Monday, July 20, 2020

श्री ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराजांचे बोधवचन क्र ६० --


श्रीमहाराजांचे बोधवचन क्र ६० –

भगवंताचे नाम हे औषध समजावे; भगवंताची प्राप्ति हे त्याचे फल; जरूर तेवढे करणे, म्हणजेच सांगितलेले तेवढेच करणे आणि जास्त न करणे, हे त्याचे अनुपान होय. औषध मात्र थेंबथेंब आणि सतत पोटात गेले पाहिजे!

श्रीराम!
संतश्रेष्ठ तुलसीदास रामचरितमानस मध्ये म्हणतात,
“जासु नाम भव भेषज हरन घोर त्रय सूल|
सो कृपाल मोहि तो पर सदा रहउ अनुकूल||”
-- ज्या प्रभू रामचंद्रांचे नाम हे भवताप निवारणारे सिद्ध औषध आहे, त्रिविध (आधिभौतिक, आधिदैविक, अध्यात्मिक) ताप दूर करणारे आहे, असे ते कृपाळू प्रभू आपल्यावर सदा सर्वदा अनुकूल राहोत.

समुद्रमंथनामध्ये जेव्हा धन्वंतरी प्रकट झाले, तेव्हा त्यांनी देवता आणि ऋषींना वेगवेगळी औषधी, रोगांचे निदान आणि उपचार यांबद्दल सांगितले. तेव्हा सर्व रोगांवर समान आणि सफलतापूर्वक काम करणाऱ्या महौषधी बद्दलही सांगितले. म्हणाले,
अच्युतानन्तगोविन्द नामोच्चारणभेषजात् |
नश्यन्ति सकला रोगाः सत्यं सत्यं वदाम्यहम् ||”

अशा रीतीने लौकिक व अलौकिक सर्व व्याधींवर रामनाम हेच औषध आहे असे सर्व संतांनी आपल्या दिव्य अनुभूतीने सांगितले. श्रीमहाराजांनी नेहमीच निष्काम भक्तीचे प्रतिपादन केले व म्हणाले, निष्कामतेशिवाय परमार्थ नाही. आणि त्यामुळेच आजच्या वचनात श्रीमहाराज म्हणतात, या औषधाचे फळ कोणते? तर – भगवंताची प्राप्ती. अनेक ठिकाणी श्रीमहाराजांनी सांगितले, अखंड समाधान हेच ईश्वर दर्शन. त्यामुळे या रामबाण औषधाचा परिणाम म्हणजे कोणत्याही परिस्थितीत अभंग राहणारे समाधान.

मात्र आजच्या वचनात श्रीमहाराजांनी साधक आणि बाधक गोष्टी थोडक्यात सांगितल्या. या गोष्टी समजून घेण्याचे मूळ कोणते? तर, “सदगुर बैद बचन बिस्वासा| संजम यह न बिषय कै आसा|| (संत तुलसीदास)” – सद्गुरू रूपी वैद्याच्या शब्दांवर विश्वास ठेवावा; विषयांची आशा धरू नये, हेच पथ्य आहे. आमची पंचाईत ही आहे की आम्हाला फक्त शरीराचा रोग तेवढाच दिसतो, मन बुद्धी चित्ताला जडलेला जन्मोजन्मीचा रोग न दिसल्यामुळे सद्गुरूंची कृपा आम्हाला फक्त तेव्हाच जाणवते जेव्हा कोणत्याही गोष्टीत या जगामध्ये आम्हाला सुख-समाधान लाभते. आजच्या घडीला जेव्हा सबंध जग विषाणूच्या विळख्यात अडकलेले आहे, तेव्हा देखील जर ती बाधा झाली नाही तर आमच्यावर महाराजांची कृपा या संकुचित विचारापर्यंत आम्ही येऊन ठेपतो. आजच्या वचनात रामनामाचा परिणाम सांगून श्रीमहाराज आम्हाला या तथाकथित गोष्टींपासून दूर राहण्यास सांगतात. अधल्यामधल्या कृपेबद्दल, परिणामांबद्दल आमचे श्रीमहाराज बोलतच नाहीत; किंवा कुणीही संत बोलत नाहीत. त्यांचे म्हणणे एकच. नश्वर गोष्टीत कमीजास्त व्हायचेच; जे शाश्वत आहे ते मिळवण्याचा प्रयत्न करा, तरच कायमचे समाधान लाभेल; नाही तर भयाच्या विळख्यातून तुम्ही कधीही बाहेर पडू शकणार नाही!

आजच्या वचनाची गंमत अशी की श्रीमहाराज आम्हाला “सांगतो तेवढेच करा” असे सरळ सरळ सांगत आहेत. ते अनेकदा म्हणत, “मी सांगतो त्यापेक्षा जास्त तरी करतात नाहीतर कमी तरी करतात; सांगतो तेवढेच कुणी करत नाही.” आजच्या वचनात यालाच श्रीमहाराज अनुपान - पथ्य म्हणताहेत. सद्गुरूंची वचने म्हणजे प्रत्यक्ष भगवंताची वचने. आपले पूज्य बाबा बेलसरे म्हणायचे, ‘त्यातला एक शब्द देखील इकडचा तिकडे होऊ नये; त्यासारखे पाप नाही!’ सद्गुरूंच्या वचनांची किंमत त्यांच्या अशा थोर सत्शिष्यानाच असते. शब्दच नव्हे तर प्रत्येक अक्षर त्यांच्यासाठी ‘चिदानंदमय सत्प्रकाश’ असतो. त्यामुळेच त्या वचनांना अक्षरशः पाळणे व त्यांवर चिंतन करणे या गोष्टी त्यांच्या साधनेला बळकटी आणतात.

पूज्य कुर्तकोटी म्हणायचे, श्रीमहाराज प्रत्यक्ष वेदांत बोलायचे; मात्र ते इतक्या साध्या आणि सोप्या भाषेत असायचे की वरवर ऐकणाऱ्याला वाटे, हे तर साधा प्रपंच बोलत आहेत. पण जेव्हा त्यावर विचार व्हायचा तेव्हा समजायचे. सद्वस्तु एकच आहे ना? ॐकारातून उगम पावलेले भगवंताचे नाम हीच ती सद्वस्तु होय असे श्रीमहाराज परोपरीने सांगत. परमार्थात अनन्यतेला महत्त्व आहे ना? त्याशिवाय परमार्थ पथिक मुक्कामी काय पण मार्गस्थ देखील होऊ शकणार नाही. मग ही अनन्यता त्या सद्वस्तुच्या प्रति असल्याखेरीज आम्ही मार्गावर चालणार कसे? आणि ही अनन्यता त्या नामाप्रती दृढ होण्याकरिता श्रीमहाराज सांगत आहेत, “औषध मात्र थेंब थेंब आणि सतत पोटात गेले पाहिजे.” याला संत तैलधाराव्रत नामस्मरण असे म्हणतात. श्रीमहाराज याबाबत खूप सावध राहावयास सांगतात. म्हणजे, दिवसातील काही वेळ आम्ही आमचा नामाचा नेम पूर्ण केला, आता पुन्हा दिवसभर नामाचा आणि माझा संबंध नाही, असे होऊ नये. तरच नाम भावनेत – भगवत भावनेत राहणे शक्य होईल. परमार्थ हा जोड धंदा नसून मुख्य धंदा आहे असे श्रीमहाराज सांगतात. नामाभोवती आमच्या सर्व वृत्ति घुटमळत राहणे आवश्यक आहे. तरच वृत्ति उठतील त्या नामाला घेऊन उठतील अशी सर्व संतांची अनुभूती आहे. आणि हे होण्यासाठी उगीच साधनेचा व्याप वाढवून साधकाला चालणार नाही असेच श्रीमहाराज आज आम्हाला सांगत आहेत. व्याप वाढला की ताप वाढतो, कारण तो व्याप पचवण्याची शक्ती आमच्यात नसते. त्या ऐवजी जर केवळ गुरुवचन हेच प्रमाण मानून आम्ही मार्गक्रमण केले तर मात्र सहजच आणि लवकरच आम्ही नामात दृढ होऊ. जे काही वाचन / श्रावण / मनन करायचे ते करताना त्यातून आमचे नाम साधन आणि भगवंताचे स्मरण दृढ होते आहे की नाही याचा सूक्ष्म विचार प्रत्येकाने करणे अनिवार्य आहे. हे करणाऱ्याला सहजीच नाम भावनेत स्थिरावणे जमेल.

पुन्हा तुलसीदासच आठवतात,
“रघुपति भगति सजीवन मूरी|
अनूपान श्रद्धा मति पूरी||
एहि बिधि भलेहिं सो रोग नसाहीं|
नाहिं त जतन कोटि नहिं जाही||”
-- (रामनामाने साधणारी) रघुपतींची भक्ति हीच संजीवनी मुळी आहे. संपूर्ण बुद्धीनिशी यावर श्रद्धा असणे हेच ते साधण्याचे पथ्य आहे असा ‘योग’ ज्याला साधतो, त्याचाच (भव)रोग नष्ट होईल. नाहीतर कोट्यावधी उपाय करून देखील रोग नाहीसा होणार नाही!

||श्रीनाम समर्थ||

5 comments:

  1. जानकी जीवन स्मरण जय जय राम

    ReplyDelete
  2. संतवाणी, तिचा गाभा आणि विस्तार सर्वकालीन असतो, याचं प्रत्यंतर आणून दिलंत. प्रणाम!! 🙏🌿📿🌿🙏

    ReplyDelete
  3. ।। जानकी जीवन स्मरण जय जय राम ।।

    ReplyDelete
  4. ।। जानकी जीवन स्मरण जय जय राम ।।

    ReplyDelete
  5. ।। जानकी जीवन स्मरण जय जय राम ।।

    ReplyDelete