Wednesday, June 28, 2023

श्री ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराजांचे बोधवचन क्र ८५ -

 श्रीमहाराजांचे बोधवचन ८५ -

"


विषयरूपी सापाचें विष उतरलेलें नसल्यामुळे भगवंताचें अमृतासारखें गोड नाम आपल्याला गोड लागत नाहीं."


जय श्रीराम 🙏


दोन प्रकारचे बदल माणसाला नेहमीच त्रासदायक ठरतात. पहिला प्रकार असा की ज्यामध्ये इच्छा असूनही तो बदल करू शकत नाही. जसे, जोराच्या फ्लू च्या साथीत तोंड कडू झाले की थंडीताप उतरल्यावर सुद्धा अनेक दिवस आपल्याला अन्न गोड लागत नाही.


दुसऱ्या प्रकारचा बदल असा ज्यामध्ये आपल्या प्रयत्नांच्या जोरावर बदल घडवण्यासाठी मनुष्य धडपड करतो. जसे, मोठ्या शहरात अनेक वर्षे राहिल्यावर खेड्यातला साधेपणा काही दिवसांपलिकडे रुचत नाही. 


अशा अनेक 'सवयी' आहेत ज्या बदलण्यास आपले सवयींच्या आधीन असलेले मन कचरते, सहजासहजी स्वीकारत नाही. थोडक्यात आपण त्या सवयींना शरण जातो आणि सवयी घट्ट होऊन चित्तात संस्कार रूपाने अनंत जन्म वास करतात. अनेक संशोधनांअंती हे स्पष्ट झाले आहे की प्रत्येक व्यक्तीच्या आवडीनिवडी या केवळ या जन्मातल्या परिस्थितीवरच अवलंबून असतात असे नाही. काही आवडीनिवडी अशा का आहेत असा प्रश्न संशोधकांना व त्यात भाग घेतलेल्यांना पडला. त्याचे कारण पूर्वजन्मांतल्या संस्कारांमध्ये आहे हे मानण्यास त्यांची तार्किक बुद्धि तयार झाली नाही; परंतु उत्तर देखील मिळाले नाही. 


हे जर साध्या सामान्य अशा लौकिक सवयींच्या बाबतीत, तर जो परमात्मा या सगळ्याच्या पलीकडे आहे, त्याचे संस्कार मनबुद्धिमध्ये होण्यास वेळ हा लागणारच. त्यातही पुन्हा सगुण भगवंताहून त्याचे नाम सूक्ष्म असल्याकारणाने 'नामाचा संस्कार' होण्यास नामाचा संस्कार झालेल्याचा दैहिक-मानसिक सहवास हाच उपाय आहे हे त्रिवार सत्य आहे! त्यामुळे आजच्या वचनात महाराज आम्हाला याच आमच्या विषयरूपी संस्कारांची आठवण करून देत आहेत. एक प्रकारे आम्हाला चेतावणी देत आहेत. 


अनेकांना नामस्मरण किंवा भगवद्भावना ही दिवसभरातल्या अनेक कर्तव्यांपैकी एक कर्तव्य असे वाटते. त्यामुळे मनुष्याच्या अंतःकरणात वास करणाऱ्या लोभ, मोह, काम, ईर्षा या भावना त्या नामासही ग्रासतात. आणि जोवर लौकिक व्यवहाराचा किंचितसा स्पर्श देखील नामाला आहे, तोवर दैनंदिनीत नामास अग्रक्रम मिळू शकत नाही. सर्व करून जमल्यास करण्याची गोष्ट असे त्याचे स्वरूप बनते आणि तरीही नामाने मनःशांती देखील का मिळत नाही हा प्रश्न मनात रुंजी घालतो! 


नाम राहो कंठी हेचि माझे कर्म।

वाहिला संसार पायी कळले त्याचे वर्म।।

असा शुद्ध भाव बनण्यासाठी महाराज सांगताहेत की नाम अमृतासारखे वाटण्यास अगोदर विषयरूपी सापाचे विष उतरले पाहिजे. पूज्य बाबा बेलसरे म्हणायचे, 'अमुक केलं तर काय झालं, तमुक केलं तर काय झालं' असे वाटत आहे तोवर साधणार नाही. म्हणजे, विषयाचे विष उतरण्यासाठी अगोदर ते विष आहे हे कळले पाहिजे, त्याशिवाय सांसारिक रागद्वेषातून मुक्त व्हावे ही इच्छाच होणार नाही. मग हे ओळखावे कसे तर संत सांगतात,

देह माझा मी देहाचा, तोवरी नसे मी देवाचा! जोवर मनबुद्धीचा मोहरा सर्व या देह आणि देहाला लागलेल्यांच्या ठायी आहे, तोवर विष कोणते याचे आकलन होणे शक्य नाही. यावर आम्ही मखलाशी करतो, पण जर हे सर्व त्यांनीच दिले आहे, तर मग त्याकडे लक्ष पुरवायला नको का? पण आम्ही 'त्यांनी दिले आहे म्हणून, ते त्यांचेच आहे' या भावनेने संसार करतो का? असे जो करील त्याला काहीच बाधणार नाही वा बांधणारही नाही! 


लौकिक विषाचे परिवर्तन अमृतात करता येत नाही; परंतु परमार्थात एक मोठा दिलासा असा आहे की या लौकिक विषयांचा मोहरा सद्गुरूंकडे - भगवंताकडे वळवला की तेच विषरूपी विषय अमृतात परिवर्तित होतात!! मग संत छातीवर हात ठेवून म्हणू शकतात, "विषय तो त्यांचा झाला नारायण"! 


हा झाला पहिला भाग की विषय विषरूपी आहेत हे कळले; परंतु आता दुसरा भाग हा अधिक महत्त्वाचा आहे की 'भगवंताचे नाम हेच अमृत आहे' याचा मनबुद्धीने कायमस्वरूपी स्वीकार! आम्ही पारायण करतो, ग्रंथ वाचतो, तीर्थक्षेत्री जातो, दानधर्म करतो, नीतिधर्माने वागतो, तरीही नाम जरुरीचेच आहे का? असा प्रश्न अनेकांच्या मनात येतो. ज्ञानेश्वर महाराज, श्रीमहाराज, सर्वच संत म्हणतात, भगवंताच्या अनुसंधानाशिवाय असणारी नीती ही पोरकी आहे. तिला मायबाप हवेत ना! हे मायबाप म्हणजे 'भगवंताचे नाम' आहे. नामाच्या गोडीची खरी कल्पना ही नामच आयुष्य बनलेल्या साधकांना येते. महाराजांनी अमृताची उपमा देण्यामागचे कारण हे की नामाने मनुष्याला आपल्या अजर-अमर आत्मस्वरूपाचे यथार्थ दर्शन होते. नामाने अमृतस्वरूप भगवंताची प्रेमप्राप्ति होते, नामाने पंचकोष पंचक्लेश यांपलिकडे साधक जातो व कायमची दुःखनिवृत्ती आणि अखंड आनंदप्राप्तीचा अधिकारी सद्गुरू कृपेने बनतो!


सद्गुरूंनी उपदेशिलेल्या आजच्या वचनाचे चिंतन करता सहज स्पष्ट होते की, 

# सर्व विषांचा संग्रह या 'खोट्या मी' मधे आहे. 

# खोट्या मी चे प्रकटीकरण 'अहंकार' रूपात होते. 

# त्याचे बीज आहे वासना. 

# वासनेचे बी अहंकाराचा जमिनीत रोवले गेले की त्या बीजातून जन्ममरण आणि त्यामधल्या भोगांना सामोरा जाणारा वृक्ष वाढत जातो.

# त्याला स्वसमर्थनाचं पाणी सतत घालत गेलं की बीचा केव्हा वृक्ष झाला कळतही नाही.

# या वृक्षाला लोभ-मोहाची फळे येऊन पुन्हा त्यांचे बी तयार होते व नवीन जन्माचा वृक्ष फोफावतो. 


मात्र,

वासनेचे बी आणि वृक्ष दोन्ही परिणामहीन ठरतात सद्गुरुंच्या शक्तीपुढे! हे होण्यासाठी -

# बी सद्गुरुंच्या नामाचे हवे

# वासना सद्गुरूंना आनंद देण्याची हवी

आणि

# अहंकार सद्गुरूंच्या मोठेपणाचा - थोरवीचा हवा!

# समर्थन सद्गुरूंनी उपदेशिलेल्या आज्ञेचे हवे.


हे होण्यासाठी सद्गुरूंना संपूर्ण शरण जाण्याची शुद्धबुद्धी प्रदान करावी अशी करुणा त्यांच्या चरणी अखंड भाकावी! 


त्यांच्या कृपेने हे घडले की मग मात्र कितीही विषयाच्या जालीम विषाच्या सान्निध्यात साधक राहिला तरी त्याचे अंतरंग नाममृताने दुथडी भरून वाहील व केवळ त्याला स्वतःलाच नव्हे तर त्याच्या सान्निध्यात येणाऱ्या असंख्य जनांना अमृतरूप करेल यात शंका नाही! 


संत चरण रज लागता सहज।

वासनेचे बीज जळुनी जाय।।

मग रामनामी उपजे आवडी।।

मग रामनामी उपजे आवडी।। 


।।श्रीनाम समर्थ।। 🙏

Tuesday, June 27, 2023

श्री ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराजांचे बोधवचन क्र ८४ -

 


श्रीमहाराजांचे बोधवचन क्र ८४ -


"नामानें दुरित नाहींसें झालें की भगवंत हवासा वाटेल आणि मग त्याच्या नामांत प्रेम येईल. नामांत प्रेम आल्यावर समाधान आपोआप लाभेल. म्हणून, आधी भगवंताची खरी भूक लागली पाहिजे."


जय श्रीराम 🙏


सनमुख होइ जीव मोहि जब ही।

जन्म कोटि अघ नासहिं तबहीं।।

हे भगवंताचे वचन आहे की, जेव्हा जीव माझ्या सन्मुख झाला तेव्हाच त्याच्या करोडो जन्मांच्या पापांचा नाश होतो. आजच्या वचनाच्या पहिल्या भागात श्रीमहाराज आम्हाला याच प्रभुवचनावर सही करून सांगत आहेत की, 'नामाने दुरितांचा नाश होतो', कारण नाम आणि भगवंत हे एकरूप आहेत. त्यामुळे भगवंतांना सन्मुख होणे म्हणजेच त्यांच्या नामाला सन्मुख होणे होय व नामाला सन्मुख होणे म्हणजेच भगवंतांना सन्मुख होणे होय.


दुरिते ही आपल्याच कर्मांचा परिपाक असतो. मग ती दुरिते ही कोणत्याही भोगांच्या स्वरूपात आपल्यासमोर येऊ शकतात. लौकिक सुख आणि दुःख असो वा परमार्थ मार्गावर चालताना येणारे अडथळे असोत. दोन्हीकडे आपल्याच कर्मफळानुसार गोष्टी घडतात. परंतु, परमार्थ मार्गात एक मोठा फरक आणि अमोघ असा दिलासा आहे की जर आम्ही सद्गुरूंना शरण जाण्याकडे आमची बुद्धि वापरली तर मात्र ते आम्हाला या कर्मफळांच्या पलीकडे नेऊन देखील साधनेत स्थिर करू शकतात. मात्र अशी शरणागती इतकी सोपी नाही. तिच्यासाठी ज्या मीपणाला आयुष्यभर मी पोसले त्याचा पूर्ण बळी देण्याची इच्छा व तयारी लागते. 


मग हे होईतोवर नामाचा परिणाम दिसतच नाही का? याचे उत्तर आज महाराज देत आहेत.


अनेक साधक शिष्यांचा हा प्रश्न असतो की आम्हाला अजून नामाची प्रचिती येत नाही. त्यांना महाराज सांगताहेत की अगोदर तुमचं पूर्व दुरित, पूर्व पाप, पूर्व कर्म यांचा नाश करण्यामध्ये नामाची शक्ती कार्य करते. ते झाल्यावर मग 'भगवंत हवासा वाटेल!!' यामध्ये महाराजांनी हे देखील सूचित केले आहे की पुन्हा तुमचे नाम दुरित नाहीसे करण्यात खर्ची पडू नये वाटत असेल आणि नामाने वाढीस लागणारी भगवद्भक्ति अनुभवायची असेल तर यापुढे तुमची सर्व कर्मे शुद्ध, गुरू-भावनेने प्रेरित आणि नितीधर्माच्या चौकटीत बसणारी असावयास हवी. 


हे सर्व कशासाठी आवश्यक आहे हे सांगताना महाराज म्हणताहेत की 'भगवंताची भूक' हे खरं पुण्य आहे मनुष्यदेहात आल्यानंतर. ज्याला ही भूक लागली तो त्याच्या निकट जाण्यास तयार झालाच! पण ही भूक लागल्याचे लक्षण आहे, इतर भूक व तहान कमीकमी होत जाणे. *भूक लागली पोटी। जेणे विठ्ठल विठ्ठल ओठी।।* अशी आस लागली की मग महाराज म्हणताहेत की 'मग त्याच्या नामात प्रेम येईल'. जेव्हा आम्ही म्हणतो, आमचं नाम mechanical होते, त्यात कोरडेपणा जाणवतो, त्याचे कारण महाराज स्पष्ट करत आहेत की अजून आम्हाला भगवंताची भूक नाही आणि इतर भूक भागली नाही! आणि हेच खरे दुरित जे भगवंताच्या भुकेविना साठत साठत संचित प्रारब्ध बनून पुन्हा पुढच्या जन्मी आमच्या वाट्याला येते! 


कसे सांगितले आहे पहा महाराजांनी. खरे बघू जाता परमार्थात प्रत्येकच गोष्ट गुरुकृपेने होत असते, त्यांच्या दयेने होत असते. परंतु आम्हाला महाराज जो पुरुषार्थ आम्ही प्रपंचात हिरिरीने वापरतो असे म्हणतो, त्याची दिशा परमार्थाकडे वळवून *'भगवंताची भूक लागेल असे करावे'* असे जणू सांगितले आहे. हे लक्षात आले की मग साधक खऱ्या अर्थाने 'धारणेचा' अभ्यास करण्यास सिद्ध होतो. एकाच गोष्टीने मन व्यापून असणे याचे नाव धारणा! ही धारणा ज्यावेळी सद्गुरुंच्या विचारांनी, आज्ञेने, भावनेने, वृत्तीने आणि कर्माने संचलित होते, तेव्हा खऱ्या अर्थाने साधक सद्गुरू प्रदत्त नामाच्या 'मागे लागतो!' 


आणि श्रीमहाराज म्हणताहेत की जो असा नामाच्या दिशेने आपली संपूर्ण मनोवृत्ती स्थिर करण्याचा प्रयत्न करतो, त्याला नामाचे प्रेम येतेच - म्हणजे ते नामाचे प्रेम आपल्याला देतात. आणि म्हणतात की नामाचे प्रेम आल्यावर समाधान आपोआप लाभेल. किती स्पष्टपणे सांगितले आहे इथे की नामाच्या प्रेमाची परिणती समाधानात होणे हा नियमच आहे, त्यात बदल संभवतच नाही. म्हणून आमचे संत चोखा महाराज म्हणाले,

नाम जाळी संचिताचा पूर्ण बडीवार।

आहे बुडत्याला नौका जीवनी आधार।।


पण हे कधी होईल सांगताना म्हणाले,

नाम जपो वाचा नित्य श्वासातही नाम।

नाममय होवो देवा माझे नित्य कर्म।।

नामाच्याच संगे लाभो प्रेम रे अपार।।

नामाच्याच संगे- हे होण्यासाठी इतर संग मनाने सुटणे गरजेचे आहे आणि हे व्हावे याची करुणा जो गुरुचरणी भाकेल त्याला 'भगवंताची खरी भूक' तेच प्रदान करतील!


।।श्रीनाम समर्थ।। 🙏

Monday, November 15, 2021

श्री ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराजांचे बोधवचन क्र ८३ --


श्रीमहाराजांचे बोधवचन क्र ८३ –

भगवंताच्या स्मरणामध्ये अभिमानाचे मरण आहे.

श्रीराम!

श्रीमहाराजांची बहुतेक वचने साधनेच्या प्रत्येक स्तरावर अत्यंत बोधक अशी असतात, त्यातलेच हे आजचे वचन. ‘अभिमान’ या एका शब्दात परमार्थ मार्गावरचे सर्व अडथळे एकत्र गुंफलेले आहेत असे म्हटले तर वावगे ठरू नये. परमार्थात अभिमानाचे स्थूल आणि सूक्ष्म असे सर्वसामान्य वर्गीकरण केले जाते. बुद्धिमत्ता, मान, कीर्ती, पैसा, रूप, स्थावर मालमत्ता, जीवन जगण्याचा लौकिक स्तर वगैरे अनेक गोष्टी स्थूल अहंकारात येतात; परंतु हा स्थूल अहंकार ज्यातून जन्म घेतो त्यास सूक्ष्म अहंकार म्हणतात. हा सूक्ष्म अहंकार म्हणजेच देहबुद्धी; मी हा देहच आहे आणि त्यामुळे या देहाला लागलेले सर्व व्यक्ती, वस्तू, पदार्थ, उपाधी म्हणजेच ‘मी’ हे झालेले false identification. वेदांतात यालाच अध्यारोप – अपवाद असे म्हणतात. जे नाही ते आहे असे वाटणे; यालाच महाराज ‘माया’ असे म्हणतात. आत्मरूप असलेला जीव मायेच्या क्षेत्रात आल्याबरोबर जे स्फुरण येते तोच अहंकार, ज्यातून मग चित्त, बुद्धी आणि मन आभासात्मक जन्म घेते. याच आभासात जगता जगता जेव्हा या आभासात्मक जगाच्या बाहेर पडण्याची खूण – भगवंताचे स्मरण - सद्गुरूंच्या भेटीने मिळते त्यामुळे जीव हळूहळू या नसलेल्या परंतु तरीही जीवास ग्रासलेल्या मायेतून केवळ त्या परम सत्तेने बाहेर पडू शकतो व पुन्हा आपला आत्मानंद भोगू शकतो, आत्मानंदरूप होऊ शकतो.

 

आपल्या पुराणांमधून आणि विविध ग्रंथांमधून अशी अनंत उदाहरणे आहेत, जिथे साधनेच्या अगदी खालच्या थरापासून अतिशय उत्तम स्तरापर्यंत हा ‘अभिमान’ कसा जीवाला बंधनात पाडतो हे कळते. दोन टोकाची उदाहरणे बघितली तर लक्षात येईल. अर्थात, जेव्हा आपण उच्च स्तरातील व्यक्ती – महात्म्यांमध्ये अशी उदाहरणे बघतो, त्यावेळी त्यांची नेमणूक आपल्याला त्यातून बोध घेता यावा यासाठी असते हेही खरे.

 

देवर्षी नारद ‘मी काम जिंकलेला आहे’ असे अभिमानाने जेव्हा सर्वत्र असे सांगू लागले, त्यावेळी भोलेनाथांनी त्यांना सावधान केले, माझ्यासमोर बोललात ठीक आहे परंतु भगवान श्रीहरींसमोर याबद्दल उच्चार करू नये. परंतु, ‘संभु दीन्ह उपदेस हित नहिं नारदहि सोहाना!’- त्यांनी दिलेला उपदेश नारदांना भावला नाही आणि त्यांनी ते श्रीहरींना सांगितले. त्यानंतर आपल्या या आवडत्या भक्ताचा अभिमान – अहंकार हरण करण्याचा घाट श्रीहरींनी घातला व मर्कटरूप त्यांना देऊन कसे ‘मी काम जिंकला’ या अभिमानास मरण दिले हे सर्वविदित आहे. यातून महाराज ज्याला ‘मीपणाचा अभिमान’ म्हणतात, तो किती घातक आहे हे आपल्या सहज लक्षात येते. मुख्यतः भक्तिपंथामध्ये जोवर किंचित देखील ही मीपणाची भावना आहे तोवर आम्ही ‘भक्त’ म्हणवून घेऊच शकत नाही असे सर्व संतांनी सांगितले. समर्थ तर या अभिमानाला आपल्या मनाच्या श्लोकात ‘पापिणी’ म्हणतात. परंतु समर्थ त्याचा उतार देखील लगेच सांगतात,

“रघूनायकावीण वाया शिणावे|

जनासारिखे व्यर्थ का वोसणावे||

सदा सर्वदा नाम वाचे वसो दे|

अहंता मनी पापिणी ते नसो दे||”

आणि हेच महाराज आजच्या वचनात सांगताहेत, भगवंताच्या स्मरणामध्ये अभिमानाचे मरण आहे. इथे अजून एक लक्षात येते, की नुसते नाम घ्या असे महाराज इथे सांगत नाहीत तर स्मरण असावे हे सांगत आहेत; कारण तेच म्हणतात तसे, सर्व साधनेचा प्राण असेल तर तो म्हणजे स्मरण. नुसते साधन आनंद देत नाही; तर त्यातले स्मरण आनंद देते. आणि नामातून गुरुकृपेने घडलेल्या साधन त्या आनंदाच्या स्त्रोतापर्यंत नेत असल्याने स्वाभाविकच हा प्रवास अहंकाराच्या पलीकडे वसणाऱ्या आत्मरूपापर्यंत होतो. असा प्रवास घडलेल्या साधकाची मनस्थिती कशी असते हे आपल्याला दुसऱ्या उदाहरणात बघायला मिळेल.

 

‘विदेही’ म्हणून गौरवले जाणारे राजर्षी जनक महाराज जेव्हा अष्टावक्र ऋषींकडे येतात, तेव्हा त्यांना प्रश्न करतात,

“कथं ज्ञानमवाप्नोति कथं मुक्तिर्भविष्यति|

वैराग्यं च कथं प्राप्तं एतद् ब्रूहि मम प्रभो||”

जे जनक महाराज प्रत्यक्ष ज्ञान, भक्ति, वैराग्य आहेत ते इतक्या विनम्रपणे ऋषींना ‘प्रभो’ असे संबोधन करून ज्ञान, वैराग्य, मुक्ती व अंतिम ज्ञानाबद्दल प्रश्न करतात आणि या खऱ्याखुऱ्या लीनतेमुळेच अष्टावक्र ऋषींचा संपूर्ण अनुग्रह त्यांच्यावर झाला आणि जगताला वेदांताचे अंतिम ज्ञान अतिशय थेट पोचवणारा ‘अष्टावक्र गीता’ हा ग्रंथ तयार झाला. म्हणूनच महाराज म्हणत असावेत की भावना मात्र शंभर नंबरी हवी; त्यात भेसळ असून चालत नाही;  . ज्याची भावना शुद्ध आणि खरी, त्याला गुरू न मागता देखील कृपा करण्यास आतुर असतात. कारण तिथे सपशेल शरणागती असते.

 

अशी ही अवस्था साधण्यासाठी स्मरणाशिवाय अन्य उपाय नाही असे महाराज सांगत आहेत. कारण, भगवंताच्या – म्हणजेच गुरूंच्या स्मरणाला कोणतीही उपाधी लागत नाही. महाराज एकीकडे म्हणतात, तुम्ही श्रीमंत आहात की गरीब आहात, समाजात तुमचे स्थान काय आहे, तुमची जात कोणती आहे, या व अशासारख्या कोणत्याच उपाधीचा संबंध भगवत स्मरणाशी शक्य नाही; इतके स्मरण शुद्ध आहे, जे त्या परमपित्याशी संधान साधते व जीवास मुक्त करते आणि म्हणूनच गोचिडासारख्या जीवाला जडलेल्या अभिमानापासून केवळ संपूर्ण उपाधिरहित असे नामस्मरणच मुक्ती देऊ शकते.

 

त्यातल्या त्यात भक्तिपंथी संतांमध्ये तर लीनतेची सहज चढाओढ लागल्यासारखी दिसते, इतके ते स्वतःला दीन-लीन म्हणण्यात धन्यता मानतात. प्रत्यक्ष शंकरसुवन केसरीनंदन जिथे म्हणतात, “सो सब तव प्रताप रघुराई| नाथ न कछु मोरि प्रभुताई||” – जो काही पराक्रम माझ्याकडून घडला तो तुमचा मोठेपणा आहे, तुमची शक्ती आहे; माझे त्यामध्ये काहीही नाही! सूरदास म्हणतात,

“अप बल तप बल और बाहु बल, चौथो बल हैं राम| 

सूर किशोर कृपा ते सब बल, हारे को हरिनाम||” – हे जे हरणे आहे, ते म्हणजे अभिमानाचे मरण आणि हे मरण सततच्या स्मरणाने साधते म्हणून महाराजांचा नामाचा अट्टाहास!

 

संतश्रेष्ठ तुकाराम महाराज भगवत नामाच्या स्मरणाने घडलेल्या अभिमान त्यागाला साधनाचे सार म्हणतात –

 

“थोडे आहे थोडे आहे| चित्त साह्य जालिया||

हर्षामर्ष नाही अंगी| पांडुरंगी सरले ते||

अवघ्या साधनांचे सार| न लगे फार शोधावे||

तुका म्हणे लटिके पाहे| सांडी देह अभिमान||”

 

|| श्रीनाम समर्थ ||

 

 

Friday, November 5, 2021

श्री ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराजांचे बोधवचन क्र ८२ --


श्रीमहाराजांचे बोधवचन क्र ८२ –


आपली वृत्ति स्थिर करण्याकरिता आणि उपाधि न लागण्याकरिता आपण नाम घ्यावे. नाम नुसते घेतल्यानेसुद्धा काम होईल; पण आपण ते समजून घेतल्याने काम लवकर होईल. एखाद्या सत्पुरुषाची परीक्षा करायची असेल तर तो नामाबद्दल काय बोलतो ते पाहावे.

 

श्रीराम!

नाम आहे आदी अंती| नाम सर्व सार|

आहे बुडत्याला नौका| जीवनी आधार||

हेच ते अंतिम सत्य आहे हे महाराज वरचेवर आपल्याला सांगतात. पण याचा नेमका अर्थ काय? नाम आदि आहे, नामच अंत आहे आणि नाम हाच आधार आहे म्हणजे नेमके काय? याचा उलगडा आज महाराज वरील वचनात करतायत. त्यामध्ये साधनेमधले तीन टप्पे महाराजांनी सांगितले आहेत. ते तीन टप्पे खालीलप्रमाणे –

१) मुमुक्षु अवस्था - नाम नुसते घेतल्यानेसुद्धा काम होईल

२) साधकावस्थेतील २ टप्पे –

  (अ) आपली वृत्ति स्थिर करण्याकरिता आणि उपाधि न लागण्याकरिता आपण नाम घ्यावे

  (ब) आपण ते समजून घेतल्याने काम लवकर होईल

३) सिद्धावस्था - एखाद्या सत्पुरुषाची परीक्षा करायची असेल तर तो नामाबद्दल काय बोलतो   ते पाहावे

 

आता गंमत अशी की महाराजांनी परोपरीने सांगितलेला पहिला टप्पा जो कुणी मनासून आचरेल त्याला पुढचे टप्पे येऊन गेल्याचे कळणारही नाही हे देखील महाराज सांगतात. मुख्यतः जो खरा तीव्र मुमुक्षु आहे, म्हणजे ज्याची शाश्वत सुखाचा मार्ग मला हवाच अशी ध्येय निश्चिती झालेली आहे, तोच सद्गुरूंनी दिलेले नाम हृदयाशी जपून नामस्मरण करील असे सर्व संत सांगतात. जोवर ध्येय निश्चिती झालेली नाही, तोवर नामाच्या कडेकडेने परिक्रमा होत राहील आणि ध्येय निश्चिती सरशी तो नामाच्या आतल्या वलयात प्रवेशकर्ता होईल. हे आतले वलय म्हणजेच सद्गुरू आज्ञापालन होय. शाश्वताचा अस्वस्थ शोध (तळमळ) आणि जबरदस्त श्रद्धा या भांडवलावर तो पूज्य बाबा म्हणतात तसे “नामाला लागेल”. महाराज सांगतायत, जो असा नुसता नामाला लागेल त्याचे देखील काम होईलच यात शंका नाही. मग तरी देखील आम्हाला महाराज “समजून घेतले तर काम लवकर होईल” असे का सांगत असावेत हा प्रश्न पडणे साहजिक आहे. त्यातही महाराजांनी दोन टप्पे सांगितले आहेत. पहिला टप्पा - वृत्ति स्थिर करण्याकरिता आणि उपाधि न लागण्याकरिता – हा जो आहे, तो महाराजांचा साधक आणि बाधक बोध आहे. जसे संत तुकाराम महाराज म्हणतात, “जेणे विठ्ठल मात्रा घ्यावी, तेणे पथ्येही सांभाळावी” त्याप्रमाणे अनेक ठिकाणी महाराजांनी आम्हाला “नामसाधना सुरळीत चालण्यासाठी” काय करणे जरूर आहे आणि काय टाळणे जरूर आहे हे सांगितले आहे. यात एक खूप मोठी मेख आहे महाराजांची. त्यांनी सांगितलेला कोणताही साधक आणि बाधक बोध यामागे साधन सुरळीत व चपखल चालावे हे कारण तर आहेच; परंतु यापेक्षाही एक दिव्य कारण यामागे आहे आणि ते म्हणजे या सर्व साधक बाधक गोष्टींच्या पालनातून साधक त्या अंतिम बोधाच्या हळूहळू जवळ सरकतो; कसे ते मार्ग चालणाऱ्याला अनुभवता येईल असे महाराज सांगतात.

 

जसे, इथे महाराज म्हणतायत, वृत्ति स्थिर करण्याकरिता – साधनेमध्ये सर्व समस्या असेल तर ती वृत्तीच्या ओढीचीच आहे आणि ही मायेकडची ओढ त्याविरुद्ध दिशेमध्ये परिवर्तित करण्याचे सामर्थ्य फक्त अशाच गोष्टीमध्ये असू शकते जी मायेला भीक घालत नाही आणि अशी गोष्ट नामाशिवाय त्रिभुवनात कोणतीही नाही. ही वृत्ति स्थिर करणे हा साधनातील सर्वात मोठा टप्पा आहे म्हटले तर वावगे ठरू नये. आमच्यासारख्या सामान्य लोकांना रोजच्या कामाच्या धामधुमीत दिवसभरात किती वृत्ति येऊन जातात याचा पत्ताच लागत नाही. त्याचा अंदाज तेव्हा येतो, जेव्हा सतत बदलणाऱ्या – मनाला व्यापून टाकणाऱ्या वृत्तींनी आम्हाला मानसिक थकवा येतो आणि मग दैनंदिन जीवन देखील नीरस आणि कंटाळवाणे वाटू लागते. महाराज सांगतात, कामापेक्षा कामाच्या विचारांनी तुम्ही अधिक थकता. त्यामुळे काम झाले की शांतपणे एका जागी बसून थोडा वेळ नामस्मरण केले की पुन्हा ताजेतवाने व्हाल. हे जे आहे तेच वृत्ति स्थिर करणे आहे, जे नामाने साधते. अर्थात या दैनंदिन व्यापातून जे विविध षड्रिपूंचे तरंग मनामध्ये उठत राहतात ते वृत्तींचे कारण आहे व नाम त्यावर हल्ला चढवते.

 

या सर्व वृत्तींमुळे काय होते? तर आम्ही विविध उपाधींमध्ये अडकतो. सर्व उपाधींचे मूळ कारण आहे देहबुद्धी. या देहाला आम्ही ‘मी’ समजलो आणि त्या देहात कार्य करणाऱ्या मनाला बळी पडलो आणि या जन्मृत्युच्या चक्रात अनंत जन्म अडकलो. चुकीच्या ठिकाणी (देह व मन) जिवाचा अहंकार चिकटल्यामुळे सकाळी उठल्यापासून ते रात्री झोपेपर्यंतच काय परंतु स्वनाच्या दुनियेत देखील आम्ही उपाधींमध्येच घेरले गेलो व अधिकाधिक देहपाशात गुंतलो. याचे पर्यवसान म्हणजे आम्ही व्यक्ती, वस्तु, पदार्थ, धन, मान, कीर्ती या उपाधींना मानव जीवनाचे इतिकर्तव्य समजत आलो. महाराज आजच्या वचनात सांगतायत, या उपाधि न लागण्याकरिता नाम घ्या. एकीकडे महाराज सांगतात तसे, नामाची गंमत अशी आहे, की नाम मनाला उलटे करते. म्हणजेच मनाच्या आजपर्यंतच्या सवयींच्या विरुद्ध प्रवास करायचा असेल तर नामाला पर्याय नाही. असे का होत असावे? एक वृंदावनचे थोर संत पूज्य प्रेमानंद गोविंद शरण जी महाराज अगदी हेच सांगतात की जेव्हा आपण एकच एक गुरुप्रदत्त नाम वरचेवर घेतो, त्यावेळी मन मरते! म्हणजे मनाला दुसऱ्या व्यापाकडे प्रवृत्त करणारी ओढ मरते आणि साहजिकच त्यामुळे देहमनात अडकलेली जीव बुद्धि कमी कमी व्हायला लागून तिथे देवबुद्धीचा प्रवेश सुलभ होतो! त्यामुळे ध्येय निश्चिती नंतरचा टप्पा म्हणजे वृत्ति स्थैर्यासाठी नामाचा उपयोग आणि तदनुसार उपाधीमध्ये अडकलेलो आहोत हे कळायला लागून त्यापासून हळूहळू सुटका.

 

आता अजून काय हवे? हेच नाम समजून घेणे नव्हे का? पण असे असते तर महाराजांनी पुन्हा ‘समजून घेतल्याने काम लवकर होईल’ असे का सांगितले असते असा प्रश्न पडणे साहजिक आहे. कसे आहे, आजचे युग तंत्रज्ञानाचे आहे आणि त्यामुळे कोणतीही गोष्ट मान्य करणे इतके सुलभ होत नाही. आणि ज्याची अशी चिकित्सक वृत्ति आहे, त्याने उपनिषदे आणि मूळ भारतीय तत्त्वज्ञाना मधून नाम महिमा जाणून घ्यावा. किंबहुना असे होण्यापेक्षाही जो केवळ अभ्यास म्हणून देखील तत्त्वज्ञान अभ्यासेल परंतु त्याची धाव जर शाश्वत आनंदाकडे असेल तर त्या सर्व अभ्यासातून तो कधी नव्हे एवढा नामाला चिकटेल. अर्थात त्यामध्ये अभ्यासातच वाहवत जाण्याचा खूप मोठा धोका आहे; यासाठी शास्त्रप्रचितीच्या आकलनामधून त्याला गुरुप्रचितीकडे वाटचाल करावीच लागेल, तेव्हाच आत्मप्रचीतीचा मार्ग खुला होईल असे सर्व संत सांगतात. परंतु यातील एक गंमत अशी की, जसे तहानलेल्याला पाण्याचे महत्त्व अधिक, जसे जन्मान्धाला डोळे मिळाल्यावर जग पाहण्याचा आनंद अधिक, तद्वतच अभ्यासाने ज्याने नामाचे परम सत्यत्व जाणून घेतले, नामानेच झालेली विश्वनिर्मिती उपनिषदांमधून चाखली, त्याला कुणाहूनही अधिक नाम-प्रचितीची – नामातून मिळणाऱ्या अढळ, अमर समाधानाची ओढ लागेल हे निश्चित आणि स्वाभाविकच मग महाराज म्हणतात तसे, नकळत घेतलेल्या नामापेक्षा त्याचे काम लवकर होईल!

 

आता शेवटच्या सिद्धावस्थेबद्दल महाराज म्हणताहेत, एखाद्या सत्पुरुषाची परीक्षा करायची असेल तर तो नामाबद्दल काय बोलतो ते पाहावे. परमेश्वराजवळ – त्या अंतिम सत्याजवळ जाण्याचे अनंत मार्ग आहेत. त्या मार्गांमधील साधनेचा प्रकार, त्याला लागणारा वेळ, श्रम, साधकाच्या मनाची धाटणी यांमध्ये फरक असला तरी कोणताही मार्ग चूक नाही. असे असले तरी ज्याने श्रुतिस्मृतिपुराणे, विविध संत साहित्य आणि त्याही पुढे जाऊन आपल्या सद्गुरूप्रदत्त साधनेचा खरा मागोवा घेतला, त्याला नामाचे निर्विवाद वर्चस्व समजणे ही काळ्या दगडावरची रेघ आहे, कारण 'सम्यक' अभ्यासाने चिकित्सक वृत्ति लयास जाऊन तो खऱ्या अर्थाने नामाश्रित आणि गुरुसमर्पित होतो!  त्यामुळे महाराज म्हणतात, सर्व शास्त्र पारंगत आहे असे म्हणतो, गुरुपद चालवतो आणि तरीही जर नामाबद्दल त्याला कळकळ नसेल, जर नाम त्याच्या आयुष्याची इतिकर्तव्यता नसेल तर तो खरा संत असू शकत नाही, कारण ज्याला नामानुभूती नाही, त्याला आत्मानुभूतीही नाही असा सरळ सरळ आलेख महाराज मांडतात आणि सांगतात,

 

“नामापरते न सत्य मानावे!”

 

|| श्रीनाम समर्थ ||


Saturday, July 3, 2021

श्री ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराजांचे बोधवचन क्र ८१ --

श्रीमहाराजांचे बोधवचन क्र ८१ –

सत्समागम आणि भगवंताचे नाम| हीच करतात परमार्थाचे काम||

 

श्रीराम!

“अब मोहि भा भरोस हनुमंता| बिनु हरिकृपा मिलहि नहिं संता||”

ज्ञानिनां अग्रगण्यम्’ असलेले हनुमंत जेव्हा लंकेत बिभीषणाला भेटले तेव्हा बिभीषणाने हे उद्गार काढले, की हनुमान महाराज, माझ्या मनात आता विश्वास निर्माण झाला की खरेच प्रभूंचा आशीर्वाद मजवर आहे, कारण त्यांच्या कृपेशिवाय तुमच्यासारख्या संतांचे दर्शन होत नाही. एवढेच म्हणून ते थांबले नाहीत तर म्हणाले, “जौं रघुबीर अनुग्रह कीन्हा| तौ तुम्ह मोहि दरसु हठि दीन्हा||” प्रभू रामचंद्रांचा अनुग्रह माझ्यावर झाल्यामुळे तुम्ही मला हट्टाने दर्शन दिलेत (याला दर्शन द्यायचेच असे तुम्ही ठरवलेत). आणि यावर लीन शिरोमणी हनुमंत म्हणतात, “सुनहु बिभीषण प्रभु कै रीति| करहुं सदा सेवक पर प्रीति||” बिभीषणा, यात माझा मोठेपणा नाही; जो सच्चा सेवक आहे – दास आहे, त्याच्यावर प्रभू अखंड प्रेम करतात.

 

हनुमंत या आधी लंकेत प्रवेश करते झाले, तेव्हा लंकिनी नामक लंका प्रवेशद्वाराचे रक्षण करणारी राक्षसीला त्यांची खरी ओळख पटून जेव्हा ते प्रवेश करू लागले तेव्हा ती राक्षसी त्यांनी म्हणते, “तात मोर अति पुन्य बहूता| देखेउं नयन राम कर दूता||” – माझे पुण्य आज उदयाला आले कारण मी आज प्रत्यक्ष रामचंद्रांच्या दूताला बघितले. असे का बरे? याचे स्पष्टीकरण देताना तुलसीदास लंकिनीच्या तोंडी पुढील दोहा घालतात –

 

“तात स्वर्ग अपबर्ग सुख धरिअ तुला एक अंग|

तूल न ताहि सकल मिलि जो सुख लव सतसंग||”

-- हे कपिश्रेष्ठ, स्वर्ग आणि मोक्ष यांचे सर्व सुख एका पारड्यात घातले तरी ते सर्व मिळून दुसऱ्या पारड्यात ठेवलेल्या क्षणभराच्या सत्संगाच्या सुखाची बरोबरी करू शकत नाही!

 

आणि आजच्या वचनात श्रीमहाराज आम्हाला याच सत्संगाचे महिमान ऐकवत आहेत. आता या वचनात गंमत अशी की सदा सर्वदा नामाचे महिमान गाणारे आमचे महाराज नामाच्या अगोदर सत्संग लिहितात आणि मग नाम लिहितात. याचे कारण अत्यंत स्पष्ट आहे. खऱ्या सत्संगाची आस लागली की मग साधकाला नामाच्या महात्म्याची थोडीतरी कल्पना येते. त्याअगोदर तो नाम घेत नसतो असे नाही; परंतु सत्संग श्रवण केल्यानंतर जी नामाची आस लागते त्याचे स्वरूप म्हणजे नामावाचून त्याची होणारी “जल बिनु मछली” ही अवस्था! संताच्या क्षणमात्रच्या संगाने साधकाचा अक्षरशः कायापालट होऊ शकतो, जर त्याच्या मनात तितकी तीव्र ध्येयाची आस आणि संताबद्दल आदरभावना असेल तर. यापैकी एक वेळ अजून ध्येयाची आस निर्माण झाली नसेल तर ती देखील संत समागमाने निर्माण होते; परंतु जर आदर भावनेत खोट असेल तर मात्र भोक पडलेल्या भांड्यातले पाणी जसे झिरपून जाते तशी ती साधनेची शिकवण झिरपून नाहीशी होते. यासाठीच भगवंत गीतेमध्ये म्हणतात, अत्यंत लीन होऊन जो आपले प्रश्न घेऊन संताला ‘शरण’ जातो, त्याचे काम झालेच पाहिजे. आणि हेच आजच्या वचनात महाराज म्हणतात, “हीच करतात परमार्थाचे काम||”

 

परमार्थाचे काम होणे म्हणजे काय?

परमार्थाचे काम होणे म्हणजेच

-- संपूर्ण निष्काम होणे.

-- अंतिम ध्येय लक्षात येऊन त्यानुसार निष्ठापूर्वक वाटचाल सुरु होणे

-- संताने – गुरूने सांगितलेल्या मार्गावर डोळे झाकून निःसंशय चालणे

-- ध्येयाचा क्षणभरही विसर न पडणे

-- दिवसेंदिवस निष्ठेचे परिणत प्रेमात रूपांतर होणे

-- खोट्या ‘मी’ चे संपूर्ण विसर्जन गुरुचरणी होऊन खऱ्या ‘सर्वांतर्गत मी’ ची ओळखण होणे

 

यातील प्रत्येक पायरीत संत समागमाचे महत्त्व कळून येईल. सद्गुरू अथवा संत यांचा आधार घेणे म्हणजे दुबळेपणा नव्हे. हा तो आधार आहे जो आपल्याला जगाकडून निराश्रित वृत्ति बाळगण्याचा आणि केवळ सच्चिदानंद गुरू अथवा भगवंताच्या ठायी आश्रित राहण्याचा, म्हणजेच अनन्यतेचा मार्ग दाखवतो. अशा अनन्यतेशिवाय खोटा जन्मोजन्मी पोसलेला ‘मी’ किंवा अहंकार गळून पडत नाही. या अहंकाराच्या मुसक्या बांधून त्याला गुरुचरणी मारून टाकण्यासाठी अखंड सत्संग श्रवण व चिंतनाची अति आवश्यकता असते, कारण कोंबडे जसे कितीही झाकले तरी आरवायचे राहत नाही, तसे अहंकाराच्या कितीही मुसक्या बांधल्या – त्याच्यावर साधनेचे पांघरूण घालण्याचा प्रयत्न केला, तरी काही ना काही निमित्ताने तो डोके वर काढतोच. त्यातल्या त्यात जर आजूबाजूला साधनेची – ज्ञानाची स्तुती करणारी माणसे असली की मग तर जी आतमध्ये सुखावणारी जाणीव साधकाला होते, त्यामुळे तो कधीच त्या अहंकाराच्या मगरमिठीतून बाहेर पडू शकत नाही. जोवर भगवद् साक्षात्कार झालेला नाही, तोवर म्हणूनच साधकाला अतिशय सावधपणे मार्ग चालण्याचा उपदेश गुरू करतात, जेणेकरून ‘परमार्थाचे काम’ होण्यात अडसर निर्माण होणार नाही.  

 

आणि तुलसीदास म्हणतातच, “बिनु सत संग बिबेक न होई| रामकृपा बिनु सुलभ न सोई||”

परमार्थाचे काम होण्यात सर्वात महत्त्वाचे जर कोणते शस्त्र असेल तर ते म्हणजे विवेकाचे शस्त्र. “प्रेय” आणि “श्रेय” यातला फरक जोवर साधकाला आतूनच कळत नाही व तो त्याप्रमाणे आपल्या साधक जीवनाची आखणी करत नाही, तोवर त्याच्याकडून साधना होणे केवळ अशक्य! आजच्या “Age of distraction” मध्ये, जिथे पावलोपावली मार्ग भटकण्याचे जणू जाळे पसरलेले आहे, त्यावेळी तर साधकाला किती जपून ‘आत्मानात्म विवेकास चिकटून’ असायला हवे हे वेगळे सांगण्याची गरज नाही आणि हा विवेक केवळ ‘खऱ्या’ सत्संगानेच जागृत राहू शकतो.

 

मात्र तुलसीदास म्हणतात तसे, हा सत्संग भगवंताच्या कृपेशिवाय मिळत नाही. आणि म्हणून सत्संग आणि ‘नाम’ म्हणतायत महाराज. कारण नाम हाच भगवंत आहे. कलियुगातील अल्पमती, अल्पविवेकी मनुष्याला साधन सोपे व्हावे म्हणून दयासिंधु करुणाकर प्रभूंनी आपले सर्व सामर्थ्य, आपली सर्व शक्ति, आपले सर्व प्रेम, आपले सगुण निर्गुण स्वरूप असे सर्वच्या सर्व नामामध्ये ठेवले व आपले भाग्य त्याहून मोठे असे की सद्गुरूंनी त्या मुळातल्या शक्तीयुत नामामध्ये आपल्या अमोघ नामप्रेमाची शक्ती ओतून ते आपल्याला दिले. याहून सुंदर संगम तो काय असू शकतो? त्यामुळे जो असे नाम अखंड जपतो त्याला प्रभुकृपा होऊन योग्य सत्संग सहज मिळतो, जेणेकरून त्याची साधना सुफळ संपूर्ण होऊन त्यास अखंड समाधानाचा लाभ गुरुकृपेने होतो.

 

याठिकाणी अजून एक गोष्ट लक्षात घेणे जरूर आहे. आपल्या महाराजांनी सत्संगाची व्याख्या अतिशय सुरेख केली आहे. त्यांचे म्हणणे असे की सत्संग हा तीन प्रकारचा असतो. एक संताची देहाने संगत. परंतु अशी संगत मिळणे अत्यंत दुर्लभ. त्याहीपेक्षा आज आमची श्रद्धा इतकी डळमळीत असते की संताच्या बाह्य अचरणावरून आम्ही आमचे मत बनवणार आणि बाहेरून संत काळाने केवळ अशक्य. जरी संत कळला तरी त्याची संगत चोवीस तास मिळणे अशक्य. म्हणून सद्विचार हा दुसऱ्या प्रकारचा सत्संग आहे म्हणतात महाराज. आणि खरोखर ज्याला गुरुकृपेने परमार्थ मार्गाची थोडी तरी चुणूक मिळाली त्याच्या हे सहज लक्षात येईल की आमचा सर्व घोळ हा चुकीच्या विचारांनी मनाला जी मरगळ आलेली आहे त्यामुळे आहे. आणि चुकीचे विचार हे दिवसभराच्या चुकीच्या चिंतनाने होतात. त्यामुळे चिंतन सुधारणे म्हणजेच विचार सुधारणे होय हे स्पष्ट आहे. आणि जेव्हा विचार भगवंत – गुरू – साधन याबद्दलचे मनामध्ये स्फुरू लागतात, त्यावेळी आपल्याला आपल्याच मनाचा सत्संग होतो हे लक्षात येते व यातून सर्व काही परमार्थाला लागणारी वस्तु आपल्या आतच आहे हेही लक्षात येते. आणि तिसरा सत्संग महाराज सांगतात तो म्हणजे नामाचा सत्संग. यामध्ये ‘संग’ शब्दाला महत्त्व आहे. आपल्या बाजूला आपल्यासोबर बोलणाऱ्या व्यक्तीचा जसा संग आपल्याला जाणवतो, तसा नामाचा संग जाणवू लागणे म्हणजे नामाचा सत्संग लाभणे होय. मग तो गुरू वा भगवंताचे जिवंत अस्तित्व जाणवणे अशा स्वरूपात असो वा नामाचाच एक दिव्य संग जाणवणे अशा स्वरूपाचा असो. महाराजांना एकांनी विचारले, तुकाराम महाराजांना कुणाचा सत्संग लाभला? तेव्हा महाराजांनी या तिसऱ्या ‘नामाच्या सत्संगाबद्दल’ सांगितले.

 

म्हणून,

 

संग एक नामाचा अनन्य भावे करावा|

तया संगतीने गुरुकृपे देहभाव त्यागावा||

असे घडविता साधनजीवन दिव्यत्व अवतरते जीवनी|

जीवपणे न राहिला ब्रह्मरूप अविनाशी||

 

|| श्रीनाम समर्थ ||

Thursday, June 24, 2021

श्री ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराजांचे बोधवचन क्र ८० --

 
श्रीमहाराजांचे बोधवचन क्र ८० –

 

वासनेच्या भक्षयामध्ये आपले मरण आहे. आपले मरण आपल्या डोळ्यांनी पाहण्यासाठी आपण भगवंताच्या नामात राहिले पाहिजे.

 

श्रीराम!

संपूर्ण मनाच्या श्लोकात आणि दासबोधात ‘विवेक’ ही जणू Central Theme ठेवलेल्या समर्थांनी मनाच्या श्लोकात म्हटले,

“विवेके क्रिया आपुली पालटावी|

अति आदरे शुद्ध क्रीया करावी||

जनी बोलण्यासारखे चाल बापा|

मना कल्पना सोडि संसारतापा||”

 

कल्पना – वासना – वृत्ति – कृती – परिणाम असा क्रम आहे, प्रपंचातही आणि परमार्थातही! मनुष्य जन्माला आल्यापासून विविध कल्पना करतो. आपल्या देह मन बुद्धि सकट सर्व मी आहे व याला लागलेले सर्व माझे आहे, हे सर्व कल्पनांचे मूळ आहे. या कल्पनासृष्टीतून मनुष्याच्या विविध वासनांचा जन्म होतो. मला अमुक मिळाले तर मी सुखी होईन हे त्यामागचे कारण देखील कल्पनामयच असते हे सहज लक्षात येईल. याच वासना सततच्या चिंतनाने मनामधून चित्तात प्रवेश करत्या झाल्या की त्या वासनांची वृत्ति बनते. मला अमुक गोष्ट मिळवायची आहे व ते मिळवण्यासाठी आवश्यक सर्व गोष्टी करण्याबद्दलचा जो कल्पनाधिष्ठित विचार तीच वृत्ति होय. त्यातून कृती जन्म घेते व एकदा कृती घडली की त्यानुसार फलप्राप्ती वा परिणाम जीवास अनुभवावा लागतो. या चक्रालाच संतांनी ‘वासनाचक्र’ असे नाव दिले.

 

ज्यावेळी मायेच्या थपडा खाऊन अथवा संतकृपेने झालेल्या शुद्ध विचाराचा परिणाम म्हणून मनुष्य आपल्या आयुष्याकडे थोडे का होईना त्रयस्थाप्रमाणे बघू लागतो त्यावेळी संत सद्गुरू त्याला सांगतात, तुझ्या वासना भगवंताकडे वळव. अनेक जणांच्या मनात हा प्रश्न रुंजी घालतो की जर आम्ही परमार्थ मार्गास लागलो, तर आमच्या विविध वासनांचे खच्चीकरण किंवा suppression होऊन आतमध्ये खदखद निर्माण होणार नाही का? त्यावेळी महाराजांसारखे संत आम्हाला योग्य दिशा देतात आणि सांगतात, do not suppress but divert.

 

जन्मोजन्मी साठलेली वासनांची शिदोरी अचानक रिकामी कशी होणार? परंतु जर हा मार्ग मनापासून चालण्याची इच्छा असेल तर वासनांची दिशा बदल. पण अनेकदा याचा अर्थ लक्षात येत नाही. काही विशेष प्रक्रिया आहे का यासाठी असा प्रश्न पडणे साहजिक आहे. तर विशेष प्रक्रिया नसून तोच क्रम इथेही लागू करा असे संत सांगतात. म्हणजे, कल्पना – वासना – वृत्ति – कृती – परिणाम याच क्रमाने आपल्याला विरुद्ध दिशेला जायचे आहे. महाराज म्हणतात, जगाच्या प्रवाहाच्या विरुद्ध दिशेने पोहणे म्हणजे परमार्थ. हे पोहणे म्हणजेच अगोदर आपल्या रूढ कल्पनांना तिलांजली देऊन संत – सद्गुरू – संतसाहित्य - संतविचार या कल्पनांनी आपले मन भरण्याकडे आपली दृष्टी वळवणे. कोणत्याही कल्पनेतून वासना निर्माण होणारच. या सद्गुरू उपदिष्ट भगवद् कल्पनांतून ज्या निर्माण होतात त्या वासना परमार्थाला हितकारक अशा असतात. साधन व्हावे, सहज सेवा घडावी, सर्वात आत्मरूप बघण्याचा अभ्यास व्हावा, संत ग्रंथ वाचन – संत श्रवण करण्यास मिळावे यासारख्या वासना भगवद् कल्पनातून स्वाभाविक निर्माण होतात. या वासना साधन – अभ्यासाने, अहर्निश प्रार्थनेने व सद्गुरू कृपेने दृढ झाल्या, की या वासनांमधूनच पारमार्थिक वृत्तीचा जन्म होतो. श्रीमहाराज जे म्हणतात, “परमार्थ हा स्वभाव बनावा” तो स्वभाव म्हणजेच पारमार्थिक वृत्ति होय. या वृत्तीतून स्वाभाविकच आपल्या ध्येयानुकूल कृती साधकाकडून होते. जास्त नामस्मरण व्हावे, नामचिंतनातच स्वतःला रमवावे, बहिर्मुखता कमीकमी करून आतमध्ये दृष्टी वळवावी हे त्या कृतीचे स्वरूप असते. आणि परीस स्पर्श झाल्यावर जसे लोखंडाचे सहजच सोने बनते, त्याची इच्छा असो वा नसो; तद्वत भगवद् संबंधी कल्पना, वासना, वृत्ति आणि कृतीने साधक सहजच शुद्ध होत होत अंतिमतः आपले मरण आपल्या डोळ्यांनी बघून जीवन्मुक्त होतो. हाच प्रवास आजच्या वचनात महाराज आम्हाला सांगत आहेत.

 

जन्मोजन्मी आम्ही ज्या वासनेला गोंजारून स्वतःचा अंतिम उद्धार यमाच्या भक्ष्यस्थानी घातला व त्याच वासनांनी “पुनरपि जननं पुनरपि मरणं” करत राहिलो, त्याच वासना गुरुकृपेने जेव्हा “नामाच्या” भक्ष्यस्थानी पडतात तेव्हा त्यांचे भस्म होते. महाराज म्हणतात, “ज्या ठिकाणी देहबुद्धी असते तेथेच वासना उत्पन्न होतात. देह मीच आहे या भावनेने वागणाऱ्या माणसाचे मन सारखे इंद्रियांतून बाहेर धावत असते. त्याच्या मनाची कधीच तृप्ति होत नाही. पण जो नाम घेऊ लागला, त्याचे मन हळूहळू बाहेर धावण्याचे कमी होते. बाहेरची धाव कमी झाली की वासनेचा जोर आपोआप कमी होतो. पुढे तेच मन नामामध्ये रंगून जाते. ज्या मनाने वासना भोगायची, तेच मन दुसरीकडे रंगू लागल्यावर वासना अपोआप क्षीण होते. काही दिवसांनी ती मरून जाते. वासना सूक्ष्म आहे, म्हणून तिचा काटा काढण्यास सूक्ष्मच अस्त्र पाहिजे, ते म्हणजे नाम होय!”

 

ही वासना शुद्ध कशी होते याचे technique देखील महाराजांनी सांगितले आहे –

“पापवासना अथवा वाईट विचार मनात येऊन लगेच त्यानुसार देहाने कुकर्म घडणे हा सर्वात खालचा – तामसी प्रकार होय. त्यापेक्षा वरच्या दर्जाचे ते की ज्यांच्या मनात वाईट विचार येतात पण त्यांना संयमाने आवर घालून ते कुकर्म ते प्रत्यक्षात घडू देत नाहीत. हा रजोगुणी प्रकार म्हणता येईल. याहून श्रेष्ठ, सात्विक वृत्तीचे जे असतात, त्यात पापसंकल्पना मुळीच नसते. आणि वासनांचा सर्वोच्च व शुद्ध सात्विक प्रकार म्हणजे, सद्गुरू आणि भगवंत यांच्याखेरीज काहीही विचार मनात न येणे. संत व सिद्ध पुरुष हे असे असतात. सतत नामस्मरण राहिले म्हणजे माणूस अपोआप या पायऱ्यांनी वर चढतचढत श्रेष्ठत्वास पोचतो!”

 

तामसिक व राजसिक वासनांनीच जन्मोजन्मीचे महादोष निर्माण होतात आणि म्हणूनच सद्गुरू उपदिष्ट नामसाधनेचे आत्यंतिक महत्त्व; जेणेकरून समर्थ म्हणतात तसे,

 

“जयाचेनि नामे महादोष जाती|

जयाचेनि नामे गती पाविजेती|

जयाचेनि नामे घडे पुण्य ठेवा|

प्रभाते मनी राम चिंतीत जावा||”

 

|| जय जय रघुवीर समर्थ||

 

|| श्रीनाम समर्थ ||  

Tuesday, June 22, 2021

श्री ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराजांचे बोधवचन क्र ७९ --

 


श्रीमहाराजांचे बोधवचन क्र ७९ –

 

रामबाण म्हणजे बरोबर काम करणारा बाण, आपल्या लक्ष्यावर अचूक जाणारा बाण. रामाचा बाण पुन्हा परत येऊन भात्यामध्ये बसे. त्याचप्रमाणे नाम अगदी रामबाण आहे. कारण रामाच्या जवळ राहणारे आणि अगदी अचूक रामाकडे नेणारे नामाशिवाय दुसरे कोणतेच साधन नाही.

 

श्रीराम!

रामारायांच्या बाणाचा वेध इतका लक्ष्यानुसंधानी आहे की आजतागायत “रामबाण” हा शब्द “अचूकते” बरोबर समानार्थक वापरला जातो. तुलसी रामायणात संतश्रेष्ठ तुलसीदासांनी भगवान शिव शंकरांच्या मुखी एक अप्रतिम असे श्रीराम स्तवन घातले आहे. उत्तरकांडातल्या या काही ओळी उद्धृत करण्याचा मोह इथे आवरत नाही. भोलेनाथ आपल्या आराध्याची स्तुती करताना म्हणतात,

 

“दससीस बिनासन बीस भुजा| कृत दूरि महा महि भूरि रुजा||

रजनीचर बृंद पतंग रहे| सर पावक तेज प्रचंड दहे||”

-- दहा शिरे व वीस भुजा असणाऱ्या रावणाचा विनाश करून पृथ्वीचा महारोग दूर करणाऱ्या हे श्रीरामा, राक्षससमूह रूपी जे कीटक होते, ते सर्व तुमच्या बाणरूपी अग्नीच्या प्रचंड तेजाने भस्म झाले.

“महि मंडल मंडन चारुतरं| धृत सायक चाप निषंग बरं|

मद मोह महा ममता रजनी| तम पुंज दिवाकर तेज अनी||”

-- तुम्ही या पृथ्वीमंडलाचे अतिसुंदर भूषण आहात. तुम्ही श्रेष्ठ बाण, धनुष्य व भाता धारण केलेले आहात. मद, मोह आणि ममतारूपी रात्रीच्या घोर अंधाराचा नाश करण्यासाठी तुम्ही सूर्याचे तेजोमय असे किरण आहात.

“मनजात किरात निपात किए| मृग लोग कुभोग सरेन हिए|

हति नाथ अनाथनि पाहि हरे| बिषया बन पावंर भूलि परे||”

-- कामदेवरूपी भिल्लाने मनुष्यरूपी हरिणांच्या मनात कुभोगरूपी बाण मारून त्यांना पाडले आहे. हे नाथ, पाप-तापाचे हरण करणारे हे हरी, त्या कामाला मारून विषयरूपी वनात भटकणाऱ्या या बिचाऱ्या अनाथ जीवांचे रक्षण करा.

 

पुढे म्हणतात,

“मुनि मानस पंकज भृंग भजे| रघुबीर महा रनधीर अजे|

तव नाम जपामि नमामि हरी| भव रोग महागद मान अरी||”

-- हे मुनींच्या मनरूपी कमळातील भ्रमरा, हे महान रणधीर आणि अजिंक्य असणाऱ्या रघुवीरा, मी तुम्हाला भजतो. हे हरी, मी तुमचे नाम जपतो आणि तुम्हाला नमस्कार करतो. तुम्ही जन्म-मरणरूपी रोगाचे महान औषध आहात आणि अहंकाराचे शत्रु आहात!

 

हे नीळकंठेश्वराच्या कंठातील गोड कवनच जणू आजच्या वचनात महाराजांनी आम्हाला साध्या सोप्या भाषेत रामरायाच्या स्मरण रूपी बाणाचे महत्त्व सांगताना सांगितले आहे. या जगाच्या नश्वरतेतून बाहेर पडून शाश्वत सत्याकडे जाण्याचा मार्ग हा दृढ स्मरणातून जातो म्हणतात महाराज आणि म्हणतात या स्मरणाला उत्तम उपाय नाम; म्हणून नामाचे अनन्य साधारण असे महत्त्व आहे.

 

या आजच्या वचनात दोन वाक्ये अतिशय महत्त्वाची व भावार्थाच्या दृष्टीने गूढ आहेत.

“रामाचा बाण पुन्हा परत येऊन भात्यामध्ये बसे. त्याचप्रमाणे नाम अगदी रामबाण आहे.” –

लक्ष्याच्या दिशेने बाण सोडल्यानंतर श्रीराम जणू त्या लक्ष्याशी तादात्म्य पावत असत, इतके त्यांचे धनुष्यप्राविण्य अफाट होते. कोणतेही कार्य जेव्हा सामान्य व्यक्ती देखील पूर्ण लक्ष देऊन करतो, त्यावेळी ती त्या कार्याशी व त्या कार्यातील घटकांशी जणू एकरूप होत असते, तिला स्वतःचे वेगळेपणाने भान नसते. यालाच एका दृष्टीने ध्यान म्हणता येईल. Mindfulness किंवा Mindful Meditation असा शब्दही यासाठी आपण आजकाल ऐकतो. याचप्रमाणे, जो नाम स्मरतो, तो जेव्हा त्या नामाशी – म्हणजेच नामीशी तादात्म्य पावतो, त्यावेळी तो वेगळेपणाने उरत नाही, नाम हे केवळ साधन म्हणून त्याच्यासाठी उरत नाही. जसा श्रीरामांचा बाण पुन्हा भात्यात येऊन बसतो, तद्वत हे नामरूपी स्मरण त्या साधकाला आपल्या खऱ्या मी-शी (भगवंताशी) तादात्म्य पावण्याची कला शिकवते आणि मग तो नामरूपच होतो! अशा दृष्टीने इथे महाराज म्हणताहेत, नाम अगदी रामबाण आहे!

 

प्रत्येक श्रीमहाराजांचे वचन हे त्या त्या स्तरावरच्या साधकाला अतिशय उपयोगी पडते. आज अजून आम्हाला नाम म्हणजेच राम आहे या मूळतत्त्वाचा (बुद्धीने परिचय असला तरी) अनुभूतीच्या दृष्टीने परिचय नाही आणि म्हणून तसे न सांगता महाराज आम्हाला सांगताहेत, रामाच्या जवळ राहणारे नामाशिवाय दुसरे काही नाही. त्यामुळे नामच आम्हाला त्या मूळ तत्त्वाचा परिचय घडवून आणू शकते हे यातून त्यांना सांगायचे आहे. म्हणूनच अजून एकीकडे महाराज म्हणतात, “स्तोत्राने भगवंताची भेट घेणे म्हणजे त्याला पत्र पाठवण्यासारखे आहे. आणि नामस्मरण हा थेट संवाद आहे!” त्यामुळेच नामासारखे साधन ज्याने दृढ धरले त्याला भगवंताच्या अस्तित्वाचे भान मनामध्ये जागवण्यासाठी जास्त कष्ट पडत नाहीत आणि अस्तित्वाचे एकदा खरेखुरे भान आले म्हणजे नामाचा विसर पडो म्हटले तरी पडत नाही म्हणतात महाराज. एकदा पूज्य बाबा बेलसरेंनी महाराजांना विचारले, महाराज, तुम्हाला कधी नामाचा विसर पडलाय का?” एकदम उसळून महाराज म्हणाले, “जिथे रोमारोमात नाम आहे, तिथे विसर कसा पडेल?” हा तो परेतून उगम पावून अंतिम लक्ष्याच्या दिशेने वैखरीतून जपलेला नाम – बाण, जो पुन्हा त्याच परावाणीत (भात्यात) स्थित होऊन अंतिम समाधान देतो!

 

हे ज्याला कळले तो भोलेनाथांसारखेच भक्तीचे वरदान प्रभूंकडे मागतो, जे म्हणाले,

“बार बार बर मागउं हरषि देहु श्रीरंग|

पद सरोज अनपायनी भगति सदा सतसंग||”

-- हे श्रीराम, मी तुम्हाला वारंवार हेच वरदान मागतो की, मला तुमच्या चरणकमलांविषयी दृढ भक्ति आणि भक्तांचा सत्संग नेहमी मिळो. हे लक्ष्मीपती, प्रसन्न होऊन मला हेच वरदान द्यावे!”

 

|| श्रीनाम समर्थ ||