Monday, December 7, 2020

श्री ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराजांचे बोधवचन क्र ७६ --

श्रीमहाराजांचे बोधवचन क्र ७६ –

 

नाम हे शाश्वत आहे. ते पूर्वी टिकले, आता आहे आणि आपण गेल्यावरही ते राहणार आहे.

 

श्रीराम!

समर्थ रामदास स्वामी म्हणाले,

“माझे सर्व जावो| नाम तुझे राहो||

हाचि माझा भाव| अंतरीचा||

रामदास म्हणे देवा तुझी आण|

ब्रीदासाठी प्राण देई जेतो||”

सत्य काय? याचे उत्तर देताना उपनिषदे सांगतात, “स्थळ, काळ, निमित्त यांच्या परिघातून जे अलिप्त असते, जे कशावरही अवलंबून नसते, सर्वतोपरी स्वतंत्र असते त्याला शाश्वत सत्य असे म्हणतात.” जे सदैव आहे ते! आणि असे सत्य नामाशिवाय दुसरे काहीही असूच शकत नाही हे तार्किक दृष्ट्या देखील सहज लक्षात येण्यासारखे आहे. सामान्य मनुष्याचे नाव देखील त्याच्या चांगल्या वाईट कर्मानुसार पुढे अनेक वर्षे लक्षात ठेवले जाते तर जो पूर्णकाम परमात्मा – त्याच्या सगुण अवताराचे नाम हे केवळ सगुण भक्तीलाच सहाय्यक आहे असे नव्हे तर तेच नाम निर्गुण निराकार आत्मतत्त्वापर्यंत साधकाला पोहोचवते हा सर्व संतांचा अनुभव आहे.

 

आजच्या वचनाला सहजरीत्या मांडुक्य उपनिषदातील मंत्राशी जोडता येईल. त्यामध्ये ॐकाराला, म्हणजेच नामाला “अक्षरब्रह्म” म्हटले आहे. अ-क्षर! ज्यावेळी विश्वनिर्मिती झाली तेव्हा जे शाश्वताचे स्फुरण झाले त्या हुंकारालाच नाम असे म्हणतात. जेव्हा याचे मूळ शोधायचा प्रयत्न होतो, तेव्हा ते शोधता येत नाही व ॐकाराच्या (अ – उ – म) तिसऱ्या मात्रेसोबत ज्या अखंड शांतिकडे आपण जातो तिथे ते स्फुरणरूपी आत्मतत्त्व – परमात्मा – परब्रह्म आहे. आता पुन्हा आजचे वचन बघितले तर लक्षात येईल, ते पूर्वी टिकले – म्हणजेच ते अनादि आहे, त्याचा उगम शोधता येत नाही, जो शोधू जातो, तो त्या उगमातच विलीन होतो. या दृष्टीने आजच्या वचनातील दुसऱ्या वाक्याचा पहिला भाग स्पष्ट होतो.

 

दुसरा भाग आहे – नाम आता आहे – भक्ति मार्ग आणि ज्ञान मार्ग यांची हातमिळवणी इथे होते. या विश्वाच्या संपूर्ण पसाऱ्यात असे एकच आहे ‘जे कधीही नाही असे होत नाही’. ते आहेच, आताही आहे, प्रत्येक क्षणाला आपण सर्व त्याची अनुभूती घेत आहोत – ते म्हणजे आत्मतत्व आणि हे आत्मतत्त्व म्हणजेच ॐकार आहे, नाम आहे असे उपनिषद स्पष्टपणे सांगते. मांडुक्य उपनिषदात ॐकाराच्या पहिल्या मात्रेला (अ) जागृती सोबत, दुसऱ्या मात्रेला (उ) स्वप्नावस्थेसोबत आणि तिसऱ्या मात्रेला (म) सुषुप्ती सोबत – म्हणजेच गाढ झोपेसोबत योग्य रीतीने जोडले आहे. हे सांगण्याचे कारण वेदांत देतो की या तीनही अवस्था प्रत्येक जीव दररोज अनुभवतो. या तीनही अवस्था ज्यामुळे दृग्गोचर होतात ती चवथी अवस्था किंवा तुरीया ही त्या सर्वांना सांधून पुन्हा अव्यक्त राहते. ती खरे तर चौथी अवस्था नसून तीच एकमेव अवस्था आहे जिथे त्या ॐकाराची शांति अनुभूतीत येते. पुढे सांगितले आहे की, या ॐकारात सर्वच्या सर्व सामावलेले आहे. सर्व अक्षरे देखील याच तीन मात्रांमध्ये सामावलेली आहेत; या दृष्टीने देखील भगवंताची सर्वच्या सर्व नामे ही ॐकाररूपाच आहेत. आणि त्यामुळेच या वरच्या स्पष्टीकरणातून “नाम आता आहे” हे स्पष्ट होते.

 

आपण गेल्यावरही नाम राहणार आहे... याला स्पष्टीकरणाची गरजच नाही. जे शाश्वत आहे त्यात कोणत्याही दृष्टीने घट संभवतच नाही. इथे देवर्षी नारदांचे भक्तिसूत्र आठवते, जे नामाच्या शाश्वतपणाला ज्ञानपूर्वीच्या आणि ज्ञानोत्तर भक्तीशी सहज जोडते. नारद महर्षी भक्तीचे एक सूत्र सांगताना म्हणतात,

“गुणरहितं कामनारहितं प्रतिक्षणवर्धमानं अविच्छिन्नं सूक्ष्मतरं अनुभवरूपम्||”

सर्व संतांनी नाम आणि नामी मध्ये जे अभेदत्त्व सार्थ रीत्या प्रतिपादन केले आहे, त्यानुसार वरील भक्तिसूत्र नामीलाच नव्हे तर नामाला देखील तंतोतंत लागू होते, ज्यायोगे ते सगुण निर्गुण ब्रह्माला सांधते. आजच्या वचनात जे श्रीमहाराज आपल्याला नामाचे त्रिकालाला लांघून असलेले शुद्ध स्वरूप सांगू इच्छित आहेत, ते स्वरूप वरच्या भक्तीसूत्राप्रमाणे “गुणातीत, संपूर्णपणे निष्काम, ज्याची महती क्षणोक्षणी वर्धमान आहे, ज्याला छेद जाऊ शकत नाही, जे अत्यंत सूक्ष्म तत्त्व आहे आणि जे अनुभवण्यासाठी तद्रूपच व्हावे लागते” असे आहे! ज्या भक्ताने असे सर्वांगाने नामाला वरले, त्याला आजच्या वचनात वर्णन केलेला नाम महिमा अनुभूतीत आल्याशिवाय कसा राहील?

 

परंतु हे शाश्वतपण भक्तासाठी तोवर आनंद देत नाही, जोवर त्याला त्यामध्ये त्याच्या रघुपतींचे दर्शन होत नाही. त्यासाठी श्रीमहाराज आम्हाला सतत सगुण भक्तीसहित नामाचा आग्रह करताना दिसतात. त्या माऊलीला आपल्या लेकरांना या भ्रमित संसारातच आनंद मिळावा याची कोण तळमळ! यासाठीच ज्या हनुमंताने हे सगुण रामनाम अखंड हृदयाशी जपले, त्याची महती वर्णन करणारे सुंदरकांड रचताना संतश्रेष्ठ तुलसीदासांनी देखील या अखंड – शाश्वत अशा नामाची जोडणी त्या रघुनंदनाशी यथार्थपणे केली आहे –

 

शांतं शाश्वतं अप्रमेयम् अनघं निर्वाणशान्तिप्रदं

ब्रह्माशम्भुफणींद्रसेव्यं अनिशं वेदान्तवेद्यं विभुम्|

रामाख्यं जगदीश्वरं सुरगुरुं मायामनुष्यं हरिं

वन्देऽहं करुणाकरं रघुवरं भूपालचूडामणिम्||

 

||श्रीनाम समर्थ||

Tuesday, November 10, 2020

श्री ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराजांचे बोधवचन क्र ७५ --


श्रीमहाराजांचे बोधवचन क्र ७५ –

 

मारुतीने दिलेली मुद्रिका पाहिल्यावर सीतेला रामाच्या स्वरुपाची आठवण झाली. त्याप्रमाणे नाम घेताना आपल्याला त्याची आठवण झाली पाहिजे.

 

श्रीराम!

लंकेहून सीता शोधाचे कार्य पार पाडून जेव्हा हनुमंत प्रभू रामचन्द्रांकडे परत आले, तेव्हा प्रभूंनी जेव्हा सीता मातेचा वृत्तांत विचारला तेव्हा हनुमंत सांगतात,

“नाम पाहरु दिवस निशी|

ध्यान तुम्हार कपाट||

लोचन निज पद जंत्रित|

प्राण जाहि केहि वाट||”

हे प्रभू, मातेचा वृत्तांत अत्यंत खेदजनक आहे; परंतु त्यांच्या मुखात सतत राम नामाचा पहारा आहे, तुमचे रूपाचा पहारा हृदयरूपी कपाटावर आहे, मातेचे नयन तुमच्या चरणांवर स्थित आहेत; असे असल्यामुळे त्यांचे प्राण (इतकी विपरीत परिस्थिती असून देखील) कुठून बाहेर पडणार? हा स्वरूपबोध जो श्रीमहाराज आम्हाला आजच्या वचनात सांगत आहेत, तो बोध सीता मातेची दैनंदिनी आम्हाला शिकवते.

 

आजच्या वचनाचा भावार्थ अत्यंत गूढ आहे. यात अनेक गोष्टी साधक दृष्ट्या महत्त्वाच्या आहेत. मुद्रिका देणारे कोण? हनुमंत! जो दास्याभावात आत्यंतिक संलग्न आहे, ज्याचे मन हे आपल्या अराध्याशी तन्मय झालेले आहे, तोच केवळ आपल्या आराध्याच्या स्वरूपाबद्दल, त्याच्या नाम, रूप, गुणाबद्दल सांगण्याचा अधिकार राखतो; किंबहुना भगवंत त्याला तो अधिकार देतात. सीता माता प्रत्यक्ष भगवती. तिने आमच्यासारख्या जीवांना स्वरूप बोध कसा व्हावा लागतो हे शिकवण्यासाठी अज्ञान्याची भूमिका घेऊन ती राम नामांकित मुद्रिका हनुमंत रूपी गुरुकडून मिळाल्यावर तिला स्मरण झाले असे दर्शवते. याशिवाय स्वरूप कायम स्थिरच आहे. ते आहेच. ते कुठून यायचे नाही. मात्र जोवर सद्गुरू त्याचे बीज आमच्यामध्ये पेरत नाहीत, तोवर ते असूनही त्याचा बोध आम्हाला होत नाही. मुद्रिकेत काय होते? तर रामनाम. नामाशिवाय स्वरूप बोध संभवत नाही; अथवा नामाशिवाय स्वरुपाव्यातिरिक्त अनात्म गोष्टी दूर करणे जीवास अत्यंत अवघड जाते हेच यातून दिसते.

 

प्रभू रामचंद्रांना लंकेस येताना हनुमंतांनी जेव्हा विचारले, “मी मातेला कसे ओळखू?” तेव्हा रघुनंदन म्हणाले, “जिथे आजूबाजूच्या झाडांमध्ये देखील रामनाम ऐकू येईल, तिथे माझी सीता आहे असे समज.” श्रीमहाराज म्हणतात, नाम कुठपर्यंत घ्यावे? तर जिथे नाम साधन म्हणून घेण्याची कृती थांबून, तेच साध्य अशी अनुभूती येऊन सहज नाम स्फुरत नाही, तिथपर्यंत नाम घ्यावे! त्यानंतर ते घ्यावे लागत नाही, ते आपोआप चालते; इतकेच नव्हे तर अशा मनुष्याच्या सान्निध्यात जो येतो, त्याला त्याचा उपयोग होतो. या प्रभू, माता आणि हनुमंतांच्या लंकेतल्या लीलांमध्ये आम्हाला या सर्व गोष्टींचा परिपाठ बघावयास मिळतो.

 

आणि हे सांगून पुढे महाराज आम्हाला सांगतात, “त्याप्रमाणे नाम घेताना आपल्याला त्याची आठवण झाली पाहिजे.” अजून एकीकडे श्रीमहाराज जे म्हणतात की, नुसते साधन आनंद देत नाही, त्यातले स्मरण आनंद देते, याचे कारण हेच. आनंदनिधान भगवंताच्या स्मरणातच जीवाच्या मीपणाचे विस्मरण आहे आणि देहबुद्धीच्या विस्मरणाशिवाय स्वरुपबोध संभवत नाही. स्मरण राहणे याचाच अर्थ भगवंताच्या अखंड संन्निध्याची जाणीव टिकणे होय. भक्ताला ही जाणीव द्वैतातून आपल्या सोबत त्याच्या भावाप्रमाणे होते तर ज्ञानी भक्ताला हीच जाणीव आपल्या हृदयकपाटात आत्मरूपाने होते – “जीवू परमात्मा दोन्ही, बैसवूनी ऐक्यासनी| जयांच्या हृदयभुवनी विराजती||” अशी अवस्था आल्याशिवाय जीवाचे जीवपण संपत नाही आणि त्यामुळे जीवाशी निगडीत सुखदुःखांची उपाधीही सुटत नाही. अशा रीतीने आजच्या वचनात महाराजांनी स्वरूप बोधाचा सरळसोट मार्ग सांगितला आहे.

 

श्रीमहाराजांचे नामावरचे प्रेम विलक्षण होते. त्यांचे म्हणणे सरळ सोपे आहे, ते म्हणजे, तुम्ही नुसते नाम घेतले, तरीदेखील त्या नामाच्या शक्तीने रूप प्रकाशित झाल्याशिवाय राहायचे नाही. कारण राम म्हटल्यावर घरातल्या गड्याचे नाव जरी राम असले तरी तो निश्चितच डोळ्यांपुढे येत नाही. त्यामुळे नामात ते मूळ राम रूप अध्याहृत आहेच. या महाराजांच्या अर्थगर्भ वचनात नामाचे आणि तदनुषंगाने प्रकटणाऱ्या रूपाचे, म्हणजेच ईश्वर स्मरणाचे बीज आहे. आजच्या वचनात महाराज ज्या स्मरणाचा उल्लेख करतात तो नामातून ध्यानाचा राजमार्ग आहे म्हटले तर वावगे ठरू नये. आत्मप्रचितीचा मार्ग हा ध्यानातून जातो हे निश्चित – ध्यानेन आत्मनि पश्यन्ति| परंतु श्रीमहाराजांना ध्यान लावणे नव्हे तर सहज ध्यान लागणे किंवा ध्यानात राहणे अपेक्षित आहे. आणि यासाठी नामाव्यातिरिक्त अन्य खात्रीचा उपाय नाही. कारण ध्यान लागण्यासाठी मनाच्या मूलद्रव्यात आमूलाग्र परिवर्तन व्हावे लागते, जेणेकरून ते मन मनरूपाने न राहता आत्मरूपातच स्थित होते. इथेच नामातून भक्ति, भक्तीतून योग, योगातून ज्ञान आणि ज्ञानातून पुन्हा सहज भक्तीकडे साधक पोचतो व सिद्ध बनतो!

 

||श्रीनाम समर्थ||   


Wednesday, November 4, 2020

श्री ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराजांचे बोधवचन क्र ७३ --


श्रीमहाराजांचे बोधवचन क्र ७३ –

 

वासनेचा क्षय भगवंताच्या नामात आहे.

 

श्रीराम.

परमपूज्य गुरुदेव रानडे यांचे एक अप्रतिम असे वचन आहे. “हटयोग देहापासून, राजयोग मनापासून सुरुवात करतो. आम्ही (नामसाधक) देवालाच धरून सुरुवात करतो!” सर्व मार्ग एकाच ध्येयाप्रत जाणारे असले तरी भगवंताचे स्मरण हा सर्व साधनांचा प्राण आहे म्हणतात श्रीमहाराज. याचे मुख्य कारण म्हणजे मनुष्याला जीवदशा प्राप्त होण्याचे कारण त्याची या दृश्याशी पडलेली गाठ आणि या गाठीचे मुख्य कारण म्हणजे वासना. ‘जन्म घ्यावा लागे वासनेच्या संगे’ हे त्रिवार सत्य आहे. वासनेचे मूळ देहबुद्धी आणि त्यामुळे वासना नष्ट करण्यासाठीचे जे साधन हवे ते देहबुद्धीवर घाला करणारे असेच असले पाहिजे. वरच्या गुरुदेवांच्या वचनात नामस्मरणाचे मर्म आले आहे. बाकीची साधने देहबुद्धीपासून सुरुवात करून देहबुद्धीच नष्ट करण्याचे योजतात. मात्र नामस्मरणाचे साधन असे आहे जे देवबुद्धीपासून सुरुवात करून त्यातच स्थित होते व त्यामुळे देहबुद्धी सहजी गळून पडते.  

 

देहबुद्धीचा उगम हा जीवदशेत मनुष्य आल्यानंतर देह मन बुद्धीच्या दृश्याशी संयोगामुळे निर्माण होऊन चिकटणाऱ्या उपाधींमुळे आहे. त्यामुळे, त्या उगमाशी घाला घालणारे साधन हे सर्वथैव उपाधि विरहित असेच असले पाहिजे; नाहीतर अनेकदा साधनाचीच उपाधि पाठीमागे लागते. आणि असे असेल तर ते केवळ भगवंताचे नामच आहे.

दासबोधात समर्थ म्हणतात,

“जेचि क्षणी अनुग्रह केला| तेचि क्षणी मोक्ष झाला| 

बंधन काही आत्मयाला| बोलोचि नये||”

हे मोक्षसुख – मुक्ती ही नामाच्या अनुग्रहाने सुलभ साध्य होते असे सर्व संतांचे म्हणणे आहे, कारण नामाने मनाच्या मूलद्रव्यावर हल्ला होतो. आणि मनाचे मूलद्रव्य हे वासनांनी बनलेले असते. नाना वासना. स्थूल वासना अभ्यासाने आणि विवेकाने काढणे शक्य असते. जसे समर्थ म्हणाले, “कर्तयासी ओळखावे| यास विवेक म्हणावे||” कारण सर्व वासनांचा उदय हा ‘मी कर्ता’ या विपरीत भावनेने होतो. संत आम्हाला थेट उद्दिष्ट दाखवतात व तेच डोळ्यांसमोर ठेवून सुरुवात करावयाला सांगतात. त्यामुळेच पूज्य बाबा बेलसरे नामचंद्रिकेत म्हणतात, “नामानुग्रह युक्तस्य जायते ब्रह्मदर्शनम्||”

 

“वासना मुळीच नको म्हणणे किती सयुक्तिक आहे?” असा लौकिक विचार असणाऱ्यांसाठी ही संत वचने नाहीतच. ती त्यांच्यासाठीच आहेत, ज्यांना या वासनांच्या अग्नीतून सही सलामत बाहेर पडून सहज निष्काम अवस्थेकडे जाण्याची व भक्तीत राहण्याची इच्छा आहे. कोणतीही विषय वासना ही दुःखालाच कारण होते व ईश्वर दर्शन हेच केवळ आनंदाला कारण होते, हे प्रथम बुद्धीला पटल्याशिवाय मनुष्य नामानुगामी किंवा ईश्वरानुगामी होणे शक्यच नाही. गीतेच्या नवव्या अध्यायात भगवंतांनी सरळ सांगितले, “अनित्यं असुखं लोकमिमं प्राप्य भजस्व माम्||”क्षणभंगुर आणि सुखरहित मनुष्यलोक जो मिळालेला आहे, त्यात तू भगवद्भजन कर. (त्याशिवाय सुख लाभणार नाही).                                                           

 

आणि या ईश्वरभक्तीची सुरुवात होण्यासाठी “मला वासनांतून बाहेर पडून वैराग्याकडे जायचे आहे" हा दृढनिश्चय ज्याचा झाला, त्याला गुरुप्रदत्त नाम वासनांचा नायनाट कसा करते याचा अनुभव गुरुकृपेने आल्यावाचून राहत नाही. सर्व वासनांचा उदय हा चित्रविचित्र कल्पनांमधून होतो. दृश्यच जिथे नाशवंत, तिथे त्या कल्पना देखील नाशवंतच असतात हे ध्यानात न आल्याने मनुष्य विविध गोष्टींच्या हव्यासात अडकतो. त्यात पूर्व संस्कारांची भर पडते. त्यावर चिंतन घडल्याने व कृती घडल्याने त्या कल्पना आणि इच्छा दृढावतात, जीव त्यांच्याशी तादात्म्य पावतो; मात्र त्या देखील तकलादू असल्यामुळे टिकत नाहीत. मग जीव नवीन कल्पना आणि नवीन वासना शोधतो व हे दुष्टचक्र संपत नाही. गुरुदेव रानडे म्हणतात, “नामस्मरण म्हणजे ‘जमावबंदी’ चा कायदा आहे. कल्पना जमू लागल्या की नामस्मरण त्यांना ‘चलो हटो’ असा आदेश देते व त्यामुळे त्या कल्पना दुर्बल होतात. मुख्य म्हणजे त्यांचे दृढीकरण होण्याचे टळते.”

 

या सर्वाचा परिपाक काय होतो तर आमचे नामस्मरण दिवसेंदिवस निष्काम आणि निरहंकार होऊ लागते. अनात्म्याचे बंधन हळूहळू क्षीण होऊ लागते व जीव स्वरूपी स्थिरावू लागतो. अगदी सत्वगुणाचे देखील बंधनच असल्यामुळे ते ओलांडण्यासाठी देखील नामावाचून आधार नाही. कारण, निष्काम होण्यामागे “मी विसरणे” हा हेतू आहे. पूज्य ब्रह्मानंद महाराज जे म्हणतात, “गुरुराव माझे रामचि केवळ, वासनेचे मूळ दूर केले!” ह्यातले वासनेचे मूळ दूर केले म्हणजे देहबुद्धीला व खोट्या ‘मी’ ला तिलांजली दिली. इथे गुरु = राम = नाम असे आहे हे वेगळे सांगणे नलगे. एक सहज लक्षात येण्यासारखी गोष्ट म्हणजे, नामावाचून सर्व साधने देखील कळत नकळत ‘मी’ शी निगडीत आहेत. नाम मात्र ‘मी’ च्या जाणिवेला चिकटून नाही. त्यामुळे इतर कोणत्याही साधनांमध्ये ‘मी’ चा विसर संभवणे अवघड आहे; परंतु नामामध्ये ‘मी’ चा विसर अंतर्भूतच आहे! गुरुदेव म्हणत, नामाने मुक्तीची सुरुवात झाली! लाकूड जळत्या चुलीत घातल्याने त्याचे टोक पेटले; हे सद्गुरूंच्या नामानेच शक्य होते. इतर साधने लाकूड वाळून पेटण्याला अधिकारी बनवतील पण पेटवणार नाहीत. लाकूड पेटण्यासाठी, मुक्तीची सुरुवात होण्यासाठी नामच हवे!

 

म्हणूनच नामाच्या योगाने तुकाराम महाराजांसारखे संत म्हणू शकतात,

“विषयी विसर पडला निःशेष| अंगी ब्रह्मरस ठसावला||”

या ब्रह्मरसाची नांदी सद्गुरूप्रदत्त नामाने होते हे त्रिवार सत्य आहे!

 

||श्रीनाम समर्थ||                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                         

Monday, August 31, 2020

श्री ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराजांचे बोधवचन क्र ७२ --

श्रीमहाराजांचे बोधवचन क्र ७२ –

‘परिस्थिती चांगली आली तर नाम घेईन’ असे म्हणणारा मनुष्य नाम कधीच घेत नाही.

श्रीराम!
आम्ही श्वास न घेतल्याने गुदमरायला लागलो तरच श्वास घेऊ असे म्हणतो का?
आम्ही भुकेने कासावीस होईपर्यंत खायचे राहतो का?
आम्ही घरात धान्याचा एक दाणा देखील न उरेपर्यंत धान्य भरायचे टाळतो का?
जर आपली मुले वाईट मार्गाला लागली तर ती आपोआप सुधारेपर्यंत हातावर हात धरून बसतो का?
अशी किती उदाहरणे देता येतील जिथे आम्ही कोणत्याही स्थळ काळ परिस्थितीचा जास्त विचार न करता जे करणे उचित आहे ते कर्म करतो. मग जिथे या मनुष्य जन्माच्या इतिकर्तव्याचा प्रश्न आहे, तिथे तुम्ही गाफील कसे काय राहू शकता असे श्रीमहाराजांसारखे संत आम्हाला विचारतात. परंतु सत्यत्वाची कल्पनाच उलट झाल्यामुळे या जगातल्या गोष्टींसाठी आम्ही सर्वस्व पणाला लावून कर्म करण्याचा प्रयत्न करतो, मात्र अध्यात्मिक आयुष्याबद्दल अजूनही मनात स्पष्टता नसल्या कारणाने नामाच्या बाबतीत आमची संकल्पशक्ती दृढता धारण करत नाही. किंवा, श्वासासारखे सहज खरे तर केवळ नाम आहे ही संकल्पना आम्हाला फक्त बुद्धीला संतांनी सांगितलेली म्हणून माहित असल्या कारणाने त्या अनुभूतीला वंचित झालेले आमचे मन बुद्धीचे वर्चस्व झुगारून देते व मनमानी करते.

आजच्या वचनात हाच मनबुद्धीचा गाफीलपणा श्रीमहाराज आम्हाला सांगत आहेत. जोवर आम्ही या देहाला ‘मी’ मानत आहोत, तोवर नामाच्या सत्तेचा सांगोपांग अनुभव आम्हाला येणे शक्य नाही. पण हा अनुभव येणे किंवा या अनुभवात स्थित होणे हे नामाला सर्वस्व मानल्याशिवाय संभवत नाही असे श्रीमहाराज आम्हाला सांगतात.

मुळात नामाचे अस्तित्व कोणत्याही परिस्थितीने बांधण्याजोगे नाही. जे सदा सर्वदा आहेच ते नाम! परंतु हे नामाचे सर्वव्यापी, सर्वसाक्षी अस्तित्व अजून आम्हाला न कळल्यामुळे आमची मनस्थिती आज व्यवस्थित नाही, आज घरामध्ये काही शुभ अशुभ प्रसंग घडला, आज आम्ही गर्दीच्या ठिकाणी आहोत, घरामध्ये नामाला – साधनेला अनुकूल वातावरण नाही, अशी एक ना अनेक परिस्थितीशी निगडीत कारणे नाम साधन न होण्याला आम्ही देत असतो याची जाणीव संतांना असते. म्हणूनच समर्थ म्हणाले,
“आधी आवदसा मग दसा| अथवा दसेउपरी आवदसा|
प्रसंग असो भलतैसा| परंतु नाम सोडू नये||”
हे सांगण्याचे मुख्य कारण पुन्हा हेच की भगवत्प्राप्तीच्या नाम साधनेचे मुख्य वैशिष्ट्यच हे आहे की ते सर्वतोपरी ‘मनाने’ करावयाचे साधन आहे. आपल्या देहाला प्रारब्धानुसार परिस्थितीचे बंधन निश्चित असू शकते. मात्र मनाला बंधन केवळ मनाच्याच क्षुद्र विचारांचे असू शकते. हे मनाचे मनावरचे बंधन मनानेच काढून टाकणे याचे नाव साधना! त्यामुळे आजच्या वचनात श्रीमहाराज सावध करीत आहेत की जर आम्ही परिस्थितीचे कारण सांगत राहिलो तर आमच्याकडून साधन घडणे संभवतच नाही. कारण लौकिक जगाला कोणत्या ना कोणत्या परिस्थितीचा शाप हा असणारच. इथे तथाकथित सुखोपभोग देखील साधन दृष्ट्या शापच आहे हे ज्याला उमजले त्यालाच खऱ्या अर्थाने साधनाची तळमळ लागते. हे लक्षात घेऊन ज्याने परिस्थितीचे बंधन झुगारून आपल्या मनाला तयार केले – करण्याचा प्रयत्न केला, त्याच्यामागे सद्गुरू कृपा सदैव विलसत राहते हा साधकांचा अनुभव आहे.

इथे अजून एका आपल्या मनाच्या विरोधाभासाबद्दल श्रीमहाराज आम्हाला सावध करीत आहेत. अध्यात्म साधन हे पूर्णपणे अंतरंगातले आहे, बाह्य गोष्टींशी त्याचा संबंध नाही हे आम्हाला माहित आहे; पण जेव्हा आम्ही परिस्थितीचे कारण देतो, तेव्हा साहजिकच साधन देखील बहिर्मुख आहे या चुकीच्या भावात स्थित होतो. जेव्हा हा अंतरंग – बहिरंगातला विरोधाभास तीव्र होतो, तेव्हा अत्यंत हानिकारक जर कोणती गोष्ट होत असेल तर ती म्हणजे आम्ही परमार्थाला प्रपंच बनवतो आणि श्रीमहाराज व संत आम्हाला प्रपंचाला परमार्थ बनवायला सांगतात. परिस्थितीशी आमचे साधन निगडीत झाल्यामुळे याच्या बरोबर उलट गोष्ट घडते आणि आम्ही तथाकथित बाह्यांगालाच सत्य समजून आत्मवंचना करून घेतो.

इथे एक गोष्ट समजून घेणे अत्यावश्यक आहे, जी आम्हाला समजावून सांगण्यासाठी यासारखी वचने श्रीमहाराज आम्हाला देतात. ती म्हणजे, नाम हेच ते अंतिम सत्य आहे, ज्याच्या अनुभूतीने संपूर्ण दुःख निवृत्ती व अखंड आनंद प्राप्ती साधते. तेच अनादि सत् तत्त्व नामरूपाने आम्हाला सदगुरूंकडून मिळालेले आहे. या तत्त्वाचे वैशिष्ट्य काय? ज्या तत्त्वात स्थळ, काळ, निमित्त (परिस्थिती) यांमुळे कसलीही वाढ अथवा घट होत नाही, जे अनिर्वचनीय प्रेमस्वरूप नाम शाश्वत दिव्य तत्त्व आहे, ज्याच्या पार्श्वभूमीवर हा विश्वाचा दृश्य विलास पडद्यावरच्या चित्रपटाप्रमाणे आम्हाला दिसतो आहे, त्यालाच “नामतत्त्व” म्हणतात. जेव्हा आम्ही आमचे नाम स्थळ-काळ-निमित्ताच्या परिघात बसवतो, तेव्हा आम्ही नसलेली उपाधि त्या शाश्वत तत्त्वाला लावून आमचीच दिशाभूल करतो व जे आत्मस्वरूपाचे स्टेशन गाठायचे ते कधी गाठता येत नाही. श्रीमहाराजांचे वचन नेहमीच ‘घागर में सागर’ या पद्धतीचे असते. त्याचा आवाका हा प्रचंड मोठा असतो. त्या वचनामागचा त्यांचा हेतू हा साधन आणि साध्य या दोन्हीला व्यापणारा असा असतो. त्याचे सम्यक आकलन आम्हाला निश्चितच आमच्या साधनेशी एकनिष्ठ ठेवते व छोट्या छोट्या वचनांमधून आम्हाला सतत त्या शाश्वत तत्त्वाच्या - नामाच्या निकट नेण्याच्या आमच्या कृपासिंधु सद्गुरूंच्या अथक प्रयत्नांमुळे त्यांच्या चरणी वारंवार नतमस्तक करते!

त्यांचे म्हणणे एकच, नाम हे एकच तत्त्व आहे... दूजा तत्त्व न होई! तुम्ही त्याला माना अगर नका मानू ते आहेच. परंतु जर मानून त्याच्यातच तुम्ही एकरूप झालात तर ‘पुनरपि जननं पुनरपि मरणं’ च्या चक्रातून सुटून मुक्त व्हाल... म्हणून सगळी त्यांची धडपड!

||श्रीनाम समर्थ||




Saturday, August 29, 2020

श्री ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराजांचे बोधवचन क्र ७१ --


श्रीमहाराजांचे बोधवचन क्र ७१ –

खेड्यातले लोक वयात आल्याबरोबर आपले लग्न करून टाकतात. ते गरीब असले तरी ‘उद्याचे उद्या बघू’ असे म्हणतात; पण शहरातले विद्वान लोक मात्र लवकर लग्न करीत नाहीत. तसे, साधारण आणि अडाणी लोक नाम घ्यायला सांगितले की नाम घेतात, परंतु विद्वान लोक मात्र ‘नामाचे प्रेम असेल तरच नाम घेईन’ असे म्हणतात.

श्रीराम!
भक्तिमार्गी संतांना नेहमीच सरळसोट स्वभावाची साधी भोळी माणसे जास्त आवडतात. याचा अर्थ ते समदर्शी नसतात का? तर तसे नव्हे. त्यांना देखील आवडते नावडते असते का? तर तसेही नव्हे. परंतु जिथे अध्यात्म शास्त्र – भगवत् शास्त्राची बात येते, तिथे मात्र ते spade is spade असे सांगणारे असतात. किंबहुना असे स्पष्टपणे सांगणे व समाजाला योग्य मार्गाकडे वळवणे यासाठीच तर आपला अखंड आत्मानंद सोडून ते आमच्यासारख्या प्रापंचिक माणसांमध्ये पडतात. तद्वत श्रीमहाराजांनी प्रत्येक वचनातून आम्हाला सावध करण्याचा जणू चंग बांधला आहे म्हटले तर वावगे ठरू नये. आजच्या वचनात ते एक अगदी साधे दिसणारे असे उदाहरण देऊन आम्हाला पुन्हा नामाचेच महत्त्व पटवून देत आहेत.

“खेड्यातले लोक वयात आल्याबरोबर आपले लग्न करून टाकतात. ते गरीब असले तरी ‘उद्याचे उद्या बघू’ असे म्हणतात; पण शहरातले विद्वान लोक मात्र लवकर लग्न करीत नाहीत” – साधी माणसे आपले जीवन कसे साधेपणाने, जास्त विचार न करता जगतात हे इथे महाराजांनी सांगितले आहे. वचनाचा दुसरा भाग अर्थातच जास्त महत्त्वाचा आहे; परंतु या भागात देखील ‘विनाकारण विचार’ करण्याच्या आमच्या वृत्तीवर ताशेरे आहेत. श्रीमहाराज आणि सर्व संतांचे असे म्हणणे आहे की आमचे सर्व दुःख आम्ही ‘वर्तमानकाळात न जगल्याने आहे.’ आम्हाला एक तर भूतकाळात घडून गेलेल्या गोष्टी त्रस्त करतात किंवा भविष्यकाळ चिंतित करतो. त्यामुळे दोन गोष्टींना आम्ही मुकतो – १) वर्तमानात आम्ही निर्णय क्षमता गमावतो आणि २) वर्तमानातला आनंद गमावतो. जसे इथे महाराज म्हणतात, साधी भोळी माणसे फार विचार न करता आलेल्या परिस्थितीचा वर्तमानात विचार करतात आणि त्यामुळे बहुतेकदा त्यांचे आयुष्य फार कटकटीशिवाय बरे जाते. परंतु तथाकथित विद्वान लोक आपल्या बुद्धीवर जास्तच अवलंबून राहतात व कोणत्याही परिस्थिती अती विचार करून लवकर घेण्याच्या निर्णयाला उशीर लावतात व त्यामुळे आयुष्यातल्या लौकिक गोष्टीतच जास्त अडकून पडतात. ही गोष्ट सांगण्याचा महाराजांचा मुख्य हेतू हा, की आम्ही उगीच लौकिक कर्म, त्याचे कारण आणि त्याचा परिणाम यांमध्येच जास्त बुद्धी लावतो व जे खरे सत्कर्म – भगवत कर्म – नामस्मरण – साधना – यांसाठी आम्हाला उशीर होत जातो.

स्वामी माधवनाथ (स्वामी स्वरूपानंदांचे शिष्य) म्हणायचे, साधकाने जे काही काम आहे ते लवकर संपवावे. बँकेत पैसे ठेवायचे आहेत ना, जा ठेवून या, आता पुन्हा त्याचा विचार नको. जितका अधिक वेळ आम्ही या विचारांमध्ये घालवू तितका आम्हाला साधनेसाठी वेळ कमी मिळतो आणि मग आम्ही बाकी सर्व करतो पण साधन म्हातारपणासाठी पुढे ढकलतो. हे किती भयंकर आहे याची कल्पना संतांना असते म्हणून संतश्रेष्ठ तुकाराम महाराज आम्हाला समजावतात, “नको नको मना गुंतू मायाजाळी| काळ आला जवळी ग्रासावया||”
नामदेव महाराज सांगतात,
“जळी बुडबुडे देखता देखता| क्षण न लागता दिसेनाती||
तैसा हा संसार पाहता पाहता| अंतकाळी हाता काई नाही||
गारुड्याचा खेळ दिसे क्षणभर| तैसा हा संसार दिसे खरा||
नामा म्हणे तेथे काही नसे बरे| क्षणाचे हे खरे सर्व आहे||”
हे ज्याने लक्षात घेतले तो लौकिक गोष्टीत फार अडकत नाही. पण श्रीमहाराज यापुढे जाऊन आम्हाला अजून एका गोष्टीत सावधान करत आहेत. जसे सर्व जुळून येण्याची वाट पहात अतिशहाणा - अतिविचारी लग्न पुढे पुढे ढकलतो, तसा तोच व्यवहारातला नियम साधनेला लावणारा अतिविचारी विद्वान साधनेत कधी स्थिरावतच नाही असे महाराज सांगत आहेत. उतावीळपणा हा साधनाला अत्यंत हानिकारक आहे. शिर्डी चे साईबाबा नेहमी दोन गोष्टी सांगत – श्रद्धा आणि सबुरी! भक्तिमार्गात श्रद्धेशिवाय चालणारच नाही. जर गुरूंनी नाम दिले आहे व त्या एका नामातच सर्व सार साठवलेले आहे असे सांगितले आहे, तर श्रद्धावानाला संशय येण्याचे कारणच नाही. तो मुकाट्याने नामच जपेल. म्हणून श्रीमहाराज नेहमी म्हणत, मला विद्वानापेक्षा अडाणी आवडतो, कारण तो जास्त चिकित्सा करत नाही आणि मुकाट्याने दिलेले नाम जपतो व लवकर त्यात स्थिरावतो. अर्धवट विद्वान मात्र त्याची चिकित्सा करतो व गुरूने आधी नामामध्ये प्रेम द्यावे आणि मग मी नाम जपेन असे म्हणतो. हा उतावीळपणा त्याला नडतो, साधनेत सबुरीने घेणाराच यशस्वी होतो.

नामामध्ये प्रेम म्हणजे अक्षरशः ईश्वर दर्शनच होय! ही भक्तिमार्गाची अंतिम अवस्था आहे, केवळ एक स्तर नव्हे. नामाशिवाय या अशा साधकाला जगणेच अशक्य होते. जसे आम्ही अन्नावर जगतो, तसा तो नामावर जगतो. जसे प्रेमाचे मायबाप बंधू भ्रतार सुत मेल्यावर सामान्य जनास दुःख होते, तसे नाम सुटल्यावर त्याला दुःख होते. नामात हा उन्मत्त होतो, नामात मस्ती हीच त्याची अखंडावस्था असते आणि ती असल्याचे भान देखील त्याला नसते. यावरून ही किती पुढची स्थिती आहे याचे आकलन होणे अवघड नाही. आणि ही स्थिती – अवस्था प्राप्त होण्यासाठी आमचे मन बुद्धी चित्त अहंकार यांमध्ये किती परिवर्तन होणे आवश्यक आहे हे देखील कळणे अवघड नाही. श्रीमहाराजांना एकदा एका साधकांनी विचारले, “नामाच्या आनंदाचा अनुभव आम्हाला एकदा द्या तरी.” यावर श्रीमहाराज म्हणाले, “मी द्यायला केव्हाही तयार आहे; पण घेणारा पात्र नसेल तर त्याला ते झेपायचे नाही, वेड लागेल.” त्यामुळे नामाच्या प्रेमाचा अनुभव हा देहबुद्धीच्या पलीकडचा अनुभव आहे व तो घेण्यासाठी पात्र बनणे हे देखील केवळ गुरुप्रदत्त नामात राहिल्यानेच साधु शकेल असे महाराज म्हणतात.

आणि म्हणून ते विचारतात, वैद्याकडून औषध घेताना त्याचा गुण आधी यावा आणि मग मी औषध घेईन असे जसे आपण म्हणत नाही व त्या वैद्यावर विश्वास ठेवून औषध घेतो, तसे नामाचा सर्वोच्च अनुभव आल्यावर मी नाम घेईन म्हणणे वेडेपणाचे आहे. त्यासाठी तुझे खरकटे भांडे आगोदर स्वच्छ व्हायला हवे. परंतु हे देखील ज्याची मनापासून इच्छा आहे त्याच्यासाठी अवघड नाही. मुळात खरकटे हे दृश्यातले असल्याने मायिक आहे व सत्य नाही. त्यामुळे जे सत्य आहे ते नाम ज्याने धरले त्याने खरकट्याचा विचार करण्याचे देखील कारण नाही, फक्त नाम जपावे असे महाराज म्हणतात. यावर संपूर्ण विश्वास ठेवून ज्याने नामाला धरले त्याच्यासाठी कसले आले आहे प्रारब्ध आणि संचित? संत एकनाथ महाराजांनी म्हणूनच स्पष्ट सांगितले,

आवडीने भावे हरिनाम घेसी| तुझी चिंता त्यासी सर्व आहे||
नको खेद करू कोणत्या गोष्टीचा| पती लक्षुमीचा जाणतसे||
सकळ जीवांचा करितो सांभाळ| तुज मोकलील ऐसे नाही||
एका जनार्दनी भोग प्रारब्धाचा| हरिकृपे त्याचा नाश आहे||

||श्रीनाम समर्थ||




Saturday, August 22, 2020

श्री ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराजांचे बोधवचन क्र ७० --


श्रीमहाराजांचे बोधवचन क्र ७० –

सूर्य हा फक्त प्रकाश देतो, पण त्यामुळे अंधार आपोआप नाहीसा होतो. तसे, नाम हे भगवंताचे प्रेम वाढवते, मग आपले दोष अपोआपच नाहीसे होतात.

श्रीराम!
‘अमृत’ चुकून जिभेवर पडले काय किंवा मुद्दाम घेतले काय, परिणाम अमरत्व आहे.

‘विष’ चुकून पोटात गेले काय किंवा कुणी घातले काय, परिणाम मृत्यू आहे.

‘पारस’ चुकून लोखंडाला लागला काय किंवा मुद्दाम लावला काय, लोखंडाचे सोने बनणारच.

‘संत’भेट सहजच झाली काय किंवा जगभर शोधल्यावर अथक परिश्रमाने झाली काय, परिणाम शांति आहे.

तद्वत, श्रीमहाराज सांगताहेत, प्रकाश देणे हा सूर्याचा धर्मच आहे. अंधार नाहीसा करायचा म्हणून तो प्रकाश देतो असे नव्हे; त्याला प्रकाशाशिवाय दुसरे काही माहीतच नाही; किंबहुना सूर्य अंधार जाणतच नाही. त्याचा उदय झाला की प्रकाश होणारच. तसे नामाला भगवंताच्या प्रेमाशिवाय काही माहित नाही. नाम आणि भगवंत प्रेम या एकाच नाण्याच्या दोन बाजू आहेत. श्रीमहाराज म्हणायचे, “सगुणाला जुळे झाले – एक नाम आणि दुसरे प्रेम”; इतका त्यांच्यात अभेद आहे. तरीही जसे जुळ्यातले एक जरासे मोठे असते तसे, नाम हा जुळ्यातला मोठा भाऊ आहे आणि तो आला (मुखात नाम आले) की मागाहून प्रेम येणारच!

कालच्या चिंतनात जे आपण बघितले तोच मुद्दा वेगळ्या भूमिकेवरून आज पुन्हा महाराज आम्हाला सांगत आहेत की, तुम्हाला दोष बघत बसण्याची जरूर काय? अमृत ज्याला मिळणार आहे हे निश्चित आहे, त्याने ‘मी मर्त्य आहे’ असा जप करण्याचे कारणच काय? अमृत मिळाले म्हणजे झाले.

प्रेम कशाने वाढते? या प्रश्नावर कुणीही सहज सांगेल की सहवासाने प्रेम वाढते. नामाने काय होते? तर श्रीमहाराजांच्या अस्तित्वाची – सहवासाची जाणीव वाढीस लागते आणि त्यामुळे साधकाला सहजच प्रेम वाटू लागते, कारण नाम हे त्यांचे कायमचे वसतीस्थान आहे. श्रीमहाराज स्वतःच म्हणतात, “ज्याच्या मुखात नाम आहे, त्याच्या मागेपुढे मी घोटाळतो!” हीच त्यांच्या अस्तित्वाची खूण आहे. आणि काय आहे त्यांच्या सहवासात? फक्त प्रेम आणि शांति! तिथे दोषांचे आणि विकारांचे स्थानच नाही, म्हणून ते म्हणताहेत, नामाने आपले दोष आपोआपच नाहीसे होतात. त्यासाठी वेगळे पुरुषप्रयत्न करावे लागत नाहीत. कारण कसे आहे की प्रयत्न आणि प्रेम यांच्यात एक प्रकारचा विरोध आहे. जिथे प्रेम आहे तिथे सपशेल शरणागती असलीच पाहिजे. तिथे श्रीमहाराजांमुळे मला प्रापंचिक अथवा पारमार्थिक आयुष्यात देखील काय मिळणार आहे हा प्रश्नच लोप पावतो, त्यामुळे मग प्रयत्न कसले करणार? याचाच अर्थ –
नाम घ्यावे – प्रेम अनुभवावे – शरणागती साधावी – सहज निजानंदासाठी नामात रहावे... असा सरळ क्रम आहे. यामध्ये कुठेच ‘मी’ चे स्थान नाही आणि म्हणूनच असे नाम आणि प्रेम साधकाला सहजगत्या स्वरूपबोधाकडे घेऊन जाते. जीवाचा मूळ दोष हा आहे की तो स्वतःला हा देह समजला आणि दोष निवृत्ती म्हणजे या देहाभिमानाची निवृत्ती आहे. या निवृत्तीला प्रेमाशिवाय उपायच नाही. इथे आमचा मार्ग कोणता आहे हा देखील प्रश्न नाही. ज्ञान मार्ग असो, योग मार्ग असो किंवा भक्ति मार्ग असो, आमच्या मार्गाबद्दल प्रेम नसल्याशिवाय आम्ही गुरुचरणी शरणागत होणेच शक्य नाही. त्यामुळे भक्तिमार्गाशिवाय इतर मार्गींना प्रेम आणि शरणागती आवश्यक नाही असे मुळीच नाही. पण भक्तिमार्गी नाम साधकांना मात्र प्रेम हाचि पाया आणि प्रेम हाचि कळस अशी गोड स्थिती आहे.

या स्थितीप्रत जाण्यासाठी नामाचा राजमार्ग संतांनी यासाठीच सांगितला, की नामाने अनायासेच दोष निर्मूलन होते. जसे आपण बघितले, मूळ दोष आहे, खोट्या मी ला खरे समजण्याचा आणि त्यातूनच इतर सर्व दोष उदय होतात. हा खोटेपणा नामाने जातो म्हणतात संत. संतश्रेष्ठ नामदेव महाराज तर म्हणतात,
“असत्याचे मळ बैसले वाचे| ते न फिरती साचे तीर्थोदळे||
हरिनामामृत प्रक्षाळी जिव्हेने| पाणिये बहुत काय करीती||
गंगासागरादि तीर्थे कोडीवरी| हरिनामाची सरी न पावती||
हरिनामगंगे सुस्नात पै झाला| नाम्याजवळी आला केशिराजा||”
-- आपल्या जिभेवर खोटेपणाची जी पुटे चढली आहेत, जो मळ बसला आहे, तो तीर्थयात्रेने जात नाही. केवळ हरिनामाने जिव्हेचे प्रक्षालन केले म्हणजे ते पाप जाते, पाण्याचेही तिथे काही चालत नाही. गंगासागरादि तीर्थे आहेत खरी; पण त्यांना हरिनामाची सर नाही. नामदेव हरिनामाच्या गंगेत सुस्नात झाले आणि म्हणून तो केशीराज श्रीहरी त्यांच्या सन्निध आला!

हे होण्यासाठी केवळ नामात आमची मनबुद्धि एकवटणे जरूर आहे. हे एकवटण्यासाठी आमचे संकल्पविकल्प शक्य तितके कमी होणे व ती संकल्प बुद्धी केवळ नामाशी निगडीत होणे जरूर आहे. हे होण्यासाठी सद्गुरू प्रार्थनाच उपयोगी पडते असा सर्वसामान्य अनुभव आहे. संकल्पांचे मूळ आहे स्वार्थ आणि स्वार्थातच आमचा मूळ दोष लपलेला आहे. प्रापंचिक स्वार्थाचे तर स्थान नाहीच; पण पारमार्थिक देखील, मला शांति हवी, मला समाधान हवे यासारखे शब्द ‘मला’ ला लागूनच असतात. संत विचारतात, तुम्ही भगवंताला – सद्गुरूंना काय दिलेत म्हणून तुम्ही या गोष्टींची अपेक्षा करत आहात? अपेक्षाविरहित होणे म्हणजेच पारमार्थिक स्वर्थाच्याही पलीकडे जाणे आहे. सद्गुरूंनी दिलेले साधन कोणताही संकल्प विकल्प ना बाळगता जो त्यांना दत्तक गेला त्यालाच नकळत आनंद – प्रेमाचा अनुभव सद्गुरू देतात. किंबहुना तो अनुभव सांगायला तो उरतच नाही, तो अनुभवरूपच होतो आणि यालाच संपूर्ण दुःख-दोष-निवृत्ती आणि अखंड आनंद-प्राप्ती म्हटले आहे. हे होण्यासाठी नीतीचे शक्य तितके पालन करून जो आयुष्य नामाप्रती समर्पित करू शकेल तोच त्या अनिर्वचनीय गुरुप्रेमाचा अधिकारी बनेल. श्रीमहाराज म्हणतातच,
“हृदयी करता भगवंताचे ध्यान|
नामाविण उच्चार दुजा न जाण||
असा नेम ज्याच्यापाशी|
राम तेथिल रहिवासी||”

||श्रीनाम समर्थ||

Friday, August 21, 2020

श्री ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराजांचे बोधवचन क्र ६९ --


श्रीमहाराजांचे बोधवचन क्र ६९ –

विषयाची ऊर्मी हे मायेचे स्मरण होय, आणि नामाचे स्मरण हे भगवंताचे स्मरण होय. नामाच्या मागे भगवंताचे अस्तित्व आहे, म्हणून त्यामध्ये सत्संगति आहे.

श्रीराम!
श्रीमहाराज एके ठिकाणी म्हणतात, “सोडायच्या गोष्टींपेक्षा धरायच्या गोष्टींचा अभ्यास करावा.” अनेकदा असे होते, की साधक आपल्या पूर्वकर्मांबद्दल खूप जास्त विचार करून दुःखी होतो व हातून घडलेल्या पाप कर्मांबद्दलच विचार करण्यात त्याचा जास्त वेळ जातो. श्रीमहाराजांना हे पसंत नव्हते. ते म्हणायचे, सद्गुरूंच्या पायावर डोके ठेवल्यावर पाप राहीलच कसे? हा भाव साधकाच्या मनात दृढ झाला पाहिजे. आजच्या बोधवचनात केवळ व्याख्या द्यायची म्हणून महाराज आम्हाला ‘विषयाची ऊर्मी हे मायेचे स्मरण होय’ असे सांगत नाहीयेत. तर, त्याचे स्मरण करणे कसे निरर्थक आहे हे सांगत आहेत. माया कुठे आहे? माया ही मनात आहे. आम्ही मायेला भगवंतापासून भिन्न मानली म्हणून माया आम्हाला त्रास देते. साधन आणि गुरुकृपेने ही माया त्या भगवंताचीच शक्ती आहे हे लक्षात आले म्हणजे विषय जे आज आम्हाला त्रास देतात, ते केवळ आमच्या मनाच्या भ्रमित अवस्थेचे फलस्वरूप होते याची अनुभूती साधकास येते व तीच माया भगवंताची ज्ञानशक्ती व प्रेमशक्ती होऊन आमच्या अंतरंगी ज्ञानाचा प्रकाश करते.

परंतु, या स्थितीप्रत जाईतोवर श्रीमहाराज सांगत आहेत की, स्मरणच करायचे ना, मग ते भगवंताचे करा. कारण, एकमेव सत्य तो भगवंतच आहे. ज्याचे चिंतन करावे तसे तुम्ही होता हा महाराजांच्या सांगण्यामागचा भावार्थ आहे. आणि त्या भगवंताचे सर्व स्मरण हे त्याच्या नामामध्ये साठवलेले असल्याने नामाचे स्मरण हेच भगवंताचे स्मरण असे आजच्या वचनात महाराज सांगत आहेत. तत्त्वज्ञान दृष्ट्या आजच्या वचनात ‘नेति नेति’ आणि ‘स इति’ हे दोनही भाव एकत्र आलेले आहेत. साधकावस्थेत मनुष्याला नेति नेति या भावातूनच आत्मप्रचीती पर्यंतचा प्रवास करायचा आहे. जर या घडीला आम्ही सर्व ब्रह्मच आहे असा भाव जागवण्याचा प्रयत्न केला, तर आमच्या विक्षेपी आणि जड मनामुळे आम्ही दृश्य जगतात अडकण्याचा धोका खूप जास्त आहे. त्यामुळेच सगुण भगवंताची उपासना व नामस्मरण हे मार्ग अत्यंत दोषरहित आणि निर्धोक आहेत. त्या सगुण ब्रह्माव्यतिरिक्त सर्व मिथ्या आहे या भावामधूनच त्या भगवंताच्या चरणी संपूर्ण समर्पण शक्य आहे. या समर्पणानंतरच जेव्हा साधकास आत्मदर्शन होते, तेव्हाच ‘स इति’ किंवा ‘वासुदेवः सर्वं इति’ ही अनुभूती त्याला होते. मार्ग कोणताही असला तरी देखील त्या मार्गात महत्त्व असेल तर ते केवळ गुरु-प्रदत्त साधनास व त्याहीपेक्षा अनंतपट अधिक गुरुकृपेस महत्त्व आहे. अर्थात गुरुप्रदत्त साधनात रत राहणाऱ्यासच गुरुकृपेची प्रचीती येते हे निश्चित आणि ही गुरुकृपा म्हणजेच सर्व संशयरहित ज्ञान व भगवत्प्रेम होय.

म्हणून श्रीमहाराज साधन काळात आम्हाला विषयांची वृत्ति न उठण्यासाठी व त्याचे रूपांतर ऊर्मीत न होण्यासाठी व तदनुषंगाने कृती न घडण्यासाठी त्याचे स्मरण आणि वारंवार विचार नकोच असे सांगत आहेत. त्या ऐवजी ज्या स्मरणाने हळूहळू मायाबद्ध जीव त्या मनरूपी मायेच्या कचाट्यातून सुटून त्यावर अधिराज्य गाजवेल अशा भगवंताच्या स्मरणात देहाचे विस्मरण होणे आवश्यक आहे.

नामस्मरणाचे अनन्यसाधारण महत्त्व हे आहे की प्रत्येक नामामागे भगवंताचे शुद्ध सच्चिदानंद स्वरूप साक्षात स्थित आहे. याची अनुभूती घेणे म्हणजे खऱ्या अर्थाने नामात राहणे आहे. पूज्य बाबा बेलसरे म्हणत, “नाम घेताना श्रीमहाराजांच्या – भगवंताच्या अस्तित्त्वाची जाणीव होते की नाही ही परीक्षा साधकाने करत रहावे. जर ही जाणीव झाली नाही तर त्याबद्दल वाईट वाटावे.” कारण, नामस्मरणाचा मुख्य हेतूच भगवंताच्या अथवा भगवत्स्वरुप सद्गुरूंच्या अस्तित्त्वाची जाणीव होणे हा आहे; ज्यायोगे जीवाचा अहंकार गलितगात्र होईल. शरणागतीचे बीज या अस्तित्वाच्या जाणीवेत आहे आणि म्हणून श्रीमहाराज नामाचा इतका आग्रह करतात, कारण शरणागतीशिवाय ब्रह्मदर्शन संभवत नाही.

वचनाच्या शेवटच्या ओळीत श्रीमहाराज पुन्हा खरी सत्संगति कोणती हे आम्हाला पटवून देत आहेत. त्यांचे म्हणणे आहे, की देहाने सत्संगती लाभणे हे उत्तमच यात शंका नाही. परंतु, देहाची सत्संगत मिळणे इतके सोपे नाही. मिळाली तरी ती चोवीस तास मिळणे अशक्य आहे. मिळाली तरी त्यावर (म्हणजे संतावर) आजच्या काळात विश्वास बसणे सोपे नाही. म्हणून महाराज देहाने सत्संगती पेक्षाही सद्विचारांची संगत महत्त्वाची मानतात. कारण सध्या आम्हाला जर कुणी त्रस्त केलेले असेल तर ते म्हणजे आमच्या मनीचे विविध विचार. त्याजागी जर सततच्या नामानुसंधानाने, सद्ग्रंथ वाचन, श्रवणाने आम्ही सद्विचार स्थिर करू शकलो, तर त्या विचारांची संगती आमची चिंतनाची दिशाच बदलते व आमची सत्याकडे म्हणजेच परमात्म्याकडे वाटचाल सुगम होते. मात्र श्रीमहाराजांना आम्ही सांसारिक गोष्टीत व दृश्यात किती मनाने अडकलेलो आहोत याची कल्पना आहे. माऊलीच ती. तिलाच आपल्या लेकरांची काळजी. म्हणून आमच्या मनात सद्विचार रुजणे आजच्या घडीला अवघड होईल हा विचार करून, तरी देखील आम्हाला उद्धाराचे मार्ग सापडावा यासाठी सर्व संतांची संगती आणि सद्विचारांची संगती यांनी अनुस्यूत असे नाम त्यांनी आम्हाला दिले. आणि सांगितले, “नामातच सत्संगती आहे.” कारण सर्व संत आणि सद्विचार यांचे वास्तव्यच नामात आहे.

आणि हे लक्षात येण्यासाठी आजचे वचन आम्ही अंगिकारणे अत्यंत आवश्यक आहे. विषय आणि त्यांची ऊर्मी ही केवळ आमच्या मनात आहे पण मन हे केवळ एक इंद्रिय आहे व मी मन नाही या भावनेत दृढ राहून त्याबद्दल जास्त उहापोह न करता जो शाश्वत सत्य अशा नामाला धरेल त्यालाच नामामध्ये गुरुकृपेने भगवत्दर्शन संभवेल!

||श्रीनाम समर्थ||

Wednesday, August 19, 2020

श्री ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराजांचे बोधवचन क्र ६८ --


श्रीमहाराजांचे बोधवचन क्र ६८ –

आज भगवंत एका टोकाला आणि आपण दुसऱ्या टोकाला आहोत.त्याच्या ‘नामाने’ त्याला जवळ जवळ आणावा. आपल्याला जितका आपल्या देहाचा विसर पडेल, तितका भगवंत जवळ येईल. भगवंताच्या नामातच संतसंगति आहे.

श्रीराम!
दृश्य हा अदृश्य ईश्वराचाच विलास असला तरी देखील दृश्य हे नश्वर आहे, दृश्याला क्षयाची बाधा जडलेली आहे. त्यामुळे जोवर दृश्याचा संपूर्ण निरास होत नाही, तोवर अदृश्य ईश्वराचा साक्षात्कार संभवत नाही. म्हणूनच आजच्या वचनात श्रीमहाराज म्हणताहेत, ‘आज भगवंत एका टोकाला आणि आपण दुसऱ्या टोकाला आहोत.’ आज सकाळी उठल्यापासून रात्री झोपेपर्यंत आम्ही केवळ देहविचार करत असू, तर देव-विचार संभवत नाही. सकाळी उठल्यावर प्रप्रथम देहाला चहा मागणारे आम्ही दिवसभर या देह आणि मनाला अग्रभागी ठेवूनच आमची दिनचर्या आखतो. अगदी साधन करताना देखील ‘मी’ सुटणे महा कर्मकठीण आहे याचा अनुभव खऱ्या साधकांना येतो. ‘माझे नामस्मरण’, ‘माझे सद्गुरू’, ‘माझ्या साधनातल्या पायऱ्या’, ‘मला साक्षात्कार व्हावा’, ‘माझे भगवंत प्रेम’ यासारख्या मनात उमटणाऱ्या वाक्यांवरून हे स्पष्ट होते की आम्ही परमार्थ देखील दृश्याच्या आणि अहंकाराच्या तराजूवर तोलतो. आणि त्यामुळेच देहाची आणि देवाची दोन ध्रुवांवर असलेली टोके कधी जुळतच नाहीत व समाधान मिळत नाही.

परमार्थ करायचा आहे, भगवंत आपलासा करायचा आहे पण आम्ही आमच्या दैनंदिनी मध्ये, मनामध्ये काहीही बदल करणार नाही या मनोवृत्तीला परमार्थातील disparity म्हणतात. अशी ही विरोधात्मक समजूत होण्याचे मुख्य कारण म्हणजे आम्हाला परमार्थ हा बहुतांशी बाहेरच्या कर्मकांडासारखा वाटतो आणि त्यामुळे परमार्थ म्हणजे आम्हाला काहीतरी विशिष्ट क्रिया करायची आहे अशी आमची भावना होते. परंतु, श्रीमहाराज म्हणतात, ‘परमार्थ हा संपूर्णपणे आतला आहे. बाहेरच्या परमार्थाची किंमत किती? तर आतला परमार्थ वाढीस लागेल, त्याला पोषक होईल, तेवढीच बाह्य परमार्थाची किंमत होय.’ आणि म्हणूनच ते म्हणतात, ‘प्रवाहाच्या विरुद्ध दिशेने पोहणे म्हणजे परमार्थ.’

आता प्रवाह किती तीव्र आहे यावरून विरुद्ध दिशेला पोहणे अवघड की सोपे हे ठरते आणि आजच्या जबरदस्त बाह्याकर्षणाच्या जगात प्रवाह किती तीव्र आहे याची जाणीव प्रत्येक साधकाला दर दिवशी होते यात शंका नाही. सबंध जग एका तीव्र प्रवाहाच्या भोवऱ्यात अडकून गरगर फिरते आहे. त्याचा जोर इतका विलक्षण आहे की मी मी म्हणणाऱ्या साधकाचा तो कधी बळी घेईल सांगता येत नाही. अशा प्रवाहाच्या विरुद्ध पोहायचे म्हणजे त्यातून आम्हाला ओढून काढणारे साधन तितकेच मजबूत हवे आणि त्याच साधनाला सद्गुरू ‘नाम’ असे म्हणतात! जर ‘कालाय तस्मै नमः’ असा पळपुटेपणा करायचा नसेल, तर केवळ या नामाला घट्ट धरलेला साधकच तरून जाऊ शकतो. संतश्रेष्ठ एकनाथ महाराज म्हणतातच,
“सदा सर्वकाळ मनी वसे देव| तेथे नाही भेव कळिकाळाचा||
काळ तो पुढारी जोडितसे हात| मुखी नाम गात तयापुढे||”
-- ज्याच्या मनात सदैव भगवंताचा वास आहे, केवळ त्यालाच कळिकाळाचे भय नाही. तो काळच अशा भक्तापुढे हात जोडून उभा असतो आणि त्याच्या समोर हा मुखाने नाम गात असतो!

त्यामुळे आज श्रीमहाराज सांगतात, नामाने त्या भगवंताला जवळ जवळ आणावे. असे वर्णन आहे की, ब्रह्मदेवाने सर्व वेदांचे तीन वेळा मंथन केले आणि त्यातून जे सार निघाले तीच भगवंताची भक्ति आणि ती भक्ति साधण्याचे साधन, नाम! मग नाम तर आम्ही स्मरत आहोत, तरीही भगवंत आम्हाला का भेटत नाही याचे उत्तर देखील श्रीमहाराज आम्हाला आज देत आहेत. भगवंत जवळ जवळ येत आहे याची खूण कोणती? तर प्रपंचाच्या गदारोळात देखील नामाचे यत्किंचितही विस्मरण न होणे व त्याच्या स्मरणात संसार फिका वाटू लागणे. संसार करत असतानाच त्यातली आसक्ति कमी कमी होत जाणे. आणि हे होण्यासाठी आजच्या वचनात जे साधन श्रीमहाराज आम्हाला सांगताहेत, ते म्हणजे, देहाचे विस्मरण. एखाद्या गोष्टीचे विस्मरण केव्हा होते? १) जेव्हा त्या गोष्टीचे महत्त्व मनातून कमी होते तेव्हा व २) त्यापेक्षा महत्त्वाची गोष्ट मनामध्ये रुजते तेव्हा. दोन्हीपैकी कोणत्याही मार्गाने गेलो तरी आपण देवापाशी पोहोचू. देहाचे नश्वरत्व लक्षात यायला हवे किंवा नामाचे महत्त्व मनात ठसायला हवे. खरे बघू जाता, या एकाच नाण्याच्या दोन बाजू आहेत. परंतु, नामात महत्त्वबुद्धी होण्याचा मार्ग हा संतांनी नावाजलेला, अनुभवलेला राजमार्ग आहे.

पण साधकावस्थेत दोनही बाजूंनी मनावर घाला घालणे आवश्यक असते असे सर्व संत सांगतात. म्हणजेच मुख्य नाम साधन सुरु असतानाच आमचा आचार, विचार, आहार याकडे देखील साधकाने लक्ष पुरवणे आवश्यक आहे. काहीही कधीही कितीही खाऊ आणि मग नाम घेऊ म्हणेल त्याचे साधन कधीही स्थिरावणार नाही असा सर्व संतांचा अनुभव आहे. सद्ग्रंथ वाचन – संत-श्रवण हे करत असतानाच आम्ही विविध प्रकारच्या मनोरंजनात देखील मन रमवू म्हणेल त्याचे मन साधनेसाठी परिशुद्ध होणे शक्यच नाही. आम्ही जगातल्या सर्व प्रकारच्या लौकिक (जरूर नसलेल्या) कार्यक्रमात भाग घेऊच आणि तरीही नाम जपू म्हणणाऱ्याच्या मनात नामाचे काहूर न माजता ज्या भेटीगाठी झाल्या त्याचेच काहूर माजणार हे निश्चित! त्यामुळे “जेणे विठ्ठल मात्रा घ्यावी तेणे पथ्येही सांभाळावी’ हेच खरे. पूज्य बाबा बेलसरे म्हणायचे, “तुम्हाला परमार्थ करायचा आहे ना, मग हे केले पाहिजे, त्याशिवाय जमणार नाही.” कोणताही प्रकारचे false justification हेच आम्हाला परमार्थ मार्गावर तोंडघशी पाडते. त्यामुळे ज्या ज्या गोष्टींद्वारे आमच्या ‘मी देहच आहे’ या भ्रमित अवस्थेला खतपाणी मिळते ते शक्य तितके टाळणे हे नाम साधनेसोबत आवश्यक आहे असे श्रीमहाराज सांगताहेत. म्हणजे मग आमचे बाहेर धावणारे मन गोळा होऊन आतमध्ये रमेल. जितके आम्ही आतमध्ये रमू, तितकी तितकी देहाची सुखबुद्धी कमी कमी होईल आणि जितकी देहबुद्धी कमी होईल, तितके तितके आम्ही भगवंताच्या सन्निध जात आहोत या अनुभूतीप्रत साधक जाईल. हे जितके होईल, तितका आणि त्या प्रतीचा अनुभव साधकाला येईल की, नामातच संत संगती आहे. कुठे राहतात सर्व संत? कुठे राहतात संतांचे अग्रणी हनुमंत? केवळ भगवंताच्या नामात त्यांची वस्ती आहे. बाहेरून संत संग मिळणे उत्तमच यात शंका नाही पण बाहेरच्या संत संगाचे फलित हेच की ज्यात ते संत रमले त्यात आम्ही रमून त्यांच्याशी तादात्म्य पावणे आणि हे ज्याला साधले त्याला नामातच संत दर्शन आणि भगवंत दर्शन एकत्वाने होईल यात शंका नाही!

||श्रीनाम समर्थ||

Monday, August 17, 2020

श्री ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराजांचे बोधवचन क्र ६७ --


श्रीमहाराजांचे बोधवचन क्र ६७ –

भगवंताच्या नामात मोबदल्याची अपेक्षा नाही, म्हणून ते पूर्ण आहे.

श्रीराम!
अपूर्णपणाचे लक्षण काय? माझ्यात किंवा माझ्याकडे जे काही आहे त्यात काहीतरी कमी आहे असे वाटणे म्हणजे अपूर्णपण. हे मायेचे लक्षण आहे. माणसाची बाहेरच्या बाजूला जी काही धाव आहे त्यामागे हे कारण आहे. प्रत्येक इंद्रियाचा आहार हा बाहेरचा आहे व तो मिळाला तरच ते इंद्रिय तृप्त होईल हा भ्रम या जगाच्या व्यापाला कारणीभूत आहे. या जगाच्या व्यवहारात त्याचे स्थान आहेच. आज ज्या काही विविध गोष्टींचे शोध लागून आमचे जीवन सुसह्य झालेले आहे त्याचा उगम या अपूर्णपणातच आहे. जर मनुष्याला कोणत्याही गोष्टीची जरूर भासलीच नसती तर मग काही शोधण्याचे कष्ट कुणी घेतलेच नसते. व्यवहार दृष्ट्या त्यामुळे आम्हाला वेळ आणि शक्ती वाचवण्यासाठी बऱ्यापैकी फायदा झालेला आहे हे देखील आपण नाकारू शकत नाही. मात्र जशी कोणत्याही गोष्टीला दुसरी बाजू असते तशी या अपूर्णपणातून आलेल्या विविध गोष्टींच्या कामनेला दुसरी बाजू अशी आहे की, कितीही वस्तु - व्यक्ती - ऐश्वर्य लाभले तरी देखील त्या गोष्टीही अपूर्णच असल्यामुळे मनुष्याला समाधान लाभत नाही. आमच्यापैकी प्रत्येकाचा हा अनुभव आहे की, सर्व आहे पण तरी देखील काहीतरी कमी आहे. ते कमी काय आहे हे न कळल्यामुळे अजून काही गोष्टी गोळा करण्याच्या मागे आम्ही लागतो आणि पुन्हा त्याच जाळ्यात गुरफटतो.

या दुष्टचक्राची जाणीव सद्गुरूंपाशी आल्यानंतर होते.
“भूमि जीव संकुल रहे गए सरद रितु पाइ|
सदगुर मिले जाहि जिमि संसय भ्रम सामुदाइ||”
--वर्षाऋतूमुळे पृथ्वीवर जे अनेक जीवजंतू भरलेले असतात, ते जीव शरद ऋतू आल्यावर नष्ट होतात. त्याप्रमाणे, सद्गुरू लाभल्यावर संशय व भ्रम यांचे समूह नष्ट होतात.
गुरु सांगतात, तुला जे हवे आहे ते बाहेर कुठे मिळणार नाही, ते तुझ्या आतच आहे आणि ते एकदा मिळवलेस की अजून काही मिळवावेसे तुला वाटणार नाही. आणि ते कसे मिळवायचे याचा मार्ग मी तुला सांगतो. असे सांगून सद्गुरू आम्हाला नाम देतात आणि सांगतात, तुझ्या कर्मबंधनातून सुटण्याची वेळ जवळ आलेली आहे आणि त्यामुळेच तू नामधारक बनलेला आहेस. मात्र त्याचे महत्त्व जाणून नीतीच्या मार्गाने चालून तू साधनात रहा. जे दिलेले साधन आहे ते कसे आहे? ते महाराज आजच्या वचनात सांगत आहेत की, नामात मोबदल्याची अपेक्षा नाही, म्हणून ते पूर्ण आहे.

वेदांताच्या भाषेत एक सहज सोपा सिद्धांत आहे. त्या सिद्धांतानुसार कोणतीही गोष्ट जी कशावरही अवलंबून आहे ती मिथ्या आहे – Everything that depends upon something is a fallacy. म्हणजेच वर बघितलेल्या सर्व गोष्टी ज्या अपूर्ण आहेत त्या कशामुळे अपूर्ण आहेत? तर त्या स्वतंत्र नाहीत, कशावर तरी अवलंबून आहेत त्यामुळे! जेव्हा मनुष्य एखादी गोष्ट करतो – कोणतेही कर्म करतो, तेव्हा त्या कर्माच्या बदल्यात कोणत्यातरी फळाची – result ची अपेक्षा ठेवूनच ते कर्म केले जाते. मात्र सद्गुरूंनी दिलेले नाम हे सर्वतोपरी स्वतंत्र असे साधन आहे. ते कशावरही अवलंबून नाही. ते पूर्णपणे उपाधिरहित असे साधन आहे. नाम घेण्याला स्थळ, काळ, निमित्त, परिस्थती, धर्म, जात, लिंग, वय कशाचेच बंधन नाही.

नाम आणि नामी यांमध्ये भेद नाही असे जे सत्तत्त्व सांगितले जाते, त्यामुळे प्रभू रामचंद्रांच्या सगुण अवतारातील सर्व गुण त्यांच्या नामामध्ये देखील विराजमान आहेत. प्रभूंचा सर्वोच्च सहज गुण म्हणजे, “अकारण करुणा”. या करुणेपोटी ते कोणत्याही भावाने – अगदी नकारात्मक भावाने – त्यांच्याकडे वळलेल्यास उत्तम गति देतात. वाली, रावण, पूतना, कंस, शिशुपाल... किती किती उदाहरणे द्यावीत? असे जर आहे, तर मग जो मनापासून त्यांच्यावरच्या भक्तीने नाम स्मरतो, त्याला समाधानाची प्राप्ती सहजीच होणार नाही का? तुलसीदास म्हणतात,
राम राम कहि जे जमुहाहीं|
तिन्हहि न पाप पुंज समुहाहीं||
-- जे लोक जांभई देताना राम-राम म्हणतात, म्हणजेच आळसामध्ये का होईना, ज्यांच्या मुखातून रामनाम येते, त्यांच्यासमोर पापाचे समूह फिरकत नाहीत.
या एकाच गुणामधून राम नामाची अकारण करुणा दिसून येते. समदर्शी प्रभूंचे समदर्शी नाम!

अपूर्ण वस्तूमध्ये आणि पूर्ण वस्तूमध्ये फरक हा, की जी वस्तु अपूर्ण असते, ती मिळाल्यावर अपूर्ण जीव पूर्ण होऊ शकत नाही. मात्र पूर्ण वस्तु – नाम – मिळाल्यावर मात्र अपूर्ण जीव हळूहळू त्या पूर्णतेचे गुण साधतो आणि म्हणूनच तो देखील अपेक्षारहित नामासारखाच निष्काम होतो! हीच नामाची विशेषता होय!

असे जर आहे, तर मग इतर सर्व आधारांचा, आश्रयांचा, साधनांचा त्याग करून केवळ नामाचा अखंड निदिध्यास लागलेल्या साधकाबद्दल काय सांगावे? रघुनाथ म्हणतातच,
“समदरसी मोहि कह सब कोऊ|
सेवक प्रिय अनन्यगति सोऊ||”
-- सर्वजण मला समदर्शी म्हणतात. मला कोणी प्रिय किंवा अप्रिय नाही. परंतु, मला भक्त फार आवडतो, कारण त्याला माझ्याशिवाय दुसऱ्या कुणाचा आधार नसतो!

असा ज्याने सर्वतोपरी नामाचाच आधार घेतला तो देखील मोबदला रहित नामासारखा पूर्णकाम बनतो!

||श्रीनाम समर्थ||