नामाबद्दल
संशय किंवा विकल्प आले तरी ते तसेच आग्रहाने घ्यावे; सर्व संशय आपोआप नाहीसे
होतील.
श्रीराम!
श्रीमहाराज एके ठिकाणी
म्हणतात, प्रवाहाच्या विरुद्ध दिशेने पोहणे म्हणजे साधक होणे. परंतु विरुद्ध
दिशेला जाण्याचे नुसते मनात आले तरी देखील आम्हा सामान्यांना त्याची भीती वाटते.
कारण अनेक जन्मातीलच नव्हे तर याही जन्मातील आमचे पूर्वीचे संस्कार. लहान मूल
जेव्हा जन्माला येते तेव्हा ते अत्यंत निरागस असते. तरी देखील ‘माझी’ आई हा भाव
पहिल्या दुग्धपानापासून, त्याच्याही आधीपासून त्याच्या मनावर बिंबतो. या सात्विक
भावातून पुढे पुढे सर्वच बाबतीत ‘मी आणि माझे’ या वावटळीत सापडून या देहाशी घनिष्ठ
संबंध आम्ही प्रस्थापित करतो. आणि याच गोष्टीला mass appeal असल्यामुळे त्यातच
आयुष्याची इतिकर्तव्यता समजत भरभर आयुष्य निघून जाते. ही अशी आमच्या मनाची दिशा
असताना जेव्हा काही पूर्वसंस्कारांमुळे सद्गुरू संपर्कात येतात, जेव्हा
त्यांच्याकडून अनंत सत्ता आणि शक्ती असलेले नाम मिळते, तेव्हा ‘आता मला नामाचा
अभ्यास सुरु केला पाहिजे’ असे मनापासून वाटून देखील ते घडत नाही. याची अनेक कारणे
आहेत. पूज्य बाबा आपल्या आनंद साधनेत पहिली अडचण सांगतात – आळस. कारण आम्हाला सतत
काहीतरी शरीराने करण्याची सवय असते. अगदी शाळेच्या अभ्यासापासून ते ऑफिस मधल्या
कामापर्यंत! त्यामुळे काहीही न करता नुसते नाम घ्यायचे याचा आम्हाला कंटाळा येतो.
मात्र हळूहळू सवयीने तो कमीही होतो, कारण नाम घेतल्यावर आंतरिक शांति जाणवते हा
अनुभव अगदी सुरुवातीला देखील बहुतेकांना येतोच.
मात्र यापेक्षा मोठी अडचण
पुढे येते, जेव्हा आम्हाला नामाच्या परिणामाबद्दल साशंकता निर्माण होते. पहिली
गोष्ट ही की नाम घेऊन काय साधायचे आहे याची संपूर्ण कल्पना आम्हाला नसते व दुसरी
ही की फक्त नामाने काय होणार; त्यासोबत अजूनही काहीतरी ‘साधन’ केले पाहिजे हा विकल्प
वरचेवर येऊ लागतो. श्रीमहाराज आज
आम्हाला याच गोष्टीबद्दल काय करावे हे सांगत आहेत. एकीकडे श्रीमहाराज म्हणतात,
बुद्धिभेद हा परमार्थात सर्वात जास्त हानी करतो. आमची बुद्धी खूप जास्त चंचल आहे.
त्यामुळे ज्या बुद्धीचा अंकुश मनावर बसायचा ती बुद्धीच चंचल झाल्यामुळे दाही दिशांना
धावणारे मन लगेच भ्रमित होते. याचे कारण ज्या अध्यात्मिक शक्तीने नाम सुगम रीतीने
चालायचे त्या अध्यात्मिक शक्तीची कमतरता आणि सद्गुरूंच्या प्रति पूर्ण निष्ठेचा
अभाव!
श्रीमहाराज म्हणतात, हरकत
नाही. संशय तुम्हाला त्रास देतो ना, मग नाम घेत घेत संशय बाळगा. काय जबरदस्त नामनिष्ठा
आहे ही! पूज्य बाबा नेहमी म्हणायचे, सगळ्या विकल्पांचे, संशयाचे एकच कारण, आमचे
नाम कमी पडते! म्हणून आजच्या वचनात महाराज म्हणतात, “आग्रहाने नाम घ्या!”
वृंदावन चे एक थोर संत पूज्य विनोद बिहारी बाबाजी म्हणतात, “ऐसा तो बहुत बार होता
है; बुद्धि पूरी की
पूरी भ्रष्ट हो जाती है| फिर चाहे वो कुसंग से हो या फिर गुरू पर दृढ़ श्रद्धा ना
होने से| नाम का रटन करने को मन करता ही नहीं, क्यूँ की हमें आदत नहीं है ना!
लेकिन डरना नहीं| भागना नहीं या निरुत्साह मत होना| जब भी ऐसा लगे तो और जोर से और
आग्रहपूर्वक नाम जपना चाहिए| मन को डांटना चाहिए की मैं तुम्हारी सुनूंगा नहीं|” अशा रीतीने जो नामाचा
अभ्यास करतो, त्याचे मन हळूहळू त्याला वश होते व नामात गोडी निर्माण होते.
अजून एक मोठी गोष्ट आज
महाराज सांगत आहेत ती म्हणजे, जो आग्रहाने नाम जपेल त्याच्यावर त्याच्या प्रयत्नांमुळे
गुरुकृपा लवकर होईल. जो साधन भावपूर्वक प्रयत्न करतो, त्या भावनेत खूप जास्त
सामर्थ्य असते. भावना सगुण ब्रह्माला हलवते! आवश्यकता आहे ती फक्त एकाच गोष्टीची,
ती म्हणजे आमच्या मनात येणाऱ्या विकल्पांबद्दल जागरूक होऊन त्यांना बळी पडू नये
यासाठी सद्गुरूंची कळवळून प्रार्थना
करणे! भावपूर्वक प्रार्थना, पुन्हा कुसंगाला बळी न पडणे व सद्गुरूंच्या संनिध आहोत
या दृढ भावात राहून आग्रहाने नाम जपणे एवढे जर आपण करू शकलो तर सद्गुरू कृपेने
सर्व संशय विकल्प नाहीसे होऊन शुद्ध अनावलंब आणि प्रेमपूर्वक नामस्मरण निश्चित
होईल!
म्हणूनच पूज्य बाबा
बेलसरे नामचंद्रिकेत म्हणतात,
“सर्वान् वादान् परित्यज्य
नामवादं समाचरेत्|
तृप्ताः नामरसं पीत्वा
धन्यास्ते विरला जनाः||”
||श्रीनाम
समर्थ||
Sri ram jay ram jay jay ram 🙏
ReplyDeleteजानकी जीवन स्मरण जय जय राम
ReplyDelete