Sunday, April 26, 2020

श्री ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराजांचे बोधवचन क्र १० --


श्रीमहाराजांचे बोधवचन क्र १० --

तुकारामबुवांची वाचा त्यांना अनावर झाली, ती सारखी नाम घेऊ लागली. याचा अर्थ असा की त्यांच्या कल्पनेच्या बाहेर नाम येऊ लागले. आपल्या शक्तीच्या बाहेर कार्य होणे ही भगवंताची कृपा होय. गाडी उतरंडीला लागली की जशी अति वेगात येते आणि आवरत नाही, तसे हे आहे.

श्रीराम!
तुकाराम महाराज अभंगात म्हणतात, “माझी मज झाली अनावर वाचा| छंद या नामाचा घेतलासे||” या एका ओळीतच तुकोबा आपल्याला नाम साधनेचे सार सांगत आहेत. “नामाचा छंद” हे अलीकडेही आहे आणि पलीकडेही. म्हणजे काय? तर, जो सद्गुरूंनी दिल्यानंतर मनापासून “नामाचा छंद जोपासतो”, त्याच्यावर सद्गुरू कृपा होऊन त्याला “नामाचा छंद लागतो!”. म्हणूनच नाम हे साधनही आहे आणि साध्यही! भगवंतांनी दर्शन दिल्यावर बाळ ध्रुव म्हणाला, तुझ्या सगुण दर्शनापेक्षाही मला नामातच आनंद आहे, तेच मला द्यावे!

खरोखर नाम काय आहे, हे सांगता येणे अत्यंत कठीण आहे, कारण जसा परमात्मा अनिर्वचनीय, तसेच त्याचे नाम देखील ‘अनिर्वचनीयं प्रेमस्वरूपम्’ असे आहे. केवळ अनुभवसिद्ध संतच नामाचे महत्त्व जाणतात. एखादा साधक जरी काही लौकिक आशेपोटी नाम साधनेला लागला; परंतु जर तो मनापासून नाम घेऊ लागला, तर त्या नामाची शक्ती अशी आहे की तो लवकरच त्या लौकिक हव्यासाच्या कचाट्यातून मुक्त होईल व नामातच त्याला सर्व सुख आणि समाधान लाभू लागेल. नामाची शक्ती काहीही करण्यास समर्थ असली तरी त्याचा मुख्य परिणाम हा संसार आसक्तीतून सुटका आणि भगवंताचे प्रेम हा आहे आणि याच प्रवासात साधकास ही ओळख पटू लागते की भगवंताचे प्रेम हेच त्याच्या नामाचे प्रेम आहे, दोन्हीत भेद नाही. हे झाले, म्हणजे मग त्यास नाम घ्यावे लागत नाही, नाम थांबत नाही!

पूज्य गुरुदेव रानडेना एका पीठाचे शंकराचार्य भेटण्यासाठी आले होते. दोघांचे वेदांताबद्दल बोलणे झाले. त्यांची जायची वेळ झाली; परंतु या थोर नामसिद्ध संताशी अजून बोलावे त्यांना वाटू लागले आणि म्हणून त्यांनी उद्या पुन्हा भेटायला जमेल का असे विचारताच गुरुदेव म्हणाले, “नामाने सोडले तर येईन!” म्हणजे ते इतके नामाच्या ताब्यात गेले होते की नामाने त्यांना व्यापून टाकले होते. अनावर नाम झाल्यावर साधक नामाच्या ताब्यात जातो. सुरुवातीला आपण नाम घेतो, नेमास केव्हा बसायचे हे आपल्या ताब्यात असते (तसे आपण समजतो); पण गुरुकृपेने जसजसे नाम वाढू लागते, तसतसे साधक नामाच्या आधीन होतो. गुरुदेवच एके ठिकाणी म्हणतात, “न कळे दिवसराती| अखंड लागलीसे ज्योती!!” ही अवस्था म्हणजे नामाच्या ताब्यात जाऊन नाम अनावर होण्याची तुकाराम महाराजांची अवस्था!

वरच्या वचनात याची गोड आणि यथार्थ सांगड महाराजांनी भगवंताच्या कृपेशी घातली आहे. खरोखर नामात प्रेम येणे हे कृपेशिवाय अशक्य! ही कृपा मात्र साधकाच्या निश्चयात्मिका बुद्धीशी निगडीत असते. जे साधक, “ महाराजांची कृपा असेल तरच नाम होणार; अजून कृपा दिसत नाही” अशी पळवाट काढतात, त्यांना महाराज म्हणत, “माझी कृपा आहेच; आता तुम्हीच तुमच्यावर कृपा करा”; म्हणजे करण्याचा निश्चय करून प्रयत्नाला लागा. कृपा ही निश्चितच यत्नसापेक्ष आहे. निदान सुरुवातीच्या काळात तरी हा नियम किंवा विश्वास साधकाला प्रयत्नांची शिकस्त करण्यास प्रवृत्त करतो. मात्र जेव्हा सद्गुरू कृपेने असे अनावर नाम येऊ लागते, तेव्हा मात्र त्याला खरी जाणीव होते, की माझ्या मुखात येणाऱ्या पहिल्या नामापासून होती ती केवळ कृपा! त्या कृपेची जाणीव मला नव्हती म्हणून मी माझ्या बळावर, कर्तृत्वावर भरोसा ठेवून होतो. पण आता मात्र त्याला त्यांच्या कृपेची अनन्य जाणीव होते व तो संपूर्ण शरणागत होतो. “मी नाम घेतो” ही भावनाच कुठल्या कुठे लोपून जाते आणि साधकाच्या मुख, मस्तक, हृदय, एवढेच काय पण शरीराच्या रोमारोमातून नामाची स्पंदने जाणवतात!

अशी ही गाडी उतरंडीला लागली म्हणजे या जन्माचे काम झाले! संपूर्ण शरणागत असल्यामुळे ‘मला पारमार्थिक आयुष्यात देखील अजून काही मिळवायचे आहे’ हा भावच साधकाचा पुसला जातो व प्रत्येक नामागणिक तो स्वानंदात निमग्न होतो! म्हणून याच अभंगात अगोदर तुकाराम महाराज म्हणतात, “विषयी विसर पडला निःशेष| अंगी ब्रह्मरस ठसावला||” काय अनुभव आहे नामाचा हा! अजून एकीकडे तुकाराम महाराज म्हणतात, “अनुहादि गुंतलो, नेणे बाह्यरंग| वृत्ति येता मग बळ लागे||” हा जो नामाचा प्रवाह सुरु झाला, त्याने त्या नामाच्या नादातच गुंतल्यामुळे बाहेरचे भान नाहीसे झाले; किंबहुना बाह्य वृत्ति येण्यासाठी मला जोर लावावा लागतो आहे. म्हणजे आता जसे आम्हाला दृश्य जगातून नामाकडे लक्ष देण्यासाठी जोर लावावा लागतो, तसे त्यांना नामाकडून दृश्य जगाकडे लक्ष देण्यासाठी जोर लावावा लागतो; ही आहे नामाची किमया!

संत म्हणतात, हे कुणालाही अभ्यासाने शक्य आहे. कुणीही असा विचार करण्याची जरूर नाही की ‘ते थोर, आम्ही सामान्य!’ एकदा सद्गुरूंनी आपले म्हटल्यावर कुणीही सामान्य नाही; सामान्य आहे ती आमची देहबुद्धी व आमची नकारात्मकता. या दोन्हीतून सुटण्याचा मार्ग देखील नामस्मरण व सत्संग हाच आहे. पूज्य ब्रह्मानंद महाराजांचे एक वचन अतिशय उत्तेजन देणारे आहे. ते म्हणतात, “नाम हे वेलीसारखे आहे. वेल जशी भरभर वाढते, तसे एकदा साधक नामाला खऱ्या अर्थाने लागला की नाम त्या वेलीसारखे भरभर वाढते!” केवळ या संत वचनांवर विश्वास ठेवून नामाला लागले पाहिजे; जो असे करील त्याला नामाने आपल्या आयुष्याचे कसे परिवर्तन झाले हे सांगावे लागणार नाही; ते परिवर्तन त्याच्या आत व बाहेर शांति, आनंद आणि समाधान या रूपात नांदेल!  

||श्रीनाम समर्थ||

4 comments:

  1. जानकी जीवन स्मरण जय जय राम

    ReplyDelete
  2. अहाहा! कल्पनेच्या बाहेर नाम येण्याचा काय अनुभव असेल! खरोखर, बुद्धी नामासाठी निश्चयात्मक झाल्याशिवाय कृपेची जाणीव होणारच नाही. ती जाणीव झाली की मग नामाचा वेलू गगनावरी जाण्याचा श्रीगणेशा होईल. तो आपल्या सर्वांचा होवो, ही आजच्या पर्वकाळात सद्गुरूचरणी प्रार्थना! 🙏🌿🙏

    ReplyDelete
  3. Wonderful write up! The naama is lovr, peace and joy. It is the sound which leads us to silence. It is the naama which connects our mind to our Self. It is the naama which pervades us all. We are all made up of atoms. But really we are made up that infinite space between the atoms. The atoms and subatomic particles are actually having a lot of space, empty space. Naama retracts our mind from earth, water, fire and air. And takes us to that space element (aakash) closes to divinity.
    It's the grace of Shri Gondavalekar Maharaj and all other Gurus who keep us afloat. Love, peace, grace and Joy.
    Shree Ram Jai Ram Jai Jai Ram.

    ReplyDelete
  4. श्रीराम जयराम जय जय राम।

    ReplyDelete