Thursday, July 30, 2020

श्री ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराजांचे बोधवचन क्र ६२ --


श्रीमहाराजांचे बोधवचन क्र ६२ –

विद्वान आणि अडाणी, श्रीमंत आणि गरीब, सर्वांना नाम हे औषध सारखेच आहे. पण जो पथ्य सांभाळून औषध घेईल त्याला गुण लवकर येईल. नाम महौषधि आहे.

श्रीराम!
जे भेदरहित असते त्यालाच ज्ञान म्हणतात. समुद्रातली लाट एकदा गर्वाने फुगली. आपल्या समोरच्या लहान लाटेला म्हणाली, मी बघ किती मोठी आहे आणि तू इवलीशी! एवढ्यात तिच्याहून मोठी लाट तिला दिसली आणि मग तिचा मत्सर जागृत झाला. ती स्वतःच्या रूपाकडे बघू लागली व जळू लागली. असे वेगवेगळे मनाचे भाव तिच्यात उदय अस्त पावत असतानाच तिला अचानक किनारा दिसू लागला आणि ती आपल्या मृत्युच्या भीतीने घाबरली. आता माझा अंत होणार असे वाटून जेव्हा ती समुद्राला शरण आली तेव्हा समुद्र तिला म्हणाला, अगं, ती मोठी लाट, ही लहान लाट, तू आणि मी या सर्वात काय आहे? तिला उमजेना तेव्हा तो सागर म्हणाला, “पाणी” हेच ते एकमेव सत्य आहे जे तुझ्यात, त्यांच्यात आणि माझ्यात भरून आहे. आपले वेगळे अस्तित्व आहे कुठे पाण्याशिवाय? पाणी आहे म्हणून आपण आहोत आणि वर, खाली, आतमध्ये फक्त पाण्यानेच भरलेले आहोत; मग तुझ्यात आणि त्यांच्यात आणि माझ्यातही भेद राहिला कुठे? त्या लाटा म्हणजे आम्ही सगळे आणि तो समुद्र म्हणजे सद्गुरू, जे आम्हाला आमच्या एकत्वाची आठवण आणि अनुभव देतात. आमच्या आजाराचे मूळच या भेद्पूर्ण नजरेमध्ये आहे आणि त्यामुळेच आम्हाला आमच्या अंतिम अनुभूतीपर्यंत पोहोचवणारे, आमच्या आजारातून कायमचे मुक्त करणारे औषध असेच हवे जे भेदरहित आहे.

त्याच औषधाला श्रीमहाराज “नाम” असे म्हणतात. म्हणून आजच्या वचनात श्रीमहाराज आम्हाला नामाच्या भेदरहित संज्ञेची ओळख करून देताहेत. श्रीमंत गरीब, विद्वान अडाणी हे तर केवळ स्थूल भेद झाले. अगदी सूक्ष्म भेदांमध्ये देखील नामात फरक नाही. पूज्य बाबा नामचंद्रिकेत म्हणतात ना,
“सर्व साधन हीनानां नामैव आलम्बनं परम्|
सर्व साधन मुक्तानां नामैव आलम्बनं पुनः||”
-- महाराज जे म्हणताहेत की नामसाधनेला कोणताही भेद नाही, तो स्थूल भेद तर आपण बघितला परंतु या वरच्या श्लोकात सांगितल्याप्रमाणे सूक्ष्म भेद देखील नाही. अजूनही साधनाला सुरुवात केलेली नाही त्याने तर नामाचा अवलंब करणे अत्यावश्यक आहे; परंतु, जो सर्व साधन करून मुक्कामी पोहोचला त्याला देखील नामाशिवाय गत्यंतर नाही – चैन पडणार नाही. अशा रीतीने सर्वार्थाने भेदरहित असेल तर ते नामसाधनच आहे, कारण नाम हेच ते परम सत्य साध्य आहे!

हे आम्हाला कळण्यासाठी श्रीमहाराज आजच्या वचनात आम्हाला हे देखील सांगताहेत की, जो पथ्य सांभाळून औषध घेईल, त्याला गुण लवकर येईल. आमचे तुकाराम महाराज म्हणतातच, “जेणे विठ्ठल मात्रा घ्यावी| तेणे पथ्येही सांभाळावी||” वैद्यक शास्त्रात कितीही औषध योजना करून गुण येईनासा झाला की डॉक्टर लोक maintaining cause काय आहे याचा शोध घेतात. म्हणजे, जर सर्दी झालेली असेल आणि औषध घेऊन पुन्हा तो रोगी पावसात जाऊन उभा राहिला तर त्याच्या बरे ना होण्यामागे पाऊस हा maintaining cause झाला. तद्वत, कितीही नाम घेऊन आम्हाला साधत नाही, मनाचे समाधान वर्धिष्णू होत नाही असे वाटत असेल तर कोणतातरी maintaining cause आहे जो त्या समाधानाच्या आड येतो आहे हे निश्चित असे श्रीमहाराज म्हणतात. आता हे ओळखायचे कसे? तर जे गुरूंना आवडते ते करणे, जे गुरूंना आवडत नाही ते टाळणे हेच पथ्य म्हणता येईल.

श्रीमहाराजांना काय आवडते आणि काय आवडत नाही याचा योग्य अभ्यास करून ते आचरणात आणणे हाच एक उपाय आहे.

तदनुसार –

या वरच्या गोष्टी जर आम्ही लक्षात ठेवल्या व साधन दृष्टीने त्यांचे महत्त्व ध्यानात घेतले तर आम्हाला आमच्या नामात एकाग्रता साधेल. मात्र साधन दृष्ट्या त्यांचे महत्त्व समजून घेणे म्हणजे खऱ्या अर्थाने श्रीमहाराज म्हणतात तसे “परमार्थ समजून” करणे होय. उदाहरणार्थ, सर्वांबरोबर गोड बोलणे आणि लोक जोडण्याची कला ही लौकिक दृष्टीने फक्त सांगितलेली नाही, तर आमच्या चित्तशुद्धीसाठी सांगितली आहे, ज्यायोगे चुकीच्या कर्माने आमचे मन दुषित न होता, लोकांबद्दल आमच्या व्यवहाराचा विचार आमच्या मनात गर्दी न करता आमचे लक्ष साधनाकडे लागावे. हे समजून ते आचरणे म्हणजे नामाचे पथ्य पाळणे होय. प्रामुख्याने साधनाच्या सुरुवातीच्या काळात या वरील गोष्टींचे महत्त्व जास्त आहे. एकदा साधन सुरु झाले, म्हणजे खऱ्या अर्थाने दोनच मुख्य पथ्ये श्रीमहाराज सांगतात, ती म्हणजे, अखंड भगवंताचे स्मरण टिकवणे आणि विस्मरण सावधपणे टाळणे. या अनुषंगाने ज्या गोष्टी कराव्या लागतील त्या पथ्यामधे मोडतात. म्हणजेच बहिर्मुखता कमी कमी होते आहे की नाही याकडे लक्ष ठेवणे आणि अंतर्मुखता वाढून नामात मन गोळा होते आहे की नाही याबद्दल जागरुकता. असे पथ्य पाळणाऱ्या साधकास नामाचा अनुभव – म्हणजे समाधान – लवकर साधेल असा विश्वास श्रीमहाराज आम्हाला देतात. त्यांचे म्हणणे हेच की नाम हीच ती महौषधी आहे जी तुम्हाला या अशाश्वत विश्वातून मनाने बाहेर काढून शाश्वताची ओढ लावेल आणि एकदा ओढ लागली की तेच नाम साध्यरूपाने – नामीच्या – अंतिम सत्याच्या - रूपाने तुमच्या हृदयाकाशी स्थित होईल!

||श्रीनाम समर्थ||

1 comment:

  1. श्रीराम! विधी ते पाळिती, निषेधा ते गाळीती ।
    खुप महत्त्वपूर्ण चिंतन! 🙏📿🙏

    ReplyDelete