीरा, मी तुम्हाला भजतो. हे हरी, मी तुमचे नाम जपतो आणि तुम्हाला नमस्कार करतो. तुम्ही जन्म-मरणरूपी रोगाचे महान औषध आहात आणि अहंकाराचे शत्रु आहात!

 

हे नीळकंठेश्वराच्या कंठातील गोड कवनच जणू आजच्या वचनात महाराजांनी आम्हाला साध्या सोप्या भाषेत रामरायाच्या स्मरण रूपी बाणाचे महत्त्व सांगताना सांगितले आहे. या जगाच्या नश्वरतेतून बाहेर पडून शाश्वत सत्याकडे जाण्याचा मार्ग हा दृढ स्मरणातून जातो म्हणतात महाराज आणि म्हणतात या स्मरणाला उत्तम उपाय नाम; म्हणून नामाचे अनन्य साधारण असे महत्त्व आहे.

 

या आजच्या वचनात दोन वाक्ये अतिशय महत्त्वाची व भावार्थाच्या दृष्टीने गूढ आहेत.

“रामाचा बाण पुन्हा परत येऊन भात्यामध्ये बसे. त्याचप्रमाणे नाम अगदी रामबाण आहे.” –

लक्ष्याच्या दिशेने बाण सोडल्यानंतर श्रीराम जणू त्या लक्ष्याशी तादात्म्य पावत असत, इतके त्यांचे धनुष्यप्राविण्य अफाट होते. कोणतेही कार्य जेव्हा सामान्य व्यक्ती देखील पूर्ण लक्ष देऊन करतो, त्यावेळी ती त्या कार्याशी व त्या कार्यातील घटकांशी जणू एकरूप होत असते, तिला स्वतःचे वेगळेपणाने भान नसते. यालाच एका दृष्टीने ध्यान म्हणता येईल. Mindfulness किंवा Mindful Meditation असा शब्दही यासाठी आपण आजकाल ऐकतो. याचप्रमाणे, जो नाम स्मरतो, तो जेव्हा त्या नामाशी – म्हणजेच नामीशी तादात्म्य पावतो, त्यावेळी तो वेगळेपणाने उरत नाही, नाम हे केवळ साधन म्हणून त्याच्यासाठी उरत नाही. जसा श्रीरामांचा बाण पुन्हा भात्यात येऊन बसतो, तद्वत हे नामरूपी स्मरण त्या साधकाला आपल्या खऱ्या मी-शी (भगवंताशी) तादात्म्य पावण्याची कला शिकवते आणि मग तो नामरूपच होतो! अशा दृष्टीने इथे महाराज म्हणताहेत, नाम अगदी रामबाण आहे!

 

प्रत्येक श्रीमहाराजांचे वचन हे त्या त्या स्तरावरच्या साधकाला अतिशय उपयोगी पडते. आज अजून आम्हाला नाम म्हणजेच राम आहे या मूळतत्त्वाचा (बुद्धीने परिचय असला तरी) अनुभूतीच्या दृष्टीने परिचय नाही आणि म्हणून तसे न सांगता महाराज आम्हाला सांगताहेत, रामाच्या जवळ राहणारे नामाशिवाय दुसरे काही नाही. त्यामुळे नामच आम्हाला त्या मूळ तत्त्वाचा परिचय घडवून आणू शकते हे यातून त्यांना सांगायचे आहे. म्हणूनच अजून एकीकडे महाराज म्हणतात, “स्तोत्राने भगवंताची भेट घेणे म्हणजे त्याला पत्र पाठवण्यासारखे आहे. आणि नामस्मरण हा थेट संवाद आहे!” त्यामुळेच नामासारखे साधन ज्याने दृढ धरले त्याला भगवंताच्या अस्तित्वाचे भान मनामध्ये जागवण्यासाठी जास्त कष्ट पडत नाहीत आणि अस्तित्वाचे एकदा खरेखुरे भान आले म्हणजे नामाचा विसर पडो म्हटले तरी पडत नाही म्हणतात महाराज. एकदा पूज्य बाबा बेलसरेंनी महाराजांना विचारले, महाराज, तुम्हाला कधी नामाचा विसर पडलाय का?” एकदम उसळून महाराज म्हणाले, “जिथे रोमारोमात नाम आहे, तिथे विसर कसा पडेल?” हा तो परेतून उगम पावून अंतिम लक्ष्याच्या दिशेने वैखरीतून जपलेला नाम – बाण, जो पुन्हा त्याच परावाणीत (भात्यात) स्थित होऊन अंतिम समाधान देतो!

 

हे ज्याला कळले तो भोलेनाथांसारखेच भक्तीचे वरदान प्रभूंकडे मागतो, जे म्हणाले,

“बार बार बर मागउं हरषि देहु श्रीरंग|

पद सरोज अनपायनी भगति सदा सतसंग||”

-- हे श्रीराम, मी तुम्हाला वारंवार हेच वरदान मागतो की, मला तुमच्या चरणकमलांविषयी दृढ भक्ति आणि भक्तांचा सत्संग नेहमी मिळो. हे लक्ष्मीपती, प्रसन्न होऊन मला हेच वरदान द्यावे!”

 

|| श्रीनाम समर्थ ||

Monday, June 21, 2021

श्री ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराजांचे बोधवचन क्र ७८ --

 

श्रीमहाराजांचे बोधवचन क्र ७८ –

 

नामाने भगवंताची प्राप्ती होणार ही खात्री असावी. अशा नामालाच ‘निष्ठेचे नाम’ असे म्हणतात. तेच नाम मंगलात मंगल आणि अत्यंत पवित्र आहे.

 

श्रीराम!

आपल्या एका गोड अभंगात संतश्रेष्ठ सावता माळी म्हणतात,

“नामाचिया बळे न भिऊ सर्वथा|

कळिकाळाच्या माथा सोटे मारू||

वैकुंठीचा देव आणू या कीर्तनी|

विठ्ठल गाऊनि नाचो रंगी||”

 

हे आहे नामाचे बळ. या संतनिष्ठेला अनुलक्षून आजच्या वचनात महाराज आम्हाला सांगताहेत नामात कशी निष्ठा असावी! महाराजांच्या वचनातला ‘खात्री’ हा शब्द संशयाच्या विरुद्ध शब्द आहे. जेव्हा मनुष्य भक्तिमार्गाच्या साधनेमध्ये सद्गुरू उपदिष्ट नाम साधना मुख्य ठेवून मार्ग चालू लागतो, तेव्हा सर्वात मोठी धोंड जर या मार्गावरची असेल तर ती म्हणजे संशय. अगोदरच सर्वत्र बुद्धिभेदाचे वातावरण असताना ‘नुसते नाम घेऊन काय होणार?’, ‘नामाला अजून कशाची तरी जोड दिली पाहिजे’ वगैरे गोष्टी आजच्या चिकित्सक युगात मनामध्ये थैमान घालतात. आणि ज्या साधनेमुळे मन clutter-free व्हायचे त्या ऐवजी जास्तच cluttered – विखुरलेले बनते. त्यामुळे नामासोबत आपल्याला आपली नामातली निष्ठा कशी वाढीस लागेल याकडे सूक्ष्मतेने लक्ष देणे आवश्यक होते. अर्थात महाराज म्हणतात तसे, सर्व शंका नाम घेत गेल्यानेच दूर होतात; परंतु हे होण्यासाठी तरी दृढतेने नामास धरणे आवश्यक आहे. म्हणूनच भक्तिमार्गात संत वचनांवर श्रद्धा असणे हा साधनेचा पाया आहे. महाराज म्हणतात, औषध घेण्याआधीच मला त्याचा उपयोग होतो याचा प्रत्यय द्या म्हटले तर तो वैद्य काय करील? तो म्हणेल, अगोदर औषध घे, म्हणजे तुला त्याचा उपयोग कळून येईल आणि रोग निवारण होईल. हे जसे, तसे हा दुर्धर भवरोग नाहीसा होण्यासाठी संत – सद्गुरूंच्या वचनांवर श्रद्धा ठेवून जो साधनेस लागतो, त्याचे मन सहजीच अमन होण्याकडे वळू लागते आणि मग तेच मन त्याला श्रीचरणांशी कायमचे संलग्न करते.

 

जमखंडीच्या एका 22 वर्षांच्या मुलाची महाराजांवर श्रद्धा होती. त्याला अयोध्येत श्रीमहाराज असताना केवळ चार दिवस त्यांचा सहवास घडला होता. अयोध्येहून त्याला निरोप देताना महाराजांनी त्याला सांगितले होते, “आपण भगवंताचे नाम घेतले म्हणजे तो आपल्याला सांभाळतो, म्हणून दिवसातून तीन वेळा तरी त्याचे नाम घ्यावे.” हे शब्द त्याच्या मनात खोलवर रुजले आणि रोज झोपताना फक्त तीन वेळा “श्रीराम” म्हणुन तो निजत असे. त्यानंतर चार-सहा महिन्यांनी त्याची प्रकृति फारच बिघडू लागली आणि वैद्यांनी सरळसरळ सांगितले की आता त्याचे आयुष्य फार तर महिनाभर असावे. त्याला दुसरे काही करता येईना पण महाराजांचे शब्द सारखे आठवत म्हणुन तो पडल्या पडल्या नामस्मरण करी. त्याला महाराजांची आत्यंतिक ओढ लागून तो गोंदवल्यास निघून आला. महाराज त्याला तीर्थ देऊन स्वतःजवळ जेवायला घेऊन बसायचे. पंधरा दिवसांनी त्याचा अंतकाळ समीप आलेला लक्षात येऊन महाराजांनी त्याला मांडीवर घेऊन रामाचे तीर्थ पाजले आणि मग अत्यंत शांतपणे त्याचे प्राणोत्क्रमण झाले. त्याचे सर्व उत्तरकार्य महाराजांनी स्वतः केले आणि मग म्हणाले, अशा लोकांची निष्ठा बाहेर दिसत नाही पण ती आतमध्ये असते. केवळ महाराजांच्या दोन वाक्यांवर दृढ विश्वास ठेवल्याने त्याच्या आयुष्याचे सोने झाले. इथे एवढे करून त्याचा प्राण काही वाचू शकला नाही असा विचार आपल्या मनात आला तर आपली अजून नामावर दृढ श्रद्धा नाही हेच ध्वनित होईल. ज्याची श्रद्धा आहे त्यालाच या अशा नामात साधलेल्या अंताचे महत्त्व कळून नामावर विश्वास दृढ होईल.

 

ज्याचा नामावर विश्वास दृढ झाला, त्याची देहबुद्धी स्वाभाविकच क्षीण होऊ लागते, कारण त्याने सर्व उपाधी – विरहित अशा नामाचा आश्रय घेतला. त्यामुळे देह – मन व इतर सांसारिक उपाधींना त्यागण्याची जरूर न भासता त्या उपाधीच नाम साधकास सोडून जातात हे गुरुकृपेने प्रत्ययास येते. हे होण्यासाठी नामाने काय साधायचे आहे याचे भान आजचे वचन आपल्याला देते. भगवंत – प्राप्ती / अखंड आनंद – प्राप्ती / अखंड शांती / अखंड समाधान (सर्व समानार्थी आहेत) साधायचे आहे, हे ध्येय प्रथम निश्चित होणे जरूर आहे. पूज्य बाबा बेलसरे नेहमी सांगत, ध्येय निश्चितीला परमार्थात अनन्य साधारण असे महत्त्व आहे. आमचे ध्येय आहे मुंबईला जाण्याचे आणि आम्ही गाडीत बसलो चेन्नईला जाणाऱ्या तर आम्ही मुंबईस कधीच पोचणार नाही. हे जसे खरे, तसे जर आमचे ध्येय आहे प्रापंचिक सुख-समाधानाच्या गोष्टी मिळवण्याचे तर आम्ही त्या परमार्थाच्या अंतिम ध्येयाप्रत कधीच पोहोचणार नाही हे अगदी साहजिक नाही का? आणि हे ध्येय निश्चित करण्याचे स्वातंत्र्य भगवंताने मनुष्य जन्माला आलेल्या प्रत्येकास बहाल केले आहे. त्याचा सुयोग्य वापर करणाऱ्यास स्वाभाविकच त्या निश्चल निष्ठेची ओढ लागते. खरोखर, नामाच्या निष्ठेच्याही अगोदर तशी निष्ठा जडावी ही ओढ लागली की मग सद्गरु कृपेचा वर्षाव अनुभवास येतो.

 

अशा दृढ वृत्तीने जो नामास वरतो व आपल्या लौकिक आशा – आकांक्षांचे क्षुद्र स्वरूप समजून घेऊन त्यांची तिलांजली त्या नाम – दीपात देतो, त्याने जपलेले नामच मंगलात मंगल आणि अत्यंत पवित्र असते म्हणताहेत इथे महाराज. म्हणजे, नाम हे नित्यच मंगल आणि पवित्र आहे; परंतु जो जीव असा निष्काम प्रेम भावनेने नाम जपतो, तो त्या नामाच्या निज-स्वरूपासारखा मंगल आणि पावित्र्याचे धाम बनतो! आणि मग जसे संतश्रेष्ठ तुकाराम महाराज आपल्या एका अभंगात निडरपणे म्हणतात तसे म्हणू शकतो,

“काळाचेही काळ| आम्ही विठोबाचे लडिवाळ||

करू सत्ता सर्वांठायी| वसो निकट वास पायी||

ऐसी कोणाची वैखरी| वदे आमुचे समोरी||

तुका म्हणे बाण| हाती हरिनाम तीक्ष्ण||”

 

|| श्रीनाम समर्थ ||